काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. किंबहुना अनेक उलथापालथी होऊन काँग्रेस आपले महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर विरोधकांबरोबरच मित्रपक्षांसमोरही आव्हान निर्माण करणार आहेत हे नक्की.
नाना पटोले विदर्भातून येतात. त्यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होतेच. नाना पटोले यांनी काँग्रेसपासून राजकारणाची सुरुवात केली, पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण तिथे ते फारकाळ टिकू शकले नाहीत. पण नंतर काँग्रेसने पुन्हा त्यांचे पुनर्वसन केले. राज्य विधानसभेत अध्यक्षपदापर्यंत पोहोचवले आणि आता प्रदेशाध्यक्षपदाचीही धुरा त्यांच्याकडे जाण्याची निश्चिती झालेली आहे, पण त्यानंतर जे महाराष्ट्रात चर्चेला उधाण आलेले आहे त्यातून आघाडीत बिघाडी होणार नाही हे आव्हान सरकारला पेलावे लागणार आहे. त्यात शरद पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे.
रिकाम्या झालेल्या अध्यक्षपदावर शिवसेना दावा करणार असल्याची चर्चा आहे, तर काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केलेली आहे. त्या पदावर बाळासाहेब थोरातांना बसवावे, अशी काँग्रेसची मागणी आहे. त्यामुळे सध्या अजित पवारांकडे असलेले उपमुख्यमंत्रीपद ते सोडणार की दोन उपमुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला तयार होणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे. पण नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भरपूर सत्तानाट्य रंगणार असे दिसू लागले आहे.
खरं तर २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून काँग्रेसला सोडल्यानंतर नाना पटोले यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक जिंकली, पण पाच वर्षांच्या आतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत पुन्हा त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. २०१९ साली पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली व महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, पण यामध्ये त्यांच्यात आणि राष्ट्रवादीत थोडी दरी निर्माण झाली. याचे कारण राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्याशी त्यांना विरोध पत्करावा लागला. ती दूरी अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळे आज पक्षवाढीसाठी रणांगणात उतरणारे नाना पटोले हे राष्ट्रवादी आणि आपल्या मित्रपक्षांपेक्षा वरचढ ठरण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे काँग्रेसकडून होत असलेली उपमुख्यमंत्रीपदाची मागणी हे असू शकते, पण या आघाडीचे पालकत्व शरद पवार यांच्याकडे असल्याने तशी भीती बाळगण्याचे कारण नाही. ते सर्वांना सांभाळून घेतील, कोणाला गप्प करायचे हे त्यांना सहज जमत असल्याने शरद पवारांची इच्छा आहे तोपर्यंत या सरकारला काहीही भीती नाही हे नक्की.
नाना पटोले हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात, पण विधानसभा अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये बदल करत सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र घेऊन, विधानसभेचे कामकाज चालवले. नाना पटोले यांनी बुधवारी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली. गुरुवारी सकाळी ते महाराष्ट्रात परतले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव निश्चित असल्याचे नक्की झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला, पण त्यांनी विधानसभा अध्यक्षपदावर असताना जी सन्मानाची भूमिका पार पाडली ती खरोखरच कौतुकास्पद अशीच होती. फार थोडा काळ मिळूनसुद्धा सत्ताधारी आणि विरोधकांना बांधून ठेवण्याचे आणि लोकशाही मार्गाने सभागृहाचे कामकाज चालवण्याचे कसब चांगले राहिले. म्हणूनच आता हे पद नेमके कोणाकडे जाते यावर सर्वांचे लक्ष असेल. नाना पटोलेंवर कधीही पक्षपाताचा आरोप झाला नाही हे त्यांच्या अध्यक्षपदाचे यश होते. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदावर गेल्यावरही ते चांगली कामगिरी करतील यात शंका नाही. ओबीसी असल्यामुळे ते सर्वसमावेशक नेते बनतील आणि सुवर्णमध्य साधून काँग्रेसला चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करतील, पण त्यांची स्पर्धा अंतर्गत महाविकास आघाडीशीच असल्याने पाय ओढाओढीच्या राजकारणाला महाराष्ट्रात सुरुवात होणार हेही नक्कीच. हे आव्हान पेलत आता महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या वळणावर येते हे भविष्यात समजेलच, पण विधानसभा अध्यक्षपद, उपमुख्यमंत्रीपद हे दोन कळीचे मुद्दे आता निर्माण होणार आहेत. त्यावर योग्य मार्ग काढण्याचे आव्हान सरकारपुढे आहे.
नाना पटोले हे जेव्हा काँग्रेस पक्षवाढीसाठी प्रयत्न करतील तेव्हा ते अन्य पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील यात शंकाच नाही. एक काळ महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण आज काँग्रेसची राज्यात फारच घसरण झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीकडे, कोकण शिवसेनेकडे, विदर्भ, मराठवाडा भाजपकडे आणि उरलेल्या भागात मिळेल तिथे थोडीफार काँग्रेस अशी अवस्था आहे. राज्यात आज चौथ्या क्रमांकावर हा पक्ष आहे. केंद्रात नेतृत्वहीन आणि कमकुवत असताना या सर्वात जुन्या पक्षाला राज्यात बळकट करण्याचे आव्हान नाना पटोले यांच्यापुढे आहे. गेली काही वर्षं बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांची कामगिरी चांगली असली तरी आक्रमक नेते म्हणून त्यांची ख्याती नव्हती. आज सर्वांना आक्रमकता हवी असते. त्यामुळेच आक्रमक आणि वक्तृत्व असलेले नेते म्हणून नाना पटोले विरोधक आणि मित्रपक्ष या दोघांपुढेही आव्हान उभे करू शकतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला आता या बदलाने काय पहायला मिळते हे पहावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा