पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अलीकडे फारच भावुक व्हायला लागले आहेत. त्यांना गहिवरून येण्याचे प्रमाणही वाढले आहे. मंगळवारी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेतून निरोप देताना त्यांना अतिशय गहिवरून आले होते. डोळ्यात अश्रू आले. दिवसभर माध्यमांनी मोदींचे अश्रू दाखवून वेळ मारून नेली. त्याचबरोबर त्या अश्रूंना उत्तर देताना शरद पवार, संजय राऊत, रामदास आठवले आणि खुद्द गुलाम नबी आझाद यांनीही मनमोकळेपणाने आणि मैत्रीपूर्ण वातावरणात आपली मनोगते व्यक्त केली. हे सगळं चित्र पाहून अक्षरश: संपूर्ण देश गहिवरून आला. वा वा काय या देशाची लोकशाही आहे? खरंच आपल्या विरोधकांचे कौतुक करण्याचे मोठेपणही आपल्याच लोकशाहीत पहायला मिळते वगैर वगैरे. अर्थात काहींना मोदींचे अश्रू हे मगरीचे अश्रू वाटले असतील. वाटू देत, कारण म्हणे मोदींवर टीका केली, पटकन प्रसिद्धी मिळते वगैरे वगैरे, पण खूप दिवसांनी सभागृहात असे वातावरण पहायला मिळाले. विशेष म्हणजे मोदींच्या अश्रू ढाळण्याने सभागृहातील सगळेच नेते गप्प झाले, वातावरण काही काळ भारावून गेले होते. गुलाम नबी आझाद किती महान नेते आहेत हे सांगण्यासाठी मग चढाओढच लागली.
म्हणजे ज्यांना पाडण्यासाठी शरद पवारांनी चंग बांधला होता, त्या गुलाम नबी आझाद यांना पाडणे आपल्याला शक्य झाले नाही इतके त्यांचे मोठेपण आहे हे शरद पवारांनी कबूल केले. काश्मीरमधील एक नेता महाराष्ट्रातील वाशिममधून निवडणुकीला उभा राहतो, पण त्याला पराभूत करणे महाराष्ट्रातील शरद पवारांना शक्य होत नाही, हा शरद पवारांच्या पाडापाडीच्या राजकारणाचा पराभव होता. कारण १९८० चे दशक म्हणजे शरद पवारांच्या पाडापाडीच्या राजकारणाचे सुगीचे दिवस होते. डोईजड होईल त्याला कसा पराभूत करायचा हे पवारांनी दाखवून दिले होते. त्या काळात पुण्यातील साडेतीन शिरोमणी राज्याचे राजकारण चालवत होते. त्या सगळ्यांना शांत करण्याचे काम पवारांनी केले. ना. ग. गोरे, विठ्ठलराव गाडगीळ, जगन्नाथराव जोशी यांना संपवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या आणि मुख्यमंत्री झालेल्या वसंतदादा पाटील, अ. र. अंतुले, शंकरराव चव्हाण या सगळ्यांना मागे खेचण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात माहिर असलेले नेते म्हणजे शरद पवार हे समीकरण कालपर्यंत पहायला मिळत होते. अगदी साताºयात छत्रपती उदयनराजेंना कोणीच पराभूत करू शकणार नाही, असे वातावरण असताना शरद पवारांनी लोकसभा पोटनिवडणुकीत इथे वरचष्मा आमचाच राहील हे दाखवून देत श्रीनिवास पाटील यांना पावसात सभा घेऊन निवडून आणले. म्हणजे भल्याभल्यांना, अतिरथी-महारथींचा पाडाव करणाºया शरद पवारांना बाहेरून महाराष्ट्रात आलेल्या गुलाम नबी आझाद यांना पाडता आले नव्हते, इतके आझाद यांचे महत्त्व त्यांनी प्रकट केले.
संजय राऊत यांनी तर त्यांच्यासाठी सभागृहात परत येण्यासाठी पायघड्याच अंथरल्या आहेत. आमच्या नेत्यांची मनं किती मोठी आहेत असेच कोणालाही वाटत राहणार. अर्थात ‘मेल्या म्हशीला दहा शेर दूध’ अशी आपल्याकडे म्हण आहे, त्याप्रमाणेही काही यात असेल, पण मोदींचे अश्रू आणि बाकीच्यांची स्तुतिसुमने ही खरोखरच आझाद यांच्यासाठी होती का? का काँग्रेसला डिवचण्याची ही खेळी होती?
गुलाम नबी आझाद हे काँग्रेसचे मोठे अनुभवी आणि निष्ठावंत नेते आहेत यात शंकाच नाही. त्यांनीही आपल्या भाषणात इंदिरा गांधी, संजय गांधींपासून सर्वांची स्तुती केली. इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्यामुळे आपल्याला संधी कशी काय मिळाली आणि पक्षात आपल्याला कसे महत्त्वाचे स्थान मिळाले हे त्यांनी सांगितले, पण त्याचवेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा अनुल्लेख करून आपल्याला कसे दुर्लक्षिले गेले हेही त्यांनी दाखवून दिले. म्हणजे सहा महिन्यांपपूर्वी काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा यासाठी पत्रप्रपंच केला होता. त्यावरून काँग्रेस अंतर्गत खळबळ माजली होती. गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांना त्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी प्रचंड अपमानित केले होते. अगदी भाजपशी जवळीक असल्याबाबत संशय व्यक्त केला होता. त्यामुळे कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद असे निष्ठावंत काँग्रेस नेते दुखावले गेले होते. त्यानंतरही मागच्या महिन्यात काँग्रेस वर्किंग कमिटीची दिल्लीत झालेली बैठक जोरदार गाजली ती वादामुळेच गाजली. या वादाचे कारण त्या २३ नेत्यांचा अध्यक्षपदाचा आग्रह हेच कारण होते, पण काही करून गांधी कुटुंबीयांना काँग्रेस अध्यक्षपद सोडायचे नाही आहे. राहुल गांधी ते घेण्यास तयार नाहीत, तर ते हंगामी सोनिया गांधींकडे दिले. जोपर्यंत प्रियंका गांधींकडे ते पद जात नाही तोपर्यंत सोनिया गांधीच सांभाळणार हे पद, असे वातावरण तयार केले. हंगामीच अध्यक्षपद द्यायचे होते तर ते थोड्या दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर बिगर गांधी व्यक्तीकडे सोपवले असते, तर काँग्रेसचे कौतुक झाले असते. पण तसे सोनिया गांधींनी केले नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर गुलाम नबी आझाद यांना काँग्रेसकडून अपमानित करणे, त्यांच्या राज्यसभेतून निवृत्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर होणे, शरद पवार आणि सर्वच विविध पक्षांनी स्तुतिसुमने उधळणे हे काँग्रेसला डिवचण्यासाठी होते, हे सहज समजून येते. मोदींच्या अश्रूंनी आजाद यांना त्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याचे काम केले आहे. हा काँग्रेसला इशारा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा