शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

भुईला भार


जयंता मुंबईत कामाला होता. शिक्षण झाल्यापासून गाव सोडलं आणि मुंबईत नोकरीला लागला होता. इथेच त्याचे लग्न झाले होते. मुलंबाळं, कुटुंब आता मुंबईकर म्हणूनच राहत होते. वर्षातून एकदा गावाकडच्या जत्रेला जायचं नाही, तर कोणाच्या लग्न कार्याला जायचं एवढाच गावाशी त्याचा संबंध होता.

गावी म्हातारे आई-वडील होते, घरदार शेतीवाडी होती. वर्षाकाठी कधी गावाला गेलं, तर घरची ज्वारी म्हणून एखादं बाचकं एसटीत टाकून आणण्यापलीकडे जयंता आणि त्याच्या कुटुंबाची कसली अपेक्षाही नव्हती. जत्रेला दिवाळीला गावाकडे मदत पाठवायची म्हणून हमखास सगळ्यांना कपडे, काही भेटवस्तू, आर्थिक मदत केली जायची. एक मुलगा मुंबईत सुखी आहे आणि एक गावी शेतीवाडी सांभाळून उदरनिर्वाह करतो आहे यात आई-बापाला आनंद होता.


शेती करायची म्हणजे कायमच पैशांची टंचाई असायची. दाणापाणी मिळत असलं, तरी हातात रोख पैसा तसा थोडाच असायचा. मोलमजुरी, खतपाण्याला वेळोवेळी जयंता पैसे पाठवायचा. त्यामुळे कुटुंबाचं कसं छान चालायचं; पण मार्च महिना उजाडला आणि एक फार मोठं संकट आलं. जयंताची नोकरी सुटली. कंपनीनं टाळेबंदी केली. परप्रांतातले लोक निघून गेले तसाच आपल्या कुटुंबाला घेऊन दोन मुलांबरोबर जयंता गावी आला. अचानक जयंता बायको मुलांसह आल्याने सर्वांना आनंद झाला; पण हा आनंद काही फार काळ टिकला नाही.

कंपनी सुरू होण्याची चिन्ह नाहीत. लॉकडाऊन वाढत चालला आहे. जयंताचा पगारही येणार नाही, त्यामुळे आता तो आणि त्याचे कुटुंब खायला कहार आणि भुईला भार होणार याची चिंता भावाला लागली. शेवटी भावाभावात उभा दावा असतोच. आई जन्म देताना म्हणते मला दुसरा मुलगा झाला, तर भाऊ म्हणतो माझा वैरी जन्माला आला. तसंच हे घडत होतं. चार आठ दिवस घरात बसून आनंदात गेल्यानंतर जयंता भावाच्या पाठोपाठ शेतात कामाला जायला निघाला. तशी वहिनी फणफणली. ‘तुमा शेरातल्या लोकांना काय येनार हाय शेतातली कामं?’. त्यावर जयंता सहजपणे म्हणाला, ‘वैनी, अगं शेतकºयाचा पोरगा हाय मी. लानपणी केलंय न्हवं शेतात काम? ’


हा संवाद चालू असताना जयंताचा मोठा भाऊ म्हणाला, ‘पर जयंता, आरं त्येला कित्येक वर्स झाली? आरं पुलाखालून किती पानी गेलंय ठाव हाय का? आता समदं बदललंय. तू नगं शेतात येऊ.’

सुरुवातीला जयंताला वाटलं आपण काम करू नये, मातीत राबू नये म्हणून भाऊ प्रेमानं सांगतोय. पण नंतर त्याला कळलं की, समदं बदललंय. शेतकºयाची मुलं जेव्हा मुंबईत कामाला येतात आणि कोणत्याही संकटानंतर त्यांना परत गावी जायची वेळ येते, तेव्हा परतीचा रस्ता बंदच झालेला असतो. अगदी असंच चाळीस वर्षांपूर्वी झालं होतं. गिरणी कामगारांचा संप सुरू झाला. अनेकांच्या नोकºया गेल्या. काम नाही म्हणून गावाकडं गेले, तर भावांनी जमिनी आपल्या नावावर केल्या होत्या. गावात फक्त राहायला छप्पर कसंबसं मिळालं; पण जमिनीचा हक्क गेला होता. गवंड्याच्या हाताखाली मोलमजुरीला जाण्याशिवाय अनेकांजवळ पर्याय नव्हता. जयंताची परिस्थिती तशीच झाली.


शहरात वाढत असलेली मुलं गावी गेल्यावर कोमजल्यासारखी झाली. बायको अवघडल्यासारखी वावरू लागली. हळहळू आनंद कमी आणि हेटाळणी, टोमणे मारणे सुरू झाले. आम्ही बगा कसं शेतात राबतोय, म्हनून सर्वांना खायला मिळतंय. बाकीचे कसे खायला कहार आणि भुईला भार झालेत. हे भुईला भार होण्याचे दुर्भाग्य अनेक लोकांवर या कोरोनामुळं आलं होतं. काही जण अपमान गिळत जगत होते, आज कंपनी सुरू होईल, उद्या मुंबईहून बोलावणं येईल म्हणून वाट पाहत अपमान पचवत जगत होते. तर काही जण अपमान सहन न झाल्याने मरणाला कवटाळत होते. मुंबईतला गर्दीचा भार कमी झाला होता; पण शेतीवर अवलंबून राहणारी ही तोंडे वाढल्याने हा झालेला भुईचा भार अस्वस्थ करणारा होता. अपमान गिळत गावात राहणं किंवा आत्महत्या करणं हे दोनच पर्याय जयंताला दिसत होते. बायका मुलांचं सगळं स्वप्न, भवितव्य अंधारात लोटलं गेलं होतं. आई-बाप आपले म्हणायचे; पण जयंता शहरात गेला आणि आता इकडं परत येणार नाही म्हणून बापानं सगळी जमीन दुसºया मुलाच्या नावावर करून टाकली होती. त्यामुळे आई-बापही भुईला भार म्हणून जगत असताना जयंताला काही पर्यायच सापडत नव्हता. असे अनेक जयंता कोरोनाच्या काळात उध्वस्तपणे लॉकडाऊन होऊन पडले होते. गावात कुठंही कामधंदा मिळणं शक्य नव्हतं. मुंबईतील राहणीमान आणि गावातील राहणीमान जुळवून घेणं मुलांना अवघड जात होतं. लहान असली, तरी मुलं समजूतदार होती, हीच जमेची बाजू होती. एरवी शहरात लाडाकोडात वाढलेली मुलं आता हेटाळणी सहन करत होती. पाहिजे तेव्हा मॅगी, पिझ्झा, बर्गर मागवणारी मुलं आत काकू बनवत असलेला शेवयांचा उपमाही का कू न करता खात होती. खरंच या लहान मुलांमध्ये कुठून आला हा समजूतदारपणा याचेच जयंताला आश्चर्य वाटत होते. आश्रीतासारखा भावाकडं राहतो आहे ही भावना आता मनात रूजली होती. आपलं गाव, आपली शेतीवाडी आता काही राहिली नाही. आता नाईलाजाने भुईला भार म्हणूनच इथं जगायचं आहे हे त्याच्या लक्षात आलं, आभाळाकडं बघून डोळ्यात आलेलं पाणी टिपलं. शहरातून गावाकडं आपल्यासारखाच आलेला दुसरा कुणी भेटला आणि त्याचे आणि आपले दु:ख सारखेच आहे हे समजल्यावर जरा हलकं वाटायचं. चला आपण एकटेच हे सहन करत नाही, तर अशी अवस्था अनेकांची आहे यातच समाधान मानून दिवस काढावे लागत होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: