रविवार, १८ एप्रिल, २०२१

घाबरवणे थांबवा!


कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे हे मान्य. सरकार आणि नागरिक त्यांच्या पातळीवर पाहिजे ती खबरदारी घेतही आहेत. सगळीकडून युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. काही लोकांनी नियमांचे उल्लंघन केले असले, तरी सगळेच बेजबाबदार आहेत असे नाही. सरकारच्या प्रत्येक आवाहनाला नागरिक प्रतिसाद देत आहेत. यातील सकारात्मकता समोर येणे गरजेचे आहे, पण सध्या बहुतेक वृत्तवाहिन्यांवरून जनतेला घाबरवून टाकणारी वृत्तं दाखवली जात आहेत. नकारात्मक वृत्त दाखवली जात आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत होत आहेत. त्यामुळे वृत्त वाहिन्यांनी घाबरवणे सोडले पाहिजे आणि काही सकारात्मक वृत्त दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सातत्याने या वाहिन्या रुग्णांचा आकडा इतके हजार झाला, तितके लाख झाला म्हणून सांगत आहेत. परंतु दीड लाख रुग्ण नवे सापडले तरी लाखभर रुग्ण बरे झाले आहेत हे सांगितले जात नाही. त्यामुळे माणसांच्या मनात एकप्रकारची भीती निर्माण केली जात आहे. अशाप्रकारची वृत्तं देणे थांबवले पाहिजे. जरूर पडली तर सरकारने यात हस्तक्षेप करून या वाहिन्यांवर काही निर्बंध लादले पाहिजेत. किती रुग्ण वाढले हे दाखवतानाच कोरोनाचे किती रुग्ण बरे झाले, हे का सांगितले जात नाही? या रुग्णांना बरे करण्यात त्या डॉक्टर, आरोग्यसेवक, सरकारी यंत्रणा यांचे परिश्रम लागलेले असतात. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याऐवजी थापेगिरीच्या बातम्या देण्याचे जे चालले आहे ते थांबले पाहिजे. खरं तर कोरोनाची भयानकता, भीतीदायक चित्र या वाहिन्यांमध्ये जेवढे आहे तेवढे प्रत्यक्षात दिसत नाही. त्यामुळे या वाहिन्यांनी सकारात्मकतेने वृत्त देणे आता बंधनकारक आहे.


राजकीय पक्षांनी लसीच्या तुटवड्याचे जेवढे राजकारण केले नाही त्याच्यापेक्षा जास्त राजकारण हे वृत्तवाहिन्यांनी केले आणि जनतेला घाबरवून सोडले. लसीचा तुटवडा, लसीचा साठा संपला, लसीकरण बंद झाले या बातम्या इतक्या भडकपणे पसरवल्या की, नंतर लसींचा स्टॉक नियमित आला तरी नागरिकांना त्याची माहिती मिळाली नाही. आपल्या इथले लसीकरण केंद्र बंद झाले असाच समज नागरिकांचा झाला. या लसीकरणाची सकारात्मक बातमी देण्याचे औचित्य एकाही वाहिनीने दाखवले नाही आणि विनाकारण महाराष्ट्राला बदनाम केले गेले. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि केंद्र सरकार यांच्यात विनाकारण भांडणे लावण्याचा प्रयत्न या वाहिन्यांनी केला आहे. त्यामुळे आज सामान्य माणसांना वाटते की, लॉकडाऊनच्या काळात या वाहिन्यांवर बंदी घातली आणि पुन्हा रामायण, महाभारत दाखवणे सुरू केले तर बरे होईल.

महाराष्ट्राने देशात सर्वाधिक लसीकरण केले, त्याचे कौतुक कोणत्या वाहिनीने केले नाही. देशात अकरा कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले. त्यापैकी एक कोटी महाराष्ट्रात लसी दिल्या गेल्या आहेत याचे कौतुक आणि अभिमान कोणी बाळगला नाही. भारतात ८५ दिवसांत दहा कोटी लोकांना लसीकरण करून जागतिक विक्रम केला याची माहिती कोणी दिली नाही. अमेरिकेला १० कोटी लोकांना लस देण्यासाठी ८९ दिवस लागले. त्याअगोदर भारताने हा टप्पा पूर्ण केला आहे. असे असताना टंचाईचा प्रश्न येतो कुठून? पण नकारात्मक बातम्या दिल्याने आणि नागरिकांना घाबरवून सोडण्याने महाराष्ट्राची बदनामी केली गेली. महाराष्ट्राला जर पुरेसा लसींचा साठा मिळाला नसता, तर १ कोटीचा टप्पा महाराष्ट्राने गाठला असता का? महाराष्ट्राला वेगाने लसीकरण करता आले असते का?


प्रारंभी याच वाहिन्यांनी लसीबाबत संभ्रमावस्था निर्माण करून नागरिकांच्या मनात भीतीची, संभ्रमाची अवस्था निर्माण केली. को-व्हॅक्सीन चांगली की कोव्हिशिल्ड चांगली? सरकारने मान्यता दिलेली आहे, जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली आहे, तर या शंका उपस्थित करण्याचे कारण काय? तुम्ही काय तज्ज्ञ आहात त्यातले? पण नाही, उगाच साप सोडून द्यायचा आणि धोपटत बसायचे. या प्रकाराला सरकारने चाप लावला पाहिजे. बातम्या सकारात्मक द्या, संशोधनात्मक द्या, नाहीतर वाहिन्यांवर बंधने आणावी लागतील. बहुतेक वाहिन्यांवर जे परिसंवाद घेतले जातात ते तर दिव्य असतात. नळावरची भांडणे बरी, अशा चर्चा केल्या जातात. कसलाही निष्कर्ष नाही. कोणाला तरी टार्गेट करायचे आणि भांडत बसायचे. अत्यंत हीन पातळीवर या वाहिन्या जातात. जनतेला घाबरवून सोडणे या ध्येयाने काम करणाºया या वाहिन्यांवर बंदी घातली तर कोरोना लवकर आटोक्यात येईल यात शंका नाही. कारण जनतेला घाबरवणे हाच एक कलमी कार्यक्रम यातून होताना दिसत आहे. हे घाबरवणे थांबवले पाहिजे.

प्रत्येक खेपेला काहीतरी नवीन लफडे काढायचे आणि त्याची अतिरंजीत वृत्तं प्रसारित करायची. गेल्या आठवड्यात लसींचा तुटवडा यावर एरंडाचे गुºहाळ चालवून झाले. त्याअगोदर वाझे, परमबीर सिंह, देशमुख यांचे दळण दळून झाले. या काळात कोरोना कुठेही त्यांना दिसला नाही. आता कोरोनामुळे घाबरवणे चालले आहे. इतके परप्रांतीय आपल्या गावी निघाले, स्टेशनवर गर्दी झाली म्हणून कांगावा केला, पण रोजगार गेल्यावर कामगार घराकडेच जाणार ना? त्यासाठी आदळआपट कशासाठी? स्टेशनवर झालेल्या गर्दीमुळे कांगावा करणारी वृत्तं दिली. मग का कोणत्या वाहिनीने पाचपंचवीस मजुरांना, आपल्या गावी जाणाºया कामगारांना थांबवून आम्ही त्यांचा पंधरा दिवसांचा खर्च करतो असे सांगितले? बाहेरून आलेले लोक खोल्यांमध्ये भाड्याने राहतात. खानावळीतून जेवतात. त्यांना चहापाणी, रोजगार काहीच मिळत नसेल तर घरी जाण्याशिवाय पर्याय तो काय? आज रस्त्यावर चहाही मिळत नाही. दारूची पार्सल सर्रास विकली जातात, पण लोकांना चहाची टपरी मिळत नाही. यावर या वाहिन्या बोलत नाहीत. फक्त नागरिकांना घाबरवणे आणि भडक वृत्तं देणे, त्यात रंजकता निर्माण करणे अशाप्रकारच्या आक्रस्ताळ्या वाहिन्यांवर बंदी घातली तर देशातील निम्मे प्रश्न सुटतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: