राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आल्याची माहिती समोर येते आहे. मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या त्यातून वाढली. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई या भागांत गर्दी आणि त्यातून सामाजिक अंतराचा उडालेला बोजवारा हे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे कारण ठरले आहे. पंधरा दिवसांपूर्वी लोकल सर्वांसाठी सुरू झाली आणि त्यानंतर ही वाढ होताना दिसते आहे. हा अंदाज अत्यंत धोकादायक असेल, कारण आता पुन्हा जर सगळं बंद करायची वेळ आली, तर फार मोठी उपासमार होईल आणि सामान्यांचे जगणे कठीण होईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ही रुग्णवाढ कशी रोखायची हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु नागरिकांनी जागरूक राहिले आणि खबरदारी घेतली, तर यावर मात करता येईल, पण नियम न पाळता नागरिक फिरत असतील, तर पुन्हा मातेरे होईल हे लक्षात घेतले पाहिजे. सरकारने कितीही प्रयत्न केले, कोविड योद्ध्यांनी कितीही चांगली कामगिरी केली, तरी नियमांचे पालन नागरिक करत नसतील तर काय होणार? अनेक लोक कारण नसताना लोकलमधून फिरतात, घाण करतात, खबरदारी घेत नाहीत. लोकलमधून प्रवासात बेजबाबदारपणे प्रवास करणारे नागरिक हे प्रसारकाची भूमिका करत आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवणारी यंत्रणा नाही हे त्यामागचे कारण आहे, पण त्यामुळे जर प्रसार जास्त प्रमाणात वाढला आणि पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली तर हे बेजबाबदार लोक सर्वसामान्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरणार आहेत हे नक्की.
कोरोनावर नियंत्रण मिळवणे आव्हानात्मक असल्याचे एव्हाना पुरेसे स्पष्ट झाले आहे. काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाला वारंवार करावे लागत आहे. संसर्ग आटोक्यात आला असे वाटत असतानाच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. विदर्भातील काही जिल्हे अमरावती, त्यानंतर पुणे, मुंबईत हे प्रमाण वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. जनजीवन पूर्वपदावर आले असताना कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. सोमवारपासून मुंबई सोडून सर्व राज्यांतील महाविद्यालये सुरू केली. साहजिकच गर्दी होऊ लागली आहे. शाळाही सुरू झाल्या आहेत, पण या रुग्णवाढीचा वाढता आलेख पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीच्या उपाययोजना पुरेशा आहेत का? मुंबईत राणीचा बाग खुला झाला, पण गर्दीमुळे होणाºया धोक्याचे काय? कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर संपणार नाही, असा इशारा संशोधक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी याआधीच दिला होता. त्यात तथ्य आहे. त्यामुळे कोरोना येण्याआधीच्या जगाची आठवण करीत निर्धास्त राहणे यापुढच्या काळात सर्वस्वी अशक्य ठरणार, अशीच चिन्हे दिसतात. आपल्याला कोरोनाबरोबर जगायचे आहे हे स्वीकारले असले, तरी त्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. पूर्वी साथीचे आणि संसर्गजन्य रोगांत डोळे येणे हा रोग भयानक असायचा. डोळ्यांची साथ आली की, त्याचा फटका हजारो लोकांना बसत होता. अशा प्रकारच्या अनेक साथीच्या संसर्गजन्य रोगांना आपण तोंड मागच्या काही दशकांत दिलेले आहे. मागच्या शतकात दिलेले आहे, पण या रोगाचे स्वरूप का इतके भयावह आहे? ही चिंतेची बाब होण्यापेक्षा खबरदारीची बाब असली पाहिजे. मागील काही महिन्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आल्याचे चित्र होते. परिणामी जम्बो कोविड सेंटरदेखील बंद करण्यात आले. टाळेबंदी शिथील करण्यात आल्यावर गर्दीचे प्रमाण वाढले, रस्तोरस्ती वर्दळ वाढत गेली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आधीप्रमाणे झाली. अशावेळी कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढणार हे अपेक्षित होते, मात्र गृहित धरलेली वाढ आरोग्य विभागाच्या अंदाजापेक्षा अधिक आहे. विशेषत: फेब्रुवारी महिना सुरू झाल्यावर रुग्णसंख्येचा वाढता आलेख समोर आला. त्यामुळे जानेवारीत मिळालेला दिलासा तात्पुरताच ठरला! काही बंधने, काही शिथिलता अशी कसरत प्रशासनाला सातत्याने करावी लागताना दिसते.
लोकल ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी. लोकल मोजक्या संख्येने सुरू झाल्या, पण लोकलच्या वेळा सर्वांच्या सोयीच्या ठरणाºया नाहीत. कमी संख्येने त्या सोडल्या जात असल्याने गर्दीही टाळता येत नाही. आता त्या गर्दीचे विपरीत परिणाम दिसू लागले आहेत. मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या त्यातून वाढली. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई या भागात गर्दी आणि त्यातून सामाजिक अंतराचा उडालेला बोजवारा हे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे कारण ठरले आहे. विदर्भामध्ये वाढलेले कोरोना संसर्गाचे प्रमाण आरोग्य विभागासाठी तेवढेच आव्हानात्मक ठरत आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ आणि नागपूर या शहरांमध्ये याच महिन्यात रुग्ण वाढले.
खरं तर कोरोनातून बºया होणाºया रुग्णांचा राष्ट्रीय पातळीवरील दर जगामध्ये सर्वाधिक आहे, अशी माहिती नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला जे यश मिळाले त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली, हे कितीही खरे असले, तरी सार्वजनिक जीवनात वावरताना भारतीय नागरिक पुरेशी खबरदारी घेण्यात कमी पडत आहेत का, गाफील वृत्ती खबरदारी घेण्यातील अडथळा ठरत आहे का? हे पहावे लागेल. अजूनही अनेक लोक मास्क वापरत नाहीत, सॅनिटायझर वापरत नाहीत. लोकलमध्ये एक सीट सोडून बसण्याचा नियम असतानाही सगळ्या सीट फुल होताना दिसतात. फोनवर बोलण्यासाठी म्हणून लोकलमध्ये विना मास्क फिरतात. स्टेशनवर उतरल्यावर मास्क तोंडाला लावतात. या पळवाटा थांबवल्या पाहिजेत. हा गाफीलपणा आणि फाजील आत्मविश्वास रोगप्रसाराला आमंत्रण देत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा