अंदाधुंद कारभार
कोरोनाच्या
संकटावर मात करत आम्हीत आता अनलॉक होत आहोत, पुनश्च हरिओम करत आहोत अशा
घोषणा करून आता महिना उलटला तरी पुन्हा काही धक्कादायक बातम्या येत आहेत.
मुंबईतला काही भाग, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात
पुन्हा 12 तारखेपर्यंत लॉकडाउन करण्यात आले. त्याचवेळी कोरोनाबाधितांच्या
आकडेवारीत भारताने रशियाला मागे टाकत आता जगात तिसरे स्थान मिळविले आहे.
म्हणजे नक्की आम्ही या रोगावर मात करत आहोत का? ही संख्या का वाढत चालली
आहे? यातून कसे बाहेरड पडणार आहोत अशा अनेक शंकांनी सामान्य माणसाचे मन
त्रस्त झालेले आहे. कधी आमचे जीवन सुरळीत सुरू होणार हा प्रत्येकाला पडलेला
प्रश्न आहे. उलट सुलट बातम्या आणि प्रसारीत होणार्या माहितीने सामान्य
माणूस जाम वैतागला आहे. म्हणजे विकासाच्या मार्गावर आम्ही कधी पहिल्या तीन
क्रमांकात येणार? पण लोकसंख्या वाढ, बेरोजेगारी, दारिद्य्र या पाठोपाठ आता
रोगराईत मात्र आम्ही वरचा क्रमांक पटकन पटकावत आहोत का असा प्रश्न यातून
निर्माण होतो.
आज अमेरिका, ब्राझीलपाठोपाठ सर्वाधिक कोरोनाग्रस्त
भारतात असून, देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याचे दिसून येते.
किंबहुना आरोग्याच्या दृष्टीने अशी आणीबाणीची स्थिती असतानाही सरकारी
पातळीवरील समन्वयाचा असलेला अभाव याला कारणीभूत आहे असेच दिसते. म्हणजे मूळ
दुखणे बाजूलाच पडत असल्याचे पहायला मिळते. साधारण 9 मार्चच्या सुमारास
महाराष्ट्रात पहिल्या रुग्णाची नोंद झ़ाली. रुग्णांची संख्या अधिक
वाढण्याआधीच महाराष्ट्र सरकारकडून सर्वप्रथम लॉकडाउन जाहीर करण्यात आला.
त्याचे निश्चितच फायदे झालेले दिसतात. तथापि, प्रारंभीच्या काळात कोरोनाशी
अत्यंत नेटाने व धीरोदात्तपणे सामना करणार्या सरकारचे नियंत्रण अनलॉकच्या
टप्प्यात काही प्रमाणात का होईना घसरले, असे म्हणावे लागेल.
म्हणजे
एकीकडे कोरोनाला अटकाव आणि दुसरीकडे अर्थचक्राला गती, अशा दोन्ही आघाडयांवर
सरकारला सध्या कसरत करावी लागत आहे. लोकांच्या रोजीरोटीबरोबरच एकूण
अर्थव्यवस्थेच्या पोषणासाठी अनलॉकची प्रक्रिया तशी आवश्यकच होती. परंतु, या
वळणावर कोरोनाविषयीचे गांभीर्यच संपुष्टात येणे, हे घातक म्हणता येईल.
आज
अशाच घातक परिस्थिीतीतून आपण चाललो आहोत. शिथिलतेनंतर आवश्यक काळजी घेऊन
आपले दैनंदिन व्यवहार वा कामे सुरू ठेवणे अपेक्षित असताना लोकांमधील
बेजबाबदारपणा निश्चितच चिंताजनक ठरतो. दुसर्या बाजूला प्रशासकीय
पातळीवरही समन्वयाचा अभाव दिसतो. त्यामुळे कोरोनाबाबत अनेक भागात संभ्रमाची
स्थिती दिसून येते.
महाराष्ट्रातम मुंबईपाठोपाठ पुणे, औरंगाबाद,
जळगावसारख्या शहरांमध्येही कोरोनाची तीव्रता वाढल्याने निर्माण झालेल्या
स्थितीला कसे सामोरे जायचे, याबाबत सुसूत्रता दिसून येत नाही. त्यात
खाटांची वा अत्यावश्यक यंत्रणेची चिंता भेडसावू लागली आहे. खासगी
रुग्णालयांच्या धोरणांमुळे उपचाराअभावी अनेकांना जीव गमवावा लागल्याची
उदाहरणे सापडतात. बहुतांश खासगी रुग्णालये ही आर्थिक शोषणाची केंद्रे बनली
आहेत. परंतु, सरकार कारवाईचा इशारा देण्यापलीकडे काही करत नाही. त्यामुळे
लोकांच्या माथी तीन-पाच लाखांची बिले मारण्याचे उद्योग बिनबोभाट सुरू
दिसतात. कोणत्याही प्रकारची एकवाक्यता शासन प्रशासनात नसल्याने हा
एकप्रकारे अंदाधुंद कारभारच चालला आहे. फक्त आज इतके वाढते, इथे इतके
वाढले, इतके मृत झाले असा क्रिकेटच्या सामन्याती स्कोर सांगावा किंवा
निवडणुकीच्या निकालात कोण पुढे कोणी किती आघाडी घेतली हे सांगावे तसे वर्णन
कोरोनाच्या आकडेवारीचे ऐकायला मिळते आहे. यातून बाहेर पडणार कधी?
आज
कोरोनामुळे औरंगाबादसारख्या औद्योगिकदृष्टया महत्त्वाच्या म्हणून ओळखल्या
जाणाऱया शहरात पुन्हा संचारबंदी लागू करावी लागली. पुणे , पिंपरी
चिंचवडसारख्या शहरात महापौर, नगरसेवकांपासून ते आमदार, माजी आमदारापर्यंत
अनेकजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पिंपरीतील राष्ट्रवादीचे कार्यक्षम नगरसेवक व
माजी विरोधी पक्षनेते म्हणून धडाडीने काम केलेल्या दत्ताकाका साने यांचा
कोरोनाने झालेला मृत्यू हा अत्यंत धक्कादायक असाच आहे. कामगार, मजुरांची
उपासमार होऊ नये म्हणून स्वबळावर अन्नधान्याचे वाटप करणार्या साने यांनी
आपला परिसर कोरोनामुक्त राहावा, याकरिता डोळयात तेल घालून फील्डवर उतरत काम
केले, ते अतुलनीयच. काही डॉक्टर वा वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीही
निश्चितपणे प्रामाणिकपणे व जीव धोक्यात घालून काम करतात. परंतु, या
आघाडीवर केंद्र, राज्यातही म्हणावा तसा संवाद दिसत नाही. परस्परांवर
दोषारोप करण्याऐवजी अशा काळात एकत्र येऊन काम केले, तरच कोरोनाला हरवणे
अधिक सोपे जाणार आहे, हे सेना व भाजप नेतृत्वाने लक्षात घ्यायला पाहिजे.
मुळात अशा काळात कोणतेही राजकारण होणे शोभादायक नाही. मात्र, आघाडी
सरकारमधील पक्ष कोरोनाविरोधात लढण्याऐवजी परस्परांची जिरवण्यात शक्ती खर्च
करत असतील, तर यासाठीच यांना निवडून दिले होते का, असा प्रश्न कोणत्याही
सामान्य माणसाला पडू शकतो. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या
पक्षांमध्ये सुरू असलेले कुरघोडयांचे राजकारण सरकारबाबतच प्रश्नचिन्ह
निर्माण करणारे ठरते. आपल्याला विश्वासात घेऊन निर्णय होत नाहीत, अशी
काँग्रेसची सुरुवातीपासूनच तक्रार आहे. म्हणूनच काँग्रेसशी कुठे संवाद कमी
पडतो, हे सेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी तपासायला हवे. गृह
विभागाने मुंबईतील दहा पोलीस अधिकाऱयांच्या केलेल्या बदल्यांना
मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या स्थगितीनेही दोन पक्षात सारे काही आलबेल
नसल्यावर शिक्कामोर्तब होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे व
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यातील भेट महत्त्वपूर्ण मानावी लागेल.
सध्याचा काळ कसोटीचा व आव्हानात्मक आहे. अशा काळात आघाडी सरकारमधील संवाद व
समन्वयातील उणिवांचा एकूणच या सगळयावर परिणाम संभवतो. आघाडीत सगळं आलबेल
आहे हे फक्त शिवसेनेचे खासदार संजय राउत सांगतात. बाकी कोणीच त्यांच्या
सुरात सूर मिसळत नाही.
एकुणच सगळीकडे केंद्र ते राज्य आणि शासन ते
प्रशासन यांच्यात अंदाधुंद कारभार चालला आहे. कोणाचा कोणाला मेळ नाही.
म्हणजे सरकारमध्ये हे आहे तर आरोग्य विभागात वेगळीच परिस्थिती आहे. भारतीय
वैद्यकीय संशोधन परिषदेने कोरोना लसीसंदर्भात डेडलाईन जाहीर करणे व इंडियन
अकॅडमी ऑफ सायन्सेसकडून ती अव्यवहार्य वा अवास्तव असल्याचे सांगणे, या
बाबीही बरेच काही सांगून जातात. कोरोनाच्या लसीकरिता आज सारे जग झटते आहे.
त्यातील प्रक्रिया, रिझल्ट हे सगळे टप्पे ध्यानात न घेता 15 ऑगस्टला लस
येणार असल्याची घाईघाईने दावेदारी करणे हे अत्यंत अप्रगल्भपणाचे व
सवंगपणाचेच लक्षण आहे. कशात काही नाही, कशाचा कशाला पत्ता नाही अन बाजारात
तुरी अशी अवस्था चालली आहे. त्यांचा दावा खोडण्यासाठी लगेच काँग्रेसचे
नेते पुढे सरसावत आहेत. अरे काय चालले आहे काय? वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व
विरोधकांच्या आक्षेपानंतर भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयानेच हा दावा
खोडून काढला. अर्थात हे बरे झाले कारण लोक आशेवर राहणार नाहीत. लोकांना
आश्वस्त जरूर करावे. पण, वास्तवाचे भान नसेल, तर भ्रमनिरास होतो.
अपेक्षाभंगाचे दु:ख लोकांच्या पदरी पडते. म्हणजे कोरोनाच्या संकटात केंद्र,
राज्य सरकार, जनता, वैद्यकीय यंत्रणा अशा सर्वच घटकांमध्ये जितका समन्वय,
सुसंवाद वा आरोग्यदायी संबंध असतील, तितकी या आजाराशी प्रतिकार करण्याची
आपली शक्ती वाढेल याची जाणीव सर्वांनीच ठेवणे आवश्यक आहे. पण अंदाधुंद आणि
मनमानीच्या कारभाराने, परस्परांना विश्वासात न घेण्याने सगळे मातेरे होत
आहे. आज अनलॉक म्हणायचे आणि दुसरीकडे लॉकडाउन करायचे असे बेबनाव चाललेले
दिसतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा