शनिवार, ३० जानेवारी, २०२१

भाषण नको, कृती हवी!



महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दर काही दिवसांनी हा विषय चर्चेत येत असतो. बाकीचे विषय मागे पडल्यावर या विषयाला हात घातला जातो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच, असा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी जोपर्यंत हा विषय न्यायालयात मार्गी लागत नाही तोपर्यंत बेळगाव केंद्रशासित असावा, अशी मागणी केली. अर्थात ही मागणी काही नवीन नाही. कदाचित महाराष्ट्रातल्या नेत्यांना विसर पडला असेल, पण यात कसे राजकारण केले जात आहे हे आता आठवण्याची वेळ आलेली आहे. केंद्रात मोदींचे सरकार आहे, कर्नाटकात भाजपचे सरकार आहे, म्हणून हा आग्रह आत्ता धरला जात आहे. कदाचित भाजपच हा प्रश्न सोडवू शकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांना वाटला असावा, पण मुख्यमंत्र्यांनी आठ वर्षांपूर्वीची गोष्ट विसरून चालणार नाही.

अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी बेळगाव सीमाप्रश्नाचा विषय उचलला होता. त्यावेळी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिल्लीत जाऊन तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे हा भाग केंद्रशासित असावा, अशी मागणी करण्याचे ठरले होते. मुंबईत झालेल्या बैठकीत स्वत: उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, अजित पवार, आर. आर. पाटील, भाजपचे नेते असे सर्वपक्षीय नेते होते. मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाणांना नेतृत्व दिले आणि पंतप्रधानांना साकडे घालायचे ठरले, पण दिल्लीला गेल्यावर या शिष्टमंडळाची पंतप्रधानांशी या विषयावर बोलणी झालीच नाहीत. अशोक चव्हाणांनी तोंडही उघडले नाही. याचा विसर मुख्यमंत्र्यांना पडला आहे का? आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून महाविकास आघाडी सरकार केले आहे. ज्यांनी हा सीमाप्रश्न निर्माण केला तेच सरकारमध्ये आहेत. बेळगाव सीमाप्रश्न हे काँग्रेसचे पाप आहे. त्याच काँग्रेसला दूर केल्याशिवाय हा प्रश्न मुख्यमंत्री सोडवू शकतील का?


पुस्तक प्रकाशन आणि भाषणात बोलायला ठीक आहे की, मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी सीमावादावर केलेल्या आंदोलनाची आठवण सांगितली. सीमाभागासंबंधी निवेदन देण्यासाठी मोरारजी देसाई यांच्या ताफ्यासमोर झालेलं आंदोलन आणि त्यानंतर झालेला घटनाक्रम उद्धव ठाकरे यांनी उलगडला, पण त्यावेळी मोरारजीभाई देसाई हे काँग्रेसचेच नेते होते. त्यांनीच हा प्रश्न रखडवला होता. काँग्रेसनेच कायम महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत शिवसेना काँग्रेसबरोबर सरकारमध्ये आहे तोपर्यंत हा विषय सुटणार नाही. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या धाडसी निर्णय क्षमतेने जर हा केंद्रशासित प्रदेश केला, तर काँग्रेसला ते चालेल काय याचा विचार शिवसेनेने केला आहे का? काँग्रेसने कायम कर्नाटकाला झुकते माप दिले आहे. बेळगावमध्ये विधानसभेची दुसरी इमारत बांधण्यास काँग्रेसने विरोध केला नाही. त्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपती असलेल्या प्रणव मुखर्जी यांनी केले होते. तेही काँग्रेसचेच नेते होते. त्यावेळी कर्नाटक विधानसभेची इमारत बेळगावात बांधली याचा अर्थ तो भाग कर्नाटकाचाच आहे यावर शिक्कामोर्तब झाले. तेव्हा विरोध नाही केला. शिवसेनेने आपली सत्ता आहे तर आज नेमके काय केले पाहिजे? तर बेळगावात महाराष्ट्र विधानसभेची आणखी एक वास्तू उभी करण्याचा संकल्प केला पाहिजे. चंदीगडमध्ये जर पंजाब आणि हरियाणाच्या दोन वास्तू आहेत, तर आमची वास्तू तिथे का नको? आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी काही करायचे नाही अन् कर्नाटक बिनधास्त तिथे घुसखोरी करत असताना आपण गप्प कसे काय बसू शकतो? ही कृती केली तर काँग्रेस शिवसेनेला साथ देईल का, याचाही विचार केला पाहिजे. आता सर्वसामान्य जनता भाषणापेक्षा कृतीवर विश्वास ठेवते. काश्मीरवर ३७० कलम रद्द करून मोदींनी करून दाखवले. नंतर भाषण केले. म्हणूनच महाराष्ट्र सरकारनेही राज्य विधान भवनाची एखादी वास्तू बेळगावात बांधून आपला हक्क प्रस्थापित करावा आणि मग भाषणबाजी करावी, ही सामान्यांची अपेक्षा आहे.

काँग्रेस जोपर्यंत शिवसेनेसोबत आहे तोपर्यंत कधीही बेळगावबाबत स्पष्ट भूमिका घेता येणार नाही. भाजपने, मोदींनी काश्मीर प्रश्न सोडवण्यापूर्वी मेहबुबांची साथ सोडली होती आणि मग निर्णय घेतला होता. बेळगाव कर्नाटकात नेऊन देणाºया काँग्रेसला बरोबर घेऊन हा प्रश्न कधीच सुटणार नाही. अशोक चव्हाण ठरलेले असूनही सर्वपक्षीय शिष्टमंडळ गेल्यावर मनमोहन सिंग यांच्यापुढे काही बोलत नाहीत. प्रणव मुखर्जींनी कर्नाटकव्याप्त बेळगावात कर्नाटक विधानसभेच्या इमारतीचे उद्घाटन करू नये म्हणून नाराजीही व्यक्त करत नाहीत. अशा परिस्थितीत काँग्रेस सीमाप्रश्न सोडवण्यास कशी काय साथ देईल? त्यांची साथ घेऊन आपण सरकार कसे काय चालवू शकतो याचा विचार केला पाहिजे. बेळगाव सीमाप्रश्न हा काँग्रेसने निर्माण केलेला प्रश्न आहे. त्यामुळे काँग्रेससोबत असताना शिवसेना तो प्रश्न सोडवू शकणारच नाही. त्यामुळे एकतर काँग्रेसला दूर केले पाहिजे किंवा बेळगावरचा हक्क सोडला पाहिजे हे दोनच पर्याय शिवसेनेकडे आहेत हे स्पष्ट आहे. त्यामुळे भाषण करून काहीच साध्य होणार नाही, प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे.

पडदा व्यापणारा बीग बी


मागच्याच आठवड्यात एक बातमी आली आणि त्यामध्ये अमिताभ बच्चन याच्या निवृत्तीचा विषय चर्चेत आला. कुठेतरी त्याने आपण थकलो असल्याच्या भावना व्यक्त केल्या आणि त्याची बातमी झाली. एखादी व्यक्ती मोठी झाली की, त्याच्या प्रत्येक कृतीची बातमी असते. एवढा महानायक निवृत्त होणार याचे अनेकांना दु:ख झाले. कारण गेल्या पन्नास वर्षांत फक्त सुपरस्टार म्हणून नाही तर पडदा व्यापणारा अभिनेता म्हणून अमिताभ बच्चनचा उल्लेख करावा लागेल. वयाचा मान आणि कारकीर्द म्हणून अमिताभचा उल्लेख अहो, जाहो असा करायला हवा, पण कलाकारांच्या बाबतीत तसे नसते. एखादा अभिनेता कितीही मोठा झाला तरी त्याचे वय सोळाच असते. त्याला कधीही अहो, जाहो न म्हणता अरे, तुरेच करायचे असते. याचे कारण त्याच्यावर आपण प्रेम करत असतो. ज्याच्यावर आपण जिवापाड प्रेम करतो त्याला अहो, जाहो करत नाही. आईचा उल्लेख एकेरी करतो, देवाचा उल्लेख एकेरी होतो. तसाच महान कलाकाराचाही उल्लेख एकेरीच करायचा असतो. म्हणूनच तो अमिताभच राहणार.

खरंच केवढी मोठी कारकीर्द आहे. अमिताभ बच्चन. भारतीय सिनेमाच्या वैभवशाली इतिहासातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक. चार दशकांहून अधिकच्या कारकिर्दीत जवळपास दोनशे चित्रपटांत काम. बॉलिवूडचा शहेनशहा, महानायक, अँग्री यंग मॅन, स्टार आॅफ द मिलेनियम, बिग बी अशी अनेक विशेषणं. अभिनयासोबतच पार्श्वगायक, चित्रपटनिर्मिती आणि टीव्हीवरील कार्यक्रमाचे पथदर्शक सूत्रधार. कारकिर्दीचे वेगवेगळे टप्पे गाजवले. काळानुरूप वेगळ्या भूमिका केल्या. मसालापट ते कलात्मक चित्रपट अशा भूमिकांनी कायम पडदा व्यापणारा हा अभिनेता आता थकल्याचे ऐकूनच वाईट वाटले. सांगावेसे वाटते ‘अरे अमिताभ, तुला थकून कसे चालेल? काम केलेच पाहिजे’.


छोरा गंगाकिनारेवाला मुंबईत आला आणि समुद्रासारखा मोठा झाला. अमिताभ बच्चनचा जन्म अलाहाबादचा. अमिताभ याच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले, तरी बच्चन या टोपणनावाने तो कविता प्रसिद्ध करायचा. सिनेसृष्टीत प्रवेश करताना अमिताभनेसुद्धा हेच टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली. पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन आडनाव व्यवहारात रूढ झाले.

ऐन विशीत कोलकात्यातील एका जहाज वाहतूक कंपनीतील एजंटची नोकरी सोडून अमिताभने अभिनयात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. उंचपुरा बांधा आणि दमदार आवाज ही पुढे या सुपरस्टारची वैशिष्ट्ये बनली. परंतु, सुरुवातीला यामुळेच त्याची हेटाळणी झाली होती.


के. ए. अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ (१९६९) या चित्रपटापासून अभिनयाची सुरुवात झाली. सुरुवातीच्या अपयशानंतर ‘जंजीर’पासून यशाची घौडदोड सुरू झाली आणि पुढे यशस्वी चित्रपटांची प्रदीर्घ मालिकाच जन्माला आली. त्यातूनच स्टार, सुपरस्टार आणि स्टार आॅफ द सेंच्युरी अशी विशेषणे लागत गेली. एक काळ असा होता १९७० च्या दशकाचा उत्तरार्ध आणि १९८० च्या दशकाचा पूर्वाध की या काळात वर्षात आठ ते दहा चित्रपट त्याचे येत होते. सतत कुठे ना कुठे तरी त्याचा चित्रपट झळकताना दिसायचाच. अमिताभ आहे म्हणजे चित्रपट चालणारच, ही खात्री निर्मात्यांना, वितरकांना असायची.

आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले तसेच त्याच्या आयुष्यात अनेक घटनाही संस्मरणीय घडल्या. त्यापैकीच एक म्हणजे कुलीच्या सेटवर झालला अपघात. या अपघातानंतर तो अक्षरश: जिवावरच्या संकटातून बचावला. त्यावेळी तो बरा व्हावा म्हणून देशभरातीलच नाही, तर जगभरातील चाहत्यांनीही प्रार्थना केल्या होत्या. तब्येतीत सुधारणा झाल्यावर अमिताभने जुहूच्या त्याच्या प्रतीक्षा बंगल्याच्या खिडकीतून चाहत्यांना रोज दर्शन देणे सुरू केले. अजूनही ही रीत कायम आहे. अर्थात गेल्या काही वर्षांपासून हे ‘दर्शन’ महिन्यातील एका रविवारपुरते मर्यादित झाले आहे.


सत्तरच्याच दशकात सिनेमांसोबतच अमिताभ आणि अभिनेत्री रेखा यांच्या जवळीकीबद्दल खूप चर्चा झाल्या. यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचेही सांगितले गेले. अभिनेत्री परवीन बाबीसोबतच्या त्यांच्या मैत्रीचीही अशीच चर्चा झाली. कालांतराने सगळे काही स्थिरस्थावर झाले, तरी आजही रेखा आणि अमिताभ एखाद्या कार्यक्रमात एकत्र किंवा समोरासमोर आले तर चर्चा होतात. जया बच्चनच्या चेहºयावरील भाव टिपले जातात. रेखाही अमिताभ बच्चन या विषयावर बोलण्याची संधी सोडत नाही, पण अमिताभ बच्चनच्या अनेक अभिनेत्रींबरोबर जोड्या जमल्या, पण सर्वात पसंतीची प्रेक्षकांची जोडी म्हणजे अमिताभ आणि रेखा हीच होती.

एखादा अभिनेता यशस्वी झाल्यावर त्याला आपणही निर्मिती करावी असे वाटते. त्यामुळे निर्मिती क्षेत्रात उतरण्याचे त्याने ठरवले, पण अभिनेता म्हणून जो नावलौकिक त्याने कमावला तो निर्माता म्हणून त्याला कमावता आला नाही. अमिताभ बच्चन कार्पोरेशन लिमिटेड या संस्थेद्वारे आणि स्वतंत्रपणेही त्याने चित्रपटांची निर्मिती केली. त्यात ‘तेरे मेरे सपने’, ‘मृत्युदंड’, ‘उल्लासम’, ‘सात रंग के सपने’, ‘मेजरसाब’, ‘अक्स’, ‘विरुद्ध’, ‘अंतरमहाल’, ‘फॅमिली’, ‘पा’, ‘विहीर’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’, ‘सप्तपदी’, ‘शमिताभ’ या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. यापैकी बहुतेक चित्रपट चांगलेच चालले, पण प्रेक्षकांना तो अमिताभ अभिनेता म्हणूनच हवा होता. त्याला बघणे, त्याचे समोर असणे हेच प्रेक्षकांना आवडते हे वारंवार दिसून आले आहे.


अमिताभच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. १९८४ मध्ये मित्र राजीव गांधी यांना मदत करण्यासाठी त्यांनी राजकारणात पाऊल टाकले. अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून त्यांनी समाजवादी पक्षाकडून खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश केला, मात्र बोफोर्स प्रकरणात त्यांचे नाव समोर आले. त्यानंतर सिनेमेही फ्लॉप होऊ लागले. इतकेच नव्हे, तर एबीसीएल या त्यांच्या निर्मिती कंपनीला लाखोंचे नुकसान झाल्याने गाशा गुंडाळायला लागला होता. एकूणच आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती. अशावेळी ‘कौन बनेगा करोडपती’च्या रूपात बिग बीने फिनिक्ससारखी भरारी घेतली. केबीसीच्या पहिल्याच भागापासून प्रेक्षकांची मनं जिंकली. हिंदी भाषेवरचे प्रभुत्व, सहभागींशी बोलण्याची शैली, संवाद साधण्याची कला यामुळे तो एकमेवाद्वितीय ठरला. हॉट सीटच्या माध्यमातून त्याने अनेकांना लखपती-करोडपती बनवले. यामध्ये त्याची बोलण्याची नम्रता, सभ्यता ही प्रेक्षकांना खूपच भावली. त्यामुळे नंतर अनेकांनी हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. शाहरूख खाननेसुद्धा. परंतु अमिताभची सर कोणालाच आली नाही. येणारही नाही.

खरं तर अमिताभच्या कारकिर्दीत दिग्दर्शकांचा वाटाही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यात मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, हृषिकेश मुखर्जी, रमेश सिप्पी, यश चोप्रा, रमेश बहल या दिग्दर्शकांचा तसेच सलीम-जावेद, कादर खान, प्रयाग राज या लेखकांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. अमिताभ युग सुरू होण्यापूर्वी आपल्याकडे एक नायक आणि त्याच्याबरोबर विनोदी सहनायक असायचा. तो फॉर्म्युलाच ठरलेला होता. दिलीप कुमार, जॉनी वॉकर, राजेश खन्ना, असरानी, जितेंद्र, मेहमूद, अगदी अलीकडे गोविंदा-शक्ती कपूर, गोविंदा-जॉनी लिव्हर अशाही जोड्या होत्या, पण अमिताभने पडदा व्यापल्यानंतर विनोदी सहनायकाची जागाही घेतली होती. अँग्री यंग मॅन इतक्याच विनोदी अमिताभच्या भूमिकाही तेवढ्याच गाजल्या होत्या. अमिताभला स्वत:लाच विनोदाची जबरदस्त जाण असल्याने वेगळा विनोदी सहनायक महत्त्वाचा ठरला नाही.


कोणत्या वेळी काय करायचे हे नेमके माहिती असल्याने अमिताभची कारकीर्द बहरत गेली. भारदस्त झाली. दशकामागून दशके कधी गेली आणि पडदा, छोटा पडदा, जाहिराती या माध्यमातून तो सगळ्यांच्या जीवनाचा भाग झाला. अगदी कोरोनाकाळातही मोबाइलवर त्याचा आवाज येत राहिला. शौचालयापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या प्रत्येक उत्पादनाच्या जाहिराती करून तो सतत समोर राहिला. मग थकणं साहजिकच आहे. त्यामुळे निवृत्तीचा विचार केला तरी त्यात गैर काही नाही, पण त्याचे दर्शन तर सतत होत राहणारच इतकी कामगिरी त्याने केलेली आहे. अर्थात ही खरीच निवृत्ती आहे की, नव्या काही रूपात तो समोर येतो हे पहावे लागेल. कदाचित एखादी वेबसीरिज घेऊन येईल. काय सांगता येत नाही, पण या भूमिकेचेही आपण स्वागत करायला हवे.


लोकशाही मूल्ये जपावीत


शुक्रवारपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. तत्पूर्वी विरोधकांनी अपेक्षेप्रमाणेच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या अधिवेशनाचे कामकाज चालू द्यायचे नाही आणि सरकारला सहकार्य करायचे नाही हा विरोधकांचा इरादा पक्का झालेला आहे, पण हे मुळातच लोकशाहीला धरून नाही हे तितकेच खरे. जनता लोकप्रतिनिधींना संसदेत सभागृहात चर्चा करण्यासाठी पाठवते, पण विरोधक सभागृहात चर्चा न करता, अभ्यासपूर्ण बाजू न मांडता बाहेर गोंधळ घालतात. याला रडीचा डावच म्हणावा लागेल. यामुळे बहुमत असलेल्या सरकारची बाजू उघडी पाडणे कधीच शक्य होणार नाही. आता हे आंदोलन शेतकºयांचे नसून विरोधकांचे होते यावर शिक्कामोर्तबच झाले असे म्हणावे लागेल.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या ६० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा, राजस्थानसह देशभरातील शेतकरी आंदोलन करत होते. केंद्र सरकारसोबत एकामागून एक अशा चर्चेच्या फेºया झडत होत्या. कडाक्याची थंडी, ऊन-वारा यांमध्ये हे शेतकरी तिथे ठिय्या देऊन होते, मात्र २६ जानेवारीला काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या गोंधळामुळे सारे फासेच पलटले आहेत. आता तर सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलनाला वेगळेच वळण लागले आहे. दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेनंतर शेतकरी संघटनांमध्ये फूट पहायला मिळत आहे. नोएडाच्या चिल्ला बॉर्डरवर शेतकरी संघटनेने भारतीय किसान युनियन (भानु) यांनी आंदोलन संपविण्याची घोषणा केली. मजदूर किसान युनियनने आंदोलनातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर चिल्ला बॉर्डरवरील बॅरिकेड्स हटविण्यात आले आहेत. चिल्ला बॉर्डरवर असे झालेले असताना आता सिंघू बॉर्डरवर स्थानिकांनीच शेतकºयांविरोधात एल्गार पुकारला आहे. याचा अर्थ या शेतकºयांना विरोधकांनी आंदोलन करण्यास भाग पाडले होते. कायदे चुकीचे आहेत अशी माहिती पसरवून अराजक माजवण्याचा प्रयत्न केला होता असेच दिसते. या अधिवेशनात विरोधकांनी या कायद्यांवर चर्चा करण्यास सरकारला का भाग पाडले नाही? अशी अधिवेशनातून माघार घेणे, सभागृहात उपस्थित न राहणे, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला न जाणे हे लोकशाहीला मारक आहे. विरोधकांचा अभ्यास कमी पडतो म्हणून त्यांना सभागृहात बोलता येत नाही. त्यामुळे उथळ माहितीच्या आधारावर बाहेर अपुºया ज्ञानाच्या प्रसारमाध्यमांना काहीही माहिती देत बसायचे असे धोरण जर विरोधक आखत असतील, तर त्यातून काहीही साध्य होणार नाही. विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी धारदार मुद्दे असले पाहिजेत, अभ्यास असला पाहिजे, पण काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधक असला तरी नेतृत्वहीन आहे. बाकीच्या पक्षात कोण काय करतो आहे हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे फक्त सुरात सूर मिसळून रडगाणे गाणे असला पोरकट प्रकार विरोधक करताना दिसत आहेत. अभ्यासपूर्ण चर्चेतून यावर तोडगा निघू शकतो. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने लोकसभेत संसदेत पाठवले आहे याचे भान लोकप्रतिनिधींनी पाळले पाहिजे. हे कृषी कायदे चुकीचे आहेत हे वाटते, तर त्याला सभागृहात विरोध करण्याचे काम विरोधकांनी केले पाहिजे. रस्त्यावर उतरून विरोध करणे म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार म्हणावा लागेल. त्यामुळे सभागृहाचा अवमान न करता, लोकशाही टिकवण्यासाठी विरोधकांनी चर्चेचा मार्ग स्वीकारला पाहिजे.


२६ जानेवारीच्या प्रकारानंतर सिंघू बॉर्डरवरील स्थानिक रहिवासी आता रस्त्यावर उतरले आहेत. शेतकºयांनी लाल किल्ल्यावर जो तिरंग्याचा अपमान केला तो चुकीचा आहे. यामुळे गावकºयांमध्ये संतापाची भावना आहे. स्थानिकांनी लगेचच हायवे रिकामा करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी हायवेवर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. हा सगळा प्रकार पाहता गेल्या साठ दिवसांत जी सहानुभूती शेतकºयांनी मिळवली होती ती त्यांनी गमावलेली आहे. या आंदोलनाला हिंसक वळण देऊन विरोधकांनी शेतकºयांची फसवणूक केलेली आहे असेच दिसते. विरोधकांनी जर शेतकºयांची पाठराखण केली होती, समर्थन केले होते, तर त्यांनी आंदोलक शेतकºयांना ट्रॅक्टर आंदोलनापासून, हिंसाचारापासून रोखणे गरजेचे होते. हे करणे चुकीचे आहे असे समजावण्याची गरज होती, पण शेतकरी हिंसक झाला तर त्याचा फायदा सरकारवर ताशेरे ओढायला मिळेल या असुरी इच्छेने विरोधकांनी हिंसाचाराचे समर्थन केले. त्यामुळे हे आंदोलन शेतकºयांचे नाही, तर विरोधकांचे असल्याचे स्पष्ट झाले, पण विरोधकांनी लोकशाहीची बूज राखण्यासाठी सभागृहात उपस्थित राहण्याचे धाडस दाखवावे आणि चर्चेतून मार्ग काढावा, लोकशाहीची मूल्य जपावीत असे वाटते. यात विरोधकांचे काहीच नुकसान झालेले नाही. शेतकरी हिंसक झाले. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी राकेश टिकैतसह अन्य शेतकरी नेत्यांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी शेतकरी नेते युद्धवीर सिंग यांनी हिंसाचारासंदर्भात दिल्ली पोलिसांची माफी मागितली. एवढेच नाही, तर झालेल्या प्रकाराची आपल्यालाही लाज वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. युद्धवीर सिंग म्हणाले, आंदोलनातून बाहेर पडलेल्या दोन संघटना, या आधीपासूनच संयुक्त किसान मोर्चाचा भाग नव्हत्या. यापूर्वीही या संघटना आंदोलनातून बाहेर पडल्या होत्या, मात्र त्यांच्या भागातून त्यांच्यावर दबाव वाढल्याने त्या पुन्हा आंदोलनात सहभागी झाल्या. कर्तृत्व विरोधकांचे, भडकावण्याचे काम विरोधकांनी केले आणि शेतकरी आंदोलक त्या जाळ्यात फसले. त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले, माफी मागावी लागली. हे विरोधकांचे चुकीचे काम आहे. त्यांनी लोकशाहीचा मान ठेवणे अपेक्षित आहे. 

शांतेच्या कार्ट्याची गोष्ट


साधारणपणे १९७० च्या दशकात श्रीनिवास भणगे यांचे एक नाटक हौशी रंगमंचासाठी आले. त्याचे पुस्तक स्वरूपातही वितरण जोरात झाले होते. त्या नाटकाचे नाव होते ‘घालीन लोटांगण’. त्या काळात कॉलेजच्या गॅदरिंगला जी नाटके सादर केली जायची त्यात श्याम फडके लिखित ‘तीन चोक तेरा’, मधुसूधन कालेलकर यांचे ‘पदरी पडलं पवित्र झालं’, वसंत कानेटकरांचे ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ आणि त्यानंतर ‘घालीन लोटांगण’ हे श्रीनिवास भणगे यांचे नाटक असायचे. सतत कुठल्या ना कुठल्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये यापैकी एक नाटक असायचेच. त्यामुळे नाटकांचे हौशी रंगमंचासाठी आणि व्यावसायिक रंगमंचासाठी अशी विभागणी असायची, पण हौशी रंगमंचावर गाजलेले एक नाटक व्यावसायिक रंगमंचावर गाजवण्याचा चमत्कार बेर्डे मंडळींनी केला. ‘घालीन लोटांगण’चे ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ असे नामांतर करून नव्या रूपात आले आणि त्या नाटकाने इतिहास घडवला.


मुळात श्रीनिवास भणगे यांची स्क्रीप्ट अत्यंत दमदार होती. हौशी मंचावर केल्यावरही सुमार अभिनय करणारे कलाकारही हशा घेत असत. अर्थात ती हशा आणि टाळ्यांची दाद लेखकाला होती, पण लेखकावर कुरघोडी करत दिग्दर्शक आणि अभिनयाच्या जोरावर शांतेच्या कार्ट्याच्या टीमने कहर केला होता. लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा यांची जुगलबंदी या नाटकात पहायला मिळायची. हसून हसून पोटात दुखणे म्हणजे काय त्याचा प्रेक्षक अनुभव या नाटकातून घेत होते. म्हणजे एकीकडे विजय चव्हाण ‘मोरूच्या मावशी’चा धुडघूस घालत होता, तर दुसरीकडे हे कार्ट सगळ्यांना याड लावत होतं.

या नाटकात शांताची भूमिका नयनतारा करायची. नयनतारा ही ‘नाथ हा माझा’सारख्या नाटकातून फटकळ स्वरूपाची भूमिका करणारी म्हणून ओळखली जात होती. कारण ‘नाथ हा माझा’ या नाटकातील प्रियाचे खूप प्रयोग तिने केले होते. त्यामुळे ती विनोदी अभिनेत्री असेल किंवा चांगली विनोदी भूमिका करू शकते हे कोणी मान्य करणे शक्य नव्हते. कारण त्यापूर्वी ‘बाळा गाऊ कशी अंगाई’सारख्या चित्रपटातून तिने भूमिका केल्या होत्या, पण एक जबरदस्त टायमिंग सेन्स असलेली विनोदी अभिनेत्री आपण आहोत हे सिद्ध करायला नयनताराला ‘शांतेच्या कार्ट’ या नाटकाची मदत झाली. या नाटकात शाम्या म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, व्यंकटेश म्हणजे सुधीर जोशी आणि शांता नयनतारा हे सतत एकमेकांवर कुरघोडी करत असतात. त्यामुळे प्रत्येकाला आपली जागा दाखवून देण्याची चांगली संधी होती.


शाम्याला बायको कशी असावी यासाठी शांता घालत असलेल्या अटी आणि त्या लिहून घेताना शाम्या यात नयनतारा लक्ष्मीकांत बेर्डे यांची जुगलबंदी असायची. त्यात कधी नयनतारा, तर कधी लक्ष्या एकमेकांवर कुरघोडी करत. प्रत्येक प्रयोगागणिक काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असल्याने या नाटकाला रिपिट आॅडियन्स कायम लाभला होता. सहकलाकारांमध्य्येही रवींद्र बेर्डे, रुही बेर्डे, उज्ज्वला जोग चांगले भाव खाऊन जात होते.

सुधीर जोशी आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा प्रेमपत्र लिहिण्याचा प्रसंग असाच धमाल करणारा. बायकोला घाबरून राहणारा व्यंकटेश घरात प्रेमपत्र आल्यावर बायकोवर कशी मात करतो हे दाखवताना नयनतारा आणि सुधीर जोशी यांची झालेली जुगलबंदी प्रेक्षकांना खिळवून ठेवायची. हे नाटक खºया अर्थाने टीमवर्क होते. म्हणजे साधारण बहुतेक नाटके ही एका कलाकाराभोवती गाजतात. ‘मोरूची मावशी’ मावशीभोवती फिरते, ‘तो मी नव्हेच’ लखोबा आणि पणशीकरांभोवती फिरायचे, पण ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकात मात्र लक्ष्मीकांत, नयनतारा आणि सुधीर जोशी या तिघांभोवती फिरत होते. फार कमी नाटकांत इतके चांगले टीमवर्क असायचे. १९७० च्या दशकात आलेल्या ‘डार्लिंग डार्लिंग’ या नाटकात अशी टीम जमली होती. त्या काळातील विनोदाचा बादशहा म्हणून गाजलेला राजा गोसावी, नयना आपटे, अशोक सराफ, प्रकाश इनामदार आणि मच्छिंद्र कांबळी असे दिग्गज त्यावेळी होते. त्यानंतर चांगले टीमवर्क असलेले ‘शांतेचं कार्ट’ हे नाटक होते.


त्या काळात नाटकाची नावे बदलून पुन्हा आणायची एक लाटच आली होती. राजा गोसावी, नयना आपटे यांचे ‘नवरा माझा मुठीत गं’ हे नाटक भरपूर चालल्यानंतर पुन्हा ‘पती पत्नी आणि ती’ या नावाने ते आले. कारण त्या काळात हिंदी सिनेमाशी नाटकाची स्पर्धा असायची. संजीवकुमारचा ‘पती पत्नी और वह’ हा चित्रपट गाजत असल्याने ‘नवरा माझ्या मुठीत गं’ या नाटकाचे नामांतर झाले होते. विजय तेंडुलकरांचे ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक गाजले होते. त्याची जोरदार चर्चा होती. त्यामुळे ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ असे नामकरण करून घालीन लोटांगण आले. बाळ कोल्हटकरांचे त्या काळात ‘उघडले स्वर्गाचे द्वार’ हे वसिष्ठ विश्वामित्र संघर्षावरचे नाटक आले होते. ते गाजत असतानाच लक्ष्मीकांत बेर्डेचे ‘बिघडले स्वर्गाचे दार’ हे नाटक आले होते. तेही नाटक जुनेच नाव बदलून आलेले होते, पण नामांतर झालेले सर्वांगसुंदर नाटक म्हणून ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ याचा उल्लेख करावाच लागेल.



पक पक पकाक पक


खुराड्यातल्या कोंबड्यांची पकपक चालली होती. काही कोंबड्या अडोशाला म्हणून गेल्या आणि त्यांच्यात चर्चा सुरू झाली. आता कोंबड्यांची चर्चा असली, तरी त्या बायकाच. आतल्या आवाजात कुजबूज, चर्चा केल्याशिवाय बायकांचा जन्म थोडाच सार्थकी लागणार आहे? त्यामुळे खुराड्यात शेकडो कोंबड्या असल्या, तरी या कोपºयात बसलेल्या कोंबड्यांचा बोलण्याचा नुसता गलका चालला होता.

a

‘पक पक पक पकाक पक...’ पपप करत काळी कोंबडी माना वेळावत सांगत होती. मध्येच आपले पंख फडफडवत होती आणि थंडीने काकडल्यासारखं अंग हालवत होती. आजूबाजूला, पांढरी, तपकीरी आणि विविध रंगाच्या कोंबड्या कोंडाळं करून बसल्या होत्या. काळी आपल्या नादात बोलत होती. ‘ पक पक पकाक... काय बाई मेला हा कोंबडीचा जन्म. या माणसांसारखं गद्दार कोणी नाही बघ.’

‘पक पक पक... आता काय झालं?’ पांढरी कोंबडी विचारू लागली. तशी चिंतेच्या स्वरात काळी कोंबडी सांगू लागली, ‘अगं जल्ला मेला कोंबडीचा जन्म. आता काय नवं संकट आलंय माहितीय का? जरा डोळे उघडे ठेवून पहा जगात काय चाललं आहे. या खुराड्यातून बाहेर पडा म्हणजे जगात काय चालले आहे ते समजेल. पक पक पकाक...’


‘कुकूचकू कुकूचकू’ तिकडून कोंबडा जोरात ओरडला तशा सगळ्या कोंबड्या सावरून बसल्या. काळी कोंबडी बोलू लागली, ‘याला काय कुकचकू करायला होतयं? आता आपली अवस्था घर की मुर्गी दाल बराबर अशीच झालीय बघ.’

‘अग पण नक्की काय झालंय? पकाकपक’ तपकीरी रंगाची कोंबडी पुढे येऊन म्हणाली तशी काळी कोंबडी म्हणाली, ‘पक पक अगदी पकले बघ आता. ते झाडावरनं कावळे खाली पडले, कुठे कबूतरं खाली पडली, तर लगेच बर्ड फ्लू आला म्हणून गोंगाट सुरू केला या माणसांनी. आता काय तर सगळ्या कोंबड्या मारून टाका असे म्हणत आहेत. आपलं काही खरं नाही. यांची आपण सतत भूक भागवतो तरी आपल्या जीवावर उठतात. आता तर काय बर्ड फ्ल्यू आपल्यामुळे हा रोग होणार या भीतीने मारून टाकणार. या माणसांच्या राज्यात आपल्याला न्याय नाही तो नाहीच.’ पक पक पकाक करत काळी कोबडी हमसून हमसून रडू लागली.


बाकीच्या कोंबड्या थोडं घाबरून, सावरून बसत तिच्या जवळ आल्या. कोणी प्रेमाने आपल्या पंखाने तिला स्पर्श करू लागले. तशी समजावणीच्या सुरात पांढरी कोबडी बोलू लागली, ‘पकाक पकाक पकाक.... बाई बाई बाई... काय म्हणायचं या माणसांच्या गद्दारीला? यांच्यासाठी अहोरात्र कष्ट करायचे, अंडी घालायची. आपली पोरंही पहायची नाहीत. या माणसांच्या पोटाची आग भागवण्यासाठी जन्माला येण्यापूर्वीच आपल्या काळजाचा तुकडा आपण देतो. का तर त्यांची पोरं धष्टपुष्ट व्हावीत. कुठं फिरायला जात नाही आपण, सतत या कोंडवाड्यात खुराड्यात कोंडलेलो असतो. माणसाची भूक भागवण्यासाठी आणि आता ते भटके पक्षी आजारी पडले, तर लगेच आपल्याला मारायला आले? हा सारासार अन्याय आहे. ’

‘कुकूचकू कुकचकू’ कोंबडा पुन्हा जोरात ओरडला. त्याबरोबर दुसरा कोंबडाही प्रत्त्युतरादाखल ओरडला, ‘कुकचककू’ त्याबरोबर या घोळक्यातल्या कोंबड्यांनी नाक मुरडावं तशा चोची मुरडल्या आणि बोलू लागल्या, ‘यांना काय नुसतं कुकचकू करायचं आणि कुचकूच करायचं याशिवाय धंदा आहे का? जरा डुलका लागला की, लागले बोंबलायवला आणि लागले बोलवायला. मनात आलं की कुचकूचू आणि कुकचकू’ पांढरी कोंबडी फटकळपणे बोलली. त्यावर काळी कोंबडी डोळे पुसत म्हणाली, ’ पक पक पक... अज्ञानात विश्व झाकलेलं आहे तुमचं तेच बरं. आपण आज आहोत उद्या नाही; पण आहोत तोपर्यंत दिसेल ते चोचीने टिपायचे आणि अंडी घालत बसायचं. कधी आपली पोरं त्या अंड्यातून येतील याची वाट पहायची; पण ती येण्यापूर्वीच फस्त झालेली असतात. त्याचे दु:ख न बाळगता पुन्हा नवी पोरं तरी जन्माला येतील म्हणून अंडी घालत बसायचं. काही स्वातंत्र्य असं नाहीच.’


त्यावर तपकीरी कोंबडी म्हणाली, ‘हो ना.. एखाद दिवशी अंडी घातली नाहीत की, लगेच खुडूक झाली म्हणून आपल्याला तंगडीला धरून उचलतात आणि नेतात खाटकाकडे. किती क्रूरपणे आपली पिसं काढतात, मानेवर सुरा फिरवतात. जराही लाज वाटत नाही या माणसांना? ’

काळी कोंबडी म्हणाली, ‘ पकाक पकाक पक... अगं काही झालं तरी आपलं मरण टळत नाही. त्यांना आपली अंडी खायला घातली, तरी मारणार आणि अंडी नाही घातली तरी मारणार. पण आता काय तर बाहेरच्या पक्षांनी कसला तो रोग लागला म्हणून आपल्याला मारणार. यांना समजत कसं नाही? बाहेरचे पक्षी उघड्यावरचं वाटेल ते खातात मग त्यांना रोग लागणारच. पण आपल्याला औषधं दिली जातात. इंजक्शन असतात. ताटलीत देतात तेच आपण खातो. मग आपल्याला रोग व्हायचे कारण काय? रोग लागला तरी त्याला माणसंच गं जबाबदार. पक पक पक पक.’


सगळ्या कोंबड्या एकमेकीच्या गळ्यात गळे घालून रडू लागल्या, पकाक पक गं पकाक पक...

कुकचकू कुकचकू करत दोन-तीन कोंबडे गोळा झाले. त्यांनी सगळ्या या बायका कोंबड्यांची विचारपूस केली. एका कोंबड्याला वाटलं कोणती, तरी कोंबडी आजारी पडली असेल. त्यामुळे सगळ्या कोंबड्यांना लांब व्हायला सांगितलं. काळी कोंबडी रडत होती. मी आजारी नाही, म्हणत होती. पण त्या काळ्या कोंबडीला या कोंबडे आणि कोंबड्यांनी वाळीत टाकल्यासारखे केले. त्यामुळे त्या खुराड्याचा चालक असलेल्या मालकाला वाटलं कोणतीतरी कोंबडी आजारी आहे. त्यामुळे त्याने फर्मान काढले, आजारी कोंबडीचा त्रास सगळ्या पक्षांना होईल. आपण त्या सगळ्या कोंबड्या मारून टाकू. अन् एकच पक पक पक पकाकच गलका खुराड्यात सुरू झाला. त्यांचा आक्रोश बराचवेळ चालू होता; पण माणसांनी सहजपणे एकेक कोंबडी मारून चिरडून, जमिनीत गाडून जाळायला सुरुवात केली होती. त्या धुरात कोंबड्यांचे अश्रू कोणाला दिसतच नव्हते.


आत्मनिर्भरतेचा संकल्प उद्या


उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. सर्वात आव्हानात्मक आणि महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी देशाच्या अर्थमंत्र्यांवर उद्या आहे. कोरोनामुळे विस्कटलेली घडी सावरण्यासाठी आगामी काळात काय करायचे याचा संकल्प म्हणजे हा अर्थसंकल्प असणार आहे. आत्मनिर्भर भारताचा हा अर्थसंकल्प असणार आहे. उद्या देशाचे २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचे केंद्रीय अंदाजपत्रक सादर होईल. तसे ते प्रत्येक वर्षी सादर होत असते; परंतु त्यासंबंधी उत्सुकता कायम असते. अंदाजपत्रकाची उत्कंठा आणि अपेक्षा या वर्षी मात्र सर्वोच्च राहील, कारण २०२० चा अधिकतम कालावधी हा कोव्हिड महासाथीने व्यापला आणि केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी.

कोव्हिड महासाथीमुळे २०२०-२१ मध्ये देशात अनेक दिवस लॉकडाऊन असल्याने उत्पादन, सेवा आणि त्यावर अवलंबून असलेले सरासरी उत्पन्न यांमध्ये मोठी घट झाली आहे; तर दुसरीकडे रोग निर्मूलनासाठी करोडो रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे अंदाजापेक्षा वित्तीय तूट अधिक असेल, अशी अपेक्षा आहे. यामध्ये समाधानाची बाब म्हणजे पाऊस सरासरीएवढा झाल्याने, अन्नधान्याचे उत्पादन चांगले होईल, शेतकºयांच्या खिशामध्ये चांगला पैसा खेळेल. वस्तू व सेवा कराच्या उत्पन्नामुळे उद्योग-धंदेदेखील पूर्वपदावर येत असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.


आपल्या देशाच्या जीडीपीमध्ये दोन अंकी वाढ होणे प्रगती आणि गरिबी निर्मूलनासाठी अत्यंत आवश्यक आहे. चालू आर्थिक वषार्साठी नियोजित ७ टक्के वाढीऐवजी केवळ १ टक्का जीडीपीत वाढ होईल, असे संकेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याचा स्वीकार करावा लागेल; परंतु कोरोना आटोक्यात आल्यानंतर सरकारला जीडीपीच्या वृद्धीसाठी ठोस उपाययोजना करावी लागेल.

उत्पादन वाढीसाठी खासगी क्षेत्र सदैव सज्ज असते. कारण त्यातूनच त्यांना कमाई होत असते. सरकारी पातळीवर गरज आहे ती या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची. प्रोत्साहन आर्थिक किंवा करसवलतींच्या स्वरूपामध्ये देता येते; परंतु प्रत्येक वेळेला त्याची गरज नसते. उदा. औद्योगिक क्षेत्रास संपूर्ण वर्षभर दर्जेदार वीजपुरवठा करण्याचे ठोस आश्वासन देऊन तसा कार्यक्रम राबविला, तर कमी खर्चात उत्पादन होऊ शकते. जनरेटरची किंवा महाग इंधनाची गरज पडणार नाही. निर्यातीचा माल बंदरावर लाल फितीमध्ये पडून न राहता, कमी कालावधीमध्ये परदेशी गेल्यास, व्याजाच्या खर्चामध्ये बचत होईल. सरकारने विकत घेतलेल्या वस्तू व सेवांचे पैसे, कराचा परतावा इ. देणी सत्वर अदा केल्यास, खाजगी क्षेत्रामधील व्यावसायिकांना खेळत्या भांडवलाचा भार कमी होऊन, उत्पादनाचा खर्च कमी होईल. किंमत कमी झाल्यास परकीय बाजारपेठ काबीज करणे सोपे होईल. त्यामुळे या अर्थसंकल्पात सरकार काय करते, यावर सर्वांची नजर आहे.


अंदाजपत्रकाच्या पूर्वसंध्येला सर्वच घटक कर सवलतीची मागणी करीत असतात. कोरोनाच्या साथीने सरकारी गंगाजळीमध्ये जमा राशीमध्ये घट, तर खर्चात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर करसवलत देणे अर्थमंत्र्यांना परवडेल, असे वाटत नाही. करदात्यांनीदेखील उत्पन्नामध्ये झळ सोसली आहे. त्यामुळे असे सुचवावेसे वाटते की, करांचा बोजा वाढवू नये. कारण त्यामुळे नकारात्मक वातावरण तयार होईल. उत्पन्न कमी झाल्याने प्रत्यक्ष कराच्या रकमेत फार वाढ संभवत नाही. त्यामुळे उद्योगामध्ये पैसे गुंतविले, रोजगार निर्माण केले, तर त्यांना करातून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कारण खाजगी क्षेत्र आपल्याकडील १ लाख रुपयांमध्ये सरकारपेक्षा कमी कालावधीमध्ये अधिक रोजगार निर्माण करण्यास सक्षम आहे. रोजगार निर्मितीला, आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देणारा हा संकल्प असला पाहिजे. भांडवलदार, कारखानदार, उद्योगपतींवर टीका करणे सोपे असते, पण ते जेवढा रोजगार देतात तो महत्त्वाचा आहे. सरकार रोजगार निर्माण करू शकत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त रोजगार देणाºया खाजगी जगताला करात सवलत देण्याचे काम सरकारने केले पाहिजे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी अंदाजपत्रक गेल्या शेकडो वर्षांपेक्षा वेगळे असेल, असे प्रतिपादन करून २०२१-२२ च्या केंद्रीय अंदाजपत्रकासंबंधी अपेक्षा उंचावल्या आहेत. २०२१-२२ चे केंद्रीय अंदाजपत्रक छापील माध्यमात देणार नसून, ते संगणक प्रणालीमध्ये देण्याचा प्रस्ताव ही या बदलाची नांदी असावी; परंतु खरा कस लागेल ते म्हणजे अंदाजपत्रकीय तूट नियंत्रणात ठेवत लोकोपयोगी कार्यक्रमांवर खर्च वाढविणे आणि कर सवलतीच्या अपेक्षांना उतरणे! ही तारेवरची कसरतच आहे; पण म्हणूनच सरकारपुढचे हे आव्हान सरकारच्या कार्यक्षमतेला नावलौकीक देणारे असेल. अर्थसंकल्प कसाही सादर केला, तरी त्यावर टीका होणारच असते. पण विरोधकांना टीका करतानाही विचार करायला लागेल असे काहीतरी यात असावे अशी अपेक्षा आहे.


अर्थसंकल्पाने अर्थव्यवस्थेला चालना मिळाली पाहिजेच, पण सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढेल आणि त्यामुळे अर्थव्यवस्था सक्रीय कशी होईल याचा विचार केला पाहिजे. गेले वर्ष औषध पाण्यात गेले आहे. प्रत्येकाचे आर्थिक बजेट हे दवाखाना या खर्चावर गेले आहे. त्यामुळे आजारलेल्या अर्थव्यवस्थेला नेमका कोणता डोस हे सरकार देणार हे फार महत्त्वाचे आहे. आर्थिक परिस्थिती कोलमडली की सगळंच फसतं. कारण पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यामुळे उद्या सरकार आपल्या जादूच्या पोतडीतून काय काढणार हे पहावे लागेल.

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

सर्वसामान्यांना लोकल सुरू करा

 ज्या देशात आदर नाही, जगण्याचे साधन नाही. शिकण्यासाठी जागा नाही. तिथे राहून काही फायदा नाही. - चाणक्य


सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलचे दरवाजे कधी उघडणार?, हा प्रश्न गेल्या कित्येक महिन्यांपासून विचारला जात आहे. उच्च न्यायालयातही याप्रकरणी सुनावणी सुरू आहे; पण कित्येक दिवसांपासून, लोकलच्या निर्णयाचं भिजतं घोंगडे कायम आहे. गर्दीचे कारण सांगून आणि त्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढेल या भीतीने लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू केलेली नाही. परंतु आता २६ जानेवारीला तरी तशी घोषणा करून ही लोकल सर्वसामान्यांना खुली करावी अशी अपेक्षा आहे.


मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबद्दल कालच एक वक्तव्य केले आहे. ते म्हणजे सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे; मात्र यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहे. लोकलमध्ये होणाºया गर्दीमुळे राज्य सरकारला काळजी वाटते आणि त्यामुळे राज्यात पुन्हा रेल्वेगाड्या सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने सर्वसामान्यांची मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सुरू करण्याचा तातडीने विचार केला पाहिजे. खरंतर आज लोकलमधून अनावश्यक लोक प्रवास करताना दिसत आहेत. लहान मुले, फिरायला बाहेर पडलेल्या महिला, लोकलमधून विक्री करणारे विक्रेते, चरसी, तृतीयपंथी, भीक मागणारे यांची सध्या लोकलमध्ये चंगळ चालू आहे. जीवनावश्यक सेवेमध्ये हे लोक येतात का? महिलांना सकाळी ११ नंतर कसल्याही चौकशीशिवाय प्रवासाला मुभा दिली आहे; पण कामासाठी बाहेर पडणाºया पुरुषांना मात्र रेल्वेचे तिकीट दिले जात नाही. हा सरळसरळ सर्वसामान्यांवर अन्याय आहे. तो राज्य सरकारने तातडीने दूर करावा. उद्याच २६ जानेवारीला सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा आदेश सरकारने दिला पाहिजे.

खरं तर मध्य रेल्वेने एक किंवा इतर पर्यायांनी गाड्या सुरू केल्या आहेत आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासाची मुभा दिल्यानंतर लवकरच पूर्ण क्षमतेने लोकल धावतील. लॉकडाऊन होण्याआधी मध्य रेल्वेकडून १७७४ लोकल गाड्या चालवल्या जात होत्या. त्यापैकी काही बंधनं पाळून १५८० गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत; पण या लोकल पूर्ण क्षमतेने धावत नसल्याने रेल्वेचेही आर्थिक नुकसान होत आहे. सरकारने आपला महसूल बुडवण्याचा विचार करता कामा नये. खरं तर रेल्वे ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते, त्यांचे स्वतंत्र लोहमार्ग आहेत. असे असताना त्या रूळांवरून धावणाºया रेल्वेला राज्य सरकारची परवानगी कशासाठी लागते आहे, हे अनाकलनीय आहे. खरं तर राज्य सरकारबरोबर रेल्वेचा चांगला समन्वय आहे. हळूहळू रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी पर्याय स्वीकारण्यात आले आहेत. मुंबईतील लोकल रेल्वेबद्दल बोलायचं झालं, तर आतापर्यंत २० श्रेणीतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू करण्यास मध्य रेल्वे सज्ज आहे. फक्त आता राज्य सरकारकडून परवानगी येताच लोकल सुरू केल्या जाईल, असं मित्तल यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता विनाविलंब सर्वसामान्यांसाठी कसल्याही अटीशिवाय लोकल सुरू करण्याचा आदेश दिला पाहिजे.


आचार्य चाणक्यांचे वचन आहे की, ज्या देशात आदर नाही, जगण्याचे साधन नाही. शिकण्यासाठी जागा नाही, तिथे राहून काही फायदा नाही. आज नेमके तेच घडत आहे. नोकरी-धंदा, कामासाठी सर्वसामान्यांना घराबाहेर पडता येत नाही. कामासाठी मुंबईत लोकल हा सर्वसामान्यांचा पर्याय आहे; पण तीच सेवा बंद केल्यामुळे अनेकांचे रोजगार सुटले आहेत. त्यामुळे लोकलसेवा नाही, तर सरकार सर्वसामान्यांचे जगण्याचे साधन काढून घेत आहे. नोकरदार महिलांना ठीक आहे, पण ज्या घरातच असतात, गृहिणी आहेत त्यांना मात्र सरकारने सकाळी ११ नंतर प्रवासाला परवानगी दिली आहे. मग गर्दी नसलेल्या वेळात दुसºया तिसºया शिफ्टला कामाला जाणाºया लोकांना प्रवासाची परवानगी का दिली जात नाही? अनावश्यक फिरणाºयांसाठी लोकल आहे. लहान मुलांना घेऊन महिला प्रवास करतात हे धोरण चुकीचे आहे. आयकार्ड दाखवा, परवानगी नाही, असे म्हणून खरच ज्यांना गरज आहे त्यांना रेल्वे परवानगी देत नाही. शिक्षणासाठी मुलांना बाहेर पडता येत नाही, त्यामुळे कसल्याही प्रकारचे आदराचे स्थान आज सामान्य माणसाला या सरकार दरबारी राहिलेले नाही. त्यामुळे अजून जर रोजगारापासून माणसं वंचित राहू लागली, तर आत्महत्येचे प्रमाण वाढेल आणि सरकार त्याला जबाबदार असेल.

आता कोरोनाचं संकट बºयापैकी कमी झालेले आहे. ते येईल म्हणून किती दिवस लपून बसायचे? लवकरात लवकर लोकल सुरू झाली नाही, तर लोकलशिवाय पर्याय नसलेल्या प्रवाशांना जर तिकीट दिले जात नसेल, तर त्यांनी विनातिकीट प्रवास करायचा मार्ग स्वीकारावा लागेल. तिकीट चेकरने अडवले तर त्यांच्यावर भांडण, मारामारीचे प्रकार ओढवतील. त्यामुळे राज्य सरकारने आता अनावश्यक ताणून न धरता ताबडतोब सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची परवानगी दिली पाहिजे.


भिजत घोंगडं


दोन दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत खडाजंगी झाली; पण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षपदाचा निर्णय होऊ शकला नाही. ही काँग्रेसची पराभूत मानसिकता त्यातून दिसून आलेली आहे. आता काँग्रेस अध्यक्षपदाची निवड २१ जून नंतर म्हणजे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर होईल, असे जाहीर करून ही बैठक उरकली. निर्णयक्षमता नाही हा काँग्रेसचा दुर्गुण यातून अधोरेखित झालेला आहे. काँग्रेसच्या नेत्यांना, मंत्र्यांना पूर्वीपासूनच कोणत्याही कामाची गळ घातली की बघू, करू अशाप्रकारे कामे लटकत ठेवण्याची सवय होती आणि आहे. तोच गुण त्यांच्या आता अंगलट येत चाललेला आहे. अनेक प्रश्न, देशहिताचे प्रकल्प अशा निर्णय न घेण्याच्या प्रवृत्तीमुळे, दुर्गुणामुळे या देशात लटकत राहिले आणि देश मागे राहिला. आता काँग्रेस अध्यक्षपद दीड वर्ष रिकामे असूनही त्या जागी फूल टाइम अध्यक्ष काँग्रेसला निवडता येत नाही, हे अत्यंत वाईट आहे.


राहुल गांधी यांनाच काँग्रेसचा अध्यक्ष करावे, त्यांनाच लोकनेता म्हणून पुढे आणावे, हा काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आग्रह म्हणजे केवळ पुत्रमोह आहे! या पुत्रमोहातून सोनिया गांधी बाहेर पडत नाहीत आणि पक्षात खºया अर्थाने लोकशाही नांदू देत नाहीत, तोपर्यंत काँग्रेस पक्षाला पूर्वीचे दिवस येणर नाहीत, हे यातून स्पष्ट झालेले आहे.

खरं तर जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीतील सर्वाधिक जुन्या पक्षाची आज जी वाईट अवस्था झाली आहे, ती भारतीय लोकशाहीलाही लाजवणारी आहे. बिगर गांधी अध्यक्षपद देऊनच खरे तर आता काँग्रेसला चांगले दिवस येऊ शकतात. पण नेतृत्वहीन काँग्रेस असा चेहरा समोर आणून आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने मैदान सोडले आहे, हे स्पष्ट दिसते. पाच राज्यांतील निवडणुकांनंतर राहुल गांधींनाच अध्यक्ष करायचे आहे तर ते आता का नको? पण जर या पाच राज्यांतही काँग्रेसची अवस्था वाईट झाली, यश मिळाले नाही, तर राहुल गांधींच्या माथी अपयश नको म्हणून त्यांची निवड लांबणीवर केली जात आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने हार पत्करल्याचे हे चित्र आहे.


खरं तर काँग्रेसचा अध्यक्ष बनण्याची आणि लोकनेता होण्याची राहुल गांधी यांची क्षमता आहे काय, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. त्यांची राजकीय परिपक्वताही देशाने अनुभवली आहे. जेव्हा पक्षाला गरज असते, तेव्हा राहुल गांधी विदेशात जातात. संसदेचे अधिवेशन असताना ते इटलीत आजीला भेटायला जातात. काँग्रेसचे कार्यकर्ते सरकारविरोधात जेव्हा एखादे मोठे आंदोलन छेडतात, नेमके तेव्हाच राहुल गांधी परदेशात गेलेले असतात. सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी उपलब्ध असलेले सगळ्यात मोठे व्यासपीठ म्हणजे संसद. संसदेच्या अधिवेशनात सरकारवर तुटून पडण्याची संधी असताना ते उपस्थित राहात नसल्याने सभागृहांत काँग्रेसच्या एकूणच कामगिरीवर परिणाम होतो. असे असतानाही त्यांना काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याचा हट्ट धरणे हे चुकीचे आहे.

काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांच्याशिवाय अन्य कुणातच क्षमता नाही, असे सोनिया गांधींना का वाटते आहे? २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुका तशा राहुल गांधींच्याच नेतृत्वात लढल्या गेल्या. पण, संविधानाने लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी जी अट घातली आहे, ती पूर्ण करण्यासाठी लागणारे संख्याबळही काँग्रेसला गाठता आले नाही, हे राहुल गांधींचे दोन निवडणुकांमधील फार मोठे अपयश होते. अन्य कोणा बिगर गांधी नावाच्या व्यक्तीकडून असे अपयश आले असते, तर काँग्रेसने त्या व्यक्तीला अध्यक्षपदावर राहू दिले असते का? मग राहुल गांधींसाठी हा हट्ट का धरला जात आहे? का प्रियंका गांधींना अध्यक्ष करण्यासाठी ही खेळी आहे? राहुल नको तर प्रियंकाला करा, असे सांगण्यासाठी ही खेळी सोनिया गांधी करत आहेत? म्हणजे विजय मिळाला, तर तो राहुल गांधी आणि सोनिया गांधींमुळे आणि पराजय झाला, तर त्यासाठी सामूहिक जबाबदारी, हे जे काँग्रेसचे धोरण आहे ते अप्पलपोटी आहे. या निर्णयक्षमता नसल्यामुळे अध्यक्षपदाचे घोंगडे भिजत पडले आहे हे लक्षात घेतले पाहिजे.


काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. पक्षात लोकशाही नांदावी आणि पक्षाला अंतरिमऐवजी स्थायी अध्यक्ष असावा, अशी अपेक्षा या पत्रातून व्यक्त करण्यात आली होती; पण पत्र लिहिणाºया या नेत्यांपैकी अनेकांची आज काय अवस्था झाली आहे? खरं तर पत्रावर सकारात्मक विचार करून पक्षहिताचा निर्णय होण्याऐवजी अनेक ज्येष्ठ नेत्यांना कसे डावलण्यात आले, हे संपूर्ण देशाने पाहिले. कधीकाळी सर्वाधिक मजबूत पक्ष असलेल्या काँग्रेस पार्टीची आज जी दुर्दशा झाली आहे, त्याला जबाबदार कोण, हे त्या पक्षातील नेत्यांना माहिती आहे. पण, ते उघडपणे बोलण्याची हिंमत दाखवत नाहीत. कारण, हिंमत दाखवणाºयाला कशी बाहेरची वाट दाखविली जाते, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. सक्षम नेतृत्वाअभावी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आहे. ते हतबल झाल्याचे पाहायला मिळते आहे. कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांसारख्या निष्ठावंत नेत्यांनाही अपमानीत केले जाते. तिथे सामान्य कार्यकर्त्यांची काय अवस्था असेल? खरं तर शशी थरूरसारखा चेहरा काँग्रेसला नवा विचार देऊ शकतो; पण लोकशाही मार्गाने निवडणुका घेऊनही अध्यक्ष निवडायचा नाही आणि फक्त भिजते घोंगडे ठेवायचे एवढाच अजेंडा सध्या काँग्रेस राबवते आहे, दुसरे काही नाही.

मुंबईतील भारत


भारतीय प्रजासत्ताक दिन हा दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय सण आहे. यावर्षी ७१वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर होणारा हा पहिलाच प्रजासत्ताक दिन असल्याने एकूणच पाहुण्यांविना होणारा हा दिवस आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पण खºया अर्थाने दिल्ली राजधानी असली, तरी आर्थिक राजधानी मुंबईत संपूर्ण भारताचे चित्र दिसते. सर्व प्रांतातील लोक इथे असल्यामुळे अख्खा भारत मुंबईत एकवटलेला असतो.

भारताची राज्यघटना घटना समितीने २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी, १९५० रोजी अंमलात आली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी, १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.


२६ जानेवारी, १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. प्रजासत्ताक दिन भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते. यामध्ये भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक यावेळी सादर केली जाते. भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो. नवी दिल्ली येथे होणाºया संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या-त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.

यामागचा इतिहास असा आहे की, ४ नोव्हेंबर, १९४७ रोजी भारताच्या घटनाकारांच्या मसुदा समितीने कच्चा मसुदा तयार केला. त्यानंतर तो सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात मांडण्यात आला. २ वर्षे, ११ महिने व १८ दिवस या मसुद्यावर खुली चर्चा करण्यात आली व त्यानंतर तो २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकारला गेला. तेव्हापासून म्हणजे २६ जानेवारी, १९४९ पासून दर वर्षी भारताच्या राजधानी नवी दिल्ली येथे एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाºया वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू हाण्यापूर्वी ध्वजारोहण होते आणि २१ बंदुकांची सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते. यावर्षी कोरोनामुळे परदेशी पाहुणे नाहीत. अगोदर ब्रिटिश पंतप्रधानांना आमंत्रित केले होते; पण ते कोरोनामुळे रद्द केले गेले. गेली सात दशके या पारंपरिक पद्धतीने हा आनंदोत्सव या देशात साजरा केला जातो. याचे कारण भारतीय राज्यघटने इतकी सुंदर घटना कुठेही पहायला मिळत नाही. या घटनेने या देशातील प्रत्येकाला सर्व काही दिले आहे. खºया अर्थाने प्रजेचे राज्य आल्याचे या घटनेने आपल्याला दिसून येते.


गेल्या काही वर्षांपासून या देशाला दहशतवादाचा सामना करावा लागत आहे; पण या दहशतवादाचा सामना करण्याचे बळ या देशातील घटनेमुळेच आपल्याला मिळते, हे लक्षात घेतले पाहिजे. २६ नोव्हेंबर, २००८ ला मुंबईत फार मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. एकप्रकारे पाकिस्तानने पुकारलेले ते छुपे युद्धच होते. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवरील या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरून गेले होते; तरीही मुंबई अवघ्या २४ तासांत सुरूळीत सुरू झाली. कोणताही कारभार बंद पडला नाही. मुंबईतील लोकल, बस, टॅक्सी आणि सार्वजनिक सेवा सुरळीत होत्या. मुंबईतील माणूस नेहमीप्रमाणे कामावर जात होता. याचे कारण मुंबई ही संपूर्ण देशाची प्रतिनिधीत्व करणारी जादुईनगरी आहे; पण कोरोनामुळे मुंबई बंद पडली होती. देशाचे नुकसान झाले आहे. लाइफलाइन लोकल बंद राहिली, ही खंत मनात बाळगून हा दिवस आपण साजरा करत आहोत. मुंबईत देशातील प्रत्येक प्रांतातील माणूस मुक्तपणे वावरत असतो. विविध देशातील लोक येत असतात. अशा संकटातही तो सुरक्षितपणे वावरू लागला, कारण या मुंबईतील लोकांनी, ज्ञात-अज्ञात व्यक्ती, शक्तींनी कसलाही भेदभाव न करता एकमेकांना मदत केली. संकटग्रस्त परिस्थितीत एकमेकांना मदत करणारी प्रवृत्ती म्हणजे आपली मुंबई आहे. हे खºया प्रजासत्ताकाचे लक्षण आहे. विविधतेतून एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे खरे चित्र दिसते, ते या संकट काळात प्रखरपणे दिसते. या विश्वासाच्या जोरावरच या देशाला महासत्ता होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.

कृषी क्षेत्रावरची संकटे


यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडला आहे. राज्यातच नाही, तर संपूर्ण देशात यावर्षी मान्सूनची कृपा झालेली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात ही दिलासा देणारी बाब आहे. बहुतेक सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, त्यातील अतिरिक्त पाण्याचा विसर्गही केला गेला आहे. त्यामुळे सुजलाम्, अशी परिस्थिती यावर्षी आहे. असे असताना कृषी कायद्यांचा प्रश्न निर्माण झाला आणि कृषी क्षेत्रावर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर संकट आले आहे. सरकार अडून बसले आहे, शेतकरी हट्टाला पेटला आहे. ११ बैठका तोडग्याविना निष्फळ ठरल्या.


खरं तर चांगला पाऊस झाल्यामुळे सुफलाम्ची अपेक्षा आता केली जाणार हे निश्चित; पण तोडगा काढण्यात फळ न आल्याने यावर्षी सुफलाम् असे चित्र दिसत नाही, हे वास्तव आहे. अजून चार दिवसांनी अर्थसंकल्प मांडला जाईल. त्यावेळी काय चित्र असेल हा प्रश्न यामुळे निर्माण होतो.

भारताची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान असल्याने इथली सगळी आर्थिक गणिते पावसावर मापली जातात. आपल्याकडे शेतीच्या पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न पावसाने सुटत असतो. त्यामुळे पावसाची कृपा झाली, तर आर्थिक घडी बसते. म्हणूनच यावर्षी नागरिकरण संकटात असताना, उद्योग संकटात असताना, कृषी आणि ग्रामीण भागाकडून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, असे दिसते. पण आज दोन महिने पंजाबचा शेतकरी ठिय्या मांडून बसलेला आहे. देशातला शेतकरी अस्वस्थ आहे. त्यामुळे निसर्गाने भरभरून दिले असतानाही आम्ही आपले नुकसान करत आहोत हे चित्र दिसते आहे.


यावर्षी जूनमध्ये १५ टक्क्यांनी जास्त पाऊस पडला. सुरुवात चांगली झाली की, सगळे व्यवस्थित होते. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला; पण पावसाने अवकृपा केली नाही, हे महत्त्वाचे होते. हा २०१३ नंतरचा सर्वाधिक पाऊस होता. त्यामुळे खरीपाची विक्रमी पेरणी, बंपर उत्पादनामुळे ग्रामीण भागात मागणी वाढेल, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज होता. पण काही ठिकाणी अवकाळीचे ग्रहण लागले आणि बेसावध असलेल्या शेतक­ºयाला फटका बसलाच. ग्रामीण भागावर यावर्षी अर्थव्यवस्थेची भीस्त असताना अवकाळी आणि आंदोलन ही कृषी क्षेत्रावरची आलेली संकटे अर्थव्यवस्थेला मारक अशीच आहेत.

सगळीकडे लॉकडाऊन आणि बेरोजगारीचे संकट असताना यावर्षी मे महिन्यात देशांतर्गत बाजारात ट्रॅक्टरची विक्री ४ टक्क्यांनी वाढली, ही माहिती आश्चर्यकारक होती; पण हेच ट्रॅक्टर आज आंदोलनासाठी दिल्लीत उतरले हे पण दुर्दैव म्हणावे लागेल. पण ते अर्थव्यवस्थेला ग्रामीण भाग, कृषी क्षेत्र हातभार लावणार असल्याचे ते संकेत होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेची मजबूत स्थिती असल्याचे हे द्योतक होते. ग्रामीण भागात वाढत्या मागणीमुळे अर्थव्यवस्था रुळावर येऊ शकते, असे यातून चित्र तयार होते.


जूनमध्येच अगदी वेळेत संपूर्ण देशात मान्सून पसरला आणि कोरोनाच्या संकटाचे ढग झाकोळले गेले. सर्वसामान्यांना कुठेतरी दिलासा दिला गेला. या तीन महिन्यांत आॅगस्ट अखेर या पावसाने सातत्य राखून कृषीक्षेत्राला खूश केले.

आपल्या हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जूनमध्ये यावेळी सामान्यपेक्षा १५ टक्के जास्त पाऊस झाला. २०१३ नंतर यावर्षी जूनमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. हिमालयीन राज्ये आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भाग वगळता देशाच्या इतर भागात जोरदार पाऊस पडला आहे. हवामान खात्याने यंदा सामान्य पावसाळ्याचा अंदाज वर्तविला होता; पण नेहमीप्रमाणेच तो खोटा ठरवत चांगला पाऊस झाला आणि जनतेची चिंता मिटवली आहे. विशेषत: ग्रामीण भागात या पावसाने बºयाचशा आशा पल्लवित केल्या. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे देशाची अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे आणि शहरी भागात विकासाचे चाके रखडले आहेत. अशा निराशेच्या वातावरणात ग्रामीण भागातून मागणी वाढून अर्थव्यवस्था सावरण्याची अपेक्षा होती; पण कृषी कायदे आणि त्यावरून निर्माण झालेले आंदोलन हे या अर्थव्यवस्थेला बाधक ठरत आहेत.


अर्थशास्त्रज्ञ आणि कॉर्पोरेट दिग्गजांचा असा विश्वास आहे की, आता मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला ग्रामीण भागातून नवी ऊर्जा मिळेल. शहरी अर्थव्यवस्थेपेक्षा ग्रामीण अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचे संकेत देशातील बाजारपेठेतील झालेल्या बदलांवरून दिसून आले होते; पण शेतकरी पेटून उठल्यामुळे हे सर्व अंदाज खोटे ठरले, असे म्हणावे लागेल. अजूनही वेळ गेलेली नाही. कुठेतरी तोडगा काढून हा वाद मिटवला गेला पाहिजे.

केवळ चांगल्या पावसामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेची अपेक्षा करीत नाहीत. ते यासाठी तीन प्रमुख कारणांवर विचार करतात. पहिले कारण असे आहे की, २५ मार्चपासून सुरू झालेला लॉकडाऊन असूनही, शेती चालूच राहिली, तर उत्पादनाला मोठी मागणी येईल. दुसरे, सरकारी एजन्सीच्या मते, यावेळी जास्त पेरणी झाली आहे. तिसरे कारण म्हणजे जे शहरांमधून आपल्या खेड्यात परतले ते कामगार आता शेतीच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे गेल्या तीस-चाळीस वर्षांत जो कृषीक्षेत्रावरचा रोजगाराचा भार सार्वजनिक आणि सेवा उद्योगाकडे वळला होता, तो पुन्हा एकदा कृषीक्षेत्राकडे वळल्याचे चित्र यावर्षी दिसून आले. त्यामुळे आता कृषीक्षेत्रावरच्या अर्थव्यवस्थेवर यावर्षी भार पडला आहे, वाढला आहे. कृषीक्षेत्राकडूनच फार मोठी अपेक्षा आहे. अशा स्थितीत शेतकरी आंदोलनात दोन-दोन महिने वाया जातात हे कुठेतरी चिंताजनक असे आहे.


विशेष म्हणजे यावर्षी पेरणीने एक नवीन विक्रम केला आहे. यावेळी खरिपाचे भरपूर पीक आले आहे. यामुळे ग्रामीण भागात मागणी वाढली; पण शेतमालाला योग्य भाव हा प्रश्न ऐरणीवर आला आणि सगळं वातावरण बिघडलं. यावर्षी सगळे निकष या कोरोनाने बदलल्यामुळे उद्योग आणि बाजारपेठेला वेगळीच सवय या काळात लागली आहे. बाजारपेठेचा मूड आणि आवड बदललेली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून स्वच्छता व कल्याण विभागात ५ नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. स्वच्छता आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या जंतुनाशकांच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. आता ग्रामीण भागातही अशा उत्पादनांना मोठी मागणी आहे. ग्रामीण भागातील नागरिक शहरी ग्राहकांपेक्षा वेगळा आम्ही मानत नाहीत. आता हा फरक अगदी किरकोळ आहे.

जी उत्पादने पूर्वी फक्त शहरातच वापरली जात होती, ती आता ग्रामीण भागातही वापरली जात आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातून अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. केंद्र सरकारने कृषी विपणन सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत, परंतु राज्ये त्याची अंमलबजावणी कशी करतात यावर परिणाम अवलंबून असेल, असे वाटत असताना वादळासारखा विरोध सुरू झाला आणि या अपेक्षा फोल ठरल्या.


नांदायला जाण्याअगोदरचा सासुरवास


झी मराठीवर ४ जानेवारीपासून ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सुरू झालेली आहे. तीन आठवड्यांतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली आहे. मुख्य म्हणजे ‘माझ्या नवºयाची बायको’ या मालिकेची प्राइम टाइम या मालिकने घेतली आणि सुरुवात तरी चांगली झालेली आहे. त्यामुळे त्या राधिका, सौमित्र आणि तो गोतावळा पाहून प्रेक्षकांना आलेला कंटाळा या मालिकेने घालवला आहे हे विशेष. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी त्याची जी जाहिरात प्रोमो केला होता त्यावरून या मालिकेचे कथानक हे लोकांना समजले होते. फक्त ते मांडले कसे जाते हे फार महत्त्वाचे होते. त्यात पहिल्या तीन आठवड्यांत या मालिकेला यश आलेले आहे.


शुभांगी गोखले, दिप्ती केतकर, आदिती सारंगधर या मालिकांमध्ये रुळलेल्या कलाकारांची यात भूमिका असल्याने या मालिकेने पटकन जोर पकडलाच, पण मालिकेसाठी शाल्वा किंजवडेकर आणि अंविता फलटणकर ही निवडलेली जोडीही प्रेक्षकांना आवडली आहे. विशेषत: प्रेक्षकांची नाडी कशी पकडायची याची दिग्दर्शकाला कल्पना असल्याने पटकथा आणि संवादही चांगल्याप्रकारे लिहिलेले दिसतात. थोडी भावनाप्रधान अशा वातावरणातून जाणारी ही मालिका आहे. खरं तर कथानकात नवीन असे काही नाही. पुरणाची पोळी किंवा स्वयंपाक प्रत्येकजण करतो, पण प्रत्येकाची चव वेगळी असते तसाच हा प्रकार आहे. तरीही लोक चाखूनचापून जेवत आहेत तसाच हा प्रकार आहे.

म्हणजे सलमान खान आणि भाग्यश्रीला नायक-नायिका म्हणून सादर करताना सूरज बडजात्यांनी जे कथानक निवडले होते तसेच आहे हे. फक्त तिथे दोन मित्र होते, इथे दोन मैत्रिणी आहेत. भाग्यश्रीला काही दिवस आपल्या मित्राच्या घरी राहण्यासाठी ठेवले जाते आणि तिथे त्यांची मैत्री जमते, प्रेम होते. तोच ढाचा या ठिकाणी आहे. नोकरीनिमित्ताने अंबरनाथची मुलगी मुंबईत राहायला येते असे या कथानकात दाखवले आहे. मैने प्यार कियामध्ये लांब पहाडी भागातून मुंबईसारख्या शहरात राहायला येते असे दाखवले आहे. इथे अंबरनाथ येथून मुंबईला येते असे दाखवले आहे. तशी ती चूकच म्हणावी लागेल, कारण अंबरनाथवरून मुंबईत दररोज लोकल प्रवास करून हजारो महिला नोकरी करत असतात. त्यासाठी मुंबईत तिची राहण्याची सोय कुठे होणार याची चिंता अंबरनाथमधील कुटुंबीयांना वाटणे हे तसे हास्यास्पद आहे. कोल्हापूर, सातारा किंवा मराठवाड्यातून, विदर्भातून मुंबईत नोकरीला आली असेल तर गोष्ट वेगळी होती, पण मालिकांना जागेवर चित्रीकरण लागते. लांबचे लोकेशन नको असते म्हणून त्यातल्या त्यात लांबचे स्टेशन म्हणून अंबरनाथ दाखवले आहे, पण तरीही प्रेक्षक मुकाटपणे बघत आहेत.


जाड असलेल्या स्विटूचे जाडीमुळे लग्न ठरत नाहीये, अठरा ठिकाणांहून नकार आलेला आहे. तिला सुंदर असा काटकुळा नायक दाखवण्याचे छान धाडस या मालिकेत केले आहे. अर्थात काही वाहिन्यांवर ‘रंग माझा वेगळा’, ‘मुलगी झाली हो’ अशा काही मालिकांमधून वर्णद्वेश, लिंगद्वेश असा दाखवला जात असताना रंगरूप, आकार हे प्रेमाच्या आड येऊ शकत नाही, असा संदेश ही मालिका देत असल्यामुळेही मालिका प्रेक्षकांना आवडत आहे. अर्थात जाड असली तरी स्वीटू ही गोड दिसते. हडकुळा असला तरी ओमकार पाप्याचं पितर वाटत नाही.

काही बाबी अतिरंजीत आहेत हा भाग वेगळा. म्हणजे कॅटरिंगचा व्यवसाय करणारे घर आहे. दररोज ३०० चपात्या विकत देतात, खाद्यपदार्थ, पुरणपोळ्या करून विकणारे सहा माणसांचे साळवी कुटुंब आहे, तिथे घरातील सामान सगळं संपलं आहे. डाळ, तांदूळ घरात काहीच शिल्लक नाही, म्हणून सगळे उपाशी राहतात. हे अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण म्हणावे लागेल. कृष्ण-सुदाम्याप्रमाणे शकू आणि नलू या मैत्रिणी खूप वर्षांनी भेटतात असेच दाखवले आहे. आता सुदाम्याच्या घरचे पोहे म्हणजे नलूच्या घरची पुरणपोळी, बटाटा वडा, पातळ आमटी खाल्ल्यामुळे शकू त्याची परतफेड करणार हे साहजिकच आहे, पण खात्यापित्या घरातील लठ्ठ मुलगी सर्वांची मर्जी जिंकते आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिका चालते. अर्थात कुठून तरी दोन-चार कुटुंबे आणायची. हिरॉईनला छळणारी एक बाई मालिकेत लागते तसे ते काम या मालिकेत तायडी अर्थात मालविका म्हणजे आदिती सारंगधरकडे आलेले आहे. ‘होणार सून...’मध्ये जान्हवीचा सासुरवास करण्यासाठी सहा सासवा होत्या. इथे एकट्या आदितीवर ती छळण्याची जबाबदारी आलेली आहे, पण गरीब-श्रीमंत या भेदभावाच्या, वर्गवारीच्या किंबहुना नव्या प्रस्थापित जातीवरूनच ही मालिका चालवली जाणार आहे.


आता यात परदेशातून आलेली मोमो ओमकारच्या प्रेमात पडणार का? ती प्रेमात पडावी म्हणून आदितीच्या कुरघोड्या आणि त्याला स्वीटू देणारी उत्तरे यातून दर आठवड्याला काहीतरी नवीन घडणार आणि वर्षभर ही मालिका चालणार हे नक्की. फक्त लग्न होण्याआधीच स्वीटू सासरी राहायला आल्यामुळे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ असे न राहता नांदायला येण्यापूर्वीच तिने पाया भक्कम करायचे ठरवले आहे.

शकू म्हणजे खानविलकर कुटुंबीयांचे फिटनेस सेंटर आहे आणि डाएट कसे असावे यावरून प्रत्येकाचा आहार नियंत्रित केला आहे. त्यामुळे श्रीमंताचे कुपोषण म्हणजे डायटिंग, तर गरीबांचे खाणे म्हणजे संतुलित आहार. या दोनमधला संघर्षही इथे पाहायला मिळणार, पण पहिल्या तीन आठवड्यांत असंख्य चुका असल्या आणि कथेत नाविन्य नसले तरी प्रेक्षकांना ही मालिका आवडते आहे हे नक्की. मालिकांमध्ये सुनांना छळण्यासाठी किंवा सुनांनी सासवांना छळण्यासाठी लग्न व्हावे लागते, पण इथे स्वीटू आधी सासुरवासाची परीक्षा देणार आहे आणि मग बोहल्यावर चढणार आहे हे नाविन्य म्हणावे लागेल.



योग्य निवड


येत्या २६ ते २८ मार्चदरम्यान नाशिकला होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ व विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची झालेली निवड ही अत्यंत योग्य बाब आहे. त्यांच्या निवडीने या साहित्य संमेलनांच्या आजवरच्या महान परंपरेत खोवला गेलेला एक मानाचा तुरा आहे असेच म्हणावे लागेल. याचे कारण काहीसे वेगळे करण्याचा प्रयत्न आजवर संमेलनाने केलेला नव्हता. वैज्ञानिक आणि साहित्यिक असलेल्या नारळीकरांना ही संधी देण्याचे केलेले काम नक्कीच चांगले आहे. यामुळे ज्ञानाला विज्ञानाची जोड मिळणार आहे.

वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी पद्मभूषणने सन्मानित झालेला नारळीकरांसारखा बुद्धिमान आणि विज्ञाननिष्ठ लेखक संमेलनाध्यक्ष पदावर विराजमान होणे ही या संमेलनाची गुणवत्ता वाढविणारी बाब म्हणावी लागेल. हा सन्मान त्यांना केवळ ते जागतिक कीर्तीचे खगोल शास्त्रज्ञ आहेत म्हणून मिळालेला नाही; मराठीमध्ये विज्ञानकथा आणि विज्ञान कादंबरीची रुजवण करण्यामध्ये आणि त्याचबरोबर बाल आणि युवा पिढीमध्ये वैज्ञानिक लेखनाद्वारे गणित, अंतराळ, खगोल शास्त्र, अशा विषयांची आवड निर्माण करण्यामध्ये नारळीकरांनी आजवर दिलेले योगदान केवळ अतुलनीय आहे. जेव्हा टीव्ही हे माध्यम रुजलेले नव्हते त्या काळात ४० वर्षांपूर्वी नभोनाट्य किंवा श्रृतिकांच्या माध्यमातून त्यांनी पोहोचवलेल्या कथाही लक्षणीय आहेत. त्यामुळे त्यांना मिळालेला मान हा रास्तच आहे. खरं तर गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलन म्हटले की, नानात‍ºहेचे वादविवाद हे चित्र पहायला मिळत होते, पण साहित्य परिषदेने काहीतरी वेगळं करून दाखवलं म्हणून त्यांचे कौतुक करावे लागेल.


खरं तर विज्ञान विषयावर लिहिणारे अनेक लेखक, साहित्यिक आहेत, परंतु अगम्य संकल्पना आणि बोजड शब्दांमुळे या विज्ञानपर साहित्याला जेवढी मिळायला हवी होती तेवढी वाचकप्रियता लाभू शकलेली नव्हती, पण डॉ. जयंत नारळीकर याला नक्कीच अपवाद आहेत. ते सोप्या भाषेत, सर्वसामान्यांना समजेल अशाच शब्दांत विज्ञानातून ज्ञान देत असतात. हे त्यांचे फार मोठे बलस्थान आहे. अत्यंत साध्या, सोप्या भाषेमध्येदेखील वैज्ञानिक संकल्पना मांडता येतात आणि विज्ञानकथा वा कादंबरीही रंजक आणि वाचनीय ठरू शकते हे त्यांनी आपल्या लेखनातून आजवर दाखवून दिले आहे. विशेषत: नव्या पिढीला साद घालणारे जे विज्ञाननिष्ठ लेखन नारळीकरांनी केले आहे, त्याला तोड नाही.

साहित्यासाठी काहीतरी भाषेत नवीन भर टाकायची असते. अनेकांनी तसे प्रयत्न केलेही आहेत. डॉ. नारळीकरांनीही यासाठी आपला वेगळा विचार मांडला आहे. प्रेषितसारखी पहिली विज्ञान कादंबरी त्यांनी लिहिली तेव्हा त्यामध्ये इंग्रजी शब्द वापरले गेल्याने काहींनी टीकाही केली होती. परंतु विज्ञान कथालेखन करताना इंग्रजी शब्द बिल्कूल वापरू नयेत हा अट्टाहास आपल्याला मान्य नाही आणि जर अशा शब्दांनी मराठी भाषा दबणार असेल तर तिला कमकुवत म्हटले पाहिजे. इतर भाषांची अतिक्रमणे पचवून कोणतीही भाषा समृद्ध होते. इंग्रजी भाषाही त्यामुळेच समृद्ध झाली आहे हे त्यांनी ठामपणे सांगितले होते. टीकेने खचून न जाता आपल्या मताशी प्रामाणिक राहून आपला इंग्रजी शब्द वापरण्याचा नेमका काय उद्देश होता हे त्यांनी ‘वामन परत न आला’ या आपल्या दुस‍ºया विज्ञान कादंबरीच्या प्रास्ताविकात दाखवून दिले आहे. हा अतिशय नम्रपणा होता. तो फार कमी लोकांना साधतो, पण आपली मर्यादा न ओलांडता, सभ्यता न सोडता, नेमकेपणाने लिहिणारे विज्ञान साहित्यिक असा लौकिक नारळीकरांनी प्राप्त केला आहे. त्यामुळे त्यांचा झालेला हा सन्मान, झालेली ही रास्त निवड म्हणजे साहित्य संमेलनाचा सन्मान वाढवणारी बाब आहे. खूप दिवसांनी एक चांगले साहित्य संमेलन नाशिकला पहायला मिळेल, असा विश्वास त्यामुळे निर्माण झालेला आहे.


यापूर्वीच जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमी पुरस्कारही लाभला आहे. मराठी विज्ञान कथा, कादंब‍ºयांचे दालन तर नारळीकरांनी समृद्ध केले आहेच, परंतु आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून मुलांसाठी, तरुणांसाठी विपुल लेखन त्यांनी आजवर केले. वैज्ञानिकांनी आपले ज्ञान दुसºयांना दिले पाहिजे हे त्यांनी वागून दाखवले आहे. नव्या पिढीला विज्ञानामध्ये रस वाटावा यासाठी डॉ. नारळीकरांनी अथकपणे केलेल्या या लेखनामुळे लाखो मुलांना आजवर विज्ञानाची, खगोल शास्त्राची, गणिताची गोडी लागली असेल यात शंका नाही. साहित्य संमेलनाध्यक्षपदी झालेली नारळीकरांची निवड मराठी साहित्यामध्ये विज्ञाननिष्ठ लेखनाचे एक नवे पर्व निर्माण करील आणि मराठी भाषेला व साहित्याला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल, याबाबत कोणतीही शंका मनात बाळगायची गरज नाही. साहित्याला राजकारण शिवलेले आपण पाहतो आहोत, पण आता खºया अर्थाने दर्जेदार संमेलन पाहण्याची संधी यावर्षी मिळणार आहे.

नाशिकचे साहित्य संमेलन म्हणजे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा गौरव आलाच. त्याशिवाय हेच नाही तर कुठलेच साहित्य संमेलन पूर्ण होऊ शकत नाही, पण आणखी एक बाब म्हणजे, कुसुमाग्रज नावाचा एक ग्रह अंतराळात आहे आणि खगोल शास्त्राचे वैज्ञानिक साहित्यिक या संमेलनाचे अध्यक्ष आहेत हाही योग फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही निवड अधिक योग्य आहे.

रविवार, २४ जानेवारी, २०२१

वादग्रस्त नाटके


एखादे नाटक रंगमंचावर आल्यावर त्यामुळे वाद निर्माण होणे हे मराठी रंगभूमीला नवीन नाही. घाशीराम कोतवालमुळे १९७०च्या दशकातील वाद पेटला होता; पण असे वाद नाटकांबाबत सतत होत राहिले आहेत. वादग्रस्त नाटके निर्माण होत राहिली आहेत आणि ती तशीच चालली पण आहेत. अशाच काही नाटकांवर आज नजर टाकूया. कधी सरकारने, कधी विविध संघटनांनी आणि व्यक्तींनी नाटकाच्या नावावर, कथानकावर किंवा कथानकाच्या काही भागांवर आक्षेप घेऊन बंद पाडलेली किंवा बंद पाडायचा प्रयत्‍न केलेली काही नाटके आपल्याकडे पुष्कळच आहेत. विशेषत: ऐतिहासिक घटनांवर एखादे नाटक असले की, त्यावर वाद हा निर्माण होणारच.


दहा एक वर्षापूर्वी असेच एक नाटक आले होते. त्याचं नाव एक चावट संध्याकाळ. (नाटक फक्त प्रौढांसाठी असल्याने स्त्रियांना आयोजकांनी मनाई केली.) फक्त पुरुषांसाठी असे नाटक असल्याची जाहिरात केल्यामुळे महिला संघटना आक्रमक झाल्या. अशोक पाटोळे आणि अजित केळकर दोघेच भेटतात आणि एकमेकांना अत्यंत पांचट, अश्लील असे जोक सांगतात. नाटकात फक्त विनोद ऐकायला म्हणूनच जायचे; पण हे अत्यंत अश्लील विनोद असल्यामुळे महिलांना या नाटकाला बंदी होती; पण महिला संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला, आम्हालाही हा चावटपणा बघायचा आहे असा आग्रह धरला, त्यावर वाहिन्यांवर टॉक शो झाले, महिलांना का नाही? म्हणून आग्रह केला आणि महिलांनाही हा चावटपणा पहायला मिळाला; पण त्यामुळे हे नाटक गाजले. अशोक पाटोळे यांच्यानंतर ते बंद पडले.

अर्थात ही परंपरा खूप जुनी आहे. अगदी शंभर वर्षांपूर्वी संगीत कीचकवध (लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर). या नाटकावर ब्रिटिशांनी २७ जानेवारी १९१० रोजी बंदी घातली होती. का तर म्हणे नाटकातील कीचक म्हणजे इंग्रज अधिकारी कर्झन या कल्पनेमुळे त्यावर बंदी घातली होती. आपल्याकडे कोणत्या कारणाने कोणाला वाईट वाटेल, भावना दुखावल्या जातील याचा नेम नसतो. त्यावरून हे वाद निर्माण होतात आणि नाटके वादग्रस्त ठरतात. कुलवधू नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी या नाटकात पाचवारी साडी नेसली होती, म्हणून वाद झाले होते.


पण १९७०च्या दशकातील घाशीराम कोतवाल या नाटकाने खूपच वाद निर्माण झाला होता. या नाटकाचे लेखक विजय तेंडुलकर होते. त्यांनी या नाटकात नाना फडणीसांचे तथाकथित विकृतीकरण केल्यावरून नाटकावर आक्षेप घेतला गेला होता. अर्थात त्याचा काही परिणाम झाला नाही. हे नाटक देश-विदेशातही गाजले आणि त्याने रंगभूमीला एक फार मोठा नवा चेहरा दिला. नवा फॉर्म दिला. एकाचवेळी जास्तीत जास्त पात्र रंगभूमीवर आणण्याचा विक्रमही याच नाटकाने केला.

१९९०च्या दशकात पती माझे छत्रपती या संजय पवार यांनी लिहिलेल्या नाटकाने वाद निर्माण झाला होता. मच्छिंद्र कांबळी या नाटकात प्रमुख भूमिकेत होते. छत्रपती या शब्दाने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होते म्हणून आरडाओरडा झाल्यावर या नाटकाचे नामकरण पती माझे छत्रीपती, असे करण्यात आले आणि हा वाद मिटला.


आणखी एक जुने नाटक म्हणजे बंधविमोचन. या नाटकाचे लेखक गोपाळ गोविंद सोमण हे होते. तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या सचिवाच्या आज्ञेवरून मुंबई पोलीस आयुक्तांनी या नाटकावर अनौपचारिक बंदी घातली होती.

या वीस वर्षांत सर्वात वादग्रस्त ठरलेले आणखी एक नाटक म्हणजे, मी नथुराम गोडसे बोलतोय. हे लेखक प्रदीप दळवी यांनी लिहिलेले नाटक. नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप या नाटकावर होता. नाटकात शरद पोंक्षे यांची प्रमुख भूमिका होती. या नाटकाचे ८००हून अधिक प्रयोग झाले आहेत; पण काँग्रेसने या नाटकाला तुफान विरोध केला. या नाटकाची बस जाळण्याचा प्रकारही काँग्रेसने ठाण्यात केला होता. सुदैवाने त्या बसमध्ये कोणी कलाकार नव्हते; पण हे नाटक चांगले चालले आणि आजही यू-ट्यूबवर ते पाहिले जाते.


महिलांसंबंधी असलेल गेल्या दहा वर्षांतील एक वादग्रस्त नाटक म्हणजे, योनीमनीच्या गुजगोष्टी. याचे मर्यादितच प्रयोग झाले. अतिशय संवेदनशील आणि कोणी बोलू शकणार नाही असे विषय यात होते. या नाटकावर बोरिवलीच्या नाट्यगृहाची बंदी होती, तसेच ठाणे महापालिकेचीही बंदी होती. त्यामुळे ठाण्यात याचे प्रयोग झाले नाहीत.

वस्त्रहरण हे नाटक जेव्हा पहिल्यांदा आले, तेव्हा वाद निर्माण झाला होता. या नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर. महाभारताची तथाकथित चेष्टा करण्यावरून कोणाच्या भावना दुखावतील, असा समज करून याला विरोध केला. पण पु. ल. देशपांडे यांनी याला चांगली पसंती दिली. अभिप्राय दिला आणि हे नाटक तुफान चालले. ५ हजारांपेक्षा जास्त प्रयोग या नाटकाने केले. वस्त्रहरणमुळे मच्छिंद्र कांबळी यांची वेगळी ओळख महाराष्ट्रालाच नाही, तर जगाला झाली. मालवणी भाषेचा गोडवा त्यांनी सर्वदूर पोहोचवला; पण त्याची सुरुवात वादाने झालेली होती.


नाटकावर बंदी असताना प्रयोग केला म्हणून किंवा त्या नाटकामुळे कोणाला शिक्षा झाल्याच्या घटना फारशा नाहीत; पण विजयतोरणा या नाटकाच्या १५ कलाकारांना ब्रिटिश सरकारने एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. लेखक विवेक बेळे यांनी शॅम्पेन आणि मारुती या नावाने एक नाटक आणले होते; पण त्यामुळे खूप वाद निर्माण झाला. त्यामुळे या नाटकाचे नाव बदलून माकडाच्या हाती शॅम्पेन असे करावे लागले. हे नाटक खूप गाजले. विशेष म्हणजे १९व्या महाराष्ट्र राज्य व्यावसायिक मराठी नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाटकाचे बक्षीस मिळालेले हे नाटक आहे.

विजय तेंडुलकरांची नाटके नेहमीच वादग्रस्त ठरली. घाशीराम कोतवालप्रमाणेच सखाराम बाइंडर या नाटकात साडी बदलण्याचे एक दृश्य होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता; पण न्यायाधीशांनी ते पाहून नाटकावर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली होती. त्यांच्या गिधाडे नाटकातही गर्भपाताचे दृष्य आहे. पोटात गुडघा मारून गर्भपात केला जातो आणि रक्तस्त्राव होतो म्हणून लाल रंग साडीला लागतो. या लाल रंगाला आणि रंगभूमीवर असे दाखवायला सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली; पण यातून पळवाट म्हणून लालच्या ऐवजी निळा रंग वापरून या नाटकाचे प्रयोग सुरू केले गेले. यातील निळा रंग लाल आहे असे समजावे असे अगोदर सूचीत केले गेले होते; पण हा वाद मिटवला गेला होता.


मी नथुराम गोडसे बोलतोय नंतर हे राम नथुराम या नावाचे नाटक लेखक-दिग्दर्शक-अभिनेते शरद पोंक्षे यांनी आणले होते. या नाटकाविरुद्ध कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहासमोर निदर्शने करण्यात आली. १९-१२-२०१६ ची म्हणजे अवघ्या चार वर्षांपूर्वीची ही घटना आहे. संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानी संघटना यांच्या कार्यकर्त्यांनीही औरंगाबादमधील संत तुकाराम नाट्यगृहाबाहेर आणि आत हे राम नथुराम या नाटकाविरुद्ध उग्र निदर्शने केली होती. पण तिथे जमलेल्या शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने या कार्यकर्त्यांना चोपून काढले. दंगल करणाºया कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर नाटक पुन्हा सुरू झाले.

काही वाद कोर्टात गेले, काही गाजले, पण रंगभूमीवर अनेक वादग्रस्त नाटके आली आणि त्यांनी नवे काही तरी दाखवूनही दिले, ही परंपरा वर्षानुवर्षांची आहे. पण यात प्रत्येक खेपेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंकलेले आहे. कोणाच्याही दडपशाहीने नाटक बंद पडले नाही. त्यात किरकोळ बदल प्रसंगी केले गेले; पण नाटक ‘शो मस्ट गो आॅन’ या न्यायाने होत राहिले.


आगीच्या वाढत्या घटना

 ातो यदग्रे भूतानां अग्रणी अध्वरे च यत् ेनाम्ना संनयते वाङ्गं स्तुतो अग्नि: इति सुरिभि:  बृहद्देवता २.२.४


गेल्या काही दिवसांत राज्यात आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या महिन्यातच भंडारा येथील शासकीय रुग्णालयात लागलेली आगीची दुर्घटना ही अत्यंत धक्कादायक होती. यात दहा चिमुकल्यांचा बळी गेला. त्यानंतर दुसरी धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग. या आगीतही पाच जणांचा बळी गेला. छोट्या मोठ्या घटना, तर घडतच आहेत. भिवंडीत गोदामांना आगी लागणे, शुक्रवारी ठाण्यात वागळे इस्टेटमध्ये लागलेली आग. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील आग. मुंबईत मालाडमध्ये लागलेली आग. या घटना आपल्याकडे सातत्यानं घडत आहेत, तरी आपण आगीचे प्रकार रोखण्यासाठी कुठे कमी पडत आहोत याचा शोध घेण्याची गरज आहे.


प्रत्येकवेळी शॉर्टसर्किटने आग लागली असे म्हणून वीजयंत्रणेवर खापर फोडण्यात अर्थ नाही. शॉर्टसर्किट का होते याचा तपास आम्ही करणार आहोत का? वायरिंग कमकुवत झाल्यानंतर, जुनाट झाल्यानंतर त्यातून शॉर्टसर्किट होत असते. मग हे वायरिंग वेळच्या वेळी चेक करणे, त्याचा मेंटनन्स ठेवणे, देखभाल करण्याची जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी प्रत्येक आस्थापनेने नेमली पाहिजे. काही ठराविक दिवसातून, ठराविक कालावधीनंतर चेक करण्याची जबाबदारी कोणावर तरी दिली पाहिजे. भंडाºयातील घटनेनंतर दोन परिचारिका आणि शल्य चिकित्सकांना निलंबित करून काय साध्य झाले? परिचारिकांनी रुग्णांची दखल घ्यायची की, लाइटची, वायरिंगची? डॉक्टरांनी पेशंट तपासायचे, शल्य चिकित्सकांनी माणसाचे शल्य जाणून घ्यायचे की वीजेचे? त्यामुळे ही जबाबदारी योग्य संबंधित व्यक्तीकडे सोपवली नसल्याने हे बळीचे बकरे बनले आहेत. हे वायरिंग धोकादायक आहे, त्याची दखल घेण्यासाठी कोणीच सूचना केल्या नव्हत्या का? अगदी पूर्ण बंद पडेपर्यंत, आग लागेपर्यंत वाट का पाहिली गेली? कारण कोणावर जबाबदारी सोपवली नाही म्हणून.

सीरमच्या आगीत वेल्डिंगच्या ठिणगीमुळे आग लागल्याचे बोलले जाते; पण वेल्डिंग करताना ठिणग्या उडणार हे माहिती असतानाही तिथे ज्वालाग्राही ज्वलनशील वस्तू कशा काय ठेवल्या गेल्या? आपल्याकडे त्याबाबत सूचना देऊनही माणसे त्याचे पालन करत नाहीत. पेट्रोल पंपावर गाडीला किक मारू नका, मोबाइल घेऊ नका असे सांगितले असले, तरी अनेक जण तिथे स्टार्टर मारतात, कीक मारतात, मोबाइल घेतात. यातून एखादा मोठा भडका उडू शकतो. हे सगळे आगीशी खेळण्याचे प्रकार आहेत. पाण्याशी आणि आगीशी कधी मस्ती करायची नसते. अग्नीचे तत्वच सर्व भस्मसात करणे आहे. त्याला शांत आणि संयमीत ठेवायचे असते; पण आम्हाला आगीशी खेळण्यात मोठेपणा वाटतो. त्यामुळे आम्ही धोके निर्माण करतो. सीरमसारख्या महत्त्वाच्या संस्थेत बांधकाम कर्मचाºयांच्या बेजबाबदारपणामुळे वेल्डिंगमुळे आग लागली. हे लांछनास्पद आहे. एका युद्धपातळीवर काम करणाºया संस्थेत, महत्त्वाच्या दिवसात असे प्रकार होत असतील तर ते चुकीचे आहे. वेल्डिंग करताना ठिणग्या उडतात हे माहिती असताना तिथे ज्वालाग्राही वस्तू ठेवल्या गेल्या, हे त्या कामगारांनी अगोदर सांगणे गरजेचे होते. विषाची परीक्षा कशासाठी घेतली जाते?


जातो यदग्रे भूतानां अग्रणी अध्वरे च यत्नाम्ना संनयते वाङ्गं स्तुतो अग्नि: इति सूरिभि: ेबृहद्देवता २.२.४ असे अग्नीचे अग्नीपुराणात वर्णन आढळते. म्हणजे, सर्व भूतांच्या आधी जन्मलेला भूत म्हणजे पंचमहाभूत असा, यज्ञामध्ये अग्रणी आणि नावाने अंगाचे संनयन करणारा, म्हणून अग्नी अशी त्याची विद्वानांनी स्तुती केली आहे. द्यु, अंतरिक्ष, पृथ्वी ही तीन अग्नीची जन्मस्थाने आहेत. विस्तव हे अग्नीचे पार्थिव रूप आहे. त्याला जाळणे, भस्मसात करणे हेच माहिती आहे. भक्षण करणे हे त्याचे काम आहे. त्यामुळे कुठेही अग्नी निर्माण करायचा नसतो. त्याला नियंत्रित करायचे असते; पण अग्नी निर्माण होण्याची म्हणजे सर्व स्वाहा होण्याची आम्ही मुभा देत असू तर हे प्रकार वाढणारच ना. आग नियंत्रणात आणणे सोपे काम नसते. आगीशी सामना करताना अग्नीशमन दलाच्या कर्मचाºयांना जीव धोक्यात घालावा लागत असतो. त्यामुळे अग्नीप्रतिबंधक सुविधा आपल्याजवळ असल्याच पाहिजेत. आज मुंबईत खूपच उंच इमारती आहेत. काही इमारती चाळीस पन्नास मजल्यांपेक्षा जास्त आहेत. पुणे, ठाणे या भागातही २० ते २४ मजल्यापर्यंत अनेक इमारती आहेत. या इमारतीत अग्नीशमनाची सोय आहे काय याचा किती जण विचार करतात. आपल्याकडे असलेल्या अग्निशमन बंबाची शिडी जास्तीत जास्त कितव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकते याचा अभ्यास सगळ्या महापालिकांकडे आहे का? दहाव्या माळ्यापर्यंत पोहोचतील इतक्या उंच शिड्या आहेत, पण जर पंधरा ते वीस मजल्यादरम्यान आग लागली तर काय करणार? या कशाचेच आमच्याकडे नियोजन नाही. त्यामुळे आम्हाला या आगीशी खेळावेच लागणार आहे. आगीच्या धोक्याशी सामोरे जावे लागणार आहे. म्हणूनच आपण आगी न लागण्याच्या कारणांची सोय केली पाहिजे. शॉर्टसर्किटचे निमित्त होणार नाही, असे पाहणे गरजेचे आहे. ज्वालाग्राही पदार्थांची सुरक्षितता राखणे गरजेचे आहे. आग हे असे संकट आहे की, ते फस्त केल्यावरच संपते. म्हणून काळजी घेणे आणि सावध राहणे हाच त्यावर उपाय आहे.

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

तेव्हापासून...

 कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७


राजकारण म्हटलं की महत्त्वाकांक्षा आलीच. मग ती तालुक्याच्या राजकारणात सक्रीय असो वा राज्याच्या. अशीच एक महत्त्वाकांक्षा नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही व्यक्त केली. पाटील यांनी एका मुलाखतीत ‘आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं’, असं म्हटलं होतं. अर्थात तो त्या मुलाखतकर्त्याने ‘तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का’ विचारल्यावर त्यांनी ‘हो’ म्हटले. कोणालाही वाटणारच, पण माध्यमांनी मात्र ती फार मोठी महत्त्वाकांक्षा वगैरे असे काही नाही, पण त्यावरून एक हवा निर्माण करण्याची संधी साधली. त्यावर लगेच अजित पवारांना काय वाटते, रोहित पवारांना काय वाटते, विरोधी पक्षाच्या नेत्यांना काय वाटते, मुख्यमंत्र्यांना काय वाटते, अशा प्रतिक्रिया घेण्याचा प्रकार केला तो अत्यंत हास्यास्पद होता. नको इतके महत्त्व त्याला दिले गेले.

शरद पवारांनीही हे कारण नसताना वाढवलेल्या प्रसारमाध्यमांच्या आगाऊपणाला तसेच उत्तरे दिले. शुक्रवारी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्यासंदर्भातील जी इच्छा व्यक्त केली, त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी, त्यात काय झालं? त्यांना शुभेच्छा. उद्या मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटेल, कोणी तसे करणार का? असा उलट प्रश्न पत्रकारांना विचारला. पवारांनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक असणाºया नेत्यांना द्यायचा तो संदेश दिला.


वास्तविक मुख्यमंत्री होण्याची काँग्रेसच्या राजकारणात प्रत्येकाला इच्छा असते. १९८० च्या दशकात तर काँग्रेसचा कोण मुख्यमंत्री केव्हा होईल याचा नेम नसायचा. वरून मनात आले तर कोणालाही लॉटरी लागत होती. त्यामुळे प्रत्येकाला वाटायचे आपणही मुख्यमंत्री होणार. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ मस्त कथा सांगायचे. एका सभेत त्यांनी व्यासपीठावर मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाºया काँग्रेस नेत्यांच्या समोर एक किस्सा सांगितला होता. एक राजा शिकारीला निघालेला असतो. तेव्हा वाटेत एक कुंभार त्याला नमस्कार करतो. ‘महाराज कुठे निघालात’ असे विचारतो. राजा सांगतो, ‘शिकारीला चाललो आहे’. त्यावर तो कुंभार म्हणतो, ‘पण आता पावसाचे चिन्ह आहे, शिकारीला कसे जाणार?’ तेव्हा तो राजा म्हणतो, ‘आमच्या हवामान खात्याने आज बिल्कूल पाऊस पडणार नाही, असे सांगितले आहे. मग तू कसा सांगतोस?’ असे म्हणून राजा जंगलात शिरतो. काही वेळातच ढग जमतात आणि पावसाला सुरुवात होते. राजाला माघारी यावे लागते. तो आश्चर्याने दुसºया दिवशी दरबारात त्या कुंभाराला बोलावून घेतो. ‘आजपासून तुला राज्याचा मुख्य मंत्री करणार आहे. कारण आमच्या एकाही मंत्र्याला पावसाचा अंदाज आला नाही, त्यांची यंत्रणा बरोबर नाही. त्यामुळे तू आजपासून राज्याचा मंत्री’. कुंभार म्हणाला, ‘महाराज आपल्याला त्यातलं काही कळत नाही. पण माझं गाढव आहे. ते पाऊस येणार असेल तर आपले कान हलवते आणि मला समजते’. राजा खूष झाला. त्यानं सांगितलं की, ‘ठीक आहे. मग तुझ्या गाढवालाच मी मुख्य मंत्री बनवतो’ आणि खरोखरच गाढवाला तो राजा मंत्री बनवतो, पण त्यामुळे झाले काय, राज्यातील सगळ्या गाढवांना स्वप्न पडू लागली की आपणही मुख्यमंत्री होणार. बॅ. गाडगीळांनी बस हा किस्सा ऐकवल्यावर उपस्थितांमध्ये हशा यायचाच, पण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सगळे नेतेही खजील व्हायचे, पण आज राष्ट्रवादीत असे स्वप्न पाहिले जात असले तरी ते मूळचे काँग्रेसचे रक्त आहे. त्यामुळे हा किस्सा तिथेही लागू होतो, पण कारण नसताना माध्यमांनी राईचा पर्वत बनवल्याने जयंतरावांना मात्र मनस्ताप झाला असण्याची शक्यता आहे.

खरं तर राजकारणात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाकांक्षा लागते, पण नुसती महत्त्वाकांक्षा नाही तर सतत कर्म करत राहणे महत्त्वाचे असते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७ या गीतेतील श्लोकाप्रमाणे फळाची अपेक्षा न करता जो काम करतो त्याला फळ मिळते. तसे मुख्यमंत्री बनण्यासाठी राष्ट्रवादीत किती उत्सुक आहेत याची गणतीच नाही. या सगळ्यांना आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती. त्यात अजितदादा पवार, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील असे अनेकजण होते. मोहिते-पाटील यांनी पक्ष बदलला असला, तरी राष्ट्रवादीची ही यादी काही कमी झालेली नाही. आता नव्या इच्छुकांच्या यादीत जयंत पाटील, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे असे कितीतरी आहेत, पण हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी कोणत्याही पक्षाला आपले संख्याबळ जास्तीत जास्त वाढवण्याची गरज असते. नाहीतर मग फळाची अपेक्षाच करायची नाही. जे काही पदरात पडते आहे ते गोड मानून काम करायचे तत्त्व असले पाहिजे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी गहिवरून सांगितले होते की, सुरुवातीला सरपंच झालो होतो, पण काँग्रेसने मला सरपंचपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवले. तेव्हापासून राज्यातल्या प्रत्येक सरपंचाला वाटू लागलं होतं की, आपणही कधीतरी मुख्यमंत्री होऊ. त्यामुळे स्वप्न पाहणं वाईट नाही, पण ते पूर्ण होणं मात्र सुप्रिमोंच्या हातात असते, कोणत्या गोष्टीने ते दुखावतील आणि आमटीत पडलेल्या झुरळाप्रमाणे झटकून दूर करतील हे सांगता येत नसते. त्यामुळे असे स्वप्न जरी असले तरी त्याची जाहीर वाच्यता राजकारणात करणेही आजकाल अवघड होऊन बसले आहे.

कलाकारांचे पाठीराखे शिवसेनाप्रमुख



कलाकारांना राजमान्यता असल्याशिवाय आपल्या कलेला काही अर्थ आहे असे वाटत नाही. त्याप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्व कलाकारांना जोपर्यंत आपल्या कलेचे कौतुक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून होत नाही तोपर्यंत त्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत नाही. याचे कारण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कलोपासक होते, कलेचे दर्दी होते. त्यामुळे कायम कलाकारांच्या पाठीशी राहून कला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कलेला राजमान्यता म्हणजे शिवसेनाप्रमुखांनी दिलेली पाठीवर थाप हेच समीकरण गेली ५० वर्षं दिसत होते.


चित्रपटसृष्टीतील सर्वाेच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार, देशातील मानाचा भारतरत्न पुरस्कार मिळवणाºया लता मंगेशकर असल्या काय किंवा लिटील चॅम्प्सचे छोटे कलाकार असोत, सर्वांना शिवसेनाप्रमुखांना आपला पराक्रम दाखवताना आनंद वाटायचा. त्यामुळेच काय होते हे समीकरण? कलाकारांना शिवसेनाप्रमुख आपले का वाटायचे? काय दैवीशक्ती त्यांच्यात होती हे पाहण्यासाठी थोडे मागे जावे लागेल.

             इरावती कर्वे यांची कथा आहे ‘परिपूर्ती’ या नावाची. या कथेत त्या एके ठिकाणी व्यासपीठावर गेलेल्या असताना, त्यांची ओळख थोर विदुषी, लेखिका, विचारवंत अशा अनेक बिरुदावलींनी करून दिली जाते, पण तरीदेखील ही ओळख अपूर्ण आहे असे त्यांना वाटत असते, पण एकदा रस्त्याने त्या जात असताना दोन खेळणारी मुले एकमेकांशी बोलताना ‘अरे ती बघ आमच्या वर्गातल्या मुलाची आई’ अशी इरावतीबार्इंची ओळख करून देतात. आई ही ओळख करून दिल्यानंतर त्यांना आपली ओळख पूर्ण झाली, परिपूर्ती झाली असे वाटते. अगदी त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुखांनी आणि शिवसेनेने कलाकारांची पाठ थोपटली, कौतुक केले की, कलाकारांना परिपूर्ती झाल्यासारखे वाटते. सर्वच कलकार, क्रीडापटूंचे कौतुक हे शिवसेनाप्रमुख करायचे, पण आपण आज फक्त चित्रपट कलावंतांचाच विचार करणार आहोत. पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत किती कलाकारांच्या कलेचे कौतुक शिवसेनाप्रमुखांनी केले याची गणतीच नाही.


             शिवसेनेच्या स्थापनेनंतर फक्त जनतेच्या मदतीसाठी उतरणे हे ध्येय शिवसेनाप्रमुखांनी राखले होते. साधारण १९७० च्या सुरुवातीला मराठी, हिंदी चित्रपटांच्या निर्मितीचे प्रमाण वाढू लागले तसे त्यांच्या समस्याही वाढू लागल्या. अनेक कलाकारांना अडचणी येऊ लागल्या. ‘मोलकरीण’सारखे दर्जेदार चित्रपट काढणारे निर्माते गजानन शिर्के यांनी या गोष्टी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बोलून दाखवल्या. त्यावर उपाय म्हणून चित्रपट कलावंतांच्या अडचणी सोडवण्यासाठी, त्यांना पाठबळ देण्यासाठी शिवसेना चित्रपट शाखा सुरू करण्याचे ठरले. त्याप्रमाणे दादरच्या विष्णू भुवन लॉजवरच्या पहिल्या माळ्यावर १९७० मध्ये चित्रपट शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाचा नारळ फोडण्यासाठी चॉकलेट हीरो देवानंद याला आमंत्रित केले होते. देवानंदच्या हस्ते शिवसेनेच्या चित्रपट शाखेचे उद्घाटन झाले तेव्हा त्यावेळी सर्व चित्रपट निर्माण करणाºया संस्थांना आमंत्रित केले होते. सर्वांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. विशेष म्हणजे गुरुदत्त हा जातीने उपस्थित होता. त्यावेळी सर्व कलाकारांना खूप आनंद झाला होता. साक्षात बाळासाहेब ठाकरे आपल्या पाठिशी असल्यावर आता आपल्या अडचणी संपल्या, हा विश्वास तिथेच कलाकारांना मिळाला. तो शब्द बाळासाहेबांनी कायम पाळला. चित्रपट शाखेचे शाखाप्रमुखपद गजानन शिर्के यांना दिले, तर हे कार्यालय सांभाळण्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी शिवसैनिक सदानंद देऊलकर यांना देण्यात आली आणि या चित्रपट शाखेचा शुभारंभ झाला.

त्यानंतर आसपासच्या सर्व स्टुडिओंनी, रूपतारा, रणजीत स्टुडिओ यांनी आपल्या स्टुडिओत शिवसेना चित्रपट शाखेसाठी कार्यालय सुरू केले आणि या शाखेची वाटचाल वेगाने सुरू झाली. रामदयाल नावाचे एक निर्माते होते. त्यांनी संजय खानला घेऊन ‘हसिनों का देवता’ म्हणून चित्रपटाची निर्मिती सुरू केली होती, पण संजय खान हा चित्रपट तारखा पुढे ढकलून, शूटिंग कॅन्सल करून रखडवत होता. त्यामुळे निर्मात्यांचे पैसे अडकून पडले होते, खर्च वाढत चालला होता. ही गोष्ट रामदयाल यांनी शिवसेनाप्रमुखांच्या कानावर घातली. शिवसेनाप्रमुखांनी तातडीने संजय खानला बोलावून घेतले. आपल्या भाषेत समजावले आणि मार्ग काढून हा चित्रपट पूर्ण केला. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांना शिवसेनेबद्दल आत्मियता वाटू लागली. शिवसेनेकडे गेल्यावर आपली कामे होतात हे लक्षात आल्यामुळे चित्रपट कलावंत सभासद होत गेले. त्यामुळे हे कलाकार कायम बाळासाहेबांसाठी काहीतरी आपण केले पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे कल्याणजी आनंदजी, शंकर जयकिशन अशा कलाकारांनी शिवसेनेचा स्थापना दिवस, शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस, मार्मिकचा वर्धापन दिन अशा निमित्ताने कार्यक्रम करायला सुरुवात केली. शंकर जयकिशन नाइट, कल्याणजी आनंदजी नाइट, आर. डी. बर्मन नाइट, किशोर कुमार नाइट, वैजयंती माला नाइट अशा प्रकारे रफी, मुकेश, आशा भोसले, महेंद्र कपूर असे कलाकार शिवसेनेसाठी उत्साहात कार्यक्रम करू लागले. हे सगळं शिवसेनाप्रमुखांच्या प्रेमापोटी, विश्वासापोटी घडत होते. म्हणजे बाकीच्या राजकीय पक्षांना गर्दी जमवण्यासाठी सिनेकलावंत आणावे लागतात. प्रचारसभांना अभिनेते लागतात, पण शिवसेनेच्या गर्दीचा आणि कामाचा फायदा कलाकार घेत होते. शिवसेनेला गर्दी जमवण्यासाठी कधी कलाकारांची गरज भासली नाही, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हाच एक हुकमी एक्का होता. नाहीतर मनात आणलं असतं तर आख्खं बॉलिवूड शिवसेनाप्रमुखांच्या प्रेमाखातर प्रचाराला उतरले असते, पण तसा कधीही कलाकारांचा फायदा बाळासाहेबांनी घेतला नाही. आपण कलाकारांच्या पाठीशी राहायचे आहे, त्यांची मदत नाही घ्यायची हा फार मोठा विचार होता.


             राजीव गांधींच्या आग्रहाखातर सुपरस्टार अमिताभ बच्चन काँग्रेसमधून इलाहाबाद मतदारसंघातून हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव करून लोकसभेत गेला, पण काँग्रेसने त्याला बोफोर्स प्रकरणात अडकवले. त्यावेळी अमिताभ बच्चन शिवसेनाप्रमुखांना भेटायला आला आणि मदत मागितली. बाळासाहेबांनी फक्त, तू काही केलं नाहीस ना? घाबरू नको. मी तुझ्या पाठीशी आहे, असा विश्वास दिला आणि त्या प्रकरणातून त्याला बाहेर काढले. कलाकारांना कोणत्याही राजकारणाने विटाळता कामा नये हे बाळासाहेबांचे ध्येय होते. १९८२ साली कुलीच्या शूटिंगच्या वेळी अमिताभला अपघात झाला होता तेव्हा सर्वात प्रथम शिवसेनेची अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचली होती. बेंगलोरवरून मुंबईत आल्यावर त्या काळात शिवसेना ब्रीच कँडीपाशी सतत अमिताभसाठी झटत होती. कारण बाळासाहेब हे कलाकारांचे पाठीराखे होते.

१९९२ च्या बॉम्बस्फोटानंतर संजय दत्त अडकला होता. त्याला अटक झाली होती. एक नायक रातोरात खलनायक झाला. त्यावेळी काँग्रेसचे खासदार आणि मंत्री असलेले सुनील दत्त बाळासाहेबांना भेटायला आले. आपण या प्रकरणाने खूप दु:खी असल्याचे सांगितले. त्यावेळी सुनील दत्त यांच्या पाठीवर हात ठेवून शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते की, काळजी करू नको, मी त्याला सोडवतो. त्याप्रमाणे बाळासाहेबांनी संजय दत्तला या प्रकरणातून बाहेर काढले.


             दादा कोंडके यांची शिवसेनाप्रमुखांशी मैत्री आणि सेना प्रेम तर जगजाहीर आहे. पहिलाच चित्रपट ‘सोंगाड्या’ काढल्यावर टॉकीज मिळत नव्हते आणि हिंदी निर्मात्यांनी अडवणूक केली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी कोहिनूर टॉकीजवर केलेले आंदोलन आणि लावलेले ‘सोंगाड्या’चे फलक हा शिवसेनेच्या इतिहासातील फार मोठा अध्याय आहे. १४० आठवडे हा चित्रपट तिथे चालला. त्यानंतर दादा कोंडके अखेरपर्यंत शिवसैनिक म्हणूनच जगले.

‘अलबेला’सारख्या चित्रपटाची निर्मिती करणारे आणि शेकडो चित्रपटांत भूमिका केलेले अभिनेते मास्टर भगवान, पण त्यांचा शेवट फार वाईट झाला. अखेरच्या काळात आर्थिक ओढाताण होती. पैसे नव्हते. तेव्हा त्या काळात बाळासाहेबांनी त्यांना २५ हजार रुपयांची मदत केली होती. आजारपणाचा सगळा औषधोपचाराचा खर्च शिवसेनाप्रमुखांनी केला होता. मुंबईत कलाकार बनायला येणारे कलाकार शिवसेना मुंबईत आहे म्हणून येऊ लागले ते यासाठीच. रणजीत भूतकर म्हणून एक कलाकार होते. त्यांनाही अशीच आर्थिक मदत म्हणून शिवसेनाप्रमुख पगार दिल्याप्रमाणे दरमहा पैसे देत होते. कलाकार जगला पाहिजे हे त्यांचे ध्येय होते. म्हणून ते कलाकारांच्या पाठीशी होते.


भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया ज्यांनी घातला त्या दादासाहेब फाळके यांचीही परिस्थिती फार चांगली नव्हती, पण त्यांचा मुलगा देवदत्त हा मुंबईत अगरबत्ती विकून गुजराण करतो हे समजल्यावर त्याला मानधन सुरू करण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. हा कलाकारांबद्दल असलेला जिव्हाळा फार महत्त्वाचा होता. कलाकारांची कदर कलाकारच करू शकतो. बाळासाहेब स्वत: जातीवंत कलाकार होते. त्यामुळेच ते कायम कलाकारांच्या पाठीशी राहिले.

नाना पळशीकर हे एक ज्येष्ठ कलाकार होते. त्यांनाही त्यांच्या राहत्या घराची काही समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख मदतीसाठी धावले होते. आय. एस. जोहर हा एक विनोदी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक होता. तोही एका प्रकरणात अडकला होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनीच त्याला मदत केली आणि त्यातून सोडवले होते. शिवसेना चित्रपट शाखेच्या माध्यमातून कलाकारांच्या पाठीशी राहण्याचे आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा कलाकारांना विश्वास देणारे शिवसेनाप्रमुख होते. या चित्रपट शाखेचे अध्यक्षपद शाखाप्रमुख म्हणून गजानन शिर्के स्वत: सांभाळत होते. कार्यालय प्रमुख म्हणून सर्व कलाकारांच्या समस्या जाणून त्या शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहोचवण्याचे काम सदानंद देऊलकर करत होते. तशी यंत्रणाच शिवसेनाप्रमुखांनी निर्माण केली होती.


धर्मंेद्र, मनोज कुमार, संजीव कुमार, किशोर कुमार हे तर शिवसेनाप्रमुखांच्या गळ्यातील ताईत होते. त्यांना शिवसेनाप्रमुखांबद्दल प्रचंड प्रेम होते. केवळ अडचणी सोडवण्यासाठीच नाही, तर बाळासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी हे कलाकार आवर्जून येत असत. कलाकारांना शिवसेनाप्रमुखांकडून एक प्रकारची ऊर्जा मिळत असे. आपले सच्चे पाठीराखे ते आहेत हे कलाकारांना वाटत असे. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्याकडे कधीही अपेक्षेने पाहिले नाही. कसलीही अपेक्षा केली नाही. त्याला मदत केली म्हणजे तो आपल्या शिवसेनेसाठी काम करेल, असा विचारही बाळासाहेबांनी केला नाही. फक्त कलाकार म्हणून पाहिले. त्याची जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, प्रांत पाहिला नाही की पक्ष पाहिला नाही. निरपेक्षपणे फक्त त्याच्यातील कलाकार जाणला. नाहीतर सुनील दत्त काँग्रेसचे खासदार, मंत्री होते तरीही त्यांच्यातला कलाकार जाणून मदत केली. अमिताभ बोफोर्समध्ये अडकला तेव्हा काँग्रेसचा खासदार होता, नंतर समाजवादी पार्टीशी जवळीक होती, पण शिवसेनेत या असे आमंत्रण कधी दिले नाही. कलाकारांना मदत केली, त्यांच्या पाठीशी राहिले, पण तुमच्या लोकप्रियतेचा फायदा आमच्या पक्षाला द्या असे कधीच बोलले नाहीत. कारण शिवसेनाप्रमुख हेच इतके मोठे होते की त्यांचा त्यांच्या कामावर विश्वास होता. आपण जिथे जाऊ तिथे गर्दी जमणारच, त्यासाठी कलाकारांना वेठीस धरणे त्यांना मान्य नव्हते.

आत्ताही जे कलाकार शिवसेनेसाठी काम करतात ते स्वयंस्फूर्तीने करतात, पण अन्य पक्षाच्या विचारांचे कलाकार असले तरी त्यांना तितकाच मान शिवसेनेत मिळतो. कारण भेदभाव करणे हे शिवसेनेच्या आणि शिवसेनाप्रमुखांच्या रक्तात नसते. आज आदेश बांदेकर, शरद पोंक्षे, सुशांत शेलार हे तरुण कलाकार पक्षाची जी जबाबदारी घेत आहेत ते स्वयंस्फूर्तीने घेत आहेत. वास्तव कशात आहे, कलाकारांचे पाठीराखे कोण आहेत, हे समजल्यावरच उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत दाखल झाल्या. कारण कलाकारांची कदर करणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख झालेली आहे. आज शिवसेनाप्रमुख नसले तरी कलाकार उद्धव ठाकरे यांना भेटायला जातात आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन येतात. ही परंपरा फार चांगली जपली जात आहे.


शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

एक पाऊल मागे पण...

 जेव्हा हरलेली व्यक्ती हरल्यानंतरही हसते, तेव्हा जिंकलेली व्यक्ती जिंकल्यानंतरही आनंद गमावून बसते.


नव्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशींवर ठाण मांडलेल्या शेतकºयांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने अखेर एक पाऊल मागे घेतले. याबाबत स्वतंत्र समिती नेमून तोडगा निघेपर्यंत तिन्ही कायद्यांना दीड वर्षासाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने बुधवारी शेतकरी संघटनांसमोर ठेवला. तसे प्रतिज्ञापत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याची तयारी केंद्राने दर्शवली. या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले, पण आजवरचा इतिहास पाहता जेव्हा जेव्हा प्यादे एक घर मागे येते तेव्हा तेव्हा नंतर मोठा विजय मिळवल्याचे आपला ईतिहास सांगतो. मोठे युद्ध जिंकण्यासाठी छोटी लढाई हरावी लागते हे तर राजकारणाचे तत्त्व बनले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे जिंकले आहेत, असे म्हणता येणार नाही.


ब्रिटिशांनी जेव्हा १९०५ साली बंगालची फाळणी केली होती तेव्हा संपूर्ण भारतातून लाल-बाल-पाल पेटून उठले होते. लाला लजपत राय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या तिघांनी एकजुटीने लढा देत ब्रिटिशांना नमवले आणि फाळणी मागे घ्यायला लावली होती. ब्रिटिशांचे एक पाऊल मागे आले, पण त्यानंतर त्यांनी मोठे युद्ध जिंकले होते. १९४७ ला पाकिस्तानच्या रूपाने भारताचा मोठा तुकडा तोडला, १९०५ पेक्षा मोठी फाळणी झाली. त्यामुळे एक पाऊल मागे घेतले जाते तेव्हा फार मोठी झेप प्रतिस्पर्ध्याची असते. भारताची फाळणी झाल्यावर पंजाबचा मोठा भाग गेला, बंगालचा भाग पाकिस्तानकडे गेला. महाराष्ट्र आत असल्यामुळे ते शक्य झाले नाही, तरी हैदराबादचा प्रश्न चिघळवला होता.

एक पाऊल मागे घेतल्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे २०१४ ला भारतात मोदीलाट आली होती, त्याचवेळी दुसरी लाट आपची होती. अरविंद केजरीवाल यांनी नवे आव्हान उभे केले होते, पण लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुका झाल्या आणि भाजप सर्वात मोठा पक्ष बनला. आप दोन नंबरचा, तर काँग्रेसचा सुफडा साफ झाला होता. जेमतेम चार आमदार होते, पण भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने आपला पाठिंबा आपला दिला. भाजपच्या हेच फायद्याचे झाले. आपला दिल्लीतच अडकवून ठेवले. त्यासाठी पुन्हा झालेल्या निवडणुकीत भाजपने दुय्यम उमेदवार उभे केले आणि आपला जास्तीत जास्त आमदार निवडून येण्याची संधी दिली. परिणामी केजरीवाल दिल्लीच्या सत्तेत गुंतले. त्यामुळे देशभरात त्यांची लूडबूड थांबली. एक पाऊल मागे घेऊन भाजपने केंद्रातली सत्ता मिळवली होती. त्यामुळेच आज दीड वर्षासाठी सरकार मागे गेले असे वाटत असले, भविष्यात हा कायदा माथी मारलाच जाणार नाही असे नाही. अर्थात तो कायदा संपूर्ण वाईट असेल असेही नाही. कदाचित तो खरोखरच शेतकरी हिताचाही असू शकतो. विरोधासाठी विरोध म्हणून विरोध असू शकतो. त्यामुळे भविष्यात काय घडते याकडे लक्ष द्यावेच लागेल.


आता केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी संघटना यांच्यात बुधवारी विज्ञान भवन येथे झालेली दहावी बैठकही तोडग्याविना संपली, मात्र केंद्राच्या नव्या प्रस्तावावर शुक्रवारी २२ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पुन्हा बैठक होणार आहे. शेतकºयांनी केंद्र सरकारच्या समितीचा प्रस्ताव मान्य केला, तर दीड वर्षासाठी कायद्यांना स्थगिती दिली जाऊ शकते. दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या आंदोलनाला ५६ दिवस झाले असून, केंद्राने पहिल्यांदाच कृषी कायद्यांना स्थगिती देण्याची तयारी शेतकºयांच्या बैठकीत दर्शवली. शेतकरी नेत्यांशी सकारात्मक आणि योग्य दिशेने चर्चा झाली असून, शुक्रवारी होणाºया बैठकीत कदाचित तोडगा निघू शकेल, असा आशावादही तोमर यांनी व्यक्त केला, पण त्यातून नेमके काय साध्य होणार हे समजत नाही. हे कायदे नेमके काय आहेत, त्यात काय म्हटले आहे, याची बाजू आजपर्यंत कोणीच न पडताळता त्याला विरोध केला गेला आहे, असेही दिसते. विरोध करणाºया कितीतरी जणांना विचारले तर या कायद्यात नेमके चुकीचे किंवा बरोबर काय आहे हे सांगा, असे विचारले तर सांगता येत नाही. नेत्यांनी सांगितले म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत, असे म्हणणारेही आहेत. पण आपला शेतकरी सृजनशील आहे. तो आपल्या हिताचा निर्णय घेईल आणि त्यासाठी कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करेल आणि मग निर्णय घेईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

एक छान सुविचार आहे, ‘जेव्हा हरलेली व्यक्ती हरल्यानंतरही हसते, तेव्हा जिंकलेली व्यक्ती जिंकल्यानंतरही आनंद गमावून बसते.’ एक पाऊल मागे याचा अर्थ यशापासून थोडेच दूर आहोत. त्यामुळे आज सरकारने एक पाऊल मागे घेतले असले असे वाटत असले तर सरकार नमले आहे असा अर्थ काढून घेण्यात अर्थ नाही. यात शेतकºयांचे काहीच नुकसान होणार नाही, पण हा विषय घेऊन जे राजकीय पक्ष मैदानात उतरतील त्यांना त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. हा विषय बुमरँगसारखा विरोधी पक्षांच्या अंगावर उलटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण हा कायदा किती जणांनी प्रामाणिकपणे वाचला आहे हे सांगता येणार नाही. त्यात खरोखरच शेतकºयांचे हित असेल आणि आगामी काळात दीड-दोन वर्षांनी भाजपने त्याचा फायदा उठवला तर विरोधक याच मागे आलेल्या पावलामुळे, मागे घेतलेल्या एक प्याद्यामुळे नामोहरम होतील हे लक्षात घेतले पाहिजे.

रिमेक

 


एखादा चित्रपट दुसºया कोणत्यातरी चित्रपटावरून घेतला आहे, असे आपण सहजपणे बोलतो. पण चांगली रंजक कथानके, स्टोरी आपणही करावी, असे निर्माता, कलाकारांना नेहमीच वाटत असते. त्यातून अन्य भाषांतील चित्रपट आपल्या भाषेत आणण्याचे प्रकार सातत्याने होत असतात. मराठी माणसांनी या चित्रपटसृष्टीचा पाया घातला तेव्हा व्ही. शांताराम, प्रभात यांसारख्या कंपन्या एकाचवेळी मराठी आणि हिंदीत चित्रपट बनवत असत, पण कालांतराने प्रत्येक भाषेतील चित्रपटांची खासियत बनली आणि आपल्या मातीतील चित्रपट बनू लागले, पण दुसºया मातीतील कथानके आपल्या मातीत चपखल बनवणे हा प्रकारही जोरात सुरू झाला. त्यामुळे अनेक हॉलिवूडचे चित्रपट बॉलिवूडमध्ये येऊ लागले. अनेक हिंदी चित्रपटांचे रिमेक मराठीत होऊ लागले. तसेच कित्येक मराठी चित्रपटांचे हिंदीतही चित्रपट येत गेले. यातून आमचा रुपेरी पडदा गाजत राहिला आहे.

‘जेम्स बाँड’च्या बाँड पटाचे हॉलिवूडला एकेकाळी वेड लागले होते. त्यामुळे हिंदीत जितेंद्रच्या रूपाने नवा बाँड आणला गेला. ‘फर्ज’ हा त्यातला पहिला चित्रपट होता, पण त्या मालिकेतील दुसरा चित्रपट ‘बाँड 303’ यायला जवळपास २५ वर्षं लागली आणि तोपर्यंत जितेंद्र हा बाँड न राहता कौटुंबिक, पोषाखी, विनोदी, दाक्षिणात्य चित्रपटातील आणि महिलांना आवडणारा चॉकलेट हीरो बनून गेला, पण जेम्स बाँडचे चित्रपट येतच होते. शॉन कॉनरी, रॉजर मूर असे कालानुरूप जेम्स बाँड 007 बदलत गेले, पण चित्रपट येत राहिले. हे सातत्य हिंदी सिनेमाला जमले नाही. त्यानंतर असाच एक बाँड आणला तो १९७९ च्या दरम्यान. कराटे खेळणारा असा ‘गनमास्टर जी 9’च्या रूपाने. गरीबांचा अमिताभ अशी ओळख असलेला मिथुन चक्रवर्ती अवतरला. ‘गनमास्टर जी 9’ या बाँड नेमने त्याने ‘सुरक्षा’, ‘वारदात’ असे काही चित्रपट काढले, पण नंतर तोही दाक्षिणात्य हिंदी चित्रपटात गुंतला आणि आमचा बाँड संपला.


पण विनोदी आणि कौटुंबिक कथानकांचे चित्रपट जसेच्या तसे काढले किंवा त्यांच्या रिमेक केला तर मात्र आमच्याकडे त्याला चांगला प्रतिसाद मिळतो हे सातत्याने दिसून आले आहे. १९८५ साली महेश कोठारे यांनी चित्रपट निर्माता म्हणून पदार्पण केले. त्यापूर्वी बालकलाकार ते कलाकार असा त्यांचा प्रवास झाला होता, पण निर्माता म्हणून त्यांनी धुमधडाक्यात ‘धुमधडाका’ने सुरुवात केली. हा चित्रपट ‘प्यार किये जा’ या १९६६ च्या चित्रपटाची रिमेक होती. यात शशी कपूर, मेहमूद, किशोर कुमार, ओमप्रकाश, मुमताज हे कलाकार होते. तुफान विनोदी चित्रपट म्हणून त्या चित्रपटाला त्या काळात यश मिळाले होते. त्याची वीस वर्षांनी मराठी रिमेक महेश कोठारेंनी केली. ‘धुमधडाका’ या चित्रपटाने लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि महेश कोठारे यांची चांगली भट्टी जमली. याशिवाय निवेदिता, प्रेमा किरण, सुरेखा राणे या नवोदित अभिनेत्री होत्या. शरद तळवलकर यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर या चित्रपटात बाजी मारली होती, पण या चित्रपटाने रिमेकच्या माध्यमातूेन एक यशस्वी निर्माता-दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. त्यानंतर रिमेक करण्याची चटकच महेश कोठारेंना लागली.

महेश कोठारेंनी आपला पुढचा चित्रपट आणला तो ‘सुपर स्नुपर’ या इंग्रजी चित्रपटाची कथा होती. ‘धुमधडाका’चे यश या चित्रपटाला मिळाले नाही, पण हा चित्रपट चांगला चालला, पण त्यानंतर नव्या कथानकाचे चित्रपट काढायला त्यांनी सुरवात केली, मात्र दोन चित्रपट त्यांनी मराठीतून हिंदीत केले. ते डब केले होते, त्यामुळे त्याला रिमेक म्हणता येणार नाही. त्यामध्ये ‘माझा छकुला’ हा चित्रपट ‘मासूम’ म्हणून हिंदीत काढला होता, तर ‘झपाटलेला’ हा तुफान गाजलेला महेश कोठारेपट ‘खिलौना बन गया खलनायक’ या नावाने काढला, पण रिमेकला प्रतिसाद चांगला मिळाला होता.


दादा कोंडके यांनी हिंदीत चित्रपट काढायचा विचार केला तेव्हा त्यांनी आपल्याच मराठी चित्रपट ‘राम राम गंगाराम’ची रिमेक केली होती. नायक दादा, नायिका उषा चव्हाणला घेऊन ‘तेरे मेरे बीच में’ हा ‘राम राम गंगाराम’चा रिमेक बनवला. मराठीतील द्वयर्थी विनोदांची मजा हिंदीत येत नाही हे दादांना समजले होते. तरी विनोदाचा अस्सलपणा आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण त्यांनी ‘मला घेऊन चला’ या चित्रपटाचाही त्यानंतर ‘आगे की सोच’ नावाने रिमेक केला होता.

१९७० च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड असा ठरलेला चित्रपट म्हणजे ‘पिंजरा’. या चित्रपटाचा व्ही. शांताराम यांनीच हिंदीत ‘पिंजडा’ नावाचा चित्रपट केला होता. श्रीराम लागू, संध्या ही प्रमुख भूमिका असलेली पात्रं असली तरी अस्सल बिहारी ग्रामीण भागात जाऊन त्याचे चित्रीकरण करून माधोपूरचे वातावरण तयार केले होते. नीळू फुलेंच्या जागी या चित्रपटात राजा गोसावींना हिंदीत संधी मिळाली होती. मराठी ‘पिंजरा’चे यश हिंदी ‘पिंजरा’ला मिळाले नाही, पण चांगल्या प्रकारे रिमेक केला होता.


१९७० च्या दशकातील उत्तरार्धात आलेल्या ‘सासुरवाशिण’ या मराठी चित्रपटाचा हिंदीत ‘सौ दिन सास के’ नावाने रिमेक झाला होता. मराठीत या चित्रपटात ललिता पवार, निळू फुले, आशा काळे, रंजना, कृष्णकांत दळवी, यशवंत दत्त, अशोक सराफ असे कलाकार होते. ललिता पवार आणि निळू फुले यांच्या खल प्रवृत्तीभोवती फिरणारा हा चित्रपट असल्याने यात रंजनाला थोडा वाव होता. मराठीत हा चित्रपट फत्तेलाल यांनी काढला होता. त्याचा रिमेक हिंदीत बनवताना चंदन सदनाह यांनी ललिता पवार आणि निळू फुले यांना त्याच भूमिका दिल्या होत्या. आशा काळेची भूमिका आशा पारेखने केली होती, तर रंजनाची भूमिका रिना रॉयने केली होती. अन्य भूमिकांत अशोक कुमार, राज बब्बर आदी कलाकार होते. हा चित्रपट मराठी आणि हिंदीतही तुफान गाजला होता.

कथानकं चांगली असतील आणि त्याचा आपल्या भाषेत चपखल प्रयोग केला, तर चांगली रिमेक यशस्वी होते हे चित्रपटसृष्टीने दाखवून दिले आहे. चित्रपटसृष्टीत असे असंख्य चित्रपट या ना त्या चित्रपटावरून बनत असतात. ‘रोझा’, ‘बॉम्बे’सारखे कितीतरी दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत बनले आहेत. ते सातत्याने बनत राहणार. कारण रिमेक म्हणजे पुन: प्रत्ययाचा आनंद असतो.