गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

योग्य निवड


येत्या २६ ते २८ मार्चदरम्यान नाशिकला होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ व विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची झालेली निवड ही अत्यंत योग्य बाब आहे. त्यांच्या निवडीने या साहित्य संमेलनांच्या आजवरच्या महान परंपरेत खोवला गेलेला एक मानाचा तुरा आहे असेच म्हणावे लागेल. याचे कारण काहीसे वेगळे करण्याचा प्रयत्न आजवर संमेलनाने केलेला नव्हता. वैज्ञानिक आणि साहित्यिक असलेल्या नारळीकरांना ही संधी देण्याचे केलेले काम नक्कीच चांगले आहे. यामुळे ज्ञानाला विज्ञानाची जोड मिळणार आहे.

वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी पद्मभूषणने सन्मानित झालेला नारळीकरांसारखा बुद्धिमान आणि विज्ञाननिष्ठ लेखक संमेलनाध्यक्ष पदावर विराजमान होणे ही या संमेलनाची गुणवत्ता वाढविणारी बाब म्हणावी लागेल. हा सन्मान त्यांना केवळ ते जागतिक कीर्तीचे खगोल शास्त्रज्ञ आहेत म्हणून मिळालेला नाही; मराठीमध्ये विज्ञानकथा आणि विज्ञान कादंबरीची रुजवण करण्यामध्ये आणि त्याचबरोबर बाल आणि युवा पिढीमध्ये वैज्ञानिक लेखनाद्वारे गणित, अंतराळ, खगोल शास्त्र, अशा विषयांची आवड निर्माण करण्यामध्ये नारळीकरांनी आजवर दिलेले योगदान केवळ अतुलनीय आहे. जेव्हा टीव्ही हे माध्यम रुजलेले नव्हते त्या काळात ४० वर्षांपूर्वी नभोनाट्य किंवा श्रृतिकांच्या माध्यमातून त्यांनी पोहोचवलेल्या कथाही लक्षणीय आहेत. त्यामुळे त्यांना मिळालेला मान हा रास्तच आहे. खरं तर गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलन म्हटले की, नानात‍ºहेचे वादविवाद हे चित्र पहायला मिळत होते, पण साहित्य परिषदेने काहीतरी वेगळं करून दाखवलं म्हणून त्यांचे कौतुक करावे लागेल.


खरं तर विज्ञान विषयावर लिहिणारे अनेक लेखक, साहित्यिक आहेत, परंतु अगम्य संकल्पना आणि बोजड शब्दांमुळे या विज्ञानपर साहित्याला जेवढी मिळायला हवी होती तेवढी वाचकप्रियता लाभू शकलेली नव्हती, पण डॉ. जयंत नारळीकर याला नक्कीच अपवाद आहेत. ते सोप्या भाषेत, सर्वसामान्यांना समजेल अशाच शब्दांत विज्ञानातून ज्ञान देत असतात. हे त्यांचे फार मोठे बलस्थान आहे. अत्यंत साध्या, सोप्या भाषेमध्येदेखील वैज्ञानिक संकल्पना मांडता येतात आणि विज्ञानकथा वा कादंबरीही रंजक आणि वाचनीय ठरू शकते हे त्यांनी आपल्या लेखनातून आजवर दाखवून दिले आहे. विशेषत: नव्या पिढीला साद घालणारे जे विज्ञाननिष्ठ लेखन नारळीकरांनी केले आहे, त्याला तोड नाही.

साहित्यासाठी काहीतरी भाषेत नवीन भर टाकायची असते. अनेकांनी तसे प्रयत्न केलेही आहेत. डॉ. नारळीकरांनीही यासाठी आपला वेगळा विचार मांडला आहे. प्रेषितसारखी पहिली विज्ञान कादंबरी त्यांनी लिहिली तेव्हा त्यामध्ये इंग्रजी शब्द वापरले गेल्याने काहींनी टीकाही केली होती. परंतु विज्ञान कथालेखन करताना इंग्रजी शब्द बिल्कूल वापरू नयेत हा अट्टाहास आपल्याला मान्य नाही आणि जर अशा शब्दांनी मराठी भाषा दबणार असेल तर तिला कमकुवत म्हटले पाहिजे. इतर भाषांची अतिक्रमणे पचवून कोणतीही भाषा समृद्ध होते. इंग्रजी भाषाही त्यामुळेच समृद्ध झाली आहे हे त्यांनी ठामपणे सांगितले होते. टीकेने खचून न जाता आपल्या मताशी प्रामाणिक राहून आपला इंग्रजी शब्द वापरण्याचा नेमका काय उद्देश होता हे त्यांनी ‘वामन परत न आला’ या आपल्या दुस‍ºया विज्ञान कादंबरीच्या प्रास्ताविकात दाखवून दिले आहे. हा अतिशय नम्रपणा होता. तो फार कमी लोकांना साधतो, पण आपली मर्यादा न ओलांडता, सभ्यता न सोडता, नेमकेपणाने लिहिणारे विज्ञान साहित्यिक असा लौकिक नारळीकरांनी प्राप्त केला आहे. त्यामुळे त्यांचा झालेला हा सन्मान, झालेली ही रास्त निवड म्हणजे साहित्य संमेलनाचा सन्मान वाढवणारी बाब आहे. खूप दिवसांनी एक चांगले साहित्य संमेलन नाशिकला पहायला मिळेल, असा विश्वास त्यामुळे निर्माण झालेला आहे.


यापूर्वीच जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमी पुरस्कारही लाभला आहे. मराठी विज्ञान कथा, कादंब‍ºयांचे दालन तर नारळीकरांनी समृद्ध केले आहेच, परंतु आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून मुलांसाठी, तरुणांसाठी विपुल लेखन त्यांनी आजवर केले. वैज्ञानिकांनी आपले ज्ञान दुसºयांना दिले पाहिजे हे त्यांनी वागून दाखवले आहे. नव्या पिढीला विज्ञानामध्ये रस वाटावा यासाठी डॉ. नारळीकरांनी अथकपणे केलेल्या या लेखनामुळे लाखो मुलांना आजवर विज्ञानाची, खगोल शास्त्राची, गणिताची गोडी लागली असेल यात शंका नाही. साहित्य संमेलनाध्यक्षपदी झालेली नारळीकरांची निवड मराठी साहित्यामध्ये विज्ञाननिष्ठ लेखनाचे एक नवे पर्व निर्माण करील आणि मराठी भाषेला व साहित्याला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल, याबाबत कोणतीही शंका मनात बाळगायची गरज नाही. साहित्याला राजकारण शिवलेले आपण पाहतो आहोत, पण आता खºया अर्थाने दर्जेदार संमेलन पाहण्याची संधी यावर्षी मिळणार आहे.

नाशिकचे साहित्य संमेलन म्हणजे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा गौरव आलाच. त्याशिवाय हेच नाही तर कुठलेच साहित्य संमेलन पूर्ण होऊ शकत नाही, पण आणखी एक बाब म्हणजे, कुसुमाग्रज नावाचा एक ग्रह अंतराळात आहे आणि खगोल शास्त्राचे वैज्ञानिक साहित्यिक या संमेलनाचे अध्यक्ष आहेत हाही योग फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही निवड अधिक योग्य आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: