शेतकरी आंदोलनावर उशिरा भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनजीवी हा शब्दप्रयोग केला आणि तो वादग्रस्त ठरला. अनेकांना तो झोंबला; पण आपल्याकडे आंदोलनजीवी लोक आहेत, हे अजूनही कोणी मान्य करत नाही. किंबहुना आम्ही सारे आंदोलनजीवी अशीच परिस्थिती असते.
आंदोलनजीवी याचा अर्थ आंदोलनातून पैसे कमावणारे आणि त्यावर गुजराण करणारे असा घेण्याची गरज नाही; पण आपण जीवंत आहोत, कार्यरत आहोत हे दाखवण्यासाठी अनेकांना आंदोलनाचा आधार घ्यावा लागतो. किंबहुना कुठलेही आंदोलन असेल, तर त्याला पाठिंबा देण्याची घाई प्रत्येकाला असते. हे आंदोलनजीवी लोक आहेत. असे आपल्या देशात ढिगाने सापडतात.
२०११ ला अण्णा हजारे यांनी जे आंदोलन केले होते ते जागतिक आंदोलन होते. जगभरात आपल्या देशभरात मैं अण्णा हूँच्या टोप्या घालून लोक हातात मेणबत्या घेऊन रस्त्यावर उतरत होते. ते आंदोलन कशासाठी आहे, हे सांगताही कोणाला येणार नाही. पण हॉटेल आणि बारमधील वेटरसुद्धा मैं अण्णा हूँच्या टोप्या घालत होते. हा विनोदच होता. कारण अण्णा दारूबंदीसाठी सुरुवातीला लढत होते; पण हॉटेल आणि बारमध्ये ग्राहकांना दारू पुरवणारे वेटर डोक्यावर मैं अण्णा हूँ नावाच्या टोप्या घालत होते. यांना आंदोलनजीवी म्हणावे लागेल. म्हणजे अण्णांच्या आंदोलनात त्या काळात अनेक हौशे गवशे नवशे आले होते. त्यातील जे गवशे होते म्हणजे आपल्याला काही सापडतंय का पाहणारे ते गवशे. ते आंदोलनजीवीच म्हणावे लागतील.
या आंदोलनात सहभागी झालेले होते बाबा रामदेव. योगगुरू म्हणून जगभर ख्याती मिळवली. त्यानंतर मोदी सरकार आल्यावर त्यांनी आपली एकेक उत्पादने बाहेर काढायला सुरुवात केली आणि फार मोठे बिझनेसमन झाले. अगदी आयुर्वेदीक औषधेच नाहीत तर नूडल्स, जीन्सपर्यंत कोणतेही उत्पादन त्यांनी सुरू केले. त्यामुळे बाबा रामदेव हे सुद्धा आंदोलनजीवीच ठरले.
अण्णांचे उपोषण, आंदोलन हे काँग्रेस सरकारला नमवण्यासाठी होते. केंद्रातील मनमोहन सिंग सरकारच्या विरोधात होते. अण्णांनी तेव्हा निर्माण केलेली काँग्रेस यूपीए सरकारविरोधातील हवा ही भाजपला मोठी करणारी होती. त्यामुळे केंद्रातील भाजप हा पक्ष सुद्धा आज आंदोलनजीवीच ठरतो.
अण्णांच्या आंदोलनात मांडीला मांडी लावून बसणारे, त्याचे नियोजन करणारे, आर्थिक रसद पुरवणारे अरविंद केजरीवाल हे भविष्यात दिल्लीचे मुख्यमंत्री होतील, हे त्या क्षणी कोणालाही वाटले नव्हते; पण अण्णांच्या आंदोलनातून टोपी घातली आणि आम आदमी पक्षाची स्थापना केली. देशभर त्या आंदोलनावर तरले आणि दोन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री ते झाले. अरविंद केजरीवाल हे आंदोलनजीवी आहेत.
किरण बेदी या पोलीस सेवेतील सर्व महिलांचा आदर्श. अगदी त्यांच्या कार्यकर्तृत्वावर १९९०च्या दशकात दूरदर्शनवर मालिकाही काढली होती. इतके सर्वांचे ते आवडते व्यक्तिमत्व होते; पण निवृत्तीनंतर त्यांनी अण्णांच्या आंदोलनात झेंडा काय हलवला आणि त्यांनी नंतर मोदी लाटेत भाजपात प्रवेश केला. निवृत्तीनंतर त्यांना भाजपकडून बरेच काही मिळाले. थेट राज्यपालपद मिळाले. त्यामुळे त्याही आंदोलनजीवीच ठरतात.
ज्यांना स्वत:ला गर्दी करता येत नाही, स्वत:चे काही मुद्दे नसतात ते दुसºयाचे आंदोलन हायजॅक करतात आणि स्वत:ला मोठे करतात, ते सर्वच आंदोलनजीवी असतात.
आज दिल्लीच्या सीमेवर अडीच महिन्यांपासून जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला काँग्रेसने सुरुवातीला पाठिंबा दिला नव्हता; पण ते आंदोलन जोरदार आहे, सरकारला डोकेदुखी होणार आहे, हे लक्षात आल्यावर काँग्रेसने त्या आंदोलनाला पाठिंबा दिला. हा पाठिंबा कुणी मागितला होता का? शेतकरी आपल्या हितासाठी, आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत होते. शेतकरी आंदोलन करत होते, त्यावर काँग्रेस जगू पहात होती. संपूर्ण देशभरातून काँग्रेसचे उच्चाटन होत असताना एखाद्या वाळवंटात ओअॅसिस सापडावा तसे हे आंदोलन आपल्याला जगवेल, आपण चर्चेत राहू याची जाणिव काँग्रेसला झाली आणि त्या आंदोलनात त्यांनी घुसखोरी केली. त्यामुळे आंदोलनजीवी हा शब्द काँग्रेसला, तर अगदी चपखल लागू पडतो. कारण मुळात हे आंदोलन कशासाठी आहे, ते शेतकरी काय मागत आहेत, केंद्र सरकारने नेमके काय कायदे केले आहेत याची कसलीही माहिती काँग्रेसचे पार्ट टाइम नेते राहुल गांधी यांना नाही. राहुल गांधी यांना अदानी, अंबानी, नोटबंदी, जीएसटी याशिवाय त्यांच्याकडे कसलाही शब्दकोष नाही. त्या तीन कायद्यांचा अभ्यास केला नाही. त्यामुळे त्यावर बोलायची हिंमत नाही. संसदेत म्हणूनच त्यांनी हम दो हमारे दो यांसारखा वाक्यप्रयोग करून आपला बावळटपणा दाखवून दिला. याचे कारण राहुल गांधी हे आज खºया अर्थाने अस्तित्वासाठी लढत आहेत. त्यामुळे मोदींनी वापरलेला आंदोलनजीवी हा शब्द त्यांना चपखल बसतो.
शेतकरी आंदोलनाला शरद पवारांनी पाठिंबा दिला असला, तरी ते थेट आंदोलनाला गेले नाहीत. कारण शरद पवार म्हणजे असे आहेत की, ते जिथे उभे राहतात लाइन वहीसे शुरू होती हैं. त्यामुळे शरद पवारांना कधी रस्त्यावर आंदोलनासाठी उतरावे लागत नाही. त्यामुळे त्यांना कोणी आंदोलनजीवी म्हणणार नाही. शरद पवारांच्या विरोधात आंदोलने होतील; पण ते आंदोलन करत बसणार नाहीत. पण बाकीचे मात्र आम्ही सारे आंदोलनजीवी असेच आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा