पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरून भाजप प्रचंड आक्रमक झाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी पुण्यात घटनास्थळी भेट दिली. पूजा चव्हाण ज्या इमारतीत राहत होती, जिथे तिने आत्महत्या केली त्या इमारतीची चित्रा वाघ यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण राहत होती ती रूम सील करण्यात आली असल्याचं सांगितलं. यामुळे त्यांनी इमारतीमधील दुसºया घरात जाऊन गॅलरीची उंची तसंच इतर गोष्टींची पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत जो आक्रमकपणे संताप व्यक्त केला तो अत्यंत सुन्न करणारा होता. एखादी वाघीण खवळलेली असेल तर ती जशी डरकाळ्या फोडून समोरच्याला घायाळ करते तितका संताप चित्राताई वाघ यांच्या बोलण्यात होता. त्यांचे नावही योगायोगाने वाघ आहे. त्यामुळे वाघाच्या थाटात त्या माध्यमांपुढे अक्षरश: डरकाळ्या फोडत होत्या. त्यामुळे यावर आता महाविकास आघाडी सरकार काही पावले उचलणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वनमंत्री संजय राठोड उपस्थित होते. आदल्या दिवशीच त्यांनी नियमभंग करून शक्तीप्रदर्शन केले होते. सर्व महिला संघटना, विरोधक भाजप नेत्या चित्रा वाघ या संजय राठोड यांच्या विरोधात आग ओकत होत्या. अगदी चपलेने बडवला पाहिजे इतपत त्यांनी भाषा वापरली होती. असे असतानाही मंत्रिमंडळ बैठकीत याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही. संजय राठोड प्रकरणावरून आघाडीतील घटक पक्षांनीही नाराजी व्यक्त केलेली होती. तरीही त्यावर कसलीही चर्चा झाली नाही आणि मंत्रिमंडळ बैठकीत संजय राठोड यांना सन्मानाने वागणूक दिली गेली. त्यामुळे विरोधक संतापले. त्यांचा सगळा संताप गुरुवारी चित्राताई वाघ यांच्या तोंडून व्यक्त होत होता.
गुरुवारी चित्रा वाघ वानवडी पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या, मात्र यावेळी त्यांचा संताप झाला आणि त्यांनी थेट पोलिसांसमोरच तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, लाज वाटली पाहिजे अशा शब्दांत टीका केली. महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात हे धूळ फेकत आहेत. लेखी परवानगी नाही असं सांगत आहे. जी दोन मुलं प्रत्यक्षदर्शी होती त्यांना तर सोडून दिलं. हे प्रशासन हातावर हात ठेवून बसले आहे. लाज वाटली पाहिजे यांना, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी पोलीस स्थानकाबाहेर संताप व्यक्त केला. या संतापाकडे सरकार केवळ गंमत म्हणून पाहणार की संजय राठोड यांच्यावर कारवाई करणार? संजय राठोड यांना पाठीशी घालणे सरकारला अडचणीचे ठरू शकते. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली गेली पाहिजे. संशयाची सुई राठोड यांच्याकडे वळत असताना त्यांना मंत्रिमंडळातून वगळून जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत मंत्रिपदाचा कारभार काढून घेण्याची कृती खरे तर सरकारने करणे अपेक्षित होते. भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे सरकार असताना मागच्या पाच वर्षांत भोसरी प्रकरणावरून एकनाथ खडसे यांच्याकडे संशयाची सुई वळली तेव्हा खडसेंचा ताबडतोब राजीनामा घेतला होता. मंत्रिपदावर बसलेली व्यक्ती कधीही संशयाच्या भोवºयात अडकलेली असता कामा नये. त्यातून संजय राठोड हे १५ दिवस बेपत्ता राहिल्याने सर्वत्र संताप निर्माण झाला होता. हा सर्व संताप चित्राताई वाघ यांच्या तोंडून बाहेर पडल्याचे दिसले. त्यांनी जर एवढे धडधडीत पुरावे दिले आहेत, आरोप केले आहेत, तर गृह खाते त्यांची दखल का घेत नाही? शिकारीत जखमी झालेली वाघीण अत्यंत धोकादायक असते. ती कशी शिकाºयाला संपवेल हे सांगता येत नाही. आज चित्राताई वाघ यांना धमक्या येत आहेत, संतापलेल्या आहेत. अशा परिस्थितीत नेमकी काय परिस्थिती आहे यामध्ये सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे. नाहीतर ते सरकारच्या अंगलट येऊ शकते.
संजय राठोड प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यातच त्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या शक्तीप्रदर्शनावर सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत कसलीच प्रतिक्रिया न देणे हे सरकारपेक्षा शिवसेनेच्या अंगलट येऊ शकते. हजारोंचा समुदाय या शक्तीप्रदर्शनाला जमला. त्यांच्यावर गुन्हे दाखल करताना संजय राठोड यांना वगळण्यात आले. ही गर्दी जमण्यासाठी जे कारणीभूत होते त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे शिवसेनेचे नेते, मंत्रीच शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत, असाही संदेश सगळीकडे गेलेला आहे. कोणतेही धार्मिक कार्यक्रम, गर्दी जमवणारे सामाजिक कार्यक्रम, आंदोलने करू नयेत. गर्दीची कारणे टाळावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्यावर २४ तासांत लगेचच १५ दिवस गायब असलेले संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतात ही कोणालाही न आवडणारी गोष्ट आहे. त्यांच्या या कृतीकडे सरकार गप्प बसून बघ्याची भूमिका घेते. याचा सगळा संताप चित्राताई वाघ यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. आता राठोड यांच्या विरोधात रान पेटवणे हाच कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला स्पष्ट दिसत आहे, पण यामध्ये शिवसेनेची आणि सरकारची नाचक्की होत आहे. कर नाही त्याला डर कशाला? आरोप झाले आहेत, ते खोटे असतील, तर घाबरायचे कारण नाही. असे असताना चौकशीला सामोरे जाणे, तक्रार नोंदवून न घेणे, कसलीही कारवाई न करणे हे चुकीचे आहे. ज्या छत्रपतींचे नाव घेऊन आपला पक्ष आहे, त्यांच्या विचारांचा हा अपमान असल्याने चित्रा वाघ यांचा संताप अनावर झाला. या संतापाची दखल घेणे गरजेचे आहे.
....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा