मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१

मुळाला हात घाला एकदाचा


सध्या देशात शेतकरी आंदोलन, बेरोजगारी, आरक्षण असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यावर भरपूर राजकारणही होत आहे, पण हे राजकारण करण्यापेक्षा एकदाचा मुळालाच हात का घालत नाही? या सगळ्या समस्यांचे मूळ आहे ते संधी नाही हे. म्हणूनच भरपूर संधी निर्माण केल्या तर आरक्षणासाठी झगडावे लागणार नाही की बेरोजगारी राहणार नाही. वर्षाला एक कोटी रोजगार निर्माण करू, हे आश्वासन खोटे ठरल्याने आज लोकांची माथी भडकली आहेत आणि वेगवेगळ्या कारणाने माणसं आंदोलन करत आहेत. यासाठी संधी निर्माण करणे या मूळ विषयाला कोणी हात घालणार आहे का, हा खरा प्रश्न आहे.

आज आपल्याकडे संधी नाही म्हणून युवापिढी परदेशात जात आहे. अर्थात हे काही आजच घडते आहे असे नाही. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून, विमान वाहतूक सुरू होण्यापूर्वीही अनेक भारतीय परदेशात जात होते व स्थायिकही होत होते. त्यात प्रामुख्याने इंग्लंड, काही आफ्रिकन देश, हाँगकाँग यांचा समावेश होता. केनियासारख्या देशाच्या आर्थिक नाड्या भारतीयांच्या हाती असल्याचे ७० च्या दशकात स्पष्ट झाले होते. तेव्हा भारताची स्थिती खूप वेगळी होती. नोकरी, व्यवसाय यात चांगली संधी शोधण्यासाठी भारतीय बाहेर जात होते, पण १९९० मध्ये देशाने खुले आर्थिक धोरण स्वीकारले. तरीही परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. गेल्या ३० वर्षांत नोकरीसाठी, व्यवसायासाठी देश सोडून जाणाºयांची संख्या किती वाढली आहे? नुकताच लोकसभेत याबाबत एक अहवाल आकडेवारी प्रसिद्ध झाली ती आश्चर्यकारक अशीच आहे.


२०१५ ते २०१९ या पाच वर्षांत ६ लाख ७० हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी भारताचे नागरिकत्व सोडून इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारल्याचे केंद्र सरकारने लोकसभेत सांगितले. २०१५ आणि २०१६ यामध्ये प्रत्येकी सुमारे १ लाख ४५ हजार, २०१७ मध्ये १ लाख २८ हजार, २०१८ मध्ये १ लाख २५ हजार, तर २०१९ मध्ये १ लाख ३६ हजार जणांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला. २०१४ ते २०१७ या काळात ४ लाख ५२ हजारांपेक्षा जास्त जणांनी परदेशी नागरिकत्व स्वीकारल्याचे सरकारने तेव्हा सांगितले होते. दोन निवेदनांत काही काळ समान असला तरी गेल्या सहा वर्षांत परदेशी नागरिकत्व स्वीकारण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. त्याआधी असे घडत नव्हते असे नाही. कदाचित त्याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसावी. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर हे प्रमाण वाढले का? हे तपासून पाहण्याची गरज आहे, कारण दरवर्षी कोट्यवधी रोजगार निर्मिती करू, असे दिलेले आश्वासन सरकारला पूर्ण करता आलेले नाही. परदेशात जाण्याची माणसाला का इच्छा व्हावी? आपले घरदार सोडून माणूस फार आनंदाने कुठेही जगाच्या पाठीवर जात नाही, पण संधी उपलब्ध नसल्याने हे सारे घडत आहे. म्हणून संधी निर्माण केली पाहिजे हे मूळ कारण लक्षात घेण्याची गरज आहे.

मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यावर खरे तर अनेक क्षेत्रांतील परदेशी कंपन्या भारतात आल्या आहेत. मल्टिनॅशनल कंपन्या इथे आपली ताकद वाढवत आहेत. त्यामुळे येथेच उत्तम वेतनाची नोकरी किंवा त्या उद्योगांना पूरक व्यवसाय सुरू करण्याची संधी निर्माण झाली. तरीही या संधी लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत आहेत. यावर संधी निर्माण करण्याचे काम सातत्याने सरकारने केले पाहिजे. केवळ आत्मनिर्भर व्हा, असे म्हणून होता येणार नाही. त्यांना दिशा देणारे काही असले पाहिजे. त्या संधी आपल्याकडे उपलब्ध नसल्याने परदेशात जाणाºयांची संख्या वाढत आहे.


परदेशी जाणा‍ºयांची आणि परदेशी नागरिकत्व घेणा‍ºयांची संख्या वाढत असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. उत्तम दर्जाची शैक्षणिक कामगिरी करणारे बहुधा बाहेर संधी शोधतात आणि नंतर तेथेच स्थायिक होतात, असा सर्वसाधारण अनुभव आहे; पण श्रीमंत व्यक्तीही हा देश सोडत आहेत. ज्यांची मालमत्ता १० लाख डॉलर्स किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा ३८ हजार व्यक्तींनी २००७ ते २०१७ या काळात भारत व त्याचे नागरिकत्व सोडले. केवळ श्रीमंतच नव्हे, तर अत्यंत बुद्धिमान व्यक्तींनीही परदेशी नागरिकत्व स्वीकारण्याची उदाहरणे आहेत. मेक इन इंडियाचे आवाहन करून कोणी सरकारला फारसा प्रतिसाद दिल्याचे दिसत नाही. मोदींचे परदेश दौरे गेल्या पाच वर्षांत खूप झाल्याची टीका सर्वांनी केली. या दौºयात त्यांनी भारतात रोजगार निर्माण करण्यासाठी गुंतवणूक होत असल्याचे भासवले, पण त्याचे परिणाम अजून हाती आलेले दिसत नाहीत. संधी निर्माण करण्याचे हे प्रयत्न तोकडे पडत आहेत, पण आता खºया अर्थाने सर्वांनी राजकारण थांबवून संधी निर्माण करण्याचे काम केले पाहिजे, नाहीतर राजकारण करणाºयांना पुन्हा संधी मिळणार नाही हे वास्तव आहे.

जागतिक प्रभावी पासपोर्टच्या यादीत २०१९ मध्ये भारतीय पासपोर्टचा क्रमांक ८६ वा आला, हे याचे एक कारण आहे. कोणत्या देशाच्या पासपोर्ट धारकास किती देशांत विना व्हिसा प्रवेश मिळतो या मुख्य निकषावर पासपोर्टचे प्रभावीपण ठरते. सरकारी व खासगी शैक्षणिक संस्था, उद्योग-व्यवसाय यात गुणवत्तेला किती किंमत मिळते हा प्रश्न सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. विज्ञान, अवकाश संशोधन, अलीकडे विकसित होणारे जैव अभियांत्रिकी व अन्य अनेक क्षेत्रांत उच्च गुणवत्ता असणारे असंख्य युवक-युवती भारतात आहेत. त्यांना हवी तशी योग्य संधी येथे मिळत नाही. त्यामुळे हे लोक बाहेर जात आहेत. अनेकांना वाटते की, परदेशात जाऊन पैसे कमावण्यासाठी हे लोक जात आहेत, पण इथे संधी नाही म्हणून ते तिथे जात आहेत हे त्यामागचे खरे कारण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: