केंद्र सरकारकडून कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही लॉकडाउनची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम असणार आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आदेशात लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यासोबत ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत निर्बंध शिथील करण्यासंबंधीही सूचना करण्यात आल्या आहेत. नियमांचं कठोरपणे पालन करण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे. परंतु सामान्य माणसांचा विजनवास किंवा नजरकैद काही संपता संपत नाही असेच आहे. म्हणजे आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न पहायचे आणि माणसांना आत्मकेंद्री बनवायचे. आतमध्ये कोंडून घेणे भाग पाडायचे किंवा आत्महत्येला प्रवृत्त करायचे धोरण नाही ना अशी शंका आली तर ती चुकीची नाही.
नव्या आदेशात जुन्या गाइडलाइन्समध्ये बदल करण्यात आलेले नाहीत. पण महत्त्वाचं म्हणजे मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्तराँ सुरु ठेवण्यास मात्र परवानगी नाही. पण होम डिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्तराँ आपलं किचन सुरु ठेऊ शकतात. हे नक्की काय चालले आहे? म्हणजे आमच्याकडे समूह संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो आहे हे आम्ही कबूल करायला घाबरत आहोत का? सरकार गेले चार महिने करत असलेले प्रयत्न कमी पडल्याचे, फसल्याचे दिसत आहे का? चार महिने घरात माणसांना बसवूनही व्हायरस पळून जायला तयार नाही. का व्हायरसला, कोरोनाच्या विषाणूला मोकळेपणाने हिंडता यावे म्हणून माणसांना घरात बसवून ठेवले जात आहे? माणसांनी खिडकीतून रस्त्यावर पहायचे की आता व्हायरस कसा फिरतो आहे पहा. जणू काही सर्कशीत पूूर्वी वाघ सिंहाचे खेळ करताना पिंजरे उभे केले जायचे. मग माणसे तो वाघ सिंहांचा तो खेळ लांबून, पिंजर्याबाहेरून बघायचे. तसेच आता घरात बसून रस्त्यावर न दिसणारा व्हायरस पहावा असे सरकारला वाटते का? आपण जेवढी गर्दी कमी करू तेवढी जागा व्हायरसा पसरायला मिळते आहे असेच वाटते.
आता 1 ऑगस्टपासूनच्या लॉकडाउनमध्ये आऊटडोअर खेळ ज्यामध्ये संघाची गरज नाही असे गोल्फ, फायरिंग रेंज (आऊटडोअर), व्यायामशाळा (आऊटडोअर), टेनिस, बॅडमिंटन (आऊटडोअर) आणि मल्लखंब यांना 5 ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशन अनिवार्य असणार आहे. स्विमिंग पूल सुरु करण्यास मात्र परवानगी नाही. पण घरात लोक संघभावनेने राहतील अशी तरतूद केलेली आहे. घराघरात गर्दी होत आहे, ती चालते पण बाहेर गर्दी करायची नाही. सध्या मोटरसायकलवरून एकानेच प्रवास करायचा. का तर म्हणे सोशल डिस्टन्सिंग. आता एका घरातून बाहेर पडलेले पती पत्नी, बाप लेक जर बाईकवरून गेले तर काय फरक पडतो? घरात तर ते जवळजवळ राहतात. बाईकवरून जातानाच कोरोना कसा काय पकडेल त्यांना? कोरोना पकडेल की नाही हे सांगता येत नाही पण पोलीस मात्र लगेच पावती फाडतात. रस्त्यावरची गर्दी कमी झाल्यामुळे त्यांचाही महसूल असाही कमीच झाला होता. त्यामुळे हा कोरोना टॅक्स वसूल करण्याचा फंडा त्यांनी काढला. पण ही शिक्षा एक महिन्याने वाढली आहे. तारीख पे तारीख तारीख पे तारीख म्हणत फक्त आता वाट पहात बसावी लागत आहे.
अर्थात नव्या लॉकडाउनच्या निर्णयात दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे, हीच फक्त समाधानकार बाब आहे. टॅक्सी, कॅबमध्ये 1 अधिक 3, रिक्षामध्ये 1 अधिक 2, चारचाकीमध्ये 1 अधिक 3 आणि दुचाकीवर दोघांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी मास्क अनिवार्य असणार आहे. अर्थात त्यामुळे थोड्या प्रमाणात तरी सार्वजनिक जीवन सुरू करता येईल अशी अपेक्षा आहे.
1 ऑगस्टपासूनच्या नव्या लॉकडाउनच्या नियमात अत्यावश्यक सेवेची दुकानं ज्यांना याआधीही परवानगी होती ते सुरु राहतील तसंच अनावश्यक सेवेची दुकानं ज्यांना याआधी सुरु ठेवण्याची परवानगी आहे ते सुरु राहतील. अत्यावश्यक तसंच अनावश्यक मार्केट, मार्केट परिसर आणि दुकानांना सकाळी 9 चे संध्याकाळी 7 पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी आहे. मद्य दुकानांना परवानगी असेल तर सुरु ठेऊ शकतात. अत्यावश्यक तसंच अनावश्यक गोष्टींसाठी ई-कॉमर्सला परवानगी असून सध्या सुरु असलेल्या सर्व इंडस्ट्रियल युनिट्सना काम सुरु ठेवण्याची परवानगी आहे.
त्यामुळे थोड्या फार प्रमाणात रोजगार सुरू होईल ही अपेक्षा आहे.
अर्थात एकुणच या चार पाच महिन्याचे परिणाम काय किंवा दुष्परिणाम काय याचा विचार करावा लागेल. साधारण चाळीस वर्षापूर्वी किर्लोस्कर, एमएसईबी कर्मचार्यांचा जेंव्हा संप झाला होता, तेंव्हा त्या संपातील कर्मचार्यांची कुटुंबियांची संख्या वाढली होती. तसा लॉकडाउनचा परिणामही होण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढील वर्षी जन्म घेणार्या बालकांची संख्या सर्वाधिक असेल असे म्हणायला हरकत नाही. एकीकडे सोशल डिस्टन्सिंगमुळे कामे, उत्पादने बंद आणि दुसरीकडे प्रजोत्पादनाचे काम सुरू असला परिणामही पहायला मिळेल यात शंका नाही. संपाच्या काळात मोकळीक मिळाल्याने ज्या मुलांचे जन्म झाले होते त्यांच्याबाबत मित्रमंडळी, बायका चर्चा करताना सांगत असत, हा संपातला मुलगा, ही संपातली मुलगी वगैरे वगैरे. म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असतो तसे लॉकडाउनच्या काळात अनेकांना पाचवा सहावा महिना सध्या लागल्याचेही चित्र आहे. पण या जन्माला येणार्या बालकांच्या सुरक्षेचे आणि मोकळ्या श्वासाचे काय गणित असणार आहे हे मात्र अनुत्तरीतच राहणार आहे. पण कोणाला कितवा महिना लागला यापेक्षा 1 तारखेपासून आता लॉकडाउनला पाचवा महिना लागणार हे नक्की झाले आहे. पाचवा महिना लागल्यावर जास्तच जपावे लागते हे पण लक्षात ठेवावे लागणार आहे. पण आता लवकर सुटका नाही हे नक्की झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा