दो बूँद जिंदगी के, म्हणून बीग बी अमिताभ बच्चन यांनी २५ वर्षांपूर्वी १९९०च्या दशकात पोलिओची जाहिरात करायला सुरुवात केली. पोलिओमुक्त भारताची घोषणाही झाली, तरीही पोलिओ लसीकरण अजून पूर्णपणे बंद केलेले नाही. ज्याप्रमाणे ‘देवीचा रोगी कळवा १ हजार रुपये मिळवा’, ही १९७४पर्यंत जाहिरात केली होती. त्यानंतर देवीचे लसीकरण बंद केले. देवी रोग पूर्णपणे हद्दपार झाला; पण पोलिओ अजूनही हद्दपार झालेला नाही. ० ते ५ वर्ष वयापर्यंत त्याचे डोस सतत दिले जात आहेत; पण हेच पोलिओचे दो बूँद जिंदगी के मागच्या आठवड्यात बालकांच्या जिवावर बेतले होते. याचे कारण माणसं सवयीचे गुलाम किती पटकन होतात हे आहे. गेले वर्षभर हात धुवा, सॅनिटायझर वापरा, प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर मारा ही सवय इतकी माणसाला लागली आहे की, समोर येणाºया प्रत्येक गोष्टीवर माणसं सॅनिटायझर माराला लागली. परवा एका लग्नात मर्यादित लोकांच्या पंगतीत वरण-भातावर तूप टाकल्यावर कोणीतरी म्हणाले आता त्यावर सॅनिटायझर टाका आणि मग सर्वांनी जेवायला सुरुवात करा. हा सॅनिटायझर जरी आवश्यक भाग असला, तरी तो औषधाचा भाग नाही तर जंतुनाशक आहे. पण हे जंतुनाशक बालकांच्या पोटात दो बूँद जिंदगी के म्हणून सोडले गेले आणि जोरदार खळबळ माजली. किती लापरवाही होती ही. देशभर चाललेल्या अर्थसंकल्प, शेतकरी आंदोलन, महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस याच्या किमतीवरून चाललेली आंदोलने यामुळे याकडे दुर्लक्ष केले गेले. पोलिओ डोस ऐवजी सॅनिटायझर देणाºयांवर तात्काळ कारवाई केली गेली; पण या गलथानपणाला कोणी फारसे गांभीर्याने घेतले नाही.
अर्थात हे सॅनिटायझर का पुढे आले, तर या वर्षात कोणते मार्केट फुलमध्ये चालले असेल, तर ते सॅनिटायझर आणि मास्कचे. त्याचा काळाबाजारही झाला. त्यातून जनतेला लुटलेही मोठ्या प्रमाणात. अत्यावश्यक बाब म्हणून सर्वात उखळ पांढरे करणारा २०२० मधला तो व्यवसाय ठरला आहे. कोरोना काळात सॅनिटायझर्स किटकांचा नाश करण्यासाठी वापरला जात असला, तरी याच सॅनिटायझरने अनेकांचे खिसे भरले, तर अनेकांना त्याच्या अतिरिक्त वापरामुळे बाधा झाल्याचेही अनेक उदाहरणे समोर आली आहेत, परंतु यवतमाळ जिल्ह्यात पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान १२ बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घाटंजी तालुक्यातील कापसी कोपरी या गावात घडला, हे मात्र संतापजनक आहे; पण त्याचे कोणाला वाईट वाटले नाही. म्हणजे मागच्या महिन्यात भंडाºयात दहा बालके होरपळून दगावली, त्यापेक्षा ही कमी महत्त्वाची बाब आहे, असे सर्वांना वाटले असावे. ३१ जानेवारीला दुपारी लसीकरण झाले. यानंतर मुलांना त्रास होऊ लागल्याने याची चौकशी केली असता ही बाब लक्षात आली. तातडीने सर्व १२ बालकांना यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती सर्व बालके दोन दिवसांच्या उपचारानंतर सुखरूप आपापल्या घरी गेली. बालकांना सॅनिटायझर पाजण्याच्या घटनेची चौकशी करण्याची सरकारी घोषणा तातडीने करण्यात आली. ती चौकशी पूर्ण करून त्यात दोषी असलेल्या चौघांवर तातडीने कारवाई करण्यात आली. लसीकरणादरम्यान सॅनिटायझर आणि पोलिओचे डोस सोबतच एकाच टेबलवर ठेवण्यात आले होते. पोलिओ डोस घेण्यासाठी आलेल्या १२ बालकांना पोलिओ डोस देण्याऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आले. डोस देताना संबंधित डॉक्टर फोनवर बोलत असल्याने बालकांना चुकून सॅनिटाझर्सच्या बाटलीतून ते पाजले गेले. फोनवर बोलणारे डॉक्टर कार्यालयीन बाबीमुळे मोबाइलवर बिझी होते की, वैयक्तिक कारणास्तव बिझी होते? पण हे सॅनिटायझर बरोबरच मोबाइलचेही बळी आहेत. काम करत असताना काम सोडून मोबाइलवर बोलणे हे चुकीचे आहे हे कधी कळणार आहे आम्हाला? घरगुती गप्पा, सोसायटीच्या चर्चा काम सोडून कार्यालयात आल्यावर कर्मचारी करतात. कागदोपत्री कार्यालयात आल्यासारखे भासवायचे आणि घरगुती कामे उरकायची हा पण भ्रष्टाचार आहे. त्यामुळे आता कार्यालयीन कामकाजात मोबाइलवर बंदी घालावी लागेल काय? असा प्रश्न पडतो. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती व्यतिरीक्त बाकीच्यांचे फोन जमा करून घेण्याची आवश्यकता आहे; पण दो बूँद जिंदगी केमुळे अनेक चुका समोर आलेल्या आहेत. बरे एका बालकाला चुकून पाजले जाईल डझनभर बालकांना सॅनिटायझर पाजले जाते हे कसे काय शक्य होईल? पण त्यावर पाहिजे तितके गांभीर्याने पाहिले गेले नाही हे खरे.
खरं तर जर मुलांना डोस पाजायचे होते, तर त्यावेळी कितीही महत्त्वाचा फोन कॉल असला, तरी डॉक्टरांनी तो फोन घ्यायला नको होता वा त्याचवेळी डोस पाजायला नको होते. हा भाग चौकशीची तीव्रता कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक नमूद केल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. जर डॉक्टर कार्यालयीन कामासाठी फोनवर बोलत असले, तरी त्यांनी केलेला गुन्हा हा सौम्य ठरत नाही. त्या १२ बालकांचे नशीब बलवत्तर म्हणून ते सुखरूप वाचले नाही, तर काही अघटीत घडले असते, तर प्रशासनाने कोणती जबाबदारी घेतली असती. हा प्रशासकीय हलगर्जीपणा आहे. शासकीय डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टीस महत्त्वाची वाटते. सरकारी मोहिमा या त्यांना शिक्षा वाटतात, त्यामुळे अशी पाट्या टाकायची कामे होतात. रेल्वे स्टेशन, बसस्थानके, विविध शाळांमधून टेबल टाकून अनेक पोलिओ लसीकरणाच्या सेविका बसलेल्या असतात. जाता येता बालके दिसली की, डोस देण्याचे काम त्या इमाने इतबारे करत असतात. त्या प्रशिक्षित नसतात. अंगणवाडी सेविका, शिकाऊ डॉक्टर असतात; पण कामाची जबाबदारी म्हणून हे लोक व्यवस्थित डोस देतात, पण डॉक्टर लोक ते काम नीट करत नाहीत याचा खेद वाटतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा