शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

कळत नकळत


काही चुका माणसाच्या हातून अनावधानानं होतात. काही चुका या नकळत होतात, तर काही चुका या झाल्यानंतर कळते की ती चूक होती, पण त्यामुळे सभ्य समाजात गजहब होतो. लोकांना चर्चेला विषय मिळत असतो. असे विषय, गॉसिपिंग हे सामान्य माणसांना नेहमीच चघळायला आवडत असतात. त्यामुळे निंदा नालस्ती हा ज्या संस्कृतीचा पायाच आहे अशा चित्रपट क्षेत्रात या विषयावर आलेले चित्रपटही चांगलेच चालतात. हे सांगण्याचे कारण म्हणजे सध्या धनंजय मुंडे यांच्या आणखी एका लग्नाची गोष्ट चर्चेत असली, तरी प्रत्यक्षात हा विषय चित्रपटात घेणे आणि अनैतिकतेचे कधी समर्थन तर कधी निषेध करण्याचे काम चित्रपटांमधून अनेकवेळा केलेले आहे. अर्थात या बहुतांश चित्रपटात दोष कुणाचा, चूक कुणाची आणि कोण बरोबर हे प्रेक्षकांवरच सोपवले जात असते.

स्मिता तळवलकर यांनी साधारण २५ वर्षांपूर्वी एक चित्रपट काढला होता. ‘कळत नकळत’. विक्रम गोखले, सविता प्रभुणे आणि त्यांची दोन मुले यांचा सुखाचा संसार चाललेला असतो, पण विक्रम गोखलेच्या आॅफीसातली अश्विनी भावे ही एक विधवा अचानक त्याच्या आयुष्यात येते आणि हा सुखी संसार कळत नकळत कोलमडून पडतो. यात मुलांचीही होलपट होते. आॅफीसातील वाईट प्रवृत्तीच्या माणसाचे टोमणे आणि संशय निर्माण करण्यावरून एक नसलेले लफडे असली लफड्यात बदलते आणि विक्रम गोखलेचा कळत नकळत पाय घसरतो आणि अश्विनी भावेबरोबर संबंध प्रस्थापित होतात. यावरून निर्माण झालेल्या दोन बायकांच्या आयुष्यातील संघर्ष, अनैतिकता, मुलांची परवड यावर चांगला कटाक्ष हा चित्रपट टाकतो. स्मिता तळवलकर यांच्या अस्मिता चित्रची ही कलाकृती चांगलीच गाजली होती. अशा अनैतिक संबंधांतून घर तोडणे, बदनाम करणे ही प्रवृत्ती कशाप्रकारे डोकावत असते हे यातून चांगले दाखवून दिलेले आहे. अर्थात चित्रपटनगरीचा हा आवडता विषय आहे. अनैतिक संबंध, लफडी दाखवणे आणि त्यातून करमणूक करणे हा अनेकांच्या आवडीचा विषय असतो. फक्त असा प्रकार फक्त चित्रपटात घडताना पाहण्यात मजा येते. वास्तवात आले तर वादळ निर्माण होते याची जाणीव प्रत्येकाला असते.


१९८३ च्या दरम्यान नसिरुद्दीन शहा, शबाना आझमी यांचा आलेला ‘मासूम’ हा चित्रपट असाच होता. नसीर शबानाचा छान संसार चाललेला असतो. दोन छान गोड मुली असतात. त्यातली एक मुलगी म्हणजे नंतरची आघाडीची अभिनेत्री उर्मिला मातोंडकर होती. त्या सुखी संसारात एका पत्राने वादळ येते. नसीरचे कामानिमित्त बाहेर असताना सुप्रिया पाठकशी संबंध येतात आणि त्यातून एक मूल जन्माला येते. तो मुलगा मोठा झाल्यावर सुप्रिया आजाराने मरते आणि मरणापूर्वी एक पत्र नसीरला पाठवते आणि तुझ्या मुलाची आई असल्याचे कळवते. यामुळे त्या मुलाला स्वीकारायचे की नाही यावरून बराच गोंधळ होतो. त्याला घरात आणले जाते. मासूम निरागस मुलं एकत्र आनंदीत असतात, पण तो सावत्र आहे, आपल्या पतीकडून प्रतारणा झालेली आहे ही भावना मात्र मनात शिल्लक असते. याचे छान चित्रण या चित्रपटात केलेले आहे. शेखर कपूरसारख्या अभ्यासू दिग्दर्शकाची ही दमदार कलाकृती होती. गुलझार यांच्या पटकथा आणि संवादांनी हा चित्रपट चांगलाच गाजला होता, पण अशा तºहेचे अनेक चित्रपट चांगलेच गाजतात आणि प्रेक्षक डोक्यावरही घेतात.

काही चित्रपट अस्सल गावरान विनोदी ढंगाने रंगवले जातात. त्यातही प्रेक्षक गुंगून जातात. यामध्ये ‘दोन बायका फजिती ऐका’ अशा नावाचा १९८० च्या दशकात अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट होता. यात अशोक सराफ, उषा नाईक आणि कामिनी भाटिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या. लग्न झालेला अशोक सराफ एका तमासगिरणीच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. मग तिला घरात घेऊन आल्यावर या दोघी सवतींची भांडणे हा नुसता विनोदाचा भाग, पण या सततच्या भांडणाला कंटाळून तो पळून जातो आणि दोघी सवती अगदी प्रेमानं एकमेकीचं करू लागतात. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतानाच तिसरीच एक आशू तिथे येते आणि दोघींना सरळ करते. असे विनोदी ढंगाने हे दोन बायकांच्या फजितीचे कथानक छान मांडले होते.


असे असंख्य चित्रपट मराठी, हिंदी चित्रपटांतून येऊन गेले असतील की ज्यात दोन बायका, अनैतिक संबंध दाखवले आहेत. सगळ्यांचाच उल्लेख करणे शक्य नाही, पण काही लक्षात राहणारे असे आहेत. १९९६ ला आलेला गोविंदाचा ‘साजन चले ससुराल’ हा चित्रपट असाच. करिष्मा कपूर आणि तब्बू या दोघींशी लग्न करून वेगवेगळा एकनिष्ठ पती असल्याची कसरत तो करतो तेव्हा बघताना खूप मजा येते. स्मिता तळवलकरचीच निर्मिती असलेला आणखी एक चित्रपट असाच विनोदी ढंगाने घेतला होता. तो म्हणजे ‘सवत माझी लाडकी’. यात मोहन जोशी आणि नीना कुलकर्णीचा छान संसार चाललेला असताना ऐन पन्नाशीत तरुण अशा वर्षा उसगांवकरच्या तो प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. त्यातून निर्माण झालेला गुंता अतिशय विनोदी पद्धतीने समोर येतो, तर गरिबी आणि सामान्य जीवनाला कंटाळलेली श्रीदेवी ही श्रीमंतीचे जीवन जगण्यासाठी आपल्या नवºयाच्या प्रेमात पडलेल्या उर्मिला मातोंडकरशी अनिल कपूरचे लग्न लावण्याचा प्रकार करते. त्या बदल्यात एक कोटी रुपये घेते आणि चक्क नवºयाला विकते. त्यानंतर आपला हक्क गेल्याचे जाणवल्यावर ती भानावर येते.

पण अशा दोन बायकांचा कळत नकळत घडणारा चित्रपटाचा गाभा हा कसला तरी मोह असतो. कधी तो पैशाचा असेल तर कधी शारीरिक, पण या मोहातूनच मोहमयी दुनियेत सातत्याने चित्रपट बनत असतात हे नवल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: