शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

रजनीचे दिवस


रजनी म्हटले की, सर्वांना वाटेल रजनीकांतबद्दल काही असेल, पण रजनीकांत हा रजनी म्हणून फेमस होण्यापूर्वी एक रजनी छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालून गेली होती. ती म्हणजे प्रिया तेंडुलकर. या रजनीला १९८५ साली प्रचंड डोक्यावर घेतले होते. प्रेक्षकांच्या ती मनात बसली होती. दुर्दैवाने त्या काळात दूरदर्शन सगळीकडे पोहोचलेला नव्हता, पण महानगरांतून ती चांगलाच दणका देत होती.

प्रिया तेंडुलकरची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका दूरदर्शनवर प्रत्येक रविवारी प्रसारित होत होती. साडेतेवीस ते पंचवीस मिनिटांचा भाग आणि पाच-सात मिनिटे जाहिराती असा अर्धा तास प्रेक्षकांना गुंतवून टाकणारे हे भाग असत. या मालिकेचे कथानक करण राजदान यांचे होते, तर मालिकेचे दिग्दर्शन बासू चटर्जी यांचे होते. बासू चटर्जींचे दिग्दर्शन असल्याने सर्वसामान्य प्रेक्षकांना ते खिळवून ठेवणार यात वेगळे सांगण्याची गरजच नाही.


या मालिकेत प्रिया तेंडुलकरच्या पतीची भूमिका करण राजदान याने केलेली होती. त्या काळात करण राजदान आणि सोनी राजदान हे पती-पत्नी दूरदर्शनचे हुकमी एक्के होते, पण कालांतराने दोघांनी घटस्फोट घेतला आणि सोनी राजदानने महेश भटशी लग्न केले. त्यामुळे प्रिया तेंडुलकरच्या पतीची खरी भूमिका करण्याची लाइनही क्लिअर झाली होती. या मालिकेत प्रिया तेंडुलकर आणि करण राजदानच्या मुलीचे काम बालकलाकार बेबी गुड्डू हिने केले होते. या मालिकेचे टायटल साँग (शीर्षक गीत) आशा भोसले यांनी घराघरात पोहोचवले होते. खरं तर रजनी या भूमिकेसाठी बासू चटर्जींनी पहिली पसंती पद्मिनी कोल्हापुरे या अभिनेत्रीला दिली होती, मात्र त्या काळात पद्मिनी कोल्हापुरे खूपच व्यस्त होती. तो तिचा आघाडीचा काळ होता. एकाच वेळी मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर, गोविंदा, राजेश खन्ना या सर्वांबरोबर तिचे हिट चित्रपट येत होते. ‘प्यार झुकता नहीं’, ‘सौतन’, ‘स्वर्ग से सुंदर’ या चित्रपटांत ती गुंतलेली असल्याने आणि छोट्या पडद्याचे फारसे आकर्षण नसल्याने तिने ही भूमिका नाकारली आणि त्याचा फायदा प्रिया तेंडुलकराला मिळाला.

प्रिया तेंडुलकर तोपर्यंत मराठी अभिनेत्री म्हणून गाजली होती. सचिनचा ‘मायबाप’, व्ही. के. नाईक प्रॉडक्शनचा ‘गोंधळात गोंधळ’, विशेष भूमिकेत ‘मुंबईचा फौजदार’, ‘देवता’, ‘चांदणे शिंपित जा’ असे काही चित्रपट आले होते, पण तिच्या थोड्याशा ग्रेशेड भूमिकांमुळे ती मराठीतील यशस्वी नायिका म्हणून स्वीकारली गेली नाही. कारण त्या काळात विनोदी चित्रपटांची लाट आली होती. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, सचिन यांचे युग सुरू झाले होते. त्यात गावरान आणि विनोदी भूमिका करू शकतील अशा अभिनेत्री टिकत होत्या. तिथे प्रिया तेंडुलकरचा पत्ता कट झाला. अर्थात ती एक विचार करणारी अभिनेत्री होती. लेखिका आणि ठाम मते असणारी होती. अर्थात तेंडुलकरांची कन्या असल्याने ती पांचट भूमिका करूच शकली नसती, मात्र त्यादरम्यान ‘कन्यादान’सारखी नाटके तिने केली. भक्ती बर्वेंनी थांबवलेले नाटक ‘ती फुलराणी’ही प्रियाने केले, पण म्हणावे तितके यश तिला मिळत नव्हते. ती उणीव रजनीने भरून काढली.


रजनी ही एक सामान्य गृहिणी असते. समाजातील सर्वत्र पसरलेला भ्रष्टाचार, अन्यायाविरोधात लढा देणारी ती मध्यमवर्गीय गृहिणी म्हणून छोट्या पडद्यावर दूरदर्शनने तिला आणली आणि ती देशभरात लोकप्रिय झाली. तिच्या भूमिकेचे कौतुक होऊ लागले.

मालिकेच्या प्रत्येक भागात वेगवेगळे विषय हाताळल्यामुळे एखादा भाग चुकला तर कोणाला चुकल्या चुकल्यासारखे वाटत नव्हते. रिपिट टेलिकास्ट असले प्रकार काही नव्हतेच तेव्हा, पण प्रिया तेंडुलकरांच्या रजनीचा समाजावर प्रचंड प्रभाव पडला होता. सर्वसामान्यांना अनके गोष्टी समजू लागल्या होत्या. अन्यायाविरोधात लढण्याची ताकद या रजनीने दिली होती. त्यामुळे तिने महिलांच्या मनात घर केले होते. समाजातील अनिष्ठ प्रथा, फसवाफसवी याविरोधात रजनी आवाज उठवायची. त्यामुळे महिलांना प्रेरणा मिळत होती. त्यामुळेच प्रिया तेंडुलकरचे २००२ ला निधन झाले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही दु:ख व्यक्त केले होते. आपल्या शोकसंदेशात त्यांनी रजनीच्या माध्यमातून अनेक गोष्टींना वाचा फोडणारी अभिनेत्री म्हणून तिचा गौरव केला होता.


या रजनी मालिकेत अनेक दिग्गजांनी छोट्या छोट्या भूमिका विविध भागात केल्या होत्या. अर्थात आत्ताचे ते दिग्गज आहेत, पण तेव्हा ते नवेच होते. यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते शाहरूख खानचे. शाहरूख आज मोठा पडदा व्यापत असला, तरी त्या काळात तो छोट्या पडद्यावरचा छोटा कलाकार होता. या क्षेत्रात येण्यासाठी फार मोठी सर्कस करत होता. या सर्कशीचा खेळ रजनीबरोबर झाला होता. याशिवाय सयाजी शिंदे, विक्रम गोखले हे दिग्गज मराठी अभिनेतेही या मालिकेत चमकले होते. बॉलिवूडचा दुसरा ग्रेट शोमन अशी ख्याती असलेल्या निर्माता, दिग्दर्शक सुभाष घई यांनीही रजनीच्या एका भागात काम केले होते. सरकारी कार्यालयातील अनागोंदी, रिक्षा, बसचालक, सिलिंडरचा काळाबाजार, मेडिकलचा काळाबाजार, एमआरपीच्या नावाखाली होणारी फसवणूक अशा नियमित जीवनातील कितीतरी गोष्टींवर प्रकाश टाकून रजनीने सामान्य माणसांमध्ये जनजागृती निर्माण केली होती. कडक अशी रजनीची इतकी छाप होती की, लक्ष्मीकांत बेर्डेंनी एका चित्रपटात आॅडिशनही तशी घेतली होती. हिरोईनचे नाव रजनी समजल्यावर, ‘रजनी? बाप रे घाबरायला हवं’ असे बोलून हशा मिळवला होता. हेच खरे रजनीचे यश होते, पण रजनीचे ते दिवस खूपच छान होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: