शनिवार, ११ जुलै, २०२०

सुशांतसिंह आणि शेतकरी


गेल्या तीन आठवड्यांपासून सुशांत सिंह राजपूत याच्या 1आत्महत्येची चर्चा सातत्याने होत आहे. बॉलीवूडमध्ये अर्धवट कारकीर्द झालेला आणि छोट्या पडद्यावर यशस्वी झालेला एक स्ट्रगलर कलाकार ही खरी त्याची ओळख. पण त्याच्या आत्महत्येने एवढ्या चौकशा सध्या सुरू आहेत की संपूर्ण बॉलीवूड त्यासाठी वेठीला धरले आहे. पण आमच्या देशाचा जो पोशिंदा आहे, तो शेतकरी वर्षानुवर्षे आत्महत्या करत आहे, त्याच्या आत्महत्यांचे कारण नेमके काय आहे याचा तपास करण्यासाठी मात्र आम्ही कधीच प्रयत्न केले नाहीत. कर्जबाजारीपणाला कंटाळून, नापिकीला कंटाळून, नैसर्गिक आपत्तीला कंटाळून शेतकर्‍याने आत्महत्या केली असा निष्कर्ष काढून फाईल क्लोज केली गेली. पण कधी ही परिस्थिती का निर्माण झाली? त्यासाठी शासन, प्रशासन कोण दोषी आहे का? याची चौकशी करण्याचा का प्रयत्न केला गेला नाही?
आज सुशांतसिंह आत्महत्या प्रकणी अनेक नावं समोर आली आहेत, ज्यांचा तपास करणं अतिशय गरजेचं आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले होते. त्यासाठी अनेक दिग्गज कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्या चौकशा सुरू झाल्या. सुशांतसिंहने आत्महत्या केली हे वाईटच झाली. पण तो स्वत:चे करीअर करणारा एक कलाकार होता. पण शेतकरी हा अन्नदाता आहे. त्या अन्नदात्याच्या आत्महत्यांची इतकी सखोल चौकशी केली जात नाही. त्याच्या आत्महत्येचीही अनेक कारणे असू शकतात.
सुशांत सिंह प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वक्तव्य होते की पोलीस यामध्ये व्यावसायिक स्पर्धेच्या अनुषंगानेही तपास करतील. आमच्याकडे व्यावसायिक स्पर्धेतून त्यानं आत्महत्या केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यापद्धतीनं पोलीस खातं तपास करत आहे. अनेकांना बोलावून त्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. बॉलिवूडमधील काही निर्माते आणि अभिनेते सुशांतच्या आत्महत्येसाठी जबाबदार आहेत.मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात संजय लीला भन्साली यांची चार तास कसून चौकशी केली. संजय लीला भन्सालीसोबत सुप्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांना त्यांनाही चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. याशिवाय करण जोहरपासून अनेकांची नावे यामुळे चर्चेत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत सुशांत सिंहची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, यशराज फिल्मच्या कास्टिंग डिरेक्टर शानू शर्मा, दिल बेचारा सिनेमाचे दिग्दर्शक मुकेश छाब्रा, सहकलाकार संजना सांघी यासह कुटुंब, मित्रपरिवार, सहकारी मिळून एकूण 28 जणांची पोलीस चौकशी झाली आहे. यामध्ये बॉलीवूडचे मोठमोठे कलाकार वेठीस धरले गेले आहेत. पण जेवढे सुशांतसिंहच्या आत्महत्येला महत्व दिले गेले आहे तेवढे आमच्या आजवर आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांना दिले असते तर शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या. पण शेतकरी हा सामान्य आहे. त्याला चेहरा नाही, तो गरीब आहे, त्याकडे लक्ष द्यावेसे कोणाला वाटत नाही.
आज जर व्यावसायिक स्पर्धा, एखाद्याचे खच्चीकरण करण्याचा हेतु अशा अनेक कारणांनी बॉलीवूडची चौकशी होत असेल तर आमच्या शेतकर्‍यांचे खच्चीकरण करणारे कितीतरी आहेत. त्याप्रत्येकाची चौकशी का केली जात नाही?
शेतकरी आत्महत्यांची कारणे तो कर्जबाजार असणे हे असते. शेतकर्‍यांना कर्ज देण्यास राष्ट्रीयीकृत बँका टाळाटाळ करतात. सरकारने कर्जमाफी दिली तर त्यांचे कर्जमाफ केले जाते पण नवीन कर्ज दिले जात नाही. त्याला बियाणे, खते, शेतीची अवजारे खरेदीसाठीही काही शिल्लक राहात नाही. त्यामुळे कित्येक शेतकर्‍यानी आत्महत्या केल्या आहेत. अशावेळी त्या बँक अधिकारी, प्रशासन यांना चौकशीला बोलावण्याचे आदेश सरकार का देत नाही? लगेच फाईल कशी काय क्लोज होते?
 कधी नापीकी, कधी अवकाळी, कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांवर शेती चालते. कधी बोंडआळी, कधी कसले रोग पडून पिकेच्या पिके नष्ट होतात. अशा परिस्थितीत योग्य पंचनामे केले जात नाहीत. विमा कंपन्या शेतकर्‍यांना योग्य भरपाई देत नाहीत. अशावेळी या विमा कंपन्यांची चौकशी का केली जात नाही? त्यांना कोर्टात खेचण्याचे, पोलीसांकडून चौकशी करण्याचे आदेश आमचे गृहखाते का देत नाही? कारण यामध्ये सरकार, मंत्री यांना प्रसिद्धी मिळत नाही. शेतकर्‍याला चेहरा नाही, त्यामुळे त्याची प्रसिद्धी आमची प्रसारमाध्यमे, वाहिन्या देत नाहीत. इथे गॉसिंपींग करायला संधी नाही. त्यामुळे चर्चेत राहता येत नाही. साहजीकच शेतकरी मेला काय जगला काय सरकारला त्याचे ना सोयर  ना सुतक. त्याच्या आत्महत्यांची चौकशी सुशांतसिंग सारखी केली जात नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे राजकारण फक्त निवडणुका जिंकण्यासाठी केले जाते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्या होणे हे राजकारण्यांच्या फायद्याचे असते. ही टाळूवरचे लोणी खाण्याची प्रवृत्ती आपल्या राजकारणात असल्याने सुशांतसिंगसारखी चौकशी शेतकरी आत्महत्यांची होत नाही.
गावात कोणतेही नापीकी, अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळ असे नैसर्गिक संकट आले तर त्याचे पंचनामे केले जातात. पण हे पंचनामे कसे केले जातात हे जगजाहीर आहे. त्यात कसलाही पारदर्शकपणा नसतो. बांधावर न जाता, पाहणी न करताच अनेकवेळा पंचनामे केले जातात. ज्याला खरी झळ बसली आहे त्याला मदत मिळेलच याची खात्री कोणीच देउ शकत नाही. यात कोण माझा, कोण दुसर्‍याचा असा अपपरभाव केला जातो. त्यात राजकीय गटबाजी उतू जाते. त्यामुळे शेतकर्‍याला न्याय मिळत नाही. म्हणूनच ज्याप्रकारे सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलीवूडची चौकशी सुरू आहे तशाचप्रकारे बॅका, विमा कंपन्या, महसूल कर्मचारी, गावातील स्थानिक नेते, सरपंच यांची चौकशी कधी आत्महत्येनंतर होत नाही. ती करण्याचे काम सरकारने केले तर शेतकरी आत्महत्या कमी होतील हे नक्की.
आजकाल टीआरपीचा जमाना आहे. ज्यावर चर्चा होते, लोकांना मसालेदार ऐकायला, पहायला मिळते त्याकडेच लक्ष देण्याची माध्यमांमध्ये प्रवृत्ती वाढीस लागली आहे. ही एकप्रकारची विकृतीच आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्येनंतर बहुतेक वाहिन्यांनी टॉक शो घेतले, त्यावर चर्चा घडवल्या, अनेकांच्या मुलाखती घेतल्या. पण कधी शेतकरी आत्महत्या हा विषय घेउन कोणतीही वाहीनी त्याच्या कारणांचा शोध घेताना दिसत नाही. हे फारच वाईट आहे. सरकारला तेच हवे आहे कारण  या चर्चांमध्ये सामान्य नागरिक गुंतून महत्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे असे बॉलीवूडचे विषय चघळायला सोडले जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: