मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

निकालातील भास आभास

 निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकाकी पडतात - वपु


राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी लागले. ‘या निवडणुकीत आम्हीच बाजी मारली’, अशी बतावणी महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनीही केलेली आहे. अर्थात पक्षनिहाय आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत, तर सर्वात कमी काँग्रेसने जिंकल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दुसºया, तिसºया क्रमांकावर आहेत, तर स्थानिक आघाड्याही त्याच संख्येत आहेत. त्यामुळे हा निकाल तसा आभासी निकाल आहे. भारतीय जनता पक्षाने आम्ही ६ हजार ग्रामपंचायतींवर आपला झेंडा लावल्याचे बोलले असले, तरी त्यातील तथ्य हे आभासी आहे. तसेच हा कौल महाविकास आघाडीला नाही, तर सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढल्यामुळे आपापली ताकद कायम राखण्यात सर्व पक्षांना यश मिळालेले आहे हे मान्य करावे लागेल. थोडक्यात काय, तर विधानसभेला २०१९ ला जसा कौल मिळाला होता त्याचीच ही अप्रत्यक्ष पुनरावृत्ती आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढलेली नव्हती. त्यामुळे तिघांच्या मिळून एकत्रित ग्रामपंचायतींच्या जागा जास्त दिसत असल्या तरी त्याही आभासी आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच जे खरे भासणारे आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वपु काळे यांचा एक छान विचार आहे. निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं ही शेवटी एकाकी पडतात. राजकीय पक्षांचे तसंच आहे. आजकाल मतदार शहाणा झालेला आहे. तो बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल म्हणतो. त्यामुळे पाच वर्षांच्या काळात निष्क्रिय राहिलात तर तुम्हाला मतदार एकाकी पाडल्याशिवाय राहात नाही. तसेच पक्ष अहंकारी असेल आणि मतदारांना गृहीत धरत असेल तरीही मतदार त्याला धडा शिकवल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे हा निकाल नेमका कसा लागला आहे याचा कोणीही काहीही अर्थ लावला तरी त्यातील भास आणि आभास जनतेला समजला आहे हे नक्की.


भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे शहरी पक्ष म्हणून ओळखले जात होते, तर काँग्रेस ही तळागाळात, ग्रामीण भागात रुजलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेस असली तरी त्याची मुळं काँग्रेसची होती. त्यामुळे ग्रामीण भागात काँग्रेसचेच बालेकिल्ले असायचे. किंबहुना ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, सहकारी साखर कारखाने, बाजार समित्या यांच्या जोरावरच महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण आता ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक कमी झाले आणि तरुण मतदारांची संख्या वाढलेली असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीला ग्रामीण भागात स्थान मिळेनासे झालेले आहे. ग्रामीण भागातील घरटी कोणी ना कोणी मुंबईशी संबंधित असल्याने शिवसेना ग्रामीण भागात पोहोचली आहे. त्यामुळे शिवसेनेचा ग्रामीण मतदार वाढला आहे. त्याचप्रमाणे भाजप ग्रामीण भागात पोहोचल्याचा भास होत आहे, पण विधानसभा निवडणुकीत भाजपने जी मेगाभरती केली होती त्याचा परिणाम त्या नेत्यांच्या वर्चस्वावर ग्रामीण भागात भाजप पोहोचलेला दिसत आहे. उदाहरणार्थ नारायण राणेंमुळे सिंधुदुर्गात, शिवेंद्रराजेंमुळे सातारा, अशा अनेक ठिकाणी आयात नेत्यांच्या आणि पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीत असलेल्या नेत्यांच्या जोरावर भाजप ग्रामीण भागात पोहोचला आहे हे वास्तव आहे. त्यामुळे एकूणच हा निकाल आभासी आहे.

या निवडणुकीत शिवसेना व भाजप हे पहिल्या दोन क्रमांकाचे पक्ष राज्यात ठरले, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिसºया व चौथ्या क्रमांकावर गेले. स्थानिक विकास आघाड्यांनी मिळवलेले यशही लक्षणीय असून, नेमक्या किती ग्रामपंचायती कोणत्या पक्षाच्या हातात जातात हे स्थानिक विकास आघाड्यांच्या येत्या काळातील निर्णयावर ठरणार असे दिसते. या स्थानिक आघाड्यांतही अनेक पक्षांनी आपले चिन्ह न ठेवता आघाडीचे चिन्ह घेतले आहे. त्यामुळे या आघाडीत कोणत्या पक्षाचे किती लोक आहेत हे स्पष्ट झाल्याशिवाय कोणाचे वर्चस्व आहे, कोणाच्या बाजूने निकाल लागला, हे सगळं आभासी ठरणार आहे. त्यामुळे वर्चस्व कोणाचे हे ठरण्यासाठी सरपंच हा निकष ठरणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण लवकरच होणार आहे आणि त्यानंतर कोणत्या पक्षाचे किती सरपंच होतात यावर सगळे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत हा निकाल आभासी असेल.


महाविकास आघाडी म्हणून एकत्रित विचार केला, तर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांनी आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे हे घटक पक्ष लढले असले, तरी तिघांची एकत्रित ताकद पाहता महाविकास आघाडीने भाजपला एकतर्फी विजयापासून रोखल्याचे दिसत आहे.

आपल्याच पक्षाचा चांगला विजय झाल्याचे दावे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या सर्वच पक्षांनी केले असले, तरी एकत्रित निकाल पाहता महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्याचे दिसते. तरी भाजप हा शहरी पक्ष म्हणून ओळखला जात असतानाच ग्रामीण भागात त्यांचा झालेला शिरकाव महत्त्वाचा मानला जातो, पण याचा अर्थ ही भाजपची वाढ आहे, शिरकाव आहे की सूज आहे हे प्रत्येकाने ठरवायचे आहे. तसेच हा महाविकास आघाडीचा खरोखरच विजय आहे का, याचेही उत्तर प्रत्येक पक्षाने आपल्या मनाला दिले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: