रविवारी जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ८ दिवसांचा अल्टिमेटम दिलेला होता. लोकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले होते. कठोर कारवाई आणि दंडाची भीतीही दाखवली होती, तरीही अजूनही अनेक लोक जागृत नाहीत. दोन दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढलेच आहेत. त्यात मंत्रालयातच ३५ रुग्ण वाढले आणि मुंबईतील रुग्ण वाढ ही अचानक ३६ टक्के झालेली आहे. हा प्रवाह असाच सुरू राहिला, तर पुन्हा लॉकडाऊन अटळ आहे; पण तो कोणालाच परवडणारा नाही. रोगापेक्षा इलाजाने माणसे मरतील, अशी अवस्था पुन्हा लॉकडाऊन लागला तर होईल.
राज्यात पुन्हा करोनाचे प्रमाण वाढले आहे. वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. पुन्हा लॉकडाऊन करणार का, हा प्रश्न वेगाने व्हायरल झाला आहे. रुग्णसंख्या वाढीच्या कैकपटीने प्रश्नाचा वेग जास्त आहे. ते स्वाभाविक आहे. गेल्या काही दिवसांतील स्थिती आणि मंत्र्यांनी केलेली विधाने पाहता लोक चिंतेत आहेत. त्यावर आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीही दम भरला आहे. निर्बंध काटेकोरपणे पाळा. नागरिकांच्या प्रतिसादाचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, म्हणजे लॉकडाऊनबाबत ठरवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे संकट कसे टाळायचे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. पुन्हा १५ दिवसांचा लॉकडाऊन घेतला, तरी माणसे उध्वस्त होतील. त्यामुळे ज्या कारणांनी लोक मास्क घालणे टाळतात, त्या कारणांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. सर्वात प्रथम तंबाखू, गुटखा, पान खाणे यावर बंदी घातली पाहिजे. जेणेकरून थुंकून हे लोक घाण करतात व रोगराई पसरते. त्यासाठी मास्क काढतात. त्यामुळे सगळ्या पानपट्ट्या बंद करून टाका. तंबाखू खाणे, जवळ बाळगणे हा गंभीर गुन्हा समजला जावा आणि ज्याच्याकडे तंबाखू, गुटखा याची पुडी सापडेल त्याला भरपूर दंड करा, कारावासाच्या शिक्षेची तरतूद करा. याशिवाय रस्त्यावर थुंकणारे, मास्क न घालणाºया लोकांना सामान्य लोकांनी विरोध करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले पाहिजे. एखादा थुंकत असेल, तर त्याला कोणी विरोध केला, तर तो अंगावर धावून येतो. कारण हे तंबाखू खाणारे गुंड स्वरूपाचे असतात. सभ्य माणसे तंबाखू, पान खात नाहीत. या असभ्य माणसांवर कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी मदतीची पथके असली पाहिजेत. अशाप्रकारे गैरवर्तन करणारे, विनामास्क वावरणाºयांची तक्रार करण्यासाठी व्यवस्था असली पाहिजे. मी जबाबदार असे सरकारने वदवून घेतले आहे, तर जबाबदार घटकांना पकडून देणाºया सामान्य माणसांना बक्षीस देण्याची योजना सरकारने जाहीर करावी. विना मास्क पकडला त्याला २०० रुपये दंड केला, तर जो सामान्य माणूस असा विना मास्कवाला पकडून देईल, त्याला त्या दंडातील काही टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्याची व्यवस्था असावी. याचा चांगला परिणाम होईल आणि एकमेकांना पकडून देण्याच्या नादाने काहींना अर्थार्जन होईल आणि नियम मोडणाºयांना आळा बसेल.
मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी करण्यास सांगितले आहे. राजकीय पक्षांनीही स्वत:ला आवरावे, असे नमूद केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हातात जादूची छडी नाही. त्यांनी छडी फिरवली, म्हणजे कोरोना थांबणार नाही. कोरोनाची त्रिसूत्री सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचे पालन आवश्यक आहे. लोक ज्या भीतीने शंका कुशंका व्हायरल करत आहेत, त्यातले थोडे जरी गांभीर्य त्यांनी कृतीत दाखवले, तरी बरेच आटोक्यात येणार आहे; पण राजकीय लोकांना त्याचे अजूनही भान नाही. १५ दिवस गायब झालेले मंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी केवढे शक्तिप्रदर्शन केले. हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. त्यात एकजरी कोरोना बाधित असेल, तर तो किती जणांना संसर्ग करेल? तेव्हा अशा नेत्यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे. पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी करण्याअगोदर अशी गर्दी का केली, याची चौकशी करणे आवश्यक आहे, कारण या लोकांमुळे संपूर्ण महाराष्ट्र वेठीला धरला जाणार आहे. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. कारण आता लॉकडाऊन परवडणारा नाही. वारंवार निर्बंध, संचारबंदी होणे हे योग्य नाही. त्यामुळे खरोखरच कठोर पावले उचलावी लागतील हे नक्की.
आजवर राज्यात ९ लाख लोकांना लस देण्यात आलेली आहे. आता पुढचा टप्पा सुरू होईल; पण लस देण्याचे तंत्र केंद्राच्या हातात आहे. खरं तर स्थानिक स्तरावर निर्णय घेतले गेले असते, तर वेगात काम झाले असते; मात्र ते उशिरा समजले. आता लसीबाबतही तीच चूक होताना दिसत आहे. ठराविक संख्येने डोस आणि समूह निर्धारित करून देण्याची योजना आहे. बरे, ज्यांचे सुरुवातीला नाव समाविष्ट केले आहे त्यांच्यापर्यंत मेसेजच गेलेले नाहीत. ज्यांच्यापर्यंत गेले ते लोक उदासीन असल्याचे आढळून आले आहेत. १ कोटी ११ लाख जणांना आतापर्यंत लस दिली गेली आहे. १३० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. एकटे सरकार आणि त्यांची यंत्रणा यासाठी पुरी पडणार नाही. काही निर्बंध शिथिल करावे लागतील. विश्वास ठेवून अन्य लोकांना यात सामावून घ्यावे लागेल. रोग रोखण्यासाठी प्रभावी लसीकरण, वेगाने लसीकरणाची सोय झाली पाहिजे आणि लॉकडाऊन न करता निर्बंध मोडणाºयांवर कारवाई हे महत्त्वाचे असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा