गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

नांदायला जाण्याअगोदरचा सासुरवास


झी मराठीवर ४ जानेवारीपासून ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सुरू झालेली आहे. तीन आठवड्यांतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली आहे. मुख्य म्हणजे ‘माझ्या नवºयाची बायको’ या मालिकेची प्राइम टाइम या मालिकने घेतली आणि सुरुवात तरी चांगली झालेली आहे. त्यामुळे त्या राधिका, सौमित्र आणि तो गोतावळा पाहून प्रेक्षकांना आलेला कंटाळा या मालिकेने घालवला आहे हे विशेष. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी त्याची जी जाहिरात प्रोमो केला होता त्यावरून या मालिकेचे कथानक हे लोकांना समजले होते. फक्त ते मांडले कसे जाते हे फार महत्त्वाचे होते. त्यात पहिल्या तीन आठवड्यांत या मालिकेला यश आलेले आहे.


शुभांगी गोखले, दिप्ती केतकर, आदिती सारंगधर या मालिकांमध्ये रुळलेल्या कलाकारांची यात भूमिका असल्याने या मालिकेने पटकन जोर पकडलाच, पण मालिकेसाठी शाल्वा किंजवडेकर आणि अंविता फलटणकर ही निवडलेली जोडीही प्रेक्षकांना आवडली आहे. विशेषत: प्रेक्षकांची नाडी कशी पकडायची याची दिग्दर्शकाला कल्पना असल्याने पटकथा आणि संवादही चांगल्याप्रकारे लिहिलेले दिसतात. थोडी भावनाप्रधान अशा वातावरणातून जाणारी ही मालिका आहे. खरं तर कथानकात नवीन असे काही नाही. पुरणाची पोळी किंवा स्वयंपाक प्रत्येकजण करतो, पण प्रत्येकाची चव वेगळी असते तसाच हा प्रकार आहे. तरीही लोक चाखूनचापून जेवत आहेत तसाच हा प्रकार आहे.

म्हणजे सलमान खान आणि भाग्यश्रीला नायक-नायिका म्हणून सादर करताना सूरज बडजात्यांनी जे कथानक निवडले होते तसेच आहे हे. फक्त तिथे दोन मित्र होते, इथे दोन मैत्रिणी आहेत. भाग्यश्रीला काही दिवस आपल्या मित्राच्या घरी राहण्यासाठी ठेवले जाते आणि तिथे त्यांची मैत्री जमते, प्रेम होते. तोच ढाचा या ठिकाणी आहे. नोकरीनिमित्ताने अंबरनाथची मुलगी मुंबईत राहायला येते असे या कथानकात दाखवले आहे. मैने प्यार कियामध्ये लांब पहाडी भागातून मुंबईसारख्या शहरात राहायला येते असे दाखवले आहे. इथे अंबरनाथ येथून मुंबईला येते असे दाखवले आहे. तशी ती चूकच म्हणावी लागेल, कारण अंबरनाथवरून मुंबईत दररोज लोकल प्रवास करून हजारो महिला नोकरी करत असतात. त्यासाठी मुंबईत तिची राहण्याची सोय कुठे होणार याची चिंता अंबरनाथमधील कुटुंबीयांना वाटणे हे तसे हास्यास्पद आहे. कोल्हापूर, सातारा किंवा मराठवाड्यातून, विदर्भातून मुंबईत नोकरीला आली असेल तर गोष्ट वेगळी होती, पण मालिकांना जागेवर चित्रीकरण लागते. लांबचे लोकेशन नको असते म्हणून त्यातल्या त्यात लांबचे स्टेशन म्हणून अंबरनाथ दाखवले आहे, पण तरीही प्रेक्षक मुकाटपणे बघत आहेत.


जाड असलेल्या स्विटूचे जाडीमुळे लग्न ठरत नाहीये, अठरा ठिकाणांहून नकार आलेला आहे. तिला सुंदर असा काटकुळा नायक दाखवण्याचे छान धाडस या मालिकेत केले आहे. अर्थात काही वाहिन्यांवर ‘रंग माझा वेगळा’, ‘मुलगी झाली हो’ अशा काही मालिकांमधून वर्णद्वेश, लिंगद्वेश असा दाखवला जात असताना रंगरूप, आकार हे प्रेमाच्या आड येऊ शकत नाही, असा संदेश ही मालिका देत असल्यामुळेही मालिका प्रेक्षकांना आवडत आहे. अर्थात जाड असली तरी स्वीटू ही गोड दिसते. हडकुळा असला तरी ओमकार पाप्याचं पितर वाटत नाही.

काही बाबी अतिरंजीत आहेत हा भाग वेगळा. म्हणजे कॅटरिंगचा व्यवसाय करणारे घर आहे. दररोज ३०० चपात्या विकत देतात, खाद्यपदार्थ, पुरणपोळ्या करून विकणारे सहा माणसांचे साळवी कुटुंब आहे, तिथे घरातील सामान सगळं संपलं आहे. डाळ, तांदूळ घरात काहीच शिल्लक नाही, म्हणून सगळे उपाशी राहतात. हे अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण म्हणावे लागेल. कृष्ण-सुदाम्याप्रमाणे शकू आणि नलू या मैत्रिणी खूप वर्षांनी भेटतात असेच दाखवले आहे. आता सुदाम्याच्या घरचे पोहे म्हणजे नलूच्या घरची पुरणपोळी, बटाटा वडा, पातळ आमटी खाल्ल्यामुळे शकू त्याची परतफेड करणार हे साहजिकच आहे, पण खात्यापित्या घरातील लठ्ठ मुलगी सर्वांची मर्जी जिंकते आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिका चालते. अर्थात कुठून तरी दोन-चार कुटुंबे आणायची. हिरॉईनला छळणारी एक बाई मालिकेत लागते तसे ते काम या मालिकेत तायडी अर्थात मालविका म्हणजे आदिती सारंगधरकडे आलेले आहे. ‘होणार सून...’मध्ये जान्हवीचा सासुरवास करण्यासाठी सहा सासवा होत्या. इथे एकट्या आदितीवर ती छळण्याची जबाबदारी आलेली आहे, पण गरीब-श्रीमंत या भेदभावाच्या, वर्गवारीच्या किंबहुना नव्या प्रस्थापित जातीवरूनच ही मालिका चालवली जाणार आहे.


आता यात परदेशातून आलेली मोमो ओमकारच्या प्रेमात पडणार का? ती प्रेमात पडावी म्हणून आदितीच्या कुरघोड्या आणि त्याला स्वीटू देणारी उत्तरे यातून दर आठवड्याला काहीतरी नवीन घडणार आणि वर्षभर ही मालिका चालणार हे नक्की. फक्त लग्न होण्याआधीच स्वीटू सासरी राहायला आल्यामुळे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ असे न राहता नांदायला येण्यापूर्वीच तिने पाया भक्कम करायचे ठरवले आहे.

शकू म्हणजे खानविलकर कुटुंबीयांचे फिटनेस सेंटर आहे आणि डाएट कसे असावे यावरून प्रत्येकाचा आहार नियंत्रित केला आहे. त्यामुळे श्रीमंताचे कुपोषण म्हणजे डायटिंग, तर गरीबांचे खाणे म्हणजे संतुलित आहार. या दोनमधला संघर्षही इथे पाहायला मिळणार, पण पहिल्या तीन आठवड्यांत असंख्य चुका असल्या आणि कथेत नाविन्य नसले तरी प्रेक्षकांना ही मालिका आवडते आहे हे नक्की. मालिकांमध्ये सुनांना छळण्यासाठी किंवा सुनांनी सासवांना छळण्यासाठी लग्न व्हावे लागते, पण इथे स्वीटू आधी सासुरवासाची परीक्षा देणार आहे आणि मग बोहल्यावर चढणार आहे हे नाविन्य म्हणावे लागेल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: