सामना ऐन निर्णायक स्थितीत आल्यावर जो शेवटचा खेळाडू खेळतो आणि अखेरची रन काढून विनर शॉट मारतो, तेव्हा त्याचे कौतुक होत असते. अगोदर शे पाचशे धावा करणारे मागे राहतात; पण विनिंग शॉट मारलेला महत्त्वाचा ठरतो. भारतीय राजकारणात असे विनिंग शॉट मारणारे नेते म्हणजे शरद पवार. म्हणूनच कदाचित क्रिकेट आणि राजकारण ते एकाचवेळी सांभाळत असावेत. आता शेतकरी आंदोलन हे आखेरच्या टप्प्यात आल्यावर त्यासाठी मतप्रदर्शन करून विनिंग शॉट मारण्याची तयारी शरद पवार करताना दिसत आहेत; पण नेमके कोणत्या वेळी काय करायचे हे शरद पवारांना सहज जमते. टायमिंग साधणे म्हणजे नेमके काय हे त्यांचे कौशल्य आहे. असेच कौशल्य ते येत्या काही दिवसांत दाखवण्याची शक्यता आहे. अर्थात यामुळे शरद पवारांबद्दल अनेकदा गैरसमज पसरतात.
सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ला सत्तेत आल्यावर केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकरी विरोधी आहे, हे बिंबवण्याचा शरद पवारांनी चांगला प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नांना सात वर्षांनी यश येताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात ज्यांचे मत महत्त्वाचे म्हणून गेली पन्नास वर्ष ऐकले जात होते ते शरद पवार गेले दोन महिने स्वस्थ होते; पण २६ जानेवारीनंतर ते आंदोलनाबाबत आक्रमक झाल्याचे दिसत आहे. याला विनिंग शॉट मारणे म्हणतात.
अर्थात ते जेव्हा गप्प असतात त्या गप्प बसण्याचा अर्थही वेगळा लावला जात होता. शरद पवार हे भाजपचे समर्थक आहेत, इथपासून ते शरद पवार भाजप सरकारमध्ये सामील होणार इथपर्यंत चर्चा रंगल्या असतानाही शरद पवारांनी कोणतेच वक्तव्य केले नाही. प्रकाश आंबेडकरांनी तर काल चक्क हे बोलूनही दाखवले. महाराष्ट्रात एक मोदी आहेत, म्हणजे हा टोला शरद पवारांनाच होता. परंतु दोन दिवसांपूर्वी अचानक उपरती झाल्याप्रमाणे मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे आणि भांडवलदारधार्जिणे आहे, असे वक्तव्य शरद पवारांनी केले.
म्हणजे पंतप्रधान म्हणून शरद पवार मोदींच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. मोदींनी टाळ्या वाजवा, घंटा बडवा म्हटल्यावर दरवाजात उभे राहून ते घंटानाद करतात, मेणबत्त्या लावतात. त्यामुळे त्यांना ओळखणे अवघडच आहे.
सात वर्षांपूर्वी व्होडाफोन कंपनीची करमाफी आणि साखर कारखान्यांना आलेल्या प्रारिाच्या नोटिसा यांचा संबंध जोडून शरद पवार यांनी कॉर्पोरेट विरुद्ध कृषी, असा सामना उभा करण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कॉर्पोरेट धार्जिणे आणि शेतकरीविरोधी असल्याचे चित्रही त्यांनी यानिमित्ताने उभे केले होते. खरं तर हे काही आज घडत आहे, असे अजिबात नाही. जे काँग्रेस करीत होते तेच नरेंद्र मोदी करत आहेत. फक्त काँग्रेसचा पंतप्रधान हा निर्णय घेत होता हे कधी दिसले नाही, त्यांचा आवाजही दहा वर्षांत आला नव्हता; पण नरेंद्र मोदी चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन करून प्रत्येक गोष्टीकडे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे काँग्रेसचाच अजेंडा ते वापरत आहेत हे समजून येत नाही; पण केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानाही शेतकरी विरोधातील धोरणे घेतली जात होती. तेव्हा कृषी मंत्री असूनही शरद पवार काहीच बोलत नव्हते. साखर कारखानदारांच्या अडचणी तेव्हाही होत्या. तेव्हा शरद पवारांनी कोणतेच ठोस निर्णय घेतले नव्हते. त्यामुळे एकटे मोदीच शेतकरी विरोधी आहेत, असे म्हणण्याचे कारण नाही. यूपीए सरकारच्या कालावधीत साखर उद्योग अडचणीत का आला होता? तेव्हा साखर कारखानदारांची राजकारणावरील पकड कशी सैल झाली याचा विचार शरद पवारांनी तेव्हा केला असता, तर आज मोदी जे करत आहेत तेच आपण करत होतो हे लक्षात येईल. त्यामुळे केवळ मोदीच नाहीत, तर सत्तेवर येणारे सगळेच पक्ष शेतकरी विरोधी आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
निवडणूक काळात राजू शेट्टी आपल्याला शेतकºयांचा कसा पुळका आहे हे दाखवून सभा गाजवायचे. त्यासाठी भुईमूग खाली येतो का वर? रताळी कुठे येतात असल्या सवंग चर्चाही झाल्या होत्या. तेवढ्याच सवंग पातळीवरचा शरद पवारांचा हा प्रयत्न असला, तरी पवारांच्या विधानात किंचितसा अर्थ दडलेला आहे. ते आज जी मागणी करीत आहेत ती रास्त असली, तरी त्यासंदर्भात सत्तेत असताना त्यांनी काय केले, हा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहत नाही.
शरद पवार हे कधीही प्रसारमाध्यमांना गृहित धरत नव्हते. पत्रकारांना लांबच ठेवत होते. परंतु अलीकडच्या काळात आपण प्रसारमाध्यमांच्या कक्षेतून बाहेर जाऊ नये, यासाठी ते सतत दक्ष असलेले दिसतात. सहा वर्षांपूर्वी अलिबागमध्ये झालेल्या चिंतन शिबिरात त्यांनी सोशल मीडिया, मीडियाचा वापर सतत करा आणि प्रसिद्धीत रहा अशी सूचनाही केली होती. या चर्चेत राहण्यासाठीच तर त्यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष चाळीस जागांसह चौथ्या क्रमांकावर फेकला गेला असतानाही भाजपला पाठिंबा जाहीर करून निकालानंतरची चर्चा त्यांनी आपल्याभोवती फिरवत ठेवली. त्यासाठी आपल्याजवळचा धर्मनिरपेक्षतेचा एकमेव अलंकारही मोडीत काढला. तेव्हाही हे सरकार शेतकरी विरोधी आहे, भांडवलदार धार्जिणे आहे हे शरद पवारांना माहीत होते; पण केवळ आपली दखल घेतली जावी आणि आपले महत्त्व कायम ठेवण्यासाठी त्यांनी तेव्हा भाजपचे समर्थन केले होते.
भर पावसात सातारची घेतलेली सभा असो अथवा पायाच्या दुखापतीनंतर रुग्णालयात विश्रांती घेत असताना मुंबईच्या प्रश्नावर पंतप्रधानांना पत्र लिहिणे असो किंवा वॉकरच्या आधाराने येऊन साखरेच्या प्रश्नावर पत्रकार परिषद घेणे असो. आपण ‘टायर्ड’ नाही आणि त्यामुळे एवढ्यात ‘रिटायर्ड’ ही होणार नाही, असाच संदेश त्यांना सर्व संबंधितांना द्यायचा आहे. त्यामुळे शेतकरी विरोधी हे भाजप सरकार आहे, हे जरी खरे असले तरी शरद पवारांनी केलेली टीका ही खरी आहे का, मनापासून आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. आपल्या वक्तव्याचा कोणता पंच येईल याची प्रतीक्षा करत ते बसले आहेत, असेच चित्र सध्या तरी दिसते; पण शरद पवार आता लवकरच विनिंग शॉट मारतील आणि तो नेमका सरकारकडून शेतकºयांचे समाधान करत असताना असेल. कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ पडते तसे नेमके टायमिंग साधण्याची खेळी आता पवार करताना दिसत आहेत, हे नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा