खुराड्यातल्या कोंबड्यांची पकपक चालली होती. काही कोंबड्या अडोशाला म्हणून गेल्या आणि त्यांच्यात चर्चा सुरू झाली. आता कोंबड्यांची चर्चा असली, तरी त्या बायकाच. आतल्या आवाजात कुजबूज, चर्चा केल्याशिवाय बायकांचा जन्म थोडाच सार्थकी लागणार आहे? त्यामुळे खुराड्यात शेकडो कोंबड्या असल्या, तरी या कोपºयात बसलेल्या कोंबड्यांचा बोलण्याचा नुसता गलका चालला होता.
a
‘पक पक पक पकाक पक...’ पपप करत काळी कोंबडी माना वेळावत सांगत होती. मध्येच आपले पंख फडफडवत होती आणि थंडीने काकडल्यासारखं अंग हालवत होती. आजूबाजूला, पांढरी, तपकीरी आणि विविध रंगाच्या कोंबड्या कोंडाळं करून बसल्या होत्या. काळी आपल्या नादात बोलत होती. ‘ पक पक पकाक... काय बाई मेला हा कोंबडीचा जन्म. या माणसांसारखं गद्दार कोणी नाही बघ.’
‘पक पक पक... आता काय झालं?’ पांढरी कोंबडी विचारू लागली. तशी चिंतेच्या स्वरात काळी कोंबडी सांगू लागली, ‘अगं जल्ला मेला कोंबडीचा जन्म. आता काय नवं संकट आलंय माहितीय का? जरा डोळे उघडे ठेवून पहा जगात काय चाललं आहे. या खुराड्यातून बाहेर पडा म्हणजे जगात काय चालले आहे ते समजेल. पक पक पकाक...’
‘कुकूचकू कुकूचकू’ तिकडून कोंबडा जोरात ओरडला तशा सगळ्या कोंबड्या सावरून बसल्या. काळी कोंबडी बोलू लागली, ‘याला काय कुकचकू करायला होतयं? आता आपली अवस्था घर की मुर्गी दाल बराबर अशीच झालीय बघ.’
‘अग पण नक्की काय झालंय? पकाकपक’ तपकीरी रंगाची कोंबडी पुढे येऊन म्हणाली तशी काळी कोंबडी म्हणाली, ‘पक पक अगदी पकले बघ आता. ते झाडावरनं कावळे खाली पडले, कुठे कबूतरं खाली पडली, तर लगेच बर्ड फ्लू आला म्हणून गोंगाट सुरू केला या माणसांनी. आता काय तर सगळ्या कोंबड्या मारून टाका असे म्हणत आहेत. आपलं काही खरं नाही. यांची आपण सतत भूक भागवतो तरी आपल्या जीवावर उठतात. आता तर काय बर्ड फ्ल्यू आपल्यामुळे हा रोग होणार या भीतीने मारून टाकणार. या माणसांच्या राज्यात आपल्याला न्याय नाही तो नाहीच.’ पक पक पकाक करत काळी कोबडी हमसून हमसून रडू लागली.
बाकीच्या कोंबड्या थोडं घाबरून, सावरून बसत तिच्या जवळ आल्या. कोणी प्रेमाने आपल्या पंखाने तिला स्पर्श करू लागले. तशी समजावणीच्या सुरात पांढरी कोबडी बोलू लागली, ‘पकाक पकाक पकाक.... बाई बाई बाई... काय म्हणायचं या माणसांच्या गद्दारीला? यांच्यासाठी अहोरात्र कष्ट करायचे, अंडी घालायची. आपली पोरंही पहायची नाहीत. या माणसांच्या पोटाची आग भागवण्यासाठी जन्माला येण्यापूर्वीच आपल्या काळजाचा तुकडा आपण देतो. का तर त्यांची पोरं धष्टपुष्ट व्हावीत. कुठं फिरायला जात नाही आपण, सतत या कोंडवाड्यात खुराड्यात कोंडलेलो असतो. माणसाची भूक भागवण्यासाठी आणि आता ते भटके पक्षी आजारी पडले, तर लगेच आपल्याला मारायला आले? हा सारासार अन्याय आहे. ’
‘कुकूचकू कुकचकू’ कोंबडा पुन्हा जोरात ओरडला. त्याबरोबर दुसरा कोंबडाही प्रत्त्युतरादाखल ओरडला, ‘कुकचककू’ त्याबरोबर या घोळक्यातल्या कोंबड्यांनी नाक मुरडावं तशा चोची मुरडल्या आणि बोलू लागल्या, ‘यांना काय नुसतं कुकचकू करायचं आणि कुचकूच करायचं याशिवाय धंदा आहे का? जरा डुलका लागला की, लागले बोंबलायवला आणि लागले बोलवायला. मनात आलं की कुचकूचू आणि कुकचकू’ पांढरी कोंबडी फटकळपणे बोलली. त्यावर काळी कोंबडी डोळे पुसत म्हणाली, ’ पक पक पक... अज्ञानात विश्व झाकलेलं आहे तुमचं तेच बरं. आपण आज आहोत उद्या नाही; पण आहोत तोपर्यंत दिसेल ते चोचीने टिपायचे आणि अंडी घालत बसायचं. कधी आपली पोरं त्या अंड्यातून येतील याची वाट पहायची; पण ती येण्यापूर्वीच फस्त झालेली असतात. त्याचे दु:ख न बाळगता पुन्हा नवी पोरं तरी जन्माला येतील म्हणून अंडी घालत बसायचं. काही स्वातंत्र्य असं नाहीच.’
त्यावर तपकीरी कोंबडी म्हणाली, ‘हो ना.. एखाद दिवशी अंडी घातली नाहीत की, लगेच खुडूक झाली म्हणून आपल्याला तंगडीला धरून उचलतात आणि नेतात खाटकाकडे. किती क्रूरपणे आपली पिसं काढतात, मानेवर सुरा फिरवतात. जराही लाज वाटत नाही या माणसांना? ’
काळी कोंबडी म्हणाली, ‘ पकाक पकाक पक... अगं काही झालं तरी आपलं मरण टळत नाही. त्यांना आपली अंडी खायला घातली, तरी मारणार आणि अंडी नाही घातली तरी मारणार. पण आता काय तर बाहेरच्या पक्षांनी कसला तो रोग लागला म्हणून आपल्याला मारणार. यांना समजत कसं नाही? बाहेरचे पक्षी उघड्यावरचं वाटेल ते खातात मग त्यांना रोग लागणारच. पण आपल्याला औषधं दिली जातात. इंजक्शन असतात. ताटलीत देतात तेच आपण खातो. मग आपल्याला रोग व्हायचे कारण काय? रोग लागला तरी त्याला माणसंच गं जबाबदार. पक पक पक पक.’
सगळ्या कोंबड्या एकमेकीच्या गळ्यात गळे घालून रडू लागल्या, पकाक पक गं पकाक पक...
कुकचकू कुकचकू करत दोन-तीन कोंबडे गोळा झाले. त्यांनी सगळ्या या बायका कोंबड्यांची विचारपूस केली. एका कोंबड्याला वाटलं कोणती, तरी कोंबडी आजारी पडली असेल. त्यामुळे सगळ्या कोंबड्यांना लांब व्हायला सांगितलं. काळी कोंबडी रडत होती. मी आजारी नाही, म्हणत होती. पण त्या काळ्या कोंबडीला या कोंबडे आणि कोंबड्यांनी वाळीत टाकल्यासारखे केले. त्यामुळे त्या खुराड्याचा चालक असलेल्या मालकाला वाटलं कोणतीतरी कोंबडी आजारी आहे. त्यामुळे त्याने फर्मान काढले, आजारी कोंबडीचा त्रास सगळ्या पक्षांना होईल. आपण त्या सगळ्या कोंबड्या मारून टाकू. अन् एकच पक पक पक पकाकच गलका खुराड्यात सुरू झाला. त्यांचा आक्रोश बराचवेळ चालू होता; पण माणसांनी सहजपणे एकेक कोंबडी मारून चिरडून, जमिनीत गाडून जाळायला सुरुवात केली होती. त्या धुरात कोंबड्यांचे अश्रू कोणाला दिसतच नव्हते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा