।।विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्रं गृहेषु च।
रुग्णस्य चौषधं मित्रं धर्मो मित्रं मृतस्य च।। : ऋग्वेद संहिता
शनिवारची सकाळ उजाडली तीच मन सुन्न करणारी बातमी घेऊन. भंडारा जिल्हा रुग्णालयातील दहा बालकांचा झालेला होरपळून मृत्यू ही अत्यंत वेदनादायी अशी घटना आहे. म्हणजे सगळे गाढ झोपेत असताना काळानं डाव साधला. नुकतीच जन्माला आलेली ती बालके आपल्या घरी जाण्यापूर्वीच देवाघरी गेली. त्यांच्या जन्माने त्या कुटुंबीयांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच हा प्रसंग उद्भवला आणि ही बालके आगीच्या भक्षस्थानी पडली. अत्यंत मनाला वेदना देणारी ही घटना आहे, पण हा एकूणच प्रकार बेजबाबदारपणाचा कळस म्हणावा लागेल. प्रवासात शिक्षण, ज्ञान, विद्या हा माणसाचा मित्र असतो, तर घरात आपली पत्नी आपला मित्र असतो. रुग्णाचा मित्र औषध असतो, तर मृत्यूचा मित्र धर्म असतो, असे आपल्या वेदात सांगितले आहे. रुग्णालयातील मित्राने घात केल्यामुळे या दहा बालकांना मृत्यूच्या कवेत जावे लागले आहे. त्यामुळे आज ही बालके अकाली यमधर्माकडे गेली.
ज्या घरांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट होणार होता. त्या कुटुंबाचं सुख काळाला पाहवलं गेलं नाही आणि त्याला सुस्थावलेल्या सरकारी व्यवस्थेचीही मदत झाली. शॉर्ट सर्किटचं निमित्त ठरलं आणि डोळे उघडून छाती भरून मोकळा श्वास घेण्याआधीच दहा कोवळ्या जिवांनी जगाचा निरोप घेतला. भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या या घटनेनंतर त्या बाळांना जन्म देणाºया मातांचा आक्रोश किती भयानक असेल याची कल्पनाच करवत नाही. साक्षात काळालाही हेलावून गेला असेल तो आक्रोश. आपल्या चिमुकल्यांसाठी टाहो फोडणाºया मातांना बघून संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे भरून आले. इतकी ही भयानक दु:खदायी घटना होती.
सुस्तावलेल्या व्यवस्थेच्या गलथान कारभारामुळे पहाटेचे स्वप्न पहात डुलक्या घेणाºया कोवळ्या जिवांना काळानं कवेत घेतलं. अतिदक्षता शिशु केअर युनिटमध्ये १७ चिमुकल्यांपैकी दहा जणांचा बळी घेतला. सात चिमुकल्यांचा श्वास न घेता आल्यानं गुदमरून मृत्यू झाला, तर तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. किती भयानक प्रकार होता हा. त्या मातांच्या आक्रोशाने रुग्णालयाच्या भिंतीही शहारल्या असतील. प्रशासन सात मुलांना वाचवल्याचे सांगत असले, तरी दहा कुटुंब मात्र शोकात बुडाली आहेत त्याचे काय? या रुग्णालयाकडून शॉर्ट सर्किटचं निमित्त सांगितलं जात आहे. त्याचबरोबर सरकारकडून ५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे, मात्र इवल्याशा पावलांनी घरात येऊ पाहणारं सुख सरकारी अनास्थेनं हिरावून घेतलं, ते या पैशातून मिळणार आहे का? असे प्रकार वारंवार घडत आहेत. सरकारी दवाखान्यातील बेशिस्त कारभार वारंवार चव्हाट्यावर येत आहे. यापूर्वीही इनक्युबीटरमध्ये उष्णता वाढून मुले दगावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. हे दुर्लक्ष कशाने होते? शॉर्ट सर्किट केव्हा होते? वायरिंग जुनाट होते तेव्हा. वायरी एकमेकांना चिकटतात तेव्हा. त्याचे तुकडे पडलेले असतील तर. मग जुनाट वायरिंग बदलण्याची जबाबदारी कोणाची? एकदा लाइट फिटींग केले की, त्याकडे बघायचेच नाही. हा गचाळ कारभार याला कारणीभूत ठरतो हे लक्षात घेतले पाहिजे.
जन्माला आल्यानंतर हे जग पाहण्यापूर्वीच त्या दहा बालकांना हे जग सोडून जावे लागले. केवळ गलिच्छ कारभारामुळे हा प्रकार घडला आहे. हॉस्पिटल्स, हॉटेल्स, मंगल कार्यालये यांचे फायर आॅडिट केले जाते. अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित आहे की नाही, हे वेळचेवेळी पहायचे असते. त्याचप्रमाणे कोणत्या बाबी धोकादायक आहेत का याचेही आॅडिट करायचे असते. दुरुस्ती आणि देखभालीसाठी एका स्वतंत्र विभागाची गरज असते. हे काहीच नसल्यामुळे वर्षानुवर्ष जुन्या वायरिंगवर कारभार चालला होता. वीजेचा भार चेक करायचा असतो. नवीन उपकरणे आल्यावर त्याचा नेमका लोड किती आहे? योग्य त्या प्रमाणात वीज पुरवठा होत आहे की नाही, याचे चेकिंग वरचेवर करावे लागते. हे काहीच केलेले नसले की, वीजेचा कुठेतरी प्रभाव वाढतो, हा दाब वाढल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा प्रकार घडतो. यासाठी आता तरी सरकारने डोळे उघडे ठेवून काम केले पाहिजे.
राज्यातील जेवढी जिल्हा रुग्णालये आहेत, शासकीय दवाखाने, प्राथमिक उपचार केंद्र असतील त्या प्रत्येक ठिकाणी असलेल्या वायरिंगचे आॅडिट केले पाहिजे. असे प्रकार कुठेही घडू शकतात. पन्नास शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या जुन्या इमारतीत अनेक हॉस्पिटल्स आहेत. त्या काळात केलेले जुने वायरिंगवर आजही ताण येताना दिसतो आहे. त्यामुळे सर्व शासकीय रुग्णालयातील जुने वायरिंग बदलण्याची आता गरज आहे. शॉर्ट सर्किट होणार नाही, अशी यंत्रणा तज्ज्ञ अभियंत्यांच्या मदतीने निर्माण करता आली पाहिजे. बालके, महिला, वृद्ध नागरिक असतील अशा भागात आगीच्या घटना घडणार नाहीत, याची काळजी रुग्णालय प्रशासनाने घेतली पाहिजे. सुरक्षा रक्षक असतात त्याप्रमाणे ही देखभाल करणारे, सगळी यंत्रणा नीट आहे की नाही, वीजेचे प्रवाह व्यवस्थित आहेत का नाही, हे दररोज चेक करणारे कर्मचारी नेमले पाहिजेत. तरच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. आपल्याकडे एखादी दुर्घटना घडली की, त्याची पुनरावृत्ती पाठोपाठ घडत जाते. अगदी निर्भया सामूहिक बलात्कारानंतर तशा घटनांची एक मालिकाच तयार झाली होती. त्यामुळे या घटनेची मालिका होण्याअगोदरच सरकारने चोख यंत्रणा निर्माण करावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा