राज्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर नेमकी काय खबरदारी घ्यायची यासाठी सरकारने रविवारी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत तज्ज्ञांबरोबर अनेक मंत्री असणार आहेत. त्या बैठकीत पुढील दिशा ठरणार आहे, पण पुन्हा एकदा लॉकडाऊनचे सावट राज्यावर आहे असे आज वाटू लागले आहे. तसे झाले तर सामान्यांना आयुष्यातून उठायची वेळ येईल. यासाठी नागरिकांनी आता तरी सावध असले पाहिजे.
मुंबई, पुणे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरतोय. कोविड-१९ चा संसर्ग ग्रामीण भागात पसरत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये एक दिवसाचा लॉकडाऊन तर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. कुठे संचारबंदी जारी करण्यात आली आहे. वाशिम आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या १२ फेब्रुवारीपासून ४,८९१ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. ही परिस्थिती का ओढवली तर त्याचे कारण म्हणजे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये शिथिल पडलेली सरकारी यंत्रणा. कोविड-१९ हा संसर्गजन्य आजार आहे. एका व्यक्तीपासून दुसºया व्यक्तीमध्ये झपाट्याने पसरणारा. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचं आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणावर हायरिस्क व्यक्तींचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आलं होतं. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्टना ट्रेस करणं फार महत्त्वाचं आहे. अमरावतीमध्ये १२ फेब्रुवारीपासून ३ हजार कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत, तर १८ फेब्रुवारीला अमरावती शहरात ५४२ रुग्ण आढळले. पूर्वी लोक सतर्क होते. नियम पाळायचे, मात्र आता लोक नियम पाळत नाहीत, हेदेखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याचं कारण आहे. याशिवाय लॉकडाऊन उघडल्याने राज्यात मोठ्या संख्येने लग्नसमारंभ होऊ लागलेत. लग्नात ५० लोकांना परवानगी असताना मोठ्या संख्येने लोकांची हजेरी दिसू लागली आहे.
लग्नसमारंभातील लोकांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीवर निर्बंध घालण्यासाठी मुंबईसह इतर जिल्ह्यांत लग्नसमारंभांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने शहरातील मंगल कार्यालयांवर धाड टाकण्याची सूचना अधिकाºयांना दिली आहे. लग्नसमारंभाचे नियम मोडणारे आयोजक आणि व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे, पण नागरिक ही वेळ का येऊ देतात हा खरा प्रश्न आहे. राज्यात जानेवारी महिन्यात १४ हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. निवडणुकीसाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला. लोक प्रचार, मतदान यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. शहरांमध्ये काम करणारे लोक मतदानासाठी ग्रामीण भागात गेले. प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. लोकांची सरमिसळ झाली. त्याचप्रमाणे विविध आंदोलने, सभा, राजकीय निवडीनंतर घेतलेल्या सभा यांमुळे गर्दी वाढली आणि त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. आपल्याकडे कितीतरी मंत्री, आमदार यांना संसर्ग झाला आहे. हेच लोक स्टेजवर होते, त्यांच्या संपर्कात शेकडो लोक होते. हे पण कोरोनावाढीचे कारण असू शकते. नाना पटोलेंच्या निवडीनंतर काँग्रेसने जी ट्रॅक्टर रॅली काढली, सभा घेतली त्या स्टेजवर किती लोक होते, बाहेर उपस्थित किती कार्यकर्ते होते याचाही विचार केला पाहिजे. नेते, कार्यकर्ते आणि नागरिक सगळेच बेजबाबादार झाल्याने हा रोगाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे ही लॉकडाऊनची नवी चिंता आहे.
आणखी एक बाब म्हणजे रुग्णसंख्या वाढण्याचं खापर फक्त लोकल ट्रेनवर फोडून चालणार नाही. राजकीय नेते, पुढारी यांचे कार्यक्रम, मोठमोठ्या रॅली होत आहेत. लोकांना कोविड-१९ बाबत भीती राहिली नाही. त्यामुळे लोकल बंद करण्याचा आततायीपणा आता करू नये. लोकल प्रवासात प्रवासी बºयापैकी काळजी घेत आहेत, पण सभा-संमेलन आणि आंदोलन यावर कुठेतरी निर्बंध येण्याची गरज आहे. रस्त्यावरून चालताना अनेक लोकांचे मास्क हनुवटीवर, गळ्याभोवती लटकलेलं किंवा हातात असल्याचं पाहायला मिळतं. काही लोक मास्कशिवाय फिरताना आढळून येतात. हे चुकीचे आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा थंडी वाढली आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्यात अनेक जिल्ह्यांत तापमान कमी झालेलं पाहायला मिळालं आहे. अवकाळी पावसाचाही काही परिणाम असू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाबाबत लोकांमध्ये आजही अनेक गैरसमज आहेत. त्यातील एक प्रमुख म्हणजे, कोरोना खरा नाहीच. कोरोना नाहीच, असा अपप्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय. हा समज पसरणेही धोक्याचे आहे, पण यामुळे पुन्हा एकदा राज्यावर लॉकडाऊनचे सावट आहे. त्याचा फटका सामान्यांना बसणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात घरात बसून राहावे लागल्यामुळे, रोजगार गेल्यामुळे, आर्थिक फटका बसल्यामुळे एक वर्ग अत्यंत आक्रमक झालेला आहे. त्यातच शाळा सुरू झाल्यामुळेही पुन्हा गर्दी वाढायला लागली आहे. रस्त्यावरच्या विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोजगार गेलेले लोक काहीतरी विकायला म्हणून रस्त्यावर बसलेले दिसतात. त्यांच्याभोवती जमणारी गर्दी, बाजारपेठेतील गर्दी ही सगळी फैलाव करण्याची कारणे ठरू शकतात. विशेष म्हणजे बिनधास्त मास्क न वापरता लोक हिंडताना दिसतात. आता मास्कशिवाय कोणी दिसले तर दंड आकारला जाणार आहे, पण त्यातून माणसांमध्ये सुधारणा होणार नाही. आपल्याला कायदेभंगाची चळवळ करून स्वातंत्र्य मिळाले, पण कायदे मोडायची सवय मात्र आपली गेली नाही. आपल्या राज्यातही आपणच कायदे मोडायचे हे फार मोठे दुर्दैव आहे. कायदे पालन करणारा माणूस म्हणजे मूर्ख ठरतो आहे, अशी अवस्था झाली आहे. ही मनोवृत्ती बदलण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा