शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

यथा राजा तथा प्रजा

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनाने अमेरिका, इटलीत घातला तसा गोंधळ घातला नाही. गेल्या वर्षी कोरोनाची चाहुल लागताच केंद्र सरकार आणि सगळ्या राज्य सरकारांनी प्रारंभापासूनच जी काळजी घेतली, सतर्कता बाळगली, उपाय केलेत त्यामुळे आपल्याकडे कोरोनाने एका विशिष्ट प्रमाणाबाहेर हातपाय पसरले नाहीत. ज्याप्रमाणे सरकारांनी प्रयत्न केलेत, त्याप्रमाणेच आपल्याकडच्या आरोग्य यंत्रणेने, यंत्रणेत सहभागी असलेल्या डॉक्टरांनी आणि अन्य कर्मचा‍ºयांनीही कोरोनाला एका मर्यादेत रोखले. कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रात काम करणा‍ºया परिचारिका, अन्य कर्मचारी यांना जास्त श्रेय दिले पाहिजे. जीवावर उदार होत त्यांनी सेवा दिली. उन्हाळ्यात पीपीई किट घालून उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करून त्यांनी जी सेवा दिली त्यामुळेच आपण त्यातून कुठे बाहेर पडत असताना, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनलॉक केले असताना गेल्या पंधरा दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. रुग्णांमध्ये गतीने वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि देशात भीतीचे वातावरण आहे. पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीने राहुरीत मंगळवारी एकाने आत्महत्या केली. असे प्रकार वाढण्याची शक्यता दाट आहे.


विदर्भ, पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये ज्याप्रकारे कारवाई सुरू आहे हे पाहता राज्याची वाटचाल पुन्हा टाळेबंदीकडे सुरू झाली आहे. नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येऊ लागले आहे. अनेकांना रोजगार टिकवण्याची कसरत करावी लागत आहे. अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत. या सगळ्याला कोरोना जबाबदार असला, तरी कोरोनाचा प्रसार करण्यास जबाबदार आपणच आहोत, हे मान्य करावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी रविवारी ‘मी जबाबदार’ असे का वदवून घेतले आहे? नागरिक सुधारत नाहीत त्यामुळे हा संसर्ग वाढतो आहे. इतके कळकळीचे आव्हान करूनही शिवसेनेचा एक मंत्री हजारोंच्या संख्येने गर्दी जमवतो. ज्या भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे तिथे केलेले हे शक्तीप्रदर्शन अत्यंत घातक आहे. त्यात एक जरी संसर्ग झालेला रुग्ण असेल तर संपूर्ण महाराष्ट्र त्यातून धोक्यात येऊ शकतो. एवढेही या वनमंत्र्यांना समजू नये का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, पण त्याकडे मंत्री आणि स्वपक्षीय लोकच दुर्लक्ष करीत आहेत. गेल्या वर्षी नव्हती, एवढी अभूतपूर्व परिस्थिती यंदा पश्चिम विदर्भात निर्माण झाली आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ अशा पाचही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता बळावली आहे. दररोज रुग्णसंख्या वाढतेच आहे. प्रत्येकाने काळजी घेण्याची आणि नियमांचे कठोर पालन करण्याची आवश्यकता आहे, पण प्रत्यक्ष व्यवहारात आम्ही चुका का करतो, कळायला मार्ग नाही. चुकांमध्ये सुधारणा केल्या नाहीत तर येणारा काळ आपल्याला विनाशाकडे घेऊन जाईल, हे आजच लक्षात घेतले पाहिजे. रोजगार, शिक्षण, आरोग्य सर्व धोक्यात येईल आणि सर्वस्व गमावून बसण्याची वेळ येईल. कोरोनाने मरायचे की, टाचा घासून मरायचे हाच पर्याय असेल. त्यामुळे आता तरी जागरूक होण्याची गरज आहे. नियम मोडणाºयांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. आज मुख्यमंत्री, हे सरकार जर संजय राठोड आणि त्या गर्दीतील लोकांवर कारवाई करतील, त्यांना दंड, शिक्षा करतील तर चांगला संदेश जाईल, नाहीतर लोक मोकाट सुटतील आणि आपल्याला विनाशाकडे नेतील हे नक्की. ‘यथा राजा तथा प्रजा’ अशी म्हण आहे. आपले नेते जसे वागतात तसेच कार्यकर्ते आणि जनता. संजय राठोड यांच्यासारखे नेते, सरकारमधील घटक असलेले मंत्रीच नियम मोडत असतील, तर सगळे त्याचे अनुकरण करतील हे नक्की.


नेतेमंडळीच जर कसलीही बंधने पाळणार नसतील, तर जनता कशी पाळेल? याबाबत आपल्याकडे एक दाखला दिला जातो. तो म्हणजे, एकदा एका साधूकडे एक माणूस जातो. त्या साधूकडे लोकांचे समाधान करण्याची फार मोठी ताकद होती. त्यामुळे रांग लागलेली असायची. त्यामुळे आपल्या मुलाला घेऊन जातो आणि दाखवतो. महाराज, हे पोरगं गूळ लई खातंय. किती समजावलं तरी ऐकत नाही. इतका गूळ आहे याच्या अंगात की झोपला तरी त्याच्याभोवती मुंगळे जमतात. साधूने त्या मुलाकडे पाहिले आणि सांगितले, ८ दिवसांनी या. आठ दिवसांनी आल्यावर साधू त्या मुलाकडे बघतो आणि सांगतो, बाळा आता गूळ खायचा नाही. मुलगा मान हलवतो आणि गूळ खाणे सोडून देतो. तो माणूस म्हणतो, महाराज एवढेच करायचे होते, तर आठ दिवसांनी या का सांगितले? तर तो साधू म्हणाला, मलाही गूळ खूप आवडत होता, पण मी गूळ खायचा आणि गूळ खाणे वाईट आहे हे त्या मुलाला कसे सांगणार? त्यासाठी आठ दिवस झाले मी गूळ खाणे थांबवले आहे. आता मी जे करतो तेच लोकांना सांगू शकतो. मी नीट वागायचे नाही आणि लोकांना उपदेश करायचा याला अर्थ नसतो. आज राज्यकर्ते नियम पाळत नसतील तर जनता कशी काय नियम पाळेल? सभा-संमेलने, उत्सव सगळं नीट चालले आहे. लग्न समारंभ होत आहेत. मग जनता बाहेर पडली तर काय फरक पडतो? हा चुकीचा संदेश आहे. त्यामुळे कारवाई होणे आवश्यक आहे. तरच कोरोनाला थांबवता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: