शनिवार, १६ जानेवारी, २०२१

सत्य घटनेवर आधारित


कोणतेही नाटक किंवा चित्रपट किंवा एखादी कलाकृती सत्य घटनेवर आधारित आहे, असे म्हटले की त्याला वेगळे वळण लागते. कुठे घडलेली होती ही घटना, परिचयाच्या, फेमस व्यक्तीसंबंधी होती का, वगैरे-वगैरे; पण नाटक चालवण्यासाठी सत्य घटना होती, घडलेली घटना होती, त्यावर नाटक केले हे सांगितले जाते. याचे कारण नाटक म्हटले की, ती नाटक असते, खोटे असते. पण हा खोटेपणाही सत्य घटनेवर आधारित होता हे सांगावे लागते. अशी सत्य घटनेवर आधारित अनेक नाटके आपल्याकडे आजवर आलेली आहेत. ती चांगली चालतातही. मागच्याच आठवड्यात आपण तो मी नव्हेच या नाटकाबाबत चर्चा केली होती. तेही सय्यद काझी खटल्यावर आधारित नाटक होते. त्यामुळे त्याचीही जाहिरात सत्य घटनेवर आधारित सामाजिक समस्याप्रधान नाटक, अशीच केली गेली होती.

रत्नाकर मतकरी यांचे माझं काय चुकलं? हे नाटक १९८०च्या दशकात आले होते. तेही सत्य घटनेवर आधारित असेच होते. या नाटकात भावना, मीनल परांजपे आणि दिलीप कुलकर्णी या प्रमुख कलाकारांनी काम केले होते. डोंबिवलीतील एका घरगुती घटनेवर आधारित हे नाटक होते. हे नाटक इतके सहजपणे पुढे सरकत होते की, त्यात निर्माण केलेले वास्तव चित्रच फार सुंदर होते. विशेष म्हणजे चाळीतील जुन्या घराचा सेट इतका सुंदर होता की, आपण अशी घरे पाहिलेली असतात. त्यामुळे त्याचा आनंद मिळतो. जुन्या काळातला उभा पितळी संसार, स्वयंपाकघर, स्टोव्ह इतका सुंदर प्रकारे या नाटकात होता की, मुलगी पाहायला येण्याच्या कार्यक्रमाला काकडा पेटवून आवाजाचा स्टोव्ह पेटवण्यापर्यंत आणि खराखुरा चहा करण्यापर्यंतचे यात साधलेले टायमिंग फार सुंदर होते. नाटकाचा पडदा उघडल्यावर सेटला मिळालेली दाम आनंददायक होती; पण जेव्हा नाटक पुढे-पुढे सरकत जाते, तेव्हा त्यातील निर्माण होणारे दु:ख अत्यंत खजील करून जाते. विचार करायला लावते, की माझं काय चुकलं?


या नाटकावर कालांतराने चित्रपटही बनवला गेला. त्याचं नाव होतं माझं घर, माझा संसार. यात मुग्धा चिटणीस आणि अजिंक्य देव यांनी काम केले होते; पण घरातील आई आणि बायको दोघांना सांभाळताना पुरुषाच्या मनावर येणारी टेन्शन या नाटकातून दाखवली होती. विधवा आई आणि प्रेमाची बायको. कोणाला जवळ करायचे कोणाला दुखावयचे? यामध्ये जनरेशन गॅप आहेच. वडिलांच्या माघारी काटकसरीने हाडाची काडं करून वाढवणारी आई आणि लग्नानंतर सुबत्ता असल्यामुळे सढळ हाताने खर्च करणारी बायको. यात किती अनावश्यक खर्च होतात यावरून होणारे सासवासुनांचे वाद विकोपाला जातात आणि या त्रासाला कंटाळून हे पती-पत्नी लोकलमधून उडी मारून आत्महत्या करण्याचे ठरवतात; पण दुर्दैव असे की, यात पुरुष मरतो आणि सून जीवंत राहते. डोंबिवलीत घडलेल्या घटनेवर हे नाटक बेतले होते; पण या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. रत्नाकर मतकरींचा छाप या नाटकावर दिसत होता. एकेकाळी मराठी चित्रपटात नाव कमावलेली अभिनेत्री भावना ही या नाटकात पुत्रप्रेमासाठी व्याकुळ असलेली खाष्ट; पण प्रेमळ सासू तिने जबरदस्त रंगवली होती. दिलीप कुलकर्णी त्या काळात रंगभूमीवर स्थिर होत असलेला एक गुणी कलाकार म्हणून ओळखला जात होता. त्या काळात हे नाटक चांगले गाजले होते.

खरं तर कोणतीही कथा, नाटक हे कुठे तरी बीज सापडल्याशिवाय तयार होत नाही. हे बीज सत्य घटनांवर आधारितच असते. कुठे तरी काही तरी घडते आणि त्याला नाट्यमय वळण मिळते. त्यामुळे लेखक नेहमी अशा घटनांचा वासच घेत असतात. त्याला ते जर्म म्हणतात; पण हा जर्म जीवंत आणि सत्य घटनेशीच घोंगावत असतो.


रत्नाकर मतकरी यांनी अनेक नाटके अशाप्रकारे सत्य घटनेवर आधारितच लिहिली आहेत. त्यापैकी घर तिघांचं हवं आणि कर्ता करविता या नाटकांचा उल्लेख करावाच लागेल. घर तिघांचं हवं हे नाटक दिलीप प्रभावळकर आणि रीमा लागू यांनी अक्षरश: गाजवलं; पण हे नाटक एका फार मोठ्या कर्तबगार महिलेच्या जीवनावर होते. एका महान समाजसेविकेच्या जीवनावर हे नाटक होते. नवºयाचा त्रास सहन करणारी आणि शेवटी त्याला सोडून समाजकार्यासाठी पुढे आलेल्या महिलेच्या कौटुंबिक नातेसंबंधांवर प्रकाश टाकणारे हे नाटक होते.

कर्ता करविता हे नाटक असेच सत्य घटनेवर होते; पण त्यातील घटना ही काही चिरंतन समस्या नसल्यामुळे ते नाटक फार काळ चालले नाही. रमेश देव, सीमा देव, उज्वला केणी, विजय गोखले असे दिग्गज कलाकार यात होते. राजकारणी लोकांचे वैयक्तिक जीवनातील भ्रष्ट चारित्र्यावर प्रकाश टाकणारे हे नाटक होते. १९८०च्या दशकात एका मोठ्या नेत्याने आपल्या सुनेवरच हात टाकण्याचा प्रकार केला होता. हे प्रकरण त्या काळात खूप गाजले होते. त्या राजकारण्याच्या जीवनावर आधारित असे हे कर्ता करविता नाटक होते. राज्यातील मोठा मंत्री म्हणून ओळखल्या जाणाºया रंगेल राजकारण्याने आपल्या सुनेच्या अब्रूला घातलेला हात हा सत्य घटनेवरचा विषय या नाटकात आला होता; पण हे नाटक थोडे दिवसच चालले; पण ते नाटक करण्याचे धाडस मात्र मतकरींनी केले होते.


नाटककार मधुसुधन कालेलकर यांनीही लिहिलेले एक नाटक एव्हरग्रीन असे आहे. ते म्हणजे अपराध मीच केला. १९६०च्या दशकात आलेले हे नाटक अजूनपर्यंत विविध कलाकारांनी केलेले होते. अरुण सरनाईक आशू आणि अविनाश खर्शिकर यांनी १९८०च्या दशकात ते नाटक गाजवले होते. त्यानंतर काही वर्षांनी कोल्हापुरातून रवींद्र महाजनी यांनी या नाटकातून काम करायला सुरुवात केली होती. हे एका लष्करी अधिकाºयाच्या खाजगी जीवनात घडलेल्या घटनेवर आधारित नाटक होते. त्याचप्रमाणे मॅडम हे नाटक त्या काळात गाजले होते. आशू ही अभिनेत्री या मॅडमची भूमिका करायची. ते नाटक तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांच्या जीवनावर आहे, असे जाहिरातीत म्हटले होते. आशू या नाटकात शालिनीताई पाटील यांच्यासारखीच तडफदारपणे चालण्याचा प्रयत्न करत होती. ते पण नाटक चांगले गाजले होते; पण त्याला ए सर्टिफिकेट दिलेले होते. अशी अनेक नाटक सत्य घटनांवर येत असतात. काही दीर्घकाळ टीकतात काही अल्पायुषी असतात.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: