६ जानेवारी हा माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा जन्मदिवस. शिवसेनेतर्फे संपूर्ण राज्यात हा दिवस 'ममता दिन' म्हणून गेली अनेक वर्ष साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून या ममतामूर्ती माँसाहेबांच्या काही आठवणी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद देऊलकर यांनी सांगितल्या आहेत. त्या अतिशय हृदयस्पर्शी अशा आठवणी आहेत. अंधेरी येथील प्रबोधन कट्ट्यावर या कट्ट्याचे संस्थापक सुभाष सावंत आणि अध्यक्ष देऊलकर हे अतिशय समारंभपूर्वक हा दिवस साजरा करतात. माँसाहेबांची आठवण म्हणून दरवर्षी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार या कट्ट्यावर केला जातो. यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कट्ट्यावर मास्क वाटपाचे काम ममता दिनाचे औचित्य साधून केले जात आहे.
माँसाहेब मीनाताई ठाकरे या माँसाहेब कशा झाल्या आणि समस्त शिवसैनिकांच्या त्या माँसाहेब कशा झाल्या हे ऐकतानाही अंगावर रोमांच उठतात. शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्राला वाहून घेतले होते. या कार्यात सावलीसारख्या त्या उभ्या असायच्या, पण आपले हिंदू तत्वज्ञान सांगते काय, तर स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते. त्याप्रमाणे बाळासाहेबांची आपल्या बाळाप्रमाणे काळजी घेणाºया मीनाताई ठाकरे या अगदी आईच बनून गेल्या होत्या. त्यामुळे शिवसेनाप्रमुख त्यांना माँ म्हणूनच संबोधत असत.
खु्द्द शिवसेनाप्रमुख माँ संबोधत असल्यामुळे सर्व शिवसैनिक त्यांना माँसाहेब म्हणून संबोधू लागले. सुरुवातीच्या काळात शिवसैनिक त्यांना वहिनीसाहेब असे म्हणत असत, पण बाळासाहेबांनी माँ म्हणायला सुरुवात केल्यावर त्या समस्त शिवसैनिकांच्या माँ झाल्या. त्यांनी आईच्या ममतेनेच शिवसैनिकांना सांभाळले. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा 'ममता दिन' म्हणून साजरा केला जातो, ते अत्यंत योग्य वाटते.
सदानंद देऊलकर हे शिवसेनेचे आॅफिस सांभाळायचे. त्यावेळी शिवसेनाभवन तयार झालेले नव्हते, त्यामुळे हे आॅफिस पर्लब्ल्यू येथे होते. दररोज आॅफिस उघडून तयार झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब तिथे यायचे. एकदा सदानंद देऊलकर यांना बरे वाटत नव्हते, त्यांची तब्ब्येत ठिक नव्हती. त्यामुळे त्यांनी बाळासाहेबांना कळवले की, आज मी काही आॅफिस उघडत नाहीये, जरा तब्ब्येत बरी नाहीये त्यामुळे तुम्ही आॅफिसला येऊ नका. त्यावर बाळासाहेब ठिक आहे म्हणाले आणि घरीच थांबले. शिवसेनेच्या आॅफिसात जाणारे बाळासाहेब आज का गेले नाहीत, याची चौकशी माँसाहेबांनी शिवसेनाप्रमुखांकडे केली. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले, सदाची तब्ब्येत ठिक नाहीये, तो आॅफिसला आलेला नाही म्हणून आज आॅफिस बंद ठेवले आहे. हे समजताच माँसाहेब मीनाताई ठाकरे या स्वत: डॉक्टरांना घेऊन सदानंद देऊलकर यांच्या घरी आल्या आणि त्यांच्यावर उपचार केले. हे कोण करते? खरी ममता असणारी आईच करू शकते. त्यामुळे साक्षात ममतेची मूर्ती असलेल्या त्या माँ होत्या.
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे, त्यांच्या घरी कोणीही महिला शिवसैनिक कार्यकर्त्या आल्या की, त्यांना त्या स्वत: हळद-कुंकू लावल्याशिवाय बाहेर सोडत नसत. हळद-कुंकू हा स्त्रीचा सन्मान असतो. तो सर्वोच्च सन्मान देऊनच महिला भगिनी तिथून बाहेर पडत असत. माँसाहेबांनी आपल्या हाताने लावलेले, आईने लावलेले कुंकू हे फार मोठे भाग्याचे लक्षण असल्याचे प्रत्येक भगिनीला वाटत असे. हळद-कुंकू हा काही साधा समारंभ नसतो. अंगावर किलोभर सोने असले, तरी त्या सोन्याची शोभा चिमूटभर कुंकवाने शतपटीने वाढते. शरीराला झालेल्या जखमांवर हळद लावली की, त्या बºया होतात. तशाच मनाला झालेल्या जखमा बºया करण्याचे काम कुंकवाने होत असते. हे फार मोठे काम माँसाहेब करत होत्या. कोणतीही संघटना म्हटल्यावर त्यात रूसवे फुगवे हे होत असतात. कोणीतरी नाराज होत असते. कधीकधी बाळासाहेब रागावल्याने कोणी नाराज होत असे, त्या प्रत्येकाची नाराजी काढण्याचे काम न चुकता माँसाहेब करत असत. हे काम आईच करू शकते. लहान मुलांमध्ये मतभेद भांडणं झाल्यावर आई जशी त्यात समझोता घडवते तेच काम एक व्रत म्हणून माँसाहेब करत असत. त्यांना शिवसैनिकांबाबत अत्यंत माया वाटत असे.
त्या काळात साधारण १९७०च्या दशकात कोणत्याही कार्यक्रमाला बाळासाहेबांना सगळीकडे बोलावले जायचे. प्रत्येक ठिकाणी त्यांना जाणे अवघड असायचे इतके कार्यक्रम व्हायचे. एकदा कार्यक्रमात व्यस्त असतानाच परळच्या कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस समारंभ होता. या बक्षीस समारंभाला येण्यासाठी आमंत्रण बाळासाहेबांना केले गेले. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले की, प्रत्येक वेळी मीच कशाला? माँसाहेबांना घेऊन जा. त्याप्रमाणे माँसाहेबांनी या कार्यक्रमाला येण्याचे ठरवले. त्यांच्या हस्ते गणेशोत्सवातील स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या कलाकारांचा बक्षीस समारंभ होता. या कार्यक्रमाला वामनराव महाडीक, विजय गांवकर, संगीतकार उषा खन्ना, अभिनेते ओमप्रकाश यांचे बंधू भक्तिचंद हे उपस्थित होते. त्यावेळी बक्षिसांचे वाटप करताना फॅन्सी ड्रेसमध्ये पहिला क्रमांक मिळवलेला एक बालकलाकार माँसाहेबांच्या समोर आला. शिवाजी महाराजांच्या वेषभूषेत आलेला तो कलाकार माँसाहेबांच्या हातून बक्षीस घेत असताना काढलेला फोटो म्हणजे साक्षात भवानीमातेने महाराजांना तलवार देतानाची अॅक्शन होती. तो फोटो अत्यंत दुर्मीळ म्हणून सदानंद देऊलकर यांच्याकडे होता. माँसाहेबांच्या निधनानंतर त्यांनी तो फोटो बाळासाहेबांना दाखवला, तेव्हा तो फोटो पाहून बाळासाहेबांच्या डोळ्यातून अश्रूधारा अनावर झाल्या. त्यावेळी त्यांचे उद्गार होते, हे हिंदवी राज्य व्हावे ही माँसाहेबांची इच्छा होती. तसेच आपल्या माँसाहेबांची इच्छा विधानभवनावर भगवा फडकवणे ही होती. ती त्यांची इच्छापूर्ण झालेली आहे. शिवसेनेने मनोहर जोशी, नारायण राणे आणि आता उद्धव ठाकरे या रूपाने तीन मुख्यमंत्री महाराष्ट्राला आजपर्यंत दिले. ही सर्व माँसाहेबांची इच्छा होती, असेच भाव आज सर्वत्र दिसून येतात. वात्सल्यमूर्ती माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना त्यांच्या या जन्मदिन ममता दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा