छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी साम्राज्य उभे राहत असताना घडणाºया इतिहासातील कथांवर अनेक चित्रपट महाराष्ट्रात आजवर घडून गेले. किंबहुना मराठी माणसांचे असणारे शिवप्रेम आणि महाराजांविषयी असलेल्या आदरामुळे हे चित्रपट भरपूर चालणार याची खात्रीच असल्यामुळे गेल्या साठ वर्षांत अनेक मराठी चित्रपट यावर येऊन गेले. त्यामध्ये छत्रपतींची भूमिका साकारणारे अनेक कलाकार होऊन गेले. आजही स्वराज्यरक्षक संभाजीराजे, जिजाऊंवरील मालिका गाजताना दिसत आहे. त्यातूनही आपल्याला महाराजांचे दर्शन घडले आहे. यासाठी आजवर कोणी कोणी महाराजांच्या भूमिका केल्या आणि प्रेक्षकांना भारावून टाकले त्यावर नजर मारतानाही आपल्याला आनंद झाल्याशिवाय राहात नाही.
पौराणिक चित्रपटांतील देवदेवतांची भूमिका करणारे कलाकार जेव्हा वास्तवात दिसतात तेव्हा देव समजून त्यांच्या पाया पडणारे भोळे प्रेक्षक असंख्य असतात. किंबहुना त्या भूमिकेतून बाहेर पडणेही त्या कलाकारांना सहज शक्य होत नाही. त्याचप्रमाणे छत्रपतींची भूमिका पडद्यावर साकारणाºया कलाकारांना पाहून मनात अभिमान आणि शौर्याची भावना उभी राहते. आपल्याकडे भालजी पेंढारकरांनी छत्रपतींवर अनेक चित्रपट बनवले. या चित्रपटांमधून काम करणाºयांमध्ये आणि छत्रपतींची भूमिका साकारणाºयांमध्ये चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांढरे यांचा वाटा मोठा आहे. इतका मोठा आहे की, महाराज म्हटल्यावर चंद्रकांत, सूर्यकांत यांपैकीच एक चेहरा डोळ्यासमोर येतो. अनेक ठिकाणी महाराजांचे फोटो, चित्र, पोस्टर्स जेव्हा पहायला मिळतात तेव्हा ते फोटो महाराजांचे नाही तर चंद्रकांत, सूर्यकांत यांच्यापैकी कोणाचा तरी असतो हे चाणाक्ष रसिकांच्या सहज लक्षात येते, पण महाराजांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाने या कलाकारांना केवढी लोकप्रियता मिळवून दिली हे पण आश्चर्य म्हणावे लागेल.
भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटांमधून या दोघांनी आलटूनपालटून केलेल्या महाराजांच्या भूमिका असल्या तरी त्या चित्रपटांची नावे लक्षात घेतली पाहिजेत. भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा दिव्य संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांतून दिला. ‘बहिर्जी नाईक’, ‘नेताजी पालकर’, ‘मोहित्यांची मंजुळा’ यांतील संवादांमधून भालजींनी दुबळेपणा व लाचारीविरुद्ध शाब्दिक आसूड ओढले. स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य व संयमी असा खंबीरपणा आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली. यामागचा उद्देश छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य येणे हाच होता.
हे सगळे चित्रपट १९६० च्या दशकापर्यंत निर्माण झालेले होते. कृष्णधवल असे होते. फक्त ‘गनिमी कावा’ हा एकमेव भालजी पेंढारकरांनी निर्माण केलेला रंगीत चित्रपट होता. याशिवाय ‘ती पावनखिंड’, ‘राजा शिवछत्रपती‘, ‘सर्जा’, ‘बाल शिवाजी’ असे अनेक चित्रपट नंतरच्या काळात निर्माण झाले. त्यातून वेगवेगळ्या कलाकारांनी महाराजांची भूमिका सादर केलेली दिसून येते. चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांढरे यांच्यानंतर महाराजांची भूमिका रंगीत चित्रपटाद्वारे ‘राजा शिवछत्रपती’मधून श्रीराम गोजमगुंडे या कलाकाराने साकारली होती. या चित्रपटालाही तुफान यश मिळाले होते. १९७५ च्या सुमारास आलेल्या या चित्रपटात मराठी, हिंदी अशी सरमिसळ कलाकारांची जंत्रीच होती. श्रीराम गोजमगुंडे हे रंगीत चित्रपटातील पहिले शिवाजी महाराज साकारणारे कलाकार. यात अनेक दिग्गज कलाकार होते. स्मिता पाटील, इफ्तेकार, विजू खोटे अशा कलाकारांना घेऊन छत्रपतींची रणनीती चांगल्या प्रकारे दाखवण्याचे काम या चित्रपटातून केले होते.
१९८१ च्या दरम्यान ‘बाल शिवाजी’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात बाल शिवाजीची भूमिका आनंद जोशी या कलाकाराने साकारली होती. मराठी चित्रपटसृष्टीत सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात कौटुंबिक चित्रपटातून काम करणारा देखणा कलाकार म्हणजे रवींद्र महाजनी. कोल्हापूरच्या या कलाकाराने १९८६ च्या सुमारास रमेश देव यांनी निर्माण केलेल्या ‘सर्जा’ या चित्रपटात महाराजांची भूमिका साकारली होती. त्यानंतर दहा वर्षांपूर्वी सध्याच्या परिस्थितीवर आधारित असलेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात महाराजांची भूमिका महेश मांजरेकर यांनी केली होती. महेश मांजरेकर एक यशस्वी निर्माने, दिग्दर्शक आहेत, पण कितीही आपण मोठे झालो तरी महाराजांच्या पायाशीच आपण असू शकतो. त्यामुळे महाराजांची ही भूमिका करायचा मोह त्यांना आवरणे शक्यच नव्हते. आज महाराष्टÑाला, मराठी माणसाला स्वाभिमानाची गरज आहे आणि स्वाभिमानानेच तो पुढे जाऊ शकतो हे सांगणारा, ऐतिहासिक नसला तरी महाराजांचे विचार पुढे नेणारा चित्रपट होता. गेल्या वर्षीपर्यंत झी मराठीवर गाजत असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजीराजे’ या मालिकेत शंतनू मोघे या कलाकाराने महाराजांची केलेली भूमिकाही अनेकांना आवडली होती. याशिवाय नाटक आणि अन्य मालिकांमधून अमोल कोल्हे यांनी शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. याशिवायही अनेक कलाकारांनी महाराजांच्या भूमिका साकारल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षण, प्रेम सर्वांना कायमच असल्यामुळे महाराजांच्या प्रेमापोटी या कलाकारांना प्रेक्षक स्वीकारतात. त्यात महाराजांचे रूप पाहून महाराजांना अभिवादन करत असतात, पण महाराजांचे नाव कोणत्याही रूपात आले, कोणत्याही माध्यमातून आले तरी फक्त प्रेरणा, स्फूर्ती आणि अभिमानच मिळतो याची साक्ष हे चित्रपट आणि मालिका देत असतात.
गेल्या वर्षी आलेल्या ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका लक्षवेधी होती. अजय देवगणची निर्मिती आणि ओम राऊत यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात शरद केळकर या कलाकाराने छत्रपती शिवरायांची भूमिका केली होती. ती पण अत्यंत चांगली आणि लक्षवेधी होती. शिवरायांचा उजवा हात म्हणजे तान्हाजी मालुसरे असे कथानक असले तरी शिवरायांभोवतीच हा चित्रपट फिरत होता. तान्हाजींची भूमिका अजय देवगणने केली होती, तर सैफ अली खानने उदयभानची भूमिका केली होती.
त्याअगोदर २०१८ मध्ये ‘फर्जंद’ हा एक भव्यदिव्य चित्रपट आला होता. दिग्पाल लांजेकर या तरुण दिग्दर्शकाने निर्माण केलेल्या या चित्रपटात चिन्मय मांडलेकरने शिवरायांची भूमिका साकारली होती, पण छत्रपतींची भूमिका कोणीही साकारली तरी ती पाहण्याचा आनंद नेहमीच सर्वांना सुखद असा असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा