दोन दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत खडाजंगी झाली; पण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षपदाचा निर्णय होऊ शकला नाही. ही काँग्रेसची पराभूत मानसिकता त्यातून दिसून आलेली आहे. आता काँग्रेस अध्यक्षपदाची निवड २१ जून नंतर म्हणजे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर होईल, असे जाहीर करून ही बैठक उरकली. निर्णयक्षमता नाही हा काँग्रेसचा दुर्गुण यातून अधोरेखित झालेला आहे. काँग्रेसच्या नेत्यांना, मंत्र्यांना पूर्वीपासूनच कोणत्याही कामाची गळ घातली की बघू, करू अशाप्रकारे कामे लटकत ठेवण्याची सवय होती आणि आहे. तोच गुण त्यांच्या आता अंगलट येत चाललेला आहे. अनेक प्रश्न, देशहिताचे प्रकल्प अशा निर्णय न घेण्याच्या प्रवृत्तीमुळे, दुर्गुणामुळे या देशात लटकत राहिले आणि देश मागे राहिला. आता काँग्रेस अध्यक्षपद दीड वर्ष रिकामे असूनही त्या जागी फूल टाइम अध्यक्ष काँग्रेसला निवडता येत नाही, हे अत्यंत वाईट आहे.
राहुल गांधी यांनाच काँग्रेसचा अध्यक्ष करावे, त्यांनाच लोकनेता म्हणून पुढे आणावे, हा काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आग्रह म्हणजे केवळ पुत्रमोह आहे! या पुत्रमोहातून सोनिया गांधी बाहेर पडत नाहीत आणि पक्षात खºया अर्थाने लोकशाही नांदू देत नाहीत, तोपर्यंत काँग्रेस पक्षाला पूर्वीचे दिवस येणर नाहीत, हे यातून स्पष्ट झालेले आहे.
खरं तर जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीतील सर्वाधिक जुन्या पक्षाची आज जी वाईट अवस्था झाली आहे, ती भारतीय लोकशाहीलाही लाजवणारी आहे. बिगर गांधी अध्यक्षपद देऊनच खरे तर आता काँग्रेसला चांगले दिवस येऊ शकतात. पण नेतृत्वहीन काँग्रेस असा चेहरा समोर आणून आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने मैदान सोडले आहे, हे स्पष्ट दिसते. पाच राज्यांतील निवडणुकांनंतर राहुल गांधींनाच अध्यक्ष करायचे आहे तर ते आता का नको? पण जर या पाच राज्यांतही काँग्रेसची अवस्था वाईट झाली, यश मिळाले नाही, तर राहुल गांधींच्या माथी अपयश नको म्हणून त्यांची निवड लांबणीवर केली जात आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने हार पत्करल्याचे हे चित्र आहे.
खरं तर काँग्रेसचा अध्यक्ष बनण्याची आणि लोकनेता होण्याची राहुल गांधी यांची क्षमता आहे काय, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. त्यांची राजकीय परिपक्वताही देशाने अनुभवली आहे. जेव्हा पक्षाला गरज असते, तेव्हा राहुल गांधी विदेशात जातात. संसदेचे अधिवेशन असताना ते इटलीत आजीला भेटायला जातात. काँग्रेसचे कार्यकर्ते सरकारविरोधात जेव्हा एखादे मोठे आंदोलन छेडतात, नेमके तेव्हाच राहुल गांधी परदेशात गेलेले असतात. सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी उपलब्ध असलेले सगळ्यात मोठे व्यासपीठ म्हणजे संसद. संसदेच्या अधिवेशनात सरकारवर तुटून पडण्याची संधी असताना ते उपस्थित राहात नसल्याने सभागृहांत काँग्रेसच्या एकूणच कामगिरीवर परिणाम होतो. असे असतानाही त्यांना काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याचा हट्ट धरणे हे चुकीचे आहे.
काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांच्याशिवाय अन्य कुणातच क्षमता नाही, असे सोनिया गांधींना का वाटते आहे? २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुका तशा राहुल गांधींच्याच नेतृत्वात लढल्या गेल्या. पण, संविधानाने लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी जी अट घातली आहे, ती पूर्ण करण्यासाठी लागणारे संख्याबळही काँग्रेसला गाठता आले नाही, हे राहुल गांधींचे दोन निवडणुकांमधील फार मोठे अपयश होते. अन्य कोणा बिगर गांधी नावाच्या व्यक्तीकडून असे अपयश आले असते, तर काँग्रेसने त्या व्यक्तीला अध्यक्षपदावर राहू दिले असते का? मग राहुल गांधींसाठी हा हट्ट का धरला जात आहे? का प्रियंका गांधींना अध्यक्ष करण्यासाठी ही खेळी आहे? राहुल नको तर प्रियंकाला करा, असे सांगण्यासाठी ही खेळी सोनिया गांधी करत आहेत? म्हणजे विजय मिळाला, तर तो राहुल गांधी आणि सोनिया गांधींमुळे आणि पराजय झाला, तर त्यासाठी सामूहिक जबाबदारी, हे जे काँग्रेसचे धोरण आहे ते अप्पलपोटी आहे. या निर्णयक्षमता नसल्यामुळे अध्यक्षपदाचे घोंगडे भिजत पडले आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. पक्षात लोकशाही नांदावी आणि पक्षाला अंतरिमऐवजी स्थायी अध्यक्ष असावा, अशी अपेक्षा या पत्रातून व्यक्त करण्यात आली होती; पण पत्र लिहिणाºया या नेत्यांपैकी अनेकांची आज काय अवस्था झाली आहे? खरं तर पत्रावर सकारात्मक विचार करून पक्षहिताचा निर्णय होण्याऐवजी अनेक ज्येष्ठ नेत्यांना कसे डावलण्यात आले, हे संपूर्ण देशाने पाहिले. कधीकाळी सर्वाधिक मजबूत पक्ष असलेल्या काँग्रेस पार्टीची आज जी दुर्दशा झाली आहे, त्याला जबाबदार कोण, हे त्या पक्षातील नेत्यांना माहिती आहे. पण, ते उघडपणे बोलण्याची हिंमत दाखवत नाहीत. कारण, हिंमत दाखवणाºयाला कशी बाहेरची वाट दाखविली जाते, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. सक्षम नेतृत्वाअभावी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आहे. ते हतबल झाल्याचे पाहायला मिळते आहे. कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांसारख्या निष्ठावंत नेत्यांनाही अपमानीत केले जाते. तिथे सामान्य कार्यकर्त्यांची काय अवस्था असेल? खरं तर शशी थरूरसारखा चेहरा काँग्रेसला नवा विचार देऊ शकतो; पण लोकशाही मार्गाने निवडणुका घेऊनही अध्यक्ष निवडायचा नाही आणि फक्त भिजते घोंगडे ठेवायचे एवढाच अजेंडा सध्या काँग्रेस राबवते आहे, दुसरे काही नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा