कृपाशंकर सिंह हे एक प्रातिनिधीक नाव असेल; पण आज काँग्रेसमध्ये असलेली खदखद अस्वस्थता ही कृपाशंकर सिंह यांच्याशी संवाद साधताना जाणवली. शंकर म्हणजे शुभ कल्याण करणारा, त्यातून कृपा करणारा, शंकर जर काँग्रेसमध्ये होता तर त्याला डावलल्याने अस्वस्थता ही निर्माण व्हायचीच. एकेकाळी मुंबई प्रदेश काँग्रेसची मोठी जबाबदारी सांभाळलेले, गृह खाते सांभाळलेले नेतृत्व काँग्रेस कशी काय दुर्लक्षित करू शकते. अशा व्यक्तींकडे केलेल्या दुर्लक्षामुळेच आज काँग्रेसला ना अध्यक्षपद निवडता येते की, कुठे यश मिळत नाही.
कृपाशंकर सिंह यांची भाजप नेत्यांशी असलेली जवळीक ही त्यांच्याबाबत संशय निर्माण करणारी ठरलेली. खरं तर राजकारणात कोणी कोणाचा नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो. राजकारणापलीकडे काही आहे की नाही? पन्नास वर्ष काँग्रेससोबत असणारे, मुंबई महाराष्ट्रात राहणारे कृपाशंकर सिंह यांच्याकडे भाजपच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून त्यांना डावलले जाते. याची खंत कृपाशंकर यांच्या बोलण्यात जाणवत होती. शिवसेना आणि काँग्रेस कधी सत्तेसाठी एकत्र येतील, असा कोणी विचारही केलेला नव्हता. पण ते एकत्र आले. मग भाजपात असलेल्या काही मित्रांशी संपर्क ठेवल्यामुळे लगेच भाजपच्या यादीत त्यांना टाकले गेले आणि त्यांची सुरक्षा व्यवस्थाही काढून घेण्यात आल्याने कृपाशंकर सिंह नाराज झाले, अस्वस्थ झाले.
ही बाब काँग्रेसच्या अनेक लोकांबाबत झालेली आहे. याची अगदी सोदाहरण माहिती कृपाशंकर सिंह यांनी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी बोलतात एक आणि करतात एक, त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी व्यक्त होताना दिसते. कृपाशंकर यांच्या मनातील भावना आज प्रत्येक जुन्या जाणत्या काँग्रेस नेत्यांच्या मनात आहे. कोणी त्या बोलून दाखवतो तर कोणी नाही. सहा महिन्यांपूर्वी अगदी निष्ठावंत आणि कट्टर काँग्रेसी असलेल्या २३ नेत्यांनी याबाबत सोनिया गांधींना पत्रही पाठवले होते; पण महाभारतात चांगला सल्ला देणाºया विदुराकडे धृतराष्ट्राने जसे दुर्लक्ष केले, तसेच या २३ विदुरांना काँग्रेसने दोष दिला. कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या नेत्यांना तर काँग्रेसने दुषणे दिली आणि बाहेरचा रस्ताही दाखवला. कोणाला भाजपात जाण्याचा सल्ला देण्यापर्यंत अपमानित केले. ज्यांनी वर्षानुवर्षे काँग्रेससाठी काम केले, काँग्रेस जपली त्यांना ही वागणूक मिळत असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढताना दिसते आहे.
ज्या राजीव गांधींनी १९८४ला काँग्रेसला तरुणांचा चेहरा दिला, धोतरातील काँग्रेस सुटाबुटात आली त्याच तरुण काँग्रेसला कुजवण्याचे काम राहुल गांधी करताना दिसत आहेत. मध्य प्रदेशातील निवडणुकीपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचे गाजर दाखवून मध्य प्रदेशची जबाबदारी दिली होती. काँग्रेसला बहुमत मिळाले; पण ऐनवेळी ज्योतिरादित्य यांचा पत्ता कट केला आणि कमलनाथ यांना मुख्यमंत्री केले गेले. तरुणांना नाराज करून काँग्रेसने काय साध्य केले? एक फार मोठा गट घेऊन ज्योतिरादित्य बाहेर पडले आणि भाजपला जाऊन मिळाले. त्यामुळे काँग्रेसला संपवण्यासाठी आता भाजपची गरज उरलेली नाही, तर राहुल गांधीच ते काम करताना दिसत आहेत. अनेक अस्वस्थ कृपाशंकर सिंह, ज्योतिरादित्य ठिकठिकाणी आहेत. सचिन पायलट यांच्याबाबतही तेच केले. त्यांना मुख्यमंत्रीपदाचे गाजर दाखवले आणि गेहलोत यांना मुख्यमंत्री केले गेले. राजस्थानातील काँग्रेस अस्वस्थ आहे.
महाराष्ट्रात फारशी वेगळी परिस्थिती नाही. भाई जगताप यांच्याकडे मुंबईची जबाबदारी दिलेली आहे. पण संजय निरूपम, मिलींद देवरा हे युवानेते बरोबर आहेत का? राज्यात नाना पटोलेंकडे जबाबदारी देण्याचे चालले आहे; पण अशोक चव्हाण त्यांना मदत करणार का? वडेट्टीवार त्यांना सहकार्य करणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. ही अस्वस्थता काँग्रेस नेतृत्वाने निर्माण केलेली आहे. यथा राजा तथा प्रजा म्हणतात त्याप्रमाणे अस्वस्थ, अकार्यक्षम आणि निर्णय घेता येऊ न शकणारे नेतृत्व यामुळे पक्ष गाळात जात आहे. या चिंतेने जुने नेते अस्वस्थ आहेत. त्याचे प्रातिनिधीक स्वरूप म्हणून आज कृपाशंकर सिंह यांच्याकडे पहावे लागेल.
कृपाशंकर सिंह यांनी चर्चेदरम्यान मांडलेला एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे काँग्रेसला नेतृत्वाची दुसरी फळी निर्माण करता आली नाही. बाकी पक्षांमध्ये ती तयार झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर नेत्यांची लाइन आहे. शरद पवारांनंतर अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आहेत, त्यांच्यापुढे रोहित पवारही तयार होत आहेत. शिवसेनेत उद्धव ठाकरेंबरोबरच आदित्य ठाकरे यांचेही नेतृत्व पुढे येत आहे. भाजप तर नेते तयार करणारीच संघटना आहे; पण काँग्रेसला दुसºया फळीतील नेते तयार करता येत नाहीत. सोनिया गांधींनंतर कोण? राहुल गांधींशिवाय कोण? फक्त प्रश्नचिन्ह. कोणी नवा पर्याय देऊ शकत नाही. कोणते दुसरे नाव मान्य होत नाही. कसे येणार नवे युवक काँग्रेसकडे? काय असणार आहे या पक्षाचे भवितव्य? या विचाराने आज वरीष्ठ काँग्रेस नेते अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेचे प्रतिनिधीत्व कृपाशंकर सिंह यांनी केल्याचे दिसते आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा