शनिवार, ९ जानेवारी, २०२१

जगणे महत्त्वाचे


देव मूर्तीत नाही, माणसात असतो. आत्म्याचे मंदिर असावे, त्यात परमात्मा असतो. माणसाला जगता येणे ही ईश्वराची श्रेष्ठ पूजा आहे. - चाणक्य


धार्मिक गोष्टींसंदर्भातील अधिकार हा जीवनाच्या मूलभूत अधिकारापेक्षा मोठा नसल्याचं निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. तामिळनाडूमधील एका मंदिरातील महोत्सवाचे आयोजन करताना कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करून धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भातील निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी बुधवारी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना धार्मिक अधिकारांपेक्षा जगण्याचा अधिकार अधिक महत्त्वाचा असल्याचं मत व्यक्त केलं. धार्मिक परंपरा या जनहित जपणाºया तसेच जीवनाचा अधिकार देणाºया असायला हव्यात, असंही न्या. बॅनर्जी म्हणाले. आपल्याकडे कोणत्याही गोष्टीला धार्मिक भावनिक रंग दिला की, त्याला वेगळे वळण लागते. परंतु मानवतेपेक्षा, माणूस आणि प्राणीजात जगण्यापेक्षा कोणताही उत्सव हा महत्त्वाचा असत नाही. आपण जगलो तर त्या उत्सवाला अर्थ आहे. तो उत्सव जर आपल्या मुळावर येत असेल तर असली धार्मिकता काहीच कामाची नाही. त्यामुळे न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि स्वागतार्ह आहे. आचार्य चाणक्यांनीही यावरच चांगले भाष्य केलेले आहे. माणसाला जगता येणे ही ईश्वराची श्रेष्ठ पूजा असते, हे वचन तेच सांगते.


नोव्हेंबर महिन्यात अनलॉक प्रक्रियेदरम्यान आपल्याकडे अनेक राजकीय पक्षांनी मंदिरे उघडा म्हणून आंदोलने केली, पण सणावाराच्या निमित्ताने लोक गर्दी करणार, त्यामुळे मंदिरातील सुरक्षा धोक्यात येणार हे गृहीत धरून सरकार त्याबाबत निर्णय घेत नव्हते, तर लोक रस्त्यावर उतरायची भाषा करत होते, पण सरकारला सार्वजनिक आरोग्य, हित पाहावे लागते. त्यामुळे सरकारच्या निर्णयाला पुष्टी देणारा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. पुढच्या आठवड्यात पौष महिना लागेल. पुशी जत्रा आपल्याकडे जोरात असतात. गावोगाव असतात. मुंबई, महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून लोक जत्रेला जमतात. त्यामुळे या जत्रा न भरवण्याचा निर्णय आता काही दिवस घेतला पाहिजे. बाहेरून येणारे पाहुणे संसर्ग करण्याची शक्यता असते. साताºयातील मांढरदेवीची यात्रा यावर्षी रद्द केली आहे. गोंदवल्याचा फार मोठा उत्सवही यंदा झालेला नाही. महाराष्ट्रात पंढरपूर, शिर्डी येथेही दर्शनाला मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. हे अनुकरण सर्व राज्यांत झाले पाहिजे. महाराष्ट्राने आपले पुरोगामीपण दाखवून देवधर्मात माणसाला गुंतवले नाही, तर माणसातला देव पाहण्यात धन्यता मानली. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवासारखा उत्सवही आपण अत्यंत साधेपणाने गर्दी न करता साजरा केला. ही काळाची गरज होती, कारण माणसाचे जगणे महत्त्वाचे होते. माणूस जगला तर पुढच्या उत्सवाला अर्थ आहे. नेमका हाच विचार न्यायालयाच्या आदेशातून प्रकट झाला आहे.

धर्माचा अधिकार हा जगण्याच्या अधिकारापेक्षा मोठा नाहीय. जर सरकार महामारीची परिस्थिती लक्षात घेऊन धार्मिक स्थळासंदर्भात काही निर्णय घेत असेल, तर आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करू इच्छित नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. न्या. बॅनर्जी आणि न्या. सेंथिलकुमार राममूर्ती यांच्या द्विसदस्यीय खंडपिठाने ही सुनावणी केली. या सुनावणीमध्ये न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश देताना तिरुचिरापल्ली येथील श्रीरंगम रंगनाथस्वामी मंदिरामध्ये कोरोनाचे नियम पाळून, लोकांच्या आरोग्याची काळजी घेत उत्सव साजरा करणं शक्य आहे का, याची पडताळणी करावी, असं म्हटलं आहे. हा राज्य सरकारला तेथील न्यायालयाने दिलेला विश्वास फार महत्त्वाचा आहे. चांगला निर्णय असेल, तर न्यायव्यवस्था सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहू शकते हे यातून दिसून आलेले आहे. दक्षिणेतील लोक थोडे आक्रमक आणि संवेदनशील असतात. त्यांना रोखणे गरजेचे होते. ते आपल्या सण, समारंभ उत्सवात काटछाट करू देत नाहीत. आपल्याकडे बैलगाडी शर्यतीवर बंदी आल्यावर या शर्यती घेणे थांबले होते, पण दक्षिणेत प्राण्यांच्या जीवाशी होणारे खेळ मात्र त्यांनी धार्मिकतेच्या नावाखाली थांबून दिले नाहीत. त्यामुळेच हा निर्णय महत्त्वाचा होता. न्यायालयाने यासंदर्भात धार्मिक नेत्यांसोबत चर्चा करून एक सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. खरं तर क्षेत्रफळाच्या हिशेबाने रंगनाथस्वामी मंदिर हे देशातील सर्वात मोठं मंदिर आहे. भगवान विष्णूचं हे मंदिर तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील श्रीरंगम येथे आहे. हे मंदिर तब्बल १५६ एकरांवर परसलेलं आहे. त्यामुळेच येथे उत्सव आयोजित करण्यावरून झालेला वाद थेट न्यायालयापर्यंत गेला आहे, पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक भागांमधील धार्मिक कार्यक्रमांना कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करण्याच्या अटीवरच परवानगी दिली जात आहे. महाराष्ट्र सोडला तर अनेक राज्यांमध्ये धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी दिसून येत आहे, मात्र दर्शनाला जाताना कोरोनासंदर्भातील काळजी भाविकांनी घ्यावी, असं धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन पाहणाºया प्रशासनाबरोबरच स्थानिक प्रशासनाकडूनही वारंवार सांगितलं जात आहे.


आपला धर्म जगण्याचा धर्म आहे. आपल्यासाठी धर्म निर्माण झालेला आहे. आधी धर्म, उत्सव, सण, समारंभ तयार झालेले नाहीत. ते माणसाने निर्माण केलेले आहेत. त्यामुळेच माणूस जगला, तो सुरक्षित असला तरच ते सण, समारंभ, उत्सव साजरे करणे योग्य ठरेल. केवळ अट्टाहास आणि अहंकाराने कोणताही उत्सव साजरा करणे योग्य ठरणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: