शिक्षेची भीती नसल्याने लोक चुकीच्या गोष्टी करण्यास सुरुवात करतात - चाणक्य
आर्य चाणक्यांनी हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले वचन आहे की, शिक्षेची भीती नसल्याने लोक चुकीच्या गोष्टी करण्यास सुरुवात करतात. हे वाक्य अगदी आजही तंतोतंत पटेल असेच आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात व देशात वाढलेली गुन्हेगारी पाहता याचे मूळ कायद्याची भीती वाटत नसल्याने हे प्रकार घडताना दिसत आहेत हे स्पष्ट होते.
दोन दिवसांपूर्वी पुण्यात कामावरून घरी जाणाºया एका मुलीला अपहरण करून बलात्कार केल्याची घटना घडली. हे तर एक प्रातिनिधीक उदाहरण झाले, पण गेल्या काही दिवसांत अशा किती बातम्या येत आहेत? या बातम्या मन सुन्न करणाºया आहेत. याला कारण शिक्षेची भीती नाही. आमच्याकडे बलात्काराचे खटले वर्षानुवर्ष चालतात. फास्टट्रॅकमधील निर्भयाचा खटला पूर्ण होऊन शिक्षा व्हायला सात वर्ष लागली. मग फास्ट ट्रॅकवरील नसलेले खटले किती वर्ष खितपत पडतील याला काही हिशोबच नाही. गुन्हेगारांना खटले प्रलंबित राहिल्याने काही फरक पडत नसतो, पण पिडीता आणि तिच्या कुटुंबाना याचा त्रास होत असतो. तिचे पुनर्वसन, नुकसान, मानसिक दौर्बल्य हे कधी दूर होणार असते. त्यामुळे स्वराज्यात आपण भीती वाटेल, शिक्षेची भीती वाटेल, असे कायदे करणे आवश्यक असते तरच गुन्हेगारी कमी होते. आता राज्यात दिशा कायदा येत आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे, हे अत्यंत स्वागतार्ह असले तरी तो कायदा कडक असला पाहिजे. त्यातील तरतुदी, काय शिक्षा असेल हे सर्वांपर्यंत प्रखरपणे पोहोचले पाहिजे, तरच कोणीही बलात्कार करताना, मुलींची छेडछाड करताना दहा वेळा विचार करेल.
आज गुन्हेगारी, भ्रष्टाचार इतक्या प्रमाणात वाढलेले आहे की, आपल्याला कधी शिक्षा होणारच नाही या तोºयात गुन्हेगार निर्ढावल्या प्रमाणे काम करताना दिसतात. आज आमच्याकडे भीती आणि धाक दाखवायला फक्त ईडी आहे, पण आजकाल त्या ईडीला, सीबीआयला कोणी घाबरतही नाही. आमच्याकडे कोरोना आला आहे, असे सांगून त्यातून पळवाटही काढता येत आहे. कायद्याचा, चौकशी यंत्रणेचा मान राखण्याचे भान नाही. गुन्हे करताना भीती नाही, असली प्रवृत्ती सगळीकडे बोकाळलेली आहे. त्यामुळे अनागोंदीचे चित्र आहे.
स्वच्छतेबाबत, आरोग्याबाबत सरकार सातत्याने आवाहन करत आहे, पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. कारण शिक्षेची भीती नाही. मध्य रेल्वेचे थुंकण्यास मनाई आहे अभियान म्हणून चालणार नाही, पण सतत प्रत्येक स्टेशनवर थुंकणाºया किती लोकांना दंड केला जातो? रस्त्यावरून हिंडताना त्रास होतो, इतके लोक मास्क बाजूला करून थुंकत असतात, पण याविरोधात दाद मागायला कोणीही जाऊ शकत नाही. कारण पोलीस असल्या तक्रारी घेत नाहीत. पोलीसच जिथे तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकताना दिसतात, तिथे ते नागरिकांना काय शिक्षा करणार? आज रस्त्यावर, कुठेही थुंकणाºयांना एक रुपया जरी दंड केला, तर एक दिवसात हजारो कोटी रुपये जमा होतील. मेट्रोसारखे प्रकल्प थुंकण्यातून वसूल केलेल्या दंडातून उभे राहतील, पण हे होत नाही. याचे कारण आम्हाला शिक्षेची भीती नाही. नियम कायदे कानून याबाबत काही वाटत नाही. ही परिस्थिती बदलली पाहिजे.
रस्त्याने जाताना वेडीवाकडी बाइक चालवणारे, झासे देत जाणारे, हेल्मेट न वापरणारे, ट्रिपल सीट जाणारे बाइकस्वार का दिसतात? कारण आरटीओ पोलिसांची त्यांना भीती वाटत नाही. व्यवस्थेने सर्वांना पार विकत घेतले आहे. हजार रुपये दंडाऐवजी शंभर रुपयाची नोट फेकली की सगळे काही दाबले जाते ही मस्ती आहे. शिक्षेची भीती वाटत नाही. त्यामुळे गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. कायदे केले, पण त्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. त्या कायद्याचा भंग केला, तर काय शिक्षा होते याची माहिती कोणाला नाही. ती माहिती घेण्याची इच्छा कोणाला नाही. त्यामुळे कळत नकळत होणारे गुन्हे वाढत आहेतच, पण त्याहीपेक्षा शोषणाचे गुन्हे फार वाढत आहेत. सध्या पुणे, नागपूर ही महाराष्ट्रातील दोन मोठी शहरे गुन्हेगारीच्या विळख्यात आहेत. हातात शस्त्र घेऊन फिरणे अगदी सामान्य असे चित्र वाटू लागले आहे. दोन दिवसांपूर्वी प्रेयसीची छेड काढली, म्हणून मानेवरून धारधार शस्त्र चालत्या बाइकवर फिरवले आणि एकाला मृत्यूच्या दाढेत ढकलले, अशी घटना घडली. नित्य असे नवनवे प्रकार ऐकायला मिळत आहेत.
सर्रास सहकारी बँका बुडवल्या जात आहेत. सामान्यांच्या ठेवी संकटात सापडत आहेत. याबाबत कोणाला काहीही वाटत नाही. बँका बुडवणारे सहकारी बँकांचे संचालक बिनधास्त उजळ माथ्याने फिरताना दिसतात. राजकीय नेत्यांच्या टोळीत सन्मानाने मांडीला मांडी लावून बसल्याचे दिसते. याचे कारण शिक्षेची भीती नाही. हे चित्र तातडीने बदलण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा