वसंत पंचमी हा एक आनंद आणि उत्साह निर्माण करणारा दिवस आहे. सरस्वतीचा जन्म या दिवशी झाला असे म्हणतात म्हणून या दिवशी सरस्वतीचे पूजन केले जाते. प्रत्येक कलाकारांना हा दिवस म्हणूनच महत्त्वाचा वाटतो. मागच्या महिन्यात एका ज्येष्ठ साहित्यिकाने याच सरस्वतीला नाकारत आपला पुरस्कार नाकारला होता; पण सारस्वतांचे म्हणजे साहित्यिकांचे प्रेरणास्थान ही सरस्वती असते असे मानतात. त्या सरस्वतीवरूनच साहित्यिकांना सारस्वत संबोधले जाते, त्या सरस्वती पूजनाचा हा दिवस.
वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये माघ शुद्ध पंचमीला साजरी केली जाते. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे. वर्षातील शिशिर हा शेवटचा ऋतू. शिशिरात झालेली पानगळ संपून नवीन पालवी फुटणार आहे हे सांगणारा आणि वसंताचे स्वागत करण्याचे आवाहन करणारा हा दिवस.
आपल्याकडे भारतात साधारणत: मकर संक्रांतीनंतर (खरेतर २१ डिसेंबरनंतर) सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला, तरी खासकरून या दिवशी, नृत्यादी कला शिकवणाºया संस्थांत, विद्येची देवता - सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला, असे समजले जाते. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. त्यामुळे पूर्वीच्या काळात ज्या वारांगना होत्या त्यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा असायचा. उत्सव, अहिस्ता अहिस्ता या चित्रपटातूनही वसंत उत्सव केलेला दिसतो. कोठीवाल्या श्रीमंत बायका नव्या वारांगनांना दिक्षा देण्यासाठीही हा दिवस निवडायच्या असे म्हणतात. पूर्वीच्या काळात नृत्य गायन आणि आपल्या सौंदर्याने पुरुषांना मोहीत करून देह स्वाधीन करणाºया वारांगना या दिवशी उत्सव साजरा करत असत. या उत्सवाला राजेरजवाडे, श्रीमंत लोक उपस्थित असत.
सुफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात. तर मध्ययुगात या दिवशी ‘सुवसंतक’ नावाचा उत्सव होत असे. हा दिवस संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या कारणांनी साजरा केला जात असला, तरी त्याचे मूळ हे कलेशी निगडीतच आहे.
इतकेच नाही, तर वसंत पंचमीचा कृषी संस्कृतीशी संबंध दिसून येतो. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात. शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात. हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गणपती, इंद्र, शिव आणि सूर्य यांची प्रार्थनाही होते. बंगाल प्रांतात या दिवशी भक्तिगीते म्हणत प्रभातफेरी काढतात.
महाराष्ट्रात पेशव्यांच्या काळात हा उत्सव उत्साहाने साजरा होत असे. या दिवशी स्री-पुरुष आपल्या नातेवाइकांना फुलांचा अथवा हिरव्या देठाच्या धान्याच्या कणसांचा गुच्छ भेट म्हणून देत असत. डोक्यावरील पागोट्यात तो कणसाचा तुरा रोवत असत. याच दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचीही पद्धत होती. फुले, फळे, मिठाई यांची देवाणघेवाण होत असे. वसंत ॠतूची सन्मानपूर्वक पूजा हा मुख्य भाग असे.
बाजीराव पेशवे यांच्या काळात सरदारांसोबत हा उत्सव साजरा केला जाई. केशरी रंगाची उधळण केली जात असे. ब्राह्मण, शास्त्री आणि अन्य सन्माननीय व्यक्तींंना भोजन, कलावंतिणींचे नृत्य असे उत्सवाचे स्वरूप असे.
बिहारमधल्या औरंगाबाद जिल्ह्यातील देव नावाच्या गावामधील सूर्य मंदिरात असलेली देवतेची मूर्ती ही वसंत पंचमीच्या दिवशी स्थापन झाली आहे. या दिवशी देवतेला स्नान घालतात आणि तिला जुनी वस्त्रे काढून नवी लाल वस्त्रे नेसवतात. भाविक मंडळी या दिवशी गीत, संगीत, नृत्य यांचे सादरीकरण करतात.
आजकाल आपल्याकडे व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जात असला, तरी हा दिवस खºया अर्थाने प्रेम आणि आनंदाचा दिवस फार पूर्वीपासून, शतकानुशतके आपल्याकडे साजरा केला जातो. प्रेमभावनेचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. लोक गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात. या दिवशी आंब्याची पाने गुंफलेली फुलांची माळ, गजरे इत्यादी घालण्याची प्रथा आहे. लोक या दिवशी राधाकृष्ण, तसेच मदन आणि रती यांच्या प्रेमाची गीते गातात. नृत्य, गायन, फुले, फळे हे नेहमीच सर्वांना आनंद देत असतात, म्हणून आनंद देणारा सण म्हणून याकडे पहायला पाहिजे.
पश्चिम बंगालमध्ये या दिवशी सर्व जण पिवळी वस्त्रे परिधान करून सरस्वतीची पूजा करतात. देवीच्या पायाशी पुस्तके व लेखण्या ठेवून देवीचा आशीर्वाद घेतात. काही लोक उपासही करतात. सरस्वतीला फुले वाहतात. याला ‘पुष्पांजली’, असे म्हणतात. या दिवशी लहान मुलांच्या पाटीवर पहिली मुळाक्षरे काढून देऊन त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करतात.
राजस्थानातही पिवळा पोशाख घालून, गोड जेवण करून, पिवळ्या रंगांच्या फुलांनी घराची सजावट करून हा उत्सव साजरा करतात. राजस्थानात मोगºयाच्या फुलांच्या माळा गळ्यात घालणे आवश्यक मानले जाते.
बाराव्या शतकात भारतीय सुफी मुस्लीम व्यक्तींनी या हिंदू उत्सवाचा स्वीकार केल्याचे दिसते. चिश्ती संप्रदायानुसार आमीर खुस्रो यांनी एका हिंदू महिलेला या दिवशी पिवळी साडी नेसून मंदिरात गेल्याचे पाहून या संप्रदायाने ही पद्धत स्वीकारली, असे मानले जाते.
वसंत ऋतूचा प्रारंभ म्हणून शीख संप्रदाय हा दिवस उत्सव म्हणून साजरा करतो. गुरुद्वारामध्ये सामाजिक उत्सव म्हणून या दिवसाचे आयोजन करण्याची पद्धत महाराजा रणजीतसिंग यांनी सुरू केली. या उत्सवाचा भाग म्हणून पतंग उत्सव करणे. या उत्सवाची सुरुवात अमृतसरमधील हरमंदिर साहिब गुरुद्वारा येथून झाली. महाराजांच्या दरबारातील विशेष कार्यक्रम या दिवशी होत असे आणि त्या दिवशी त्यांचे मंत्री आणि सैनिक पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान करीत असत.
केवळ भारतातच नाही तर फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्चिम पंजाबातसुद्धा वसंत पंचमी ही पतंगोत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते. शेतातील सरसों (मोहरी)ची फुले पिवळी जर्द झाल्यावर नदीकाठी पंजाबात हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी केशर घातलेला गोड भात खाण्याची पद्धत आहे. एकूणच वसंत पंचमी हा आनंद देणारा आणि उत्साह निर्माण करणारा दिवस आहे, त्याचा आनंद सर्वांनी घेतला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा