दिलासादायक परिस्थिती
गेल्या
दोन दिवसापासून पावसाला सुरूवात झालेली आहे. ग्रामीण भागातही पावसाने
हजेरी लावल्याने आनंदाचे वातावरण आहे. लॉकडाउनमुळे आलेले औदासिन्य, नाराजी
आता या पावसाच्या आगमनाने थोडी कमी झाल्याचे दिसत आहे. सध्या आपली भिस्त
पूर्णपणे पावसावर आहे. पावसाने दिलासा दिल्याने शेतीचे उत्पन्न चांगले होईल
असा विश्वास या महिनाभरात मिळाला आहे. साहजिकच दु:खात सुख म्हणतात तसे
याठिकाणी दिसून येते आहे.
आपल्या देशातील 80 ते 90 शेती, उद्योग, सेवा
यांसह जवळपास सर्वच क्षेत्रांवर मान्सून प्रभाव टाकतो. त्यामुळे प्रत्यक्ष व
अप्रत्यक्षपणे मान्सून देशाच्या अर्थकारणवरही परिणाम करीत असतो. त्या
अर्थी मान्सूनला देशाच्या अर्थव्यवस्थेचा वा ग्रामीण अर्थकारणाचा कणाच आहे.
कधी नव्हे ते यावर्षी हवामानखात्याचा किंवा स्कायमेटचा अंदाज बरोबर
आल्याचे दिसते आहे. कारण जूनमधील मान्सूनची कामगिरी पाहता नक्कीच
अर्थकारणाच्या दृष्टीने फलदायी वातावरण मानता येईल. जून ते सप्टेंबर हा चार
महिन्यांचा कालावधी हा मान्सून कालावधी समजला जातो. यात जून महिन्यात
मान्सूनचे आगमन व सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. या
दोन महिन्यांमध्ये पावसात बरेच चढ-उतार होतात. त्यामुळे जुलै, ऑगस्ट
महिन्यातील पाऊस महत्त्वपूर्ण मानला जातो. यावर्षी कोरोनाने झटका दिलेला
असताना आपली अर्थव्यवस्था आज फक्त शेतीवर अवलंबून असणार आहे. कारण उद्योग
आणि कामगार जगतात एकुणच लॉकडाउनमुळे मंदी आहे. त्यामुळे शेती चांगली होणे
हेच आजचे स्वप्न असणार आहे. गेल्या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावली.
यंदाही पाऊस सरासरीपेक्षा अधिक असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने
वर्तविला आहे. त्यामुळे यावर्षी कृषीक्षेत्राकडूनच आपल्याला उभारी मिळणे
अपेक्षित आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नैर्त्रुत्य
मोसमी वारे अर्थात मान्सून यंदा सरासरीइतका राहणार आहे. यात वायव्य भारत
सरासरीच्या 107, मध्य भारत 103, दक्षिण भारत 102, तर पूर्वोत्तर भारतात 96
टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय जुलै, ऑगस्ट महिन्यात
पाऊसही जोरदार राहणार असल्याचा दुसरा दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान
विभागाने वर्तविला आहे. सरासरीच्या तुलनेन देशात यंदा 102 टक्के पाऊस
राहणार असून, यात चार टक्के कमी-अधिकची शक्यता गृहित धरण्यात आली आहे, तर
वायव्य भारत सरासरीच्या 107, मध्य भारत 103, दक्षिण भारत 102, तर
पूर्वोत्तर भारतात 96 टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात आठ
टक्के कमी-अधिकची शक्यता आहे. याचा विचार करता संपूर्ण पावसाचा कालावधी हा
चांगला असेल. त्यामुळे पावसामुळे आपल्याला कृषीक्षेत्राकडे सकारात्मकतेने
आशेने पाहता येईल.
यावर्षी मान्सून 1 जूनला केरळात दाखल झाला. त्यानंतर
वेगाने तो देशभर पसरला. 12 दिवस आधीच त्याने देश व्यापला. 26 जूनला तर
मान्सूनने संपूर्ण देश व्यापला. 1 जून ते 30 जून या एक महिन्याचा आढावा
घेतला असता देशात सरासरीच्या 17 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात तो समाधानकारक झालेला आहे. अर्थात मानसूनच आगमनाला वादळाचे
ग्रहण लागले तो भाग वेगळा. पण त्याने आपली हजेरी वेळेवर लावून एकप्रकारे
दिलासा दिला होता. सर्वसाधारणपणे जून महिन्यात पावसाचा खंड जास्त असतो.
तसेच तो सरासरीही कमी गाठतो. यंदा मात्र पावसाचा खंडही तुलनेत कमी राहिला
तसेच त्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. देशात जून महिन्यात 166.9
मिमी इतका होतो, यंदा मात्र 196.2 मिमी इतका पाऊस झाला आहे.
देशात
आतापर्यंत मध्यप्रदेश, सिक्कीम तसेच बिहार राज्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे.
तसेच महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मेघालय,
आसाम, जम्मू काश्मीर, अंदमान-निकोबार बेटे येथे अतिरिक्त पावसाची नोंद झाली
आहे. स्वाभाविकच देशातील अकरा राज्यांमध्ये जादा पाऊस झाल्याची आकडेवारी
सांगते. त्यामुळे आपल्यावरचे जलसंकट आता टळले आहे असे म्हणता येईल.
आसामसारख्या राज्यात पावसाने दाखवलेले रौद्ररूप, ब्रम्हपुत्रेचा पूर यामुळे
येथील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. पण ते आता नित्याचेच झालेले
आहे.
देशाच्या अर्थकारणात व कृषी अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र, उत्तर
प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात यांसारख्या राज्यांचा सहभाग मोठा आहे. मुख्य
म्हणजे कृषी उत्पादनात अग्रेसर असलेल्या या राज्यांमध्ये पेरण्यांची
स्थितीही चांगली आहे. चालू वर्षी पेरण्याही गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट
झाल्या आहेत. त्यामुळे कृषीक्षेत्रावकडूनच यावर्षी जास्त अपेक्षा ठेवाव्या
लागणार आहेत. लॉकडाउनमुळे अनेक नोकरदारवर्ग शेतीकडे वळल्याचेही दिसत आहे.
त्यामुळे काही जणांना हा पाउस तारक ठरला आहे. अर्थात शेतीसाठी एकूणच पोषक
स्थिती असली, तरी या ना त्या माध्यमातून अनेक अरिष्टांतून सातत्याने शेती
व्यवसायाला जावे लागते. कोरडा वा ओला दुष्काळ या संकटांबरोबरच कीड वा विविध
रोगांशी सामना करावा लागतो. ही संकटे यावर्षी लांबच राहोत हीच अपेक्षा आता
करावी लागेल. पण पावसाने दिलेली साथ ही दिलासादायक आहे हे नक्की.
आज
संपूर्ण जगाला कोरोनाने घेरलेले असताना सगळ्यांच्या अथर्ंव्यवस्था डबघाईला
आलेल्या आहेत. आपली शेती ही पावसावर अवलंबून असणारी असल्याने शेतीसाठी
वरदान ठरणारा पाउस पडावा हीच अपेक्षा सामान्य माणसाची आहे. त्यामुळे शेतकरी
आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेचा तारक ठरणार आहे. त्याला या पावसाची
चांगलीच मदत होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा