मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१

किती पाणी घालायचे?


पाण्याची भेसळ करून विकतात हे जगजाहीर आहे, पण किती पाणी मिसळायचे यालाही काही मर्यादा असते. आमच्या वाहिन्यांच्या जगात असाच प्रकार पहायला मिळतो. कथानक संपले तरी त्यात पाणी मिसळून प्रेक्षकांना वैताग आणायचा प्रकार या वाहिन्या करत असतात. म्हणून मालिकांच्या निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार या सर्वांना विचारावे लागेल की, त्या संपलेल्या कथानकात पाणीतरी किती घालायचे? दूधवाल्याने जर इतके पाणी घातले तर दुधाचा रंगही दिसणार नाही इतके ते पातळ पाणचट असेल. अगदी तोच प्रकार मालिका पाहताना दिसून येतो.


साधारणपणे एखादी मालिका किमान वर्षभर चालेल असा अंदाज घेऊन ती दणक्यात सुरू करतात. त्यासाठी एखादे लोकेशन ठरवले जाते. ती वर्षभरात चांगली पकड घेताना दिसते आहे म्हटल्यावर त्या मालिकेच्या कथानकात पाणी घालून वाढवले जाते. मग त्यामध्ये कोण कोणत्या अवस्थेत आहे याचा काही पत्ता लेखक, निर्माते आणि दिग्दर्शकांनाही नसतो. आता त्या ‘माझ्या नवºयाची बायको’ या मालिकेत ती जेनी गेले सव्वावर्ष गरोदर आहे. मागच्या आठवड्यात म्हणे तिचे पोट जरा कुठे दिसायला लागले म्हणून आनंद पोटात माझ्या मायेना असा आनंद त्या आनंदला झाला. लॉकडाऊनचा काळ संपला, त्यापूर्वी जवळपास सहा महिने ती गरोदर असल्याचे दाखवले जात होते. त्यासाठी तिचे खाण्यापिण्याचे चोचले पुरवण्यासाठी सौमित्र, राधिकाने तिला आपल्या घरी आणले होते. हे सगळे असताना ती किती वर्ष गरोदर दाखवणार आहात? म्हणजे किक्रेटमध्ये जसे धावांचे विक्रम करतात तसे मालिकेत हे गरोदरपणाचे विक्रम केले जाणार का? ‘चार दिवस सासू’चे या मालिकेत सुमारे सव्वादोन वर्षं कविता लाड गरोदर होती. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेत जान्हवी म्हणजे तेजश्री साधारण सव्वावर्ष गरोदर होती. आता जेनी किती दिवस गरोदर दाखवणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे.

मालिकेचे चित्रीकरण साधारणपणे वर्षभर एका ठिकाणी चालेल म्हणून ते ठिकाण बुक केले जाते, करार करून, भाडे भरून ती जागा घेतली जाते, पण या मालिका संपण्याचे नावच दिसत नाही. तसे त्या जागेचे मालक जागा सोडा, आम्हाला कामे आहेत, आता इथे चित्रीकरण करू नका, असे काही सांगतात. मग चित्रीकरणाचे स्थळ बदलण्यासाठी कथानकात बदल करावा लागतो. आता सध्या राधिकाला खेडेगावात आणण्याचे तेच कारण असावे. गुलमोहर सोसायटी चार वर्ष दाखवली. तिथेच सगळ्यांची घरे आणि कार्यालये. एकाच फ्लॅटमध्ये राधिकाचे घर, नाना-नानींचे घर, रेवतीचे घर, महाजनी काका, गुरुनाथ सगळ्यांची घरे एकाच फ्लॅटमध्ये फक्त बेडशीट बदलून दाखवली गेली, पण चित्रीकरणाचे संपण्याचे नाव नाही. त्यामुळे तिथली जागा सोडायला लागली की काय कोण जाणे, पण नाना-नानी, महाजनी, गुप्ते, रेवती सगळे कथानकातून गायब झाले. आता ठाण्यातील चित्रीकरणाचे स्थळ मिळत नसावे म्हणून या मालिकेचे पुनर्वसन ग्रामीण भागात केले जात आहे. राधिका मसालेचा परदेशात व्याप वाढवायला जाणारी राधिका आता ग्रामीण भागात हा व्याप वाढवायला लागली आहे. तिथे नवे घर भाड्याने घेतले आहे. जागा बदलल्यामुळे कथानकात पाणी घालावे लागले.


मागच्या महिन्यात राणा-अंजलीची ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपली, पण सुरुवातीला जो आमदारांचा वाडा, खानदानी श्रीमंताचा वाडा होता, तो चित्रीकरणासाठी मिळाला नाही म्हणून वाडा पडायला आलाय असे दाखवून एका बंगल्यात आणले. चक्क गावच बदलले आणि शेताच्या काठावर चित्रीकरण व्हायला लागले. कथानकात पाणी घातले की असे प्रकार होतात. त्यामुळे पूर्वी जसे दूरदर्शनवरील मालिकांना एपिसोड किती असावेत याची बंधने असायची तशी बंधने घातली पाहिजेत. विनाकारण कथानके ताणून वाढवू नका. प्रेक्षकांचा अंत पाहू नका, त्यांना छळू नका. दूरदर्शन फक्त १३ भागांना परवानगी देत होते. तेसुद्धा आठवड्यातून एकदा प्रसारण. फक्त ‘बुनियाद’ ही एकमेव मालिका त्या काळात होती, जिला आठवड्यातून मंगळवार आणि शनिवार असे दोन दिवस दिले होते. तरी ती मालिका १०४ भागांत संपली होती. बाकीच्या सगळ्या मालिका १३, २६ अशा भागांत असायच्या. रामायण, महाभारतही वर्ष-दीड वर्षापेक्षा जास्त चालू दिले नाही. त्याला जर अशी हजार, पाचशे भागांची परवानगी दिली असती, तर रामानंद सागर यांनी अक्षरश: १४ वर्षांत राम-सीतेने काय केले हे दाखवले असते. कल्पना लढवून भरताने १४ वर्ष राज्य कसे केले ते पाणी घालून घालून दाखवले असते, पण त्याची आवश्यकता नसते. कथानक हे व्यवस्थित उरकणे महत्त्वाचे असते, पण या पाणीदार कारभारामुळे आता इतके एपिसोड होतात की लोक बघत आहेत म्हणून कथानकं लांबवायची.

विशेषत: सत्य घटनेशी साधर्म्य असणाºया मालिका तर मर्यादित भागातच संपवल्या पाहिजेत. ‘काय घडलं त्या रात्री’ ही मालिका सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या संदर्भात आहे. ती जास्त काळ ताणता कामा नये. ‘१०० डेज’सारखी ती मर्यादित भागात संपवून टाकली पाहिजे. तोच प्रकार ‘देवमाणूस’चा झालेला आहे. अजितकुमारने खुनांची मालिका चालवली आहे. बसमधला प्रवासी, आपली प्रेयसी, रेश्मा, अपर्णा, अपर्णाची आई, पवार, संजू, मंजुळा इतके खून केल्यानंतर आता ही मालिका कुठेतरी निर्णायक टप्प्यावर आली पाहिजे. डिंपी इतकी क्रूर नाहीये की ती अजितला अजून खुनात मदत करेल. त्यामुळे तिथे आता तोंड उघडून ही मालिका लवकर संपवली पाहिजे, तरच त्यात अर्थ राहील.


मालिका या आटोपशीर आणि कमी भागांच्याच असल्या पाहिजेत. ३ महिन्यांत संपतील अशा शंभर नव्वद भागांच्या असल्या तर नवे कलाकार आणि कथानके समोर येतील. आज चार चार वर्ष कलाकार एका वाहिनीवर मुक्काम करून आहेत त्यांना त्यांच्या भूमिकेतून नंतर बाहेरही पडता येणार नाही. आता राणा, अंजली कुठे दिसत आहेत? राधिकाला नंतर कोणी लवकर विचारेल का? पण कलाकार या दीर्घकाळ चालणाºया मालिकांमध्ये अडकून आपल्या अभिनयावरही मर्यादा लावून घेत आहेत. एका साचात अडकून पडत आहेत. त्यामुळे पाणी घालण्याचे प्रकार थांबवले गेले पाहिजेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: