एखादे नाटक रंगमंचावर आल्यावर त्यामुळे वाद निर्माण होणे हे मराठी रंगभूमीला नवीन नाही. घाशीराम कोतवालमुळे १९७०च्या दशकातील वाद पेटला होता; पण असे वाद नाटकांबाबत सतत होत राहिले आहेत. वादग्रस्त नाटके निर्माण होत राहिली आहेत आणि ती तशीच चालली पण आहेत. अशाच काही नाटकांवर आज नजर टाकूया. कधी सरकारने, कधी विविध संघटनांनी आणि व्यक्तींनी नाटकाच्या नावावर, कथानकावर किंवा कथानकाच्या काही भागांवर आक्षेप घेऊन बंद पाडलेली किंवा बंद पाडायचा प्रयत्न केलेली काही नाटके आपल्याकडे पुष्कळच आहेत. विशेषत: ऐतिहासिक घटनांवर एखादे नाटक असले की, त्यावर वाद हा निर्माण होणारच.
दहा एक वर्षापूर्वी असेच एक नाटक आले होते. त्याचं नाव एक चावट संध्याकाळ. (नाटक फक्त प्रौढांसाठी असल्याने स्त्रियांना आयोजकांनी मनाई केली.) फक्त पुरुषांसाठी असे नाटक असल्याची जाहिरात केल्यामुळे महिला संघटना आक्रमक झाल्या. अशोक पाटोळे आणि अजित केळकर दोघेच भेटतात आणि एकमेकांना अत्यंत पांचट, अश्लील असे जोक सांगतात. नाटकात फक्त विनोद ऐकायला म्हणूनच जायचे; पण हे अत्यंत अश्लील विनोद असल्यामुळे महिलांना या नाटकाला बंदी होती; पण महिला संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला, आम्हालाही हा चावटपणा बघायचा आहे असा आग्रह धरला, त्यावर वाहिन्यांवर टॉक शो झाले, महिलांना का नाही? म्हणून आग्रह केला आणि महिलांनाही हा चावटपणा पहायला मिळाला; पण त्यामुळे हे नाटक गाजले. अशोक पाटोळे यांच्यानंतर ते बंद पडले.
अर्थात ही परंपरा खूप जुनी आहे. अगदी शंभर वर्षांपूर्वी संगीत कीचकवध (लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर). या नाटकावर ब्रिटिशांनी २७ जानेवारी १९१० रोजी बंदी घातली होती. का तर म्हणे नाटकातील कीचक म्हणजे इंग्रज अधिकारी कर्झन या कल्पनेमुळे त्यावर बंदी घातली होती. आपल्याकडे कोणत्या कारणाने कोणाला वाईट वाटेल, भावना दुखावल्या जातील याचा नेम नसतो. त्यावरून हे वाद निर्माण होतात आणि नाटके वादग्रस्त ठरतात. कुलवधू नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी या नाटकात पाचवारी साडी नेसली होती, म्हणून वाद झाले होते.
पण १९७०च्या दशकातील घाशीराम कोतवाल या नाटकाने खूपच वाद निर्माण झाला होता. या नाटकाचे लेखक विजय तेंडुलकर होते. त्यांनी या नाटकात नाना फडणीसांचे तथाकथित विकृतीकरण केल्यावरून नाटकावर आक्षेप घेतला गेला होता. अर्थात त्याचा काही परिणाम झाला नाही. हे नाटक देश-विदेशातही गाजले आणि त्याने रंगभूमीला एक फार मोठा नवा चेहरा दिला. नवा फॉर्म दिला. एकाचवेळी जास्तीत जास्त पात्र रंगभूमीवर आणण्याचा विक्रमही याच नाटकाने केला.
१९९०च्या दशकात पती माझे छत्रपती या संजय पवार यांनी लिहिलेल्या नाटकाने वाद निर्माण झाला होता. मच्छिंद्र कांबळी या नाटकात प्रमुख भूमिकेत होते. छत्रपती या शब्दाने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होते म्हणून आरडाओरडा झाल्यावर या नाटकाचे नामकरण पती माझे छत्रीपती, असे करण्यात आले आणि हा वाद मिटला.
आणखी एक जुने नाटक म्हणजे बंधविमोचन. या नाटकाचे लेखक गोपाळ गोविंद सोमण हे होते. तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या सचिवाच्या आज्ञेवरून मुंबई पोलीस आयुक्तांनी या नाटकावर अनौपचारिक बंदी घातली होती.
या वीस वर्षांत सर्वात वादग्रस्त ठरलेले आणखी एक नाटक म्हणजे, मी नथुराम गोडसे बोलतोय. हे लेखक प्रदीप दळवी यांनी लिहिलेले नाटक. नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप या नाटकावर होता. नाटकात शरद पोंक्षे यांची प्रमुख भूमिका होती. या नाटकाचे ८००हून अधिक प्रयोग झाले आहेत; पण काँग्रेसने या नाटकाला तुफान विरोध केला. या नाटकाची बस जाळण्याचा प्रकारही काँग्रेसने ठाण्यात केला होता. सुदैवाने त्या बसमध्ये कोणी कलाकार नव्हते; पण हे नाटक चांगले चालले आणि आजही यू-ट्यूबवर ते पाहिले जाते.
महिलांसंबंधी असलेल गेल्या दहा वर्षांतील एक वादग्रस्त नाटक म्हणजे, योनीमनीच्या गुजगोष्टी. याचे मर्यादितच प्रयोग झाले. अतिशय संवेदनशील आणि कोणी बोलू शकणार नाही असे विषय यात होते. या नाटकावर बोरिवलीच्या नाट्यगृहाची बंदी होती, तसेच ठाणे महापालिकेचीही बंदी होती. त्यामुळे ठाण्यात याचे प्रयोग झाले नाहीत.
वस्त्रहरण हे नाटक जेव्हा पहिल्यांदा आले, तेव्हा वाद निर्माण झाला होता. या नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर. महाभारताची तथाकथित चेष्टा करण्यावरून कोणाच्या भावना दुखावतील, असा समज करून याला विरोध केला. पण पु. ल. देशपांडे यांनी याला चांगली पसंती दिली. अभिप्राय दिला आणि हे नाटक तुफान चालले. ५ हजारांपेक्षा जास्त प्रयोग या नाटकाने केले. वस्त्रहरणमुळे मच्छिंद्र कांबळी यांची वेगळी ओळख महाराष्ट्रालाच नाही, तर जगाला झाली. मालवणी भाषेचा गोडवा त्यांनी सर्वदूर पोहोचवला; पण त्याची सुरुवात वादाने झालेली होती.
नाटकावर बंदी असताना प्रयोग केला म्हणून किंवा त्या नाटकामुळे कोणाला शिक्षा झाल्याच्या घटना फारशा नाहीत; पण विजयतोरणा या नाटकाच्या १५ कलाकारांना ब्रिटिश सरकारने एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. लेखक विवेक बेळे यांनी शॅम्पेन आणि मारुती या नावाने एक नाटक आणले होते; पण त्यामुळे खूप वाद निर्माण झाला. त्यामुळे या नाटकाचे नाव बदलून माकडाच्या हाती शॅम्पेन असे करावे लागले. हे नाटक खूप गाजले. विशेष म्हणजे १९व्या महाराष्ट्र राज्य व्यावसायिक मराठी नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाटकाचे बक्षीस मिळालेले हे नाटक आहे.
विजय तेंडुलकरांची नाटके नेहमीच वादग्रस्त ठरली. घाशीराम कोतवालप्रमाणेच सखाराम बाइंडर या नाटकात साडी बदलण्याचे एक दृश्य होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता; पण न्यायाधीशांनी ते पाहून नाटकावर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली होती. त्यांच्या गिधाडे नाटकातही गर्भपाताचे दृष्य आहे. पोटात गुडघा मारून गर्भपात केला जातो आणि रक्तस्त्राव होतो म्हणून लाल रंग साडीला लागतो. या लाल रंगाला आणि रंगभूमीवर असे दाखवायला सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली; पण यातून पळवाट म्हणून लालच्या ऐवजी निळा रंग वापरून या नाटकाचे प्रयोग सुरू केले गेले. यातील निळा रंग लाल आहे असे समजावे असे अगोदर सूचीत केले गेले होते; पण हा वाद मिटवला गेला होता.
मी नथुराम गोडसे बोलतोय नंतर हे राम नथुराम या नावाचे नाटक लेखक-दिग्दर्शक-अभिनेते शरद पोंक्षे यांनी आणले होते. या नाटकाविरुद्ध कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहासमोर निदर्शने करण्यात आली. १९-१२-२०१६ ची म्हणजे अवघ्या चार वर्षांपूर्वीची ही घटना आहे. संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानी संघटना यांच्या कार्यकर्त्यांनीही औरंगाबादमधील संत तुकाराम नाट्यगृहाबाहेर आणि आत हे राम नथुराम या नाटकाविरुद्ध उग्र निदर्शने केली होती. पण तिथे जमलेल्या शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने या कार्यकर्त्यांना चोपून काढले. दंगल करणाºया कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर नाटक पुन्हा सुरू झाले.
काही वाद कोर्टात गेले, काही गाजले, पण रंगभूमीवर अनेक वादग्रस्त नाटके आली आणि त्यांनी नवे काही तरी दाखवूनही दिले, ही परंपरा वर्षानुवर्षांची आहे. पण यात प्रत्येक खेपेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंकलेले आहे. कोणाच्याही दडपशाहीने नाटक बंद पडले नाही. त्यात किरकोळ बदल प्रसंगी केले गेले; पण नाटक ‘शो मस्ट गो आॅन’ या न्यायाने होत राहिले.
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा