सध्या झी मराठी वाहिनीवर प्रत्येक गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी काय घडलं त्या रात्री ही मालिका प्रसारित होत आहे. अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर तयार केलेली ही मालिका म्हणजे वृत्त वाहिन्यांचा भोंगळ कारभार आणि त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी काढलेली मालिका आहे. अत्यंत सफाईदारपणे ही मालिका गेले महिनाभर प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेणारी ठरत आहे. ३१ डिसेंबरला सुरू झालेल्या या मालिकेने महिनाभरात चांगली बाजी मारल्याचे दिसत आहे.
जून महिन्यात सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केली आणि संपूर्ण देशभरातील राजकारण ढवळून निघाले. यावरून खून की, आत्महत्या याचे राजकारण रंगले. पोलिसांवर अविश्वास, सीबीआयकडे केस सोपवण्यासाठी वाढलेला दबाव यावरून काही सेलिब्रेटिंचं त्यात वक्तव्य होणे. भरीला प्रसारमाध्यमांनी म्हणजे टीआरपी वाढवण्यासाठी वृत्त वाहिन्यांनी या प्रकरणाला दिलेले नको तितके महत्त्व. यामुळे जवळपास सहा महिने चांगले राजकारण तापले. त्याच पार्श्वभूमीवर काय घडलं त्या रात्री ही मालिका ३१ डिसेंबरपासून सुरू झाली आणि प्रेक्षकांना चांगली मेजवानी नव्या वर्षात प्रवेश करताना मिळाली.
मालिकांमधून घराघरातून लोकप्रिय असलेला अभिनेता सिद्धांत छाया हा आत्महत्या करतो आणि त्याच्या आत्महत्येने कशी देशभर खळबळ माजते. विशेषत: ती खळबळ टिव्ही चॅनेलवाले न्यूज रिपोर्टर कशी माजवतात यावर प्रकाश टाकणारी ही चांगली मालिका आहे. बातमीतून सत्य दाखवण्यापेक्षा खोटी बातमी कशी क्रिएट केली जाते आणि लोकांची कशी दिशाभूल केली जाते याचे अत्यंत वास्तव चित्रण या मालिकेतून घडते. वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या बातमीवर कितपत विश्वास ठेवायचा, असा प्रश्न निर्माण करणारी ही अत्यंत धाडसी मालिका म्हणावी लागेल. त्यामुळे किमान वृत्त वाहिन्या खरे वृत्त देण्यासाठी धडपडतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. खरंतर काही समस्या या समस्या नसताना घाबरवून सोडून वृत्त वाहिन्यांनी चिघळवल्याने वाढल्याची उदाहरणे आपण अनेकवेळा पाहिले असेल. कोरोनाच्या काळातही अनेक वाहिन्यांनी अतिरंजीत वृत्त प्रसारित करून सामान्यांचे जगणे महाग केले होते. वृत्त भडक करून अशांतता माजवण्याचे प्रकार घडताना आपण पाहतो. अर्णब गोस्वामीसारखे सुपारीबाज लोक सत्य असल्याचा भास निर्माण करण्यासाठी आक्रस्ताळेपणाने बोलतात. याचा वाईट परिणाम किंबहुना दुष्परिणाम प्रेक्षकांवर होत असतो. हे अत्यंत नेमकेपणाने या मालिकेत टिपले आहे.
पाल असेल, तर तिची मगर कशी करायची याची कला एकदा अवगत झाली की, नसलेली बातमीही बातमी म्हणून चालवली जाते. काहीतरी खळबळजनक आपल्याकडे आहे हे दाखवून अन्य वाहिन्यांवरून प्रेक्षक आपल्याकडे वळवण्यासाठी चाललेली जीवघेणी स्पर्धा हे अत्यंत भयानक आहे.
सिद्धांत छाया हा गळफास लावून आत्महत्या करतो. मग त्याच्या मित्रांची चौकशी होते. मोलकरणीची चौकशी होते. त्याच्या आत्महत्येस जबाबदार नेमका कोण आहे यावरून राजकीय नेत्यांची चौकशी सुरू होते. हे जे वातावरण या मालिकेत निर्माण केलेले आहे ते अत्यंत वास्तववादी आहे. एक वडापाव विकणारा नेता होतो, दहीहंडीचे कार्यक्रम करून राजकीय नेता बनतो, त्याची दादागिरी, राजकारण याचेही अत्यंत वास्तव चित्रण या मालिकेत आहे. कारण नसताना बातमी तयार करण्यासाठी पैसे देऊन बातम्या कशा मॅनेज केल्या जातात याचेही वास्तव चित्रण या मालिकेत पहायला मिळते. खुनाचा तपास भरकटत ठेवायचा, पोलिसांच्या तपासकार्यात अडथळे निर्माण करायचे आणि पोलिसांवर जाहीर टीका करून त्यांची प्रतिमा माध्यमे कशी बदनाम करतात हे स्पष्टपणे दाखवून वृत्त वाहिन्यांचा बुरखा या मालिकेने टराटरा फाडला आहे. विशेषत: सिद्धांत छायाची मोलकरीण करिना हिची कारण नसताना चौकशी केली जाते. त्यावेळी ती चक्कर येऊन पडते, तर लगेच तिला प्रेग्नंट असल्यामुळे चक्कर आली, तिच्या पोटात असलेले मूल सिद्धांत छायाचेच असेल का?, यावर चर्चा होते आणि बातमी दिवसभर चालवली जाते. हे असले प्रकार माध्यमांतून सतत चालतात. विशेषत: मागच्या महिन्यात धनंजय मुंडेंचे बलात्कार प्रकरण अशाचप्रकारे चालवले गेले होते.
पोलिसांमध्ये आपल्या प्रतिस्पर्धी अधिकाºयांची कोंडी करण्यासाठी कसे राजकारण केले जाते, याचेही दर्शन ही मालिका घडवते. तपासात अडथळे निर्माण करणारे पोलीस, राजकारण्यांना टीप देणारे पोलीस, असे सगळे प्रकार या मालिकेत पाहायला मिळतात; पण एक महिला पोलीस अधिकारी आपल्या हुशारीने या सगळ्यांवर कशाप्रकारे मात करते आणि तपास करून नेमके काय घडले त्या रात्री हे समोर आणते, हे पाहण्यासाठी ही मालिका एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे.
अर्थात या मालिकेत अचानकपणे आणलेला फिल्मी ड्रामा थोडासा खटकणारा आहे, म्हणजे अनावश्यक वाटतो. तो म्हणजे राजकारणी गुंड असलेल्या राजन पर्वतेला रेवती अटक केल्यावर त्याला सोडवण्यासाठी जो वकील येतो तो रेवतीचाच नवरा असणे हे अनावश्यक वाटते. बायको पोलीस अधिकारी आणि नवरा वकील हा फॉर्म्युला अनेकवेळा हिंदी सिनेमात आलेला आहे. यात हेमा मालिनी, स्मीता पाटील यांनी अशा भूमिका केलेल्या आहेत. तो वकील तिचा नवराच दाखवून ट्विस्ट निर्माण करण्याचा लेखकाचा हा प्रयोग अत्यंत नाटकी वाटतो. त्यांचे काही संबंध या कथानकात दाखवण्याची गरज नव्हती. अगदी मित्र-मित्र असलेले दाखवले असते तरीही ते फिल्मीच झाले असते. दोस्ताना सारख्या चित्रपटात अमिताभ पोलीस, तर शत्रुघ्न सिन्हा वकील. त्याने पकडायचे याने सोडवायचे आणि सलामत रहे दोस्ताना हमारा म्हणायचे, हे प्रकार जुनेच आहेत. पण कारण नसताना रेवतीचाच नवरा राजन पर्वतेचे वकीलपत्र घेतो आणि बायकोने पकडलेल्या संशयिताला सोडवण्यासाठी पुढे येतो हे तितकेसे मनाला पटत नाही; पण एकूणच ही मालिका चांगली पकड घेताना दिसत आहे.
या मालिकेचे दिग्दर्शन परेश पाटील यांनी चांगले केले आहे. कलाकारांमध्ये किशोर कदम यांनी केलेला राजन पर्वते हा भाव खाऊन जातो. थंड डोक्याचा खलनायक अत्यंत सहजपणे साकारलेला आहे. आयएसपी रेवती बोरकरची भूमिका मानसी साळवीने अत्यंत प्रभावीपणे केलेली आहे. सिद्धांत छायाच्या वडिलांचे काम विजय निकमने ज्या प्रकारे केलेले आहे त्याचे वर्णन अप्रतिम म्हणून करावे लागेल. अंडरप्ले अशी भूमिका करून तो ज्याप्रकारे सर्वांना छळतोय हे पाहणे रंजक वाटते. बाकी सुशांत शेलार, स्मीता गोंदकर, जयवंत वाडकर, चेतन वडनेरे, स्वाती लिमये यांनी आपापल्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रकार केलेला आहे. संजय जाधव यांनी वकिलाच्या भूमिकेत या मालिकेत दिलेले दर्शन आणि अभिनय सुखद असेच आहे. पण या मालिकेने कथानकातील खलनायकापेक्षा प्रसारमाध्यमातील, वृत्त वाहिन्यांवरील खल प्रवृत्तीवरचा टाकलेला प्रकाश हा महत्त्वाचा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा