शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

नानांच्या मागे काँग्रेसची फरफट

काँग्रेसला राज्यात चेहरा नसल्यामुळे एक आक्रमक चेहरा देण्यासाठी नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नेमणूक केली गेली. नेमणूक यासाठी कारण काँग्रेसमध्ये निवड होत नसते, तर नेमणुका होत असतात. त्यामुळे आक्रमक वागून काँग्रेस पक्ष चर्चेत राहण्यासाठी नाना पटोले यांना नेमले आहे. याचे कारण महाविकास आघाडीत असलेले अन्य दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कायम आक्रमक असतात. विरोधी पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष हा कायम आक्रमक असतो. छोटा असला, तरी मनसे हाही आक्रमकपणे चर्चेत राहतो. या तुलनेत काँग्रेस एकदम मवाळ अशी दिसते. त्यामुळे ज्याप्रमाणे राष्ट्रवादीकडे छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या मुलुखमैदान तोफा आहेत, तसे काँग्रेसमध्ये कोणीच नाही. सगळे मुखदुर्बळ नेते असल्याने नानांची नेमणूक या पदावर करण्यात आली. शिवसेनेची खिंड संजय राऊत, निलम गोºहे लढवत असतात. भाजपात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, राम कदम हे सतत आक्रमक असतात. मनसेत स्वत: राज ठाकरे, संदीप देशपांडे हे आक्रमक असतात; पण काँग्रेसमध्ये सगळे हाताची घडी तोंडावर बोट असते. त्यामुळे हाताची घडी झाली, तर पक्ष शिल्लक राहणार नाही या भीतीने नानांना नेमले आहे.


आता आक्रमक म्हणून आपल्याला नेमले म्हटल्यावर काही तरी आक्रमण हे केलेच पाहिजे. त्यामुळे अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली. जोपर्यंत अमिताभ आणि अक्षय कुमार मोदी सरकारवर टीका करत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रात त्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे आव्हान त्यांनी दिले. आता ही काँग्रेसची संस्कृती नाही; पण नानांमुळे आता काँग्रेसची फरफट होणार आहे. तोडफोड करायला काँग्रेसचे नेते कार्यकर्ते बाहेर पडतील, अशी अपेक्षा आहे. मुळात काँग्रेसचे निष्ठावंत नेते आहेत ते बाळासाहेब थोरात, अशोकच चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे सगळे शांत संयमी नेते. त्यांचा तो स्वभाव नाही. या शांतपणालाच कंटाळून नारायण राणे यांनी काँग्रेसला राम राम ठोकला. कारण आक्रमकता असल्याशिवाय पक्ष शिल्लक राहणार नाही; पण त्यांचे कोणी ऐकले नाही. आता नानांचे हे जुने जाणते निष्ठावान नेते ऐकणार का? नानांच्या मागे काँग्रेसची फरफट होणार का हे पहावे लागेल.

नानांनी अमिताभ व अक्षय कुमार यांचे चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही, अशी धमकी देताच २४ तासांच्या आत अमिताभ आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याच्या तारखाच समोर आल्या. नागराज मंजुळे यांनी जून महिन्यात आपला झुंड हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले. झुंडमध्ये अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहे. मग आता जर तो चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत अमिताभने मोदी सरकारवर कडाडून टीका केली नाही, मोदींवर टीका करणारे ट्विट केले नाही, काँग्रेसची स्क्रीप्ट बोलली नाही, तर काँग्रेस हा चित्रपट बंद पाडणार. मग नानांच्या बरोबर रस्त्यावर उतरून राडा करायला अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण असे शांत संयमी सहिष्णू नेते येतील का? हातात काठ्या, दगड घेऊन पोस्टर फाडायला अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आले आहेत हे किती छान चित्र असेल. पण ते उतरणार का रस्त्यावर? ते जर दंगली करायला उतरले, तर ती काँग्रेसची नानांच्या मागे झालेली फरफटच असेल.


नाना पटोले यांना कोणी निष्ठावंत म्हणू शकत नाही, कारण ते काँग्रेस सोडून भाजपात गेले होते. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे खानदानी आणि परंपरेने आलेले निष्ठावंत आहेत. तरीही केवळ आक्रमकता आणि चर्चेत राहिले पाहिजे यासाठी काँग्रेसने नानांची प्रदेशाध्यक्षपदावर नेमणूक केली आहे; पण नानांची करणी आणि कथनी यात फरक असतो.

नाना पटोले यांनी त्यांच्या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाल्याने काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केले होते; मात्र त्यानंतरही शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुहू येथील आयोजित कार्यक्रमात भाग घेतला होता. नाना पटोले यांनी स्वत: ट्विट करून त्यांचा कार्यक्रमातील फोटोही शेअर केला होता. कोरोना बाधितांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे विलगीकरणात रहायचे सोडून सुपर स्प्रेडर होण्यासाठी ते कशासाठी कार्यक्रमाला गेले? केवळ चर्चेसाठी. पण आज राज्यात कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढत असताना त्यांचे हे कामही किती धोकादायक आहे? याचा अर्थ नानांच्या पाठीमागे काँग्रेसची फरफट होणार असेच दिसते. नानांनी कामापेक्षा आपले उपद्रवमूल्य किती आहे हे दाखवण्यावर भर दिलेला आहे, हे यातून स्पष्ट होते आहे. साहजिकच काँग्रेस आपले उपद्रवमूल्य दाखवून मोठी होणार का?


काँग्रेस संस्कृतीत रूजलेल्यांना हे कधीच मान्य होणार नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये आणखी गटबाजी उफाळून येईल. त्याला जातीचे लेबल चिकटेल, कारण नाना पटोले हे ओबीसी नेते आहेत. प्रदेशाध्यक्षपद ओबीसींकडे देण्याची मागणी होतीच. त्यात जर या आक्रमकपणाला अशोच चव्हाण, थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांनी साथ दिली नाही, तर मराठा लॉबी सहकार्य करत नाही, असा कांगावा नानांना करावा लागेल. त्यामुळे एकूणच काँग्रेसची फरफट होणार हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: