मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

हे पुरोगामीत्व नव्हेच

 तुमचा शत्रू जितकी दु:ख देत नाही, त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.


प्रसिद्ध कवी आणि तथाकथीत विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणारा 'जीवनव्रती' पुरस्कार नाकारला. पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावरील सरस्वतीच्या पुतळ्याला त्यांनी विरोध केला आणि त्यातून पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही कृती अतिशय चुकीची आहे आणि याला पुरोगामीत्व म्हणतच नाहीत. सरस्वतीची प्रतिमा किंवा मूर्ती हे विद्येचे, साहित्याचे प्रतिक आहे. सर्व कलांचे ते अधिष्ठान आहे. ते नाकारणे अत्यंत चुकीचे आहे. त्याचा देवधर्माशी किंवा हिंदू धर्माशी संबंध आहे; पण केवळ आपण पुरोगामी आहोत, विचारवंत आहोत हे दाखवण्यासाठी केलेली ही एक फालतू कृती आहे. त्यामुळे त्यांनी हा पुरस्कार नाकारला ते एक प्रकारे बरेच झाले, कारण त्यांना पुरस्कार म्हणजे समस्त सारस्वत, साहित्यकलेचा तो अपमान ठरला असता. अपात्री दान देऊ नये म्हणतात तसेच अपात्र व्यक्तीचा पुरस्कार देऊन गौरवही करू नये हेच योग्य. कोणताही पुरस्कार देताना कसले चित्र-विचित्र आकाराचे शिल्ड, ट्रॉफी बनवतात त्यापेक्षा सरस्वती असली म्हणून काय बिघडले? पण अति शहाणा त्याचा बैल रिकामा म्हणतात, तशी ही गत झालेली आहे. तुमचा शत्रू जितकी दु:ख देत नाही, त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात. या गोष्टीचा विचार यशवंत मनोहरांनी करणे गरजेचे आहे. त्यांच्या मनातील ही नकारात्मकता मराठी साहित्याला पोषक नाही, त्यामुळे त्यांच्या वागण्याला पुरोगामी म्हणता येणार नाही.


माझी मूल्यं नाकारून मी हा पुरस्कार स्वीकारू शकत नाही, असं म्हणत यशवंत मनोहर यांनी हा पुरस्कार स्वीकारायला विरोध केला आहे. यशंवत मनोहर यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडताना सांगितले, माझी इहवादी भूमिका, माझी लेखक म्हणून भूमिका याची कल्पना साहित्य संघाला असेल असा माझा समज होता. व्यासपीठावर काय-काय असेल, अशी विचारणा मी केली होती; पण सरस्वतीची प्रतिमा असणार आहे असे त्यांनी मला सांगितले. तेव्हा माझी मूल्य नाकारून हा पुरस्कार स्वीकारणे मला शक्य नव्हते, म्हणून मी तो नम्रपणे नाकारला; पण इथेच मनोहर यांचे चुकले आहे. म्हणजे साहित्यीक कोणत्या विषयावर लिहितो यावर मानचिन्ह ठरवली जातात का? एखादा विनोदी लिखाण करतो म्हणून त्याला हसरा चेहरा असल्याचे मानचिन्ह द्यायचे, एखादा ग्रामीण साहित्य लिहितो म्हणून त्या संस्थेने आपला सिम्बॉल बदलून त्याला ग्रामीण भागाचे सन्मान चिन्ह द्यायचे, एखादा गूढ कथा लिहिणारा आहे म्हणून तसेच काही गूढ द्यायचे, असे कधी होत नाही. जी संस्था पुरस्कार देते त्यांचे नियम पाळणे आवश्यक असते. पुरस्कार आणि मानचिन्ह मागून मिळत नाही, ते देणाºया संस्थेने ठरवायचे असते. त्यामुळे यशवंत मनोहर यांची कृती ही चुकीचीच आहे.

संविधान, भारतीय प्रबोधनानुसार, परिवर्तनाच्या चळवळीचे हात धरून चाललो आहे. मी तुमच्यासाठी नाही बदलणार, तुम्ही माझ्यासाठी बदललं पाहिजे. माझ्यासाठी म्हणजे प्रबोधनासाठी, परिवर्तनासाठी तुम्ही बदललं पाहिजे. सगळ्यांच्या हिताचं जे आहे, त्यासाठी आपण सर्व जण बदललं पाहिजे. यादृष्टीने विदर्भ साहित्य संघाला विनंती केली; पण त्यांनी मनावर घेतलं नाही. म्हणून मग पुरस्कार स्वीकारायला जायचं नाही, असं ठरवलं, असं यशवंत मनोहर म्हणतात. पण सरस्वतीला तुम्ही देवी मानू नका; पण एक प्रतिमा म्हणून स्वीकारली असती तर काय झोळीत धोंडा पडला असता का? सरस्वती, मोरपीस, लेखणी ही सर्व साहित्याची प्रतिके आहेत. त्यामुळे त्या प्रतिकांचा सन्मान हा केला गेलाच पाहिजे. यशवंत मनोहर हे जेव्हा कोणते कार्यक्रम स्वत: आयोजित करतील, तेव्हा त्यांनी आपल्या प्रथा सुरू कराव्यात. पण अन्य संस्था जेव्हा कार्यक्रम आयोजित करते, तेव्हा तो कसा असावा, काय द्यावे याचा आग्रह पाहुण्यांनी देणे चुकीचे असते. एक तर पुरस्कार स्वीकारतो हे अगोदर मान्य केल्यानंतर तो नाकारणे हे चांगले नाही. पुरस्कार स्वीकारण्याच्या आधी विदर्भ साहित्य संघ आहे, तिथे काय काय प्रतिमा आहेत, तिथे कोण व्यक्ती आहेत, हे आधी पाहायला हवं. एकदा पुरस्कार स्वीकारण्यास होकार दिल्यानंतर नाकारणं, हा पुरस्कार देणाºयाचा अपमान असतो. त्यामुळे यशवंत मनोहर यांची कृती ही सभ्यतेला सोडून आहे. सरस्वती हे विदर्भ साहित्य संघाचे बोधचिन्ह आहे. यात 'विदर्भ विषय: सारस्वती जन्मभू:' स्पष्टपणे लिहिलेले आहे. ते १९२३ सालापासून लिहिलेले आहे. यशवंत मनोहर यांचे संपूर्ण जीवन नागपुरातच गेले आणि जात आहे, तेव्हा त्यांनी हे बोधचिन्ह आणि ते दोन श्लोक जे प्राचीन काव्यशास्त्राचे आचार्य राजशेखर यांनी लिहिलेले आहेत कधी पाहिलेच किंवा वाचलेच नसतील, असे वाटत नाही. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी आणि आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेली ही स्टंटबाजी असावी, असेच यातून स्पष्ट होते. त्यांना जेव्हा 'जीवनव्रती' पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानच करायचे ठरविले होते. त्यांनी तो पुरस्कार स्वीकार करताना सरस्वतीच्या प्रतिमेस हार-फुलं न वाहता आपल्या भाषणात आपल्या इहवादी भूमिकेचा स्पष्ट उच्चार केला असता, तर ते अधिक चांगले ठरले असते; पण तसे न करता एका चांगल्या कार्यक्रमाचा फियास्को केला गेला हे नक्की. पण याला पुरोगामी म्हणता येणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: