कोरोना संकटातून आपण बाहेर पडत आहोत. अजूनही संकट टळलेले नाही, अशी अकारण भीती घालण्याचे प्रकार आता थांबले पाहिजेत. कोरोना बाधितांचा देशभरातील एक कोटीचा आकडा आपण पार केला आहे. तसाच बºया होणाºया रुग्णांचा एक कोटीचा आकडाही आपण पार केलेला आहे. आता १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. मग जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे की नाही? सर्वात प्रथम मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सर्वांसाठी पूर्वीसारखी सुरू करणे ही आता काळाची गरज आहे. त्याचे कोणी राजकारण करून अर्थकारणाला खिळ घालण्याचा प्रयत्न करू नये, असे वाटते.
गर्दीचे कारण दाखवून गेले अनेक महिने लोकल बंद ठेवली. नंतर टप्प्याटप्प्याने ती मर्यादित लोकांसाठी सुरू केली, पण यात रेल्वेचे आर्थिक नुकसान होत आहेच. सरकारच्या रेल्वेच्या उत्पन्नात सर्वाधिक वाटा देणारी ही मुंबई लोकल आहे. हे एवढे मोठे उत्पन्नाचे स्त्रोत सरकार इतका दीर्घकाळ कशासाठी बंद ठेवते आहे? आज परिस्थिती अशी आहे की, ज्यांना खरोखरच लोकलने प्रवास करणे आवश्यक आहे त्यांना सरकार त्याने प्रवास करून देत नाही आणि कारण नसताना प्रवास करणारे शेकडो प्रवासी रेल्वेत दिसत आहेत.
महिलांना सकाळी अकरानंतर प्रवासाला मुभा दिली आहे. ती सर्वांनाच का दिली जात नाही? लहान मुलांनी लोकल प्रवास करू नये, असे नियम असतानाही सर्रास महिला आपल्या लहान बालकांना घेऊन कुटुंबीयांसहीत लोकलने प्रवास करताना दिसतात. त्यांचे कसलेही चेकिंग केले जात नाही, पण खरोखरच ज्यांची हातावर पोटं आहेत, नोकरी रोजगारासाठी जाणे आवश्यक आहे त्यांना मात्रा आयडी कार्ड द्या, सरकारी नोकर असाल तरच जायला मिळेल, असे सांगून तिकीट नाकारले जाते. लोकलमधून विक्री करणारे फिरते विक्रेत आपला धंदा करत आहेत, पण रेल्वे मात्र आपला महसूल बुडवत आहे. हे काय चालले आहे? कधी होणार आहे ही लोकल सर्वांना सुरू?
केवळ गर्दीचे कारण सांगून रेल्वेत प्रवेश नाकारला जातो, पण बस आणि टॅक्सी, रिक्षाची काय अवस्था आहे? त्याकडे सरकार दुर्लक्ष का करत आहे? लोकलचा बोजा बसमध्ये पडत असल्यामुळे प्रवासी उभ्याने गर्दी करून प्रवास करत आहेत. मग तिथे संसर्ग होणार नाही का? शेअर रिक्षात तीन ते चार प्रवासी घेतले जातात, चिकटून चिकटून बसतात तिथे संसर्ग होणार नाही का? रेल्वेतूनच कोरोनाचा संसर्ग होतो, असा साक्षात्कार कोणाला झालेला आहे? केंद्र आणि राज्याच्या संघर्षात मुंबई लोकल पूर्ण क्षमतेने चालवणे थांबवले आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. अनेक लोकांचे रोजगार त्यामुळे थांबलेले आहेत. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर लावून पूर्ण क्षमतेने पूर्वीप्रमाणे लोकल सुरू करणे आवश्यक आहे. अर्थव्यवस्था गतीमान करण्यासाठी आता सर्वात प्रथम मुंबई सुरू होणे आवश्यक आहे. मुंबई सुरू झाली की, देश सुरू झाला असे समजायला हरकत नाही. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी ती बंद ठेवणे हा उपाय नाही. १२ डब्यांची लोकल पंधरा डब्यांची करा, लोकलची संख्या वाढवा, अशा अनेक उपायांनी या समस्येवर तोडगा निघू शकतो. फक्त राजकीय इच्छाशक्ती कमी पडते आहे. जिथे करायची तिथे गर्दी लोक करतच आहेत. मग लोकल सुरू करायला काय हरकत आहे? बसने प्रवास करणे मुंबईत तसे गैरसोयीचे आणि वेळ काढूपणाचे असते, खर्चिकही असते, पण लोकल ट्रेन ही सर्वसामान्यांना परवडणारी असते. आज रोजगार नसताना, पगार कमी झालेले असताना जनजीवन मूळपदावर आणण्यासाठी लोकल तातडीने सुरू करण्याची गरज आहे.
मुंबईत आणि या देशात यापूर्वी अनेक साथीचे रोग आलेले आहेत. स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू अगदी डोळ्यांची साथही नियमीत येत असते, पण याचा अर्थ त्याचा प्रसार फक्त लोकलमधूनच होतो असे नाही. त्यामुळे बसची गर्दी चालते, लोकलला रेड सिग्नल का दाखवला गेला आहे? सरकारने तातडीने मुंबई लोकल सुरू करून सर्वसामान्यांना दिलासा देणे गरजचे आहे.
मुंबई लोकलने दररोज साधारणपणे ८० लाख लोक प्रवास करत होते. आज पाच लाख लोकही प्रवास करत नाहीत. त्यामुळे रेल्वेचा किती महसूल बुडत आहे? लोकल प्रवास सर्वांना परवानगी नसल्याने रात्रीच्या वेळी चालवल्या जाणाºया बहुतेक लोकल या रिकाम्या धावत असतात. त्यामुळे लोकलमधील सुरक्षिततेचा प्रश्न उभा आहे. फर्स्ट क्लासच्या डब्यात एखादाच प्रवासी असतो, तर जनरल डब्यात फार कमी प्रवासी असतात. त्यामुळे रात्री लोकलने प्रवास करताना अक्षरश: भीती वाटते. पंधराच दिवसांपूर्वी हार्बर लाइनवर वाशी ते बेलापूरदरम्यान एका तरुणाला टोळक्याने सीवुडदरम्यान लुटले होते. वाशीदरम्यान एका मुलीवर अत्याचार करून तिला रेल्वे लाइनवर फेकले होते. हे प्रकार का घडत आहेत? तर गर्दी नाही त्याचा फायदा गुंड घेत आहेत. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढली पाहिजे. लोकांना प्रवासाची गरज आहे, इच्छा आहे, असे असतानाही नाहक बंधने आता तोडली पाहिजेत आणि जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा