आज कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे इतकी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे की, घरात बसून मरण्यापेक्षा आम्ही काम करून मरू, आम्हाला काम करू द्या, आमच्या जबाबदारीवर मरू द्या, अशी म्हणण्याची वेळ सामान्यांवर येऊन ठेपली आहे. असेही सरकार मी जबाबदार, माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणत आहे, मग का आमची कोंडी केली जात आहे? इतके उपाय करूनही रोग नियंत्रणात येत नसेल, तर किती दिवस घाबरून घरात बसायचे, असा प्रश्न निर्माण होतो. कालच काही संशोधकांनी म्हटले आहे की, कोरोनाचा जंतू हवेतूनही येतो. म्हणजे तो हवेतून घरात बसल्यावरही येणार असेल, तर अशा हिरण्यकश्यपू समान राक्षसी व्हायरसला संपवण्यासाठी आपल्याला नरसिंहा बनले पाहिजे. ते घरात बसून कसे होणार?
सध्या जळी स्थळी काष्टी पाषाणी आणि आता हवेतूनही तो येतो आहे, असे असेल तर आम्ही घरात बसून काय करणार आहोत?, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. जर देश बंद करायचा आहे, राज्य बंद करायचा आहे, महामारीचे संकट आहे, तर सगळे उपचार फुकट व्हायला पाहिजेत. लोकांकडे पैसे नसताना त्यांना औषधे विकत का घ्यावी लागतात? आई जेऊ घालेना आणि बाप भिक मागू देईना, अशी अवस्था सामान्यांची झालेली आहे. म्हणजे एकीकडे आम्ही मुंबईसारखे महानगर २४*७ सुरू ठेवायचे जाहीर करतो आणि दुसरीकडे सगळा देश बंद करतो. हा काय प्रकार आहे? असंही मरायचं, तसंही मरायचं मग आता सगळं खुलं करा आणि एकदा होऊन जाऊ दे काय ते, असे आज प्रत्येकाच्या मनात येत आहे. एक वर्ष होऊन गेले, तरी आम्ही कोंडूनच घेत असू, शाळा, शिक्षण, नोकरी, उद्योग सगळ्यांची वाताहात होत असेल, तर हात-पाय हालवावेच लागतील. किती काळ घरात बसणार? आणि आता तर तो हवेतूनही येत असेल, तर घरात बसून तरी काय फायदा? टाळेबंदीबाबत अनिश्चित धोरण आणि जिल्हास्तरावरील धरसोडवृत्तीमुळे अर्थचक्र पूर्वपदावर येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत नसल्याने उद्योगांचा प्रतिसाद कमी आहे. सरकारने सगळे अधिकार प्रशासनाला देऊन टाकून घरात बसून सरकार काम करत आहे. त्यामुळे प्रशासनाचा कारभार हा गझनीच्या मोहमंदासारखा झाला आहे. आज लॉकडाऊन उठवा, उद्या शिथील करा, परवा लागू करा, असले काही तरी पोरकट खेळ चालले आहेत; पण यामध्ये मरतो आहे तो सामान्य माणूस.
प्रशासनाच्या अधिकाºयांचे, कर्मचाºयांचे पगार चालू आहेत. त्यांना काय फरक पडतो कार्यालय सुरू राहिले काय आणि बंद झाले काय? हातावर पोटे असणाºया, खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाºया, चार महिने कुणी बिनपगारी, कुणी अर्धपगारी तर कुणी नुसतेच शंख करत बसले आहेत त्यांचे काय? हा उद्रेक होईल तेव्हा लोक सरकारला जबाबदार धरतील. प्रशासन तेव्हा गप्प असेल. हे धंदे आता बंद करा आणि जनतेला त्यांच्या जबाबदारीवर मोकळे सोडा, असे सांगायची आता वेळ आलेली आहे.
किती दिवस ठेवणार आहात बांधून? ६० ते ६५ टक्के लोक बरे होत आहेत. बाहेर पडत आहेत. कसलीही औषधे नसताना, लस नसताना बरी होत आहेत, असे असताना चिंता कसली करायची? सुरू करा देश. सरकारी, राजकीय पक्षांचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी हा खटाटोप चालला आहे काय?, असाच प्रश्न कधी कधी पडतो. निवडणुकांमध्ये गर्दी होत आहे, प्रचारसभा वेगाने होत आहेत. मग लोकांचा रोजगार बुडाला, शिक्षण बुडाले, तोंडचा घास जात असताना निवडणुका नसल्या, लोकप्रतिनिधी नसले म्हणून काय बिघडले असते? नसती घेतली पंढरपूरची पोटनिवडणूक तर काय बिघडले असते?
आज सरकार फक्त घोषणा करते. आर्थिक मदत मिळेल, कर्ज मिळेल, अनुदान मिळेल वगैरे वगैरे. पण हे काहीही होत नाही. कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँका सामान्यांना, तरुणांना, नोकरदारांना कोव्हीड १९ चे कर्ज देण्यास तयार नाहीत. फक्त त्याची जाहिरात केली जात आहे. त्यामुळे सामान्यांची शुद्ध फसवणूक केली जात आहे. स्वस्त दरात धान्य, रेशनचे धान्य हे फक्त गोरगरीबांना मोफत वाटा, असे आदेश दिले जातात. ते कोणाला दिले जाते? सामान्य, मध्यमवर्गीय लोक काय माणसे नाहीत? त्यांना कसली मदत का नाही केली जात? प्रामाणिकपणे टॅक्स भरणारा वर्गच आज भरडला जातो आहे. स्वत:ला तज्ज्ञ म्हणवणाºया राज्यकर्त्यांच्या हे डोक्यात कसे येत नाही? प्रामाणिकपणे कर भरणारा मध्यमवर्ग जर तुम्ही घरात बसून संपवाल तर सरकारी तिजोरीत महसूल कुठून येणार आहे? कर चुकवेगिरी करणाºयांच्या जिवावर हा देश चालणार आहे का?
केंद्राने आत्मनिर्भर होण्याची योजना जाहीर केली; पण जे आधीच आत्मनिर्भर होते त्यांना मात्र संपवले जात आहे. आज राज्यात सूक्ष्म-लघू-मध्यम व मोठे असे सुमारे दीड लाख उद्योग टाळेबंदीपूर्वी नियमितपणे कार्यरत होतेपण या सर्व अनिश्चिततेचा परिणाम राज्यातील उद्योगचक्रावर झाला आहे. सरकारच्या ध्येयधोरणांची दिशा काय असेल, याबाबत अनिश्चितता असल्याने उद्योजक साशंक आहेत. बाजारपेठा उघडण्याबाबतही वेगवेगळे निर्णय सुरू असतात. त्यातून मागणी होत नाही. अनेक शहरांत पुन्हा टाळेबंदी झाली. त्यामुळे पुन्हा उद्योग सुरू करण्याबाबत उद्योजकांमध्ये साशंकता आहे. छोटे छोटे व्यवसाय असणारे अनेक जण अडचणीत आले आहेत. अनेक कलाकार, चित्रकार, विविध प्रदर्शने भरवून आपल्या कलेच्या जोरावर आत्मनिर्भर असलेले लोक आज देशोधडीला लावण्याचा प्रकार होत आहे. छोटे विक्रेते, कारागीर, रोजंदारीवर काम करणारे लोक आज उध्वस्त झालेले आहेत. पोलीस आणि प्रशासन घरात बसा, घरात बसा म्हणून आग्रह करत आहे; पण घरात बसून पोट भरायची कशी? उपाशी मरण्यापेक्षा काम करून मरू असा विचार आता प्रत्येकाच्या मनात येत आहे. यातून फार मोठा उद्रेक होऊ शकतो. व्हायरस जर कुठूनही येणार असेल, हवेतूनही येत असेल तर घरात बसून काय उपयोग? जनता म्हणेल तुम्ही बंद करायच्या फंदात पडू नका आम्हाला आमच्या जबाबदारीवर मरू द्या आता. असेही मरणार, तर तसे मरू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा