जितनी इज्जत हम अपने घर परिवार की महिलाओं को देते हैं उतनी ही समाज की अन्य महिलाओं को भी देनी चाहिए. यदि ऐसा हो तो समाज में काफी सकारात्मकता रहे. - विदूर
महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार थांबण्याचे काही नाव घेत नाही. दररोज कुठे ना कुठे अत्याचाराच्या घटना घडत आहेत. सोमवारी गोंदियावरून पुण्याला जाणाºया एका २४ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडलीय. चालत्या खाजगी बस ट्रॅव्हल्समध्ये विनयभंग करून वाशिमच्या मालेगाव परिसरात बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. किती भयानक प्रकार आहे हा? पेणच्या घटनेला अजून पंधरा दिवसही झालेले नाहीत, तोवर त्याचा विसर पडला आणि हा बसमध्ये प्रकार घडला. एकेकाळी आमच्या महाराष्ट्रात असे प्रकार घडत नाहीत हे आपण अभिमानाने सांगत होतो, पण हा महाराष्ट्र आहे की यूपी, बिहार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कशामुळे बदलत आहे? विदूर नीतीत विदूराने म्हटले आहे, जितनी इज्जत हम अपने घर परिवार की महिलाओं को देते हैं उतनी ही समाज की अन्य महिलाओं को भी देनी चाहिए. यदि ऐसा हो तो समाज में काफी सकारात्मकता रहे. पण हे बाजूला पडन आता नकारात्मक भाव निर्माण होत आहेत. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.
चालत्या बसमध्ये अशाप्रकारे बलात्कार होत असताना काय अवस्था झाली असेल त्या मुलीची? अंगावर शहारा येणारी ही घटना आहे. काळजाचा भीतीने थरकाप उडतो अशा घटना ऐकल्यावर. आपण अभिमानाने सांगतो का शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथे आयाबहिणींचा सन्मान केला जातो. त्या महाराष्ट्रात ही घटना घडणे हा अत्यंत वाईट प्रकार आहे. आमच्या आयाबहिणी उजळ माथ्याने प्रवास करू शकत नाहीत, त्या असुरक्षित असतील, तर आम्ही राज्य करायला नालायक आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. या नराधमांना लवकरात लवकर शासन झालेच पाहिजे. हे प्रकार सातत्याने महाराष्ट्रात का वाढत आहेत? गृहमंत्र्यांनी याकडे तातडीने लक्ष घातले पाहिजे. राजकारण बाजूला ठेवून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले गेले पाहिजे. आज आमच्याकडे पोलिसांवरही हल्ले होतात. या राज्यात पोलीसही सुरक्षित नाहीत. तिथे महिला कशा सुरक्षित राहणार? त्यामुळे अशा नराधमांना शासन करता येणार नसेल, तर सक्षम यंत्रणेची व्यवस्था करावी लागेल. एक महिन्यापूर्वी अधिवेशनात शक्ती कायदा आणणार असे सरकारने घोषित केले होते. काय झाले त्या कायद्याचे? कायदा येण्याअगोदरच महिलांच्या शोषणाचे प्रकार वाढीला लागतात? किती शरमेची बाब आहे ही.
या घटनेनंतर तरुणीचे मानसिक स्वास्थ्य खचले होते. पीडित तरुणीने पुण्यात पोहोचताच पोलिसांत तक्रार दिल्याने घडलेला सारा प्रकार समोर आला आहे. आरोपीने पीडित तरुणीला सीट नंबर तुमचे नसल्याचे कारण सांगून मागच्या सीटवर बसवले आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून, जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला, तसेच घडलेल्या घटनेची वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकी आरोपीने दिली. हे किती भयानक आहे? पुणे पोलिसांनी काय केले? तर हा खटला वाशिम पोलिसांकडे पाठवून दिला आणि आपले हात झटकले. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे हे तातडीने तपासले गेले पाहिजेत. त्यासाठी कार्यक्षेत्र, घटना कुठे घडली याच्या पळवाटा काढून निसटण्याचा प्रकार पोलिसांनी करता कामा नये. मोठ्या आशेने ती मुलगी पुणे पोलिसांत गेली आणि पुणे पोलिसांनी तो तपासासाठी वाशिमला पाठवला. त्या मुलीने काय करायचे? चालती बस होती म्हणजे जबाबदारी कोणाचीच नाही का? या पळवाटांमुळे गुन्हेगारी मनोवृत्ती वाढीस लागते. त्याला आळा बसण्याची गरज आहे. तातडीने शक्ती कायदा अस्तित्वात आला पाहिजे. अशा नराधमांना तातडीने शिक्षा झाली पाहिजे. कायद्याचा गुन्हेगारांना धाक बसला पाहिजे. पुन्हा कोणाचीही हिंमत झाली नाही पाहिजे असा कायदा तयार करण्याची गरज आहे, पण सरकार इथेच कमी पडताना दिसते आहे. नुसती ‘बोलाची कढी अन् बोलाचा भात’ याप्रमाणे शक्ती कायदा आणणार, असे बोलून दाखवले. प्रत्यक्षात त्याबाबत कसल्याही हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे गुन्हेगारांना महिलांची छेडछाड काढायला काहीही वाटत नाही असे दिसते. यावर सरकारने कठोर पावले जलदगतीने उचलण्याची गरज आहे. महाराष्ट्राचा यूपी, बिहार होण्यापासून थांबले पाहिजे. सरकारने, मंत्र्यांनी, राजकारण्यांनी बोलबच्चनगिरी थांबवली पाहिजे. अशी घटना घडली की लगेच महिला नेत्यांपासून विविध राजकीय पक्षांचे नेते भाषण करतात, मोर्चे काढतात आणि आपले शक्तिप्रदर्शन करून स्वत:चे महत्त्व वाढवून घेतात, पण त्या पीडितेला न्याय मात्र मिळत नाही. त्यामुळे हाही त्या महिलांवर, पीडितांवर होणारा मानसिक अत्याचार असतो याची जाणीव राज्यकर्त्यांनी आणि राजकारण्यांनी घेतली पाहिजे. पेणची घटना विस्मरणात गेली का? म्हणून नवीन घटना घडायची वाट पाहिली जात आहे? आधीच्या गुन्हेगारांना कडक शासन झाले नाही, कारवाई झालेली नाही. त्यामुळे नव्या गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा