व्हॅलेंटाईन डेचा सप्ताह सुरू झाला आहे. काही वर्षांपूर्वी हा फक्त डे साजरा होत होता. आता गेल्या काही वर्षांपासून तो सप्ताह साजरा होऊ लागला आहे. म्हणजे आपल्याकडे नवरात्राला जसे वेगवेगळे रंग, अवतार असतात, रूपे असतात तशी म्हणे ही प्रेमाची व्यक्त करण्याची वेगवेगळी रूपे दिसायला लागली आहेत. म्हणजे व्हॅलेंटाईनच्या मुख्य उत्सवाचा दिवस १४ फेब्रुवारी असला, तर त्याचे वेध आठवडाभर आधी लागतात. ऐकूनच गंमत वाटते. काय तर रोझ डे, चॉकलेट डे, हग डे, किस डे आणि पुढचे न बोललेले बरे, म्हणजे प्रेम व्यक्त करायचा दिवस. अर्थात ते कशा प्रकारे व्यक्त केले जाते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे; पण आता हा सण रूळला आपल्यात. सुरुवातीला विरोध झाला, टीका झाली; पण हळूहळू तो अंगवळणी पडला. चायनीज पदार्थांना नावे ठेवणारे आणि नुडल्सना दानवी म्हणून किळसवाणी तोंडे करणारी जशी चायनीज डीशवर ताव मारू लागले आहेत. तसाच आता व्हॅलेंटाईन डे अंगवळणी पडला आहे.
या दिवसाची तयारी आठवडा-दहा दिवस आधीपासूनच सुरू होते. तशी ती यंदाही झाली. दुकानाच्या शोकेसेसमध्ये लाल, गुलाबी रंगाची फुग्याची हृदये झळकू लागली आहेत. मोठमोठे आणि आकर्षक ग्रीटिंग कार्डसही लक्ष वेधून घेत आहेत. वेगवेगळ्या उंची हॉटेलांच्या तितक्याच फॅन्सी रेस्तराँमध्ये जागांचे बुकिंग केले जात आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही उत येत आहे. चॉकलेट डे च्या शुभेच्छा म्हणून कसली कसली चित्रविचित्र चॉकलेट व्हॉट्सअॅपवर, फेसबुकवर व्हायरल होत आहेत. इमोजीमध्ये काय काय हृदयांचे प्रकटीकरण होत आहे. मज्जाच मजा आहे सगळी.
आता तर व्हॅलेंटाईन डे ची सुरुवात आठवडाभर अगोदर वेगवेगळे सण साजरे करून केली जाते. म्हणजे नवरात्रात जसे नऊ रंगाचे कपडे, साड्या घातल्या जातात, तसे अगोदर आठवडाभर हे दिवस साजरे होत आहेत. कधी चॉकलेट डे, कधी रोझ डे, कधी हग डे वगैरे. या हग डे दिवशी शाळा, कॉलेजातून मुले-मुली हागत असतात (मिठ्या मारत असतात) तेव्हा गंमत वाटते, म्हणजे हस्तांदोलनापासून सुरू झालेली विलायती संस्कृती मिठ्या मारेपर्यंत पोहोचली आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सोशल डिस्टन्स ठेवून हे हागणे (मिठ्या मारणे) जमते का हे पहावे लागेल.
यादरम्यान गेल्या आठवड्यात तरुणींच्या नव्या आकर्षक डिझाइन्सच्या कपड्यांची रेलचेल आहे. मुंबईसारख्या महानगरात, तर हा सण म्हणजे पर्वणीच असते. तिथले डिस्को थेकचे बुकिंगही दोन-तीन दिवसांपूर्वीच संपत आले, म्हणजे आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या स्वागतासाठी सगळेजण किती सज्ज झालेले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
त्यामुळे अशा उत्साहात मिठाचा खडा टाकून सारे दूधच नासवण्यात कमालीचा आंबट आनंद घेण्याची सवय काही मंडळींना जात्याच असते. ते लोक याला विरोध केल्याशिवाय रहात नाहीत. होऊ देत ना आमची संस्कृती नष्ट, कोणाला काय पडले आहे? कोणीतरी चावटपणे सांगतो की, आजचा दिवस म्हणे मातृदिन म्हणून साजरा करा. काही रसिकता, प्रेम आहे की नाही? आणि आई-बापाचे प्रेम हे काय एक दिवस गौरवण्याइतके कमी आहे काय? व्हॅलेंटाईन डे हा प्रेमिकांचा दिवस आहे. आपले प्रेम व्यक्त करून ते साजरे करण्याची ही एक अधिकृत आणि आधुनिक प्रकारची संधी आहे. त्यामुळेच जगभरच लैला-मजनू, रोमियो-ज्युलिएट आणि बाजीराव-मस्तानी या निमित्ताने जर आपले प्रेम व्यक्त करू इच्छित असतील, तर कुणाला पोटशूळ जडण्याची खरे तर काही गरज नाही; पण तरीही काही स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांना अचानक हा विकार जडतोच आणि खोकल्याची उबळ जितकी दाबावी तितकीच अधिक उफाळून वर येते तसा प्रकार घडतो. काही वर्षांपूर्वी शिवसेनेला आपले हिंदुत्व आठवायचे आणि आर्चिजसारख्या शोरूमवर हल्ले करायचे प्रकार व्हायचे; पण आता त्यांचा उत्साह थंडावला आहे. भाजपशी ब्रेकअप झाल्यानंतर आणि काँग्रेस राष्ट्रवादीशी नवे पॅचअप झाल्यानंतर त्यांना हा सणही आवडायला लागला आहे.
पण काही असो, या संस्कृतीरक्षकांचे म्हणजे आसारामबापूंचे भक्त हा दिवस मातृदिन म्हणून साजरा करतात. म्हणजे हा विनोदच आहे, कारण आश्रमात व्हॅलेंटाईन केल्यामुळे तुरुंगात गेलेले वरकरणी या सणाला विरोध करत होते. त्यावेळी ते म्हणायचे की, व्हॅलेंटाईन डे हा काही भारतीय संस्कृतीचा सण नाही. मग तो आपण का व कसा साजरा करायचा? युरोपातल्या कुणा एका सेंट व्हॅलेंटाईनच्या स्मृत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. हा संत म्हणे प्रेमवेड्यांची व चुपके-चुपके प्रेम करून नंतर विरहाचे उष्म उसासे टाकणाºयांचे विवाह लावून देई. भारतात असा कुणी व्हॅलेंटाईन जन्माला आला नाही. त्यामुळे त्याचे स्मरण करण्याचे आपल्याला काय कारण?
मग तसा विचार केला, तर येशू ख्रिस्त कुठे भारतात जन्माला आला? त्याच्या धर्माचा प्रसार भारतात सुरू झाला तो पंधराव्या शतकात वास्को द गामा भारतात आला त्यानंतरच. त्याला सुळावर चढवण्याचे पापकृत्यही कुणा भारतीयाने केले नाही. हे जर खरे असेल, तर दर २५ डिसेंबरला आपण ख्रिसमस म्हणजेच नाताळ का साजरा करावा? १ जानेवारी हे भारतीय संस्कृतीचे नववर्ष नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर हा दिवस वर्षाखेरचा नाही, तरीही आपण ३१ डिसेंबरला न्यू इयर पार्टी न चुकता का साजरी करतो?
आपल्याला व्हॅलेंटाईन डेला नक्की कोणते रूप अभिप्रेत आहे? प्रेमाचे एक रूप म्हणजे माया. दुसरे ममता आणि आणखी एक रूप म्हणजे वासना. यातील वासनेमध्येही प्रेमाचा एक अंश दडलेला असतोच; पण हॅलेंटाईन डेला तो अभिप्रेत नाही. प्रेम ही अत्यंत तरल आणि शब्दांच्या तुरुंगात बंदी न होऊ शकणारी संकल्पना आहे. तरुणीचे तरुणावर वा तरुणाचे तरुणीवर खरेच प्रेम असेल, तर ते व्यक्त करण्यासाठी हा एकच दिवस कशासाठी? ते सदैव व्यक्त होतच राहायला हवे. सच्चे प्रेम हे असे स्थळ, काळाची वाट न पाहता व भीती न बाळगता समुद्राच्या भेटीसाठी डोंगर कड्यांतून नदी सुसाट वाहत सुटावी व समुद्राच्या विशाल जलाशयात तिने आपले अस्तित्वही मिटवून टाकावे तसे असते. त्याला कोणतेही बंधारे फार काळ अडवू शकत नाहीत. व्हॅलेंटाईन डेला अपेक्षित प्रेम हे असे अनावर असावे. व्हॅलेंटाईन डे असो वा नसो, त्यासाठी कुणी नाके मुरडो वा कुणी प्रेमाची आलिंगने देवोत, एक नक्की प्रेम अमर असते. कारण प्रेम भावना शाश्वत व अमरही आहे. प्रेमानेच जग जिंकता येते. त्यामुळेच २५ वर्षांपूर्वी या सणाला होणारा विरोध बंद झाला आणि हा सण इथे रूजला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा