सध्या भारत चीन तणावाचे वातावरण आहे. त्या वातावरणात अंतर्गत राजकीय युद्धही पेटले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना दोन पातळींवर लढावे लागत आहे. एक चीनी शत्रूला रोखायचे आणि दुसरे अंतर्गत टीकाकार असलेले काँग्रेसला रोखायचे. अर्थात मोदी जास्तीत जास्त काँग्रेसला टाळत आहेत. पण तरीही यामुळे देशात राजकारण तापले आहे. नुकतेच चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या 59 ऍपवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा योग्य आहे यात शंकाच नाही. पूर्व लडाखमधील गलवान खोऱयात मागच्या 15 दिवसांपूर्वी चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. परंतु, चीनच्या ताबारेषेवरील कारवाया अद्यापही सुरूच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सीमेवरील संघर्षाबरोबरच अन्य माध्यमातूनही लढण्याच्या दृष्टीने उचललेले हे डिजिटल पाऊल आवश्यकच म्हणावे लागेल. या काळात आपण देशांतर्गत चीनी अॅपवर बंदी घालत आहोत तसेच चीनची पाठराखण करणार्या राजकीय नेते, पक्ष यांच्यावरही बंदी घालायला पाहिजे. मोठा शत्रू रोखायचा असेल तर आधी स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त करायचा असतो. छत्रपतींच्या रणनीतीतील हा फार मोठा विचार आहे. आज पंतप्रधान मोदींनी तेच करण्याची गरज आहे.
भारत आणि चीन या दोन राष्ट्रांमधील संबंध हे बव्हंशी तणावाचे व परस्परांविषयी संशयाचेच राहिलेले आहेत. एकीकडे दोस्तीचे नाटक करायचे आणि दुसरीकडे कुरापती काढायच्या, हा चीनचा पूर्वापार विशेष. त्यातूनच ‘हिंदी-चिनी भाई भाई’ची साखरपेरणी करीत 1962 मध्ये चीनकडून भारतावर युद्ध लादण्यात आले. त्यानंतरही या ना त्या माध्यमातून डॅगन खोडयाच करीत राहिला. पण अजूनही काँग्रेसला चीन आपला भाई वाटतो आहे. त्यावर देशाचे मोठे नेते शरद पवार यांनीही काँग्रेसचे कान उपटले आहेत. ही वेळ सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची आहे हे त्यांनी सांगितले. पण त्यावर आता काँग्रेसची भूमिका नितीन राउत यांनी घेउन शरद पवारांवर टीका केली. नितीन राउत यांना अजून राज्यातील वीजेचा प्रश्न, वीज बिलाचा घोळ मिटवता आला नाही ते शरद पवारांवर बोलतात आणि चीन भारतावर बोलतात हाच विनोद आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा भारत दौरा, गुजरात भेट व पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची झोपाळयावरील सुहास्यवदनी छायाचित्रे तेव्हा कितीही आश्वासक वाटली, तरी त्याने केवळ झुलवण्याचेच काम केले, असेच आता म्हणावे लागेल. सरतेशेवटी पुन्हा एकदा डॅगनने आपले विषारी दात दाखवून दिले आहेत. माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी चीन हाच भारताचा शत्रू क्रमांक एक असल्याचे विधान केले होते. मुळात चीन हे अत्यंत महत्त्वाकांक्षी राष्ट्र असून, सहा देशांची जमीन आत्तापर्यंत ड्रगनने गिळंकृत केली आहे. अमेरिकेशी स्पर्धा करणाऱया या राष्ट्राला आशिया वा हिंदी महासागरावर वर्चस्व हवे आहेच. शिवाय जगभर आपला प्रभाव निर्माण करण्याचा ड्रगनचा मनुसबा आहे. तथापि, कोरोनाचा जन्मदाता देश व या विषाणू व तत्सम बाबींसंदर्भातील संदेहामुळे जगातील बहुतेक राष्ट्रे आज चीनसंदर्भात काहीसा सावध पवित्रा बाळगून आहेत. स्वाभाविकच गुंतवणुकीसह चीनच्या अर्थकारणाला मोठा तडा गेल्याचे दिसून येते. हा तडाखा चीनच्या व्यापारी प्रभावाला छेद देऊ शकेल. चीनला धक्का देण्याच्या दृष्टीने भारताने घेतलेली भूमिकाही महत्त्वपूर्ण आहे. पण सरकारच्या पाठीशी न राहता काँग्रेस चीनला योग्य वातावरण तयार करत आहे हे दुर्दैव आहे. देशभक्ती आणि स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस सहभागी होती असा दावा करणारी हीच ती काँग्रेस आहे का?
आज भारतात 40 कोटीपेक्षा जास्त स्मार्ट फोन यूसर्ज आहेत. यातील जवळपास 30 कोटी यूजर्सच्या मोबाईलमध्ये चीयनीज ऍप्लिकेशन्स आहेत. मात्र, हे ऍप देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धोकादायक ठरत असतील, तर त्यांच्यावर फुली मारून सरकारने संबंधितांना योग्य तो संदेश दिला आहे. पण त्या अॅपवर बंदी घातल्याचे दु:ख चीनपेक्षा काँग्रेसलाच जास्त झाले आहे असे दिसते. कारण अशा धोरणांवर टीका करताना काँग्रेसने चीनी कंपन्यांकडून पंतप्रधान निधीला कुठून पैसे आले आणि कोणी मदत केली हे मुद्दे उकरत आहे. सीमेवर शत्रू बंदूक रोखून बसला असताना असे सरकारला लक्ष करणे हे काँग्रेसचे दुष्कृत्यच म्हणावे लागेल.
सरकारी धोरण काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे. चीनविषयी भारतीयांच्या मनात नकारात्मक मानसिकता निर्माण झाली, तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यात या देशाला भोगावे लागू शकतात. बंदी घालण्यात आलेल्या ऍपमध्ये टिकटॉकसह शेअर इट, यूसी ब्राउजर, वंडर कॅमेरा अशा ऍपचा समावेश आहे. यातील सर्वच ऍप सगळे वापरत असतील, अशातला भाग नाही. तरीदेखील टिकटॉकसारख्या काही ऍपने निश्चितपणे भारतीयांच्या मनावर गारूड घातल्याचे दिसून येते. परंतु, कोणत्याही माध्यमाचा गैरवापर होत असेल, तर त्यातून खासगी माहिती चोरली जात असेल, तर त्यातील वरपांगी ग्लॅमरवर भाळून चालणार नाही. मागच्या काही दिवसात चिनी हॅकर्सकडून मोठया प्रमाणात भारतात सायबर हल्ले घडविल्याचेही निदर्शनास आले आहे. म्हणूनच चीनपासून डिजिटलदृष्टयाही सावधानता बाळगावी लागेल. अशा परिस्थितीत सरकारने घातलेली ही बंदी योग्य असताना त्याला राजकीय रंग देण्याचे पाप आता काँग्रेसने करू नये.
चीनच्या आर्थिक आणि डिजीटल नाड्या आवळणे गरजेचे आहे. भविष्यात यापेक्षाही कडक पावले उचलण्याकरिता आपण तयार रहायला हवे. पुढच्या काही दिवसात कदाचित अमेरिकेकडून चीनवर डिजिटल निर्बंध घातले जाण्याची चिन्हे आहेत. चीनसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार 95 अब्ज अमेरिकन डॉलरच्या आसपास असून, त्यात चीनचा वाटा मोठा आहे. चीनचे नस्ते उद्योग कायम राहिल्यास नक्कीच त्याचा परिणाम व्यापार उदिमावर संभवतो. तसे झाल्यास भारतापेक्षा चीनला त्याची सर्वाधिक झळ बसेल, हे निश्चित. आज भारतीय बाजारपेठा चीन वस्तूंनी व्यापल्या आहेत. त्यावर बहिष्कार टाकून चीनला जेरीस आणण्याची योग्य निती सरकार अवलंबत असताना विनाकारण विरोध करून काँग्रेसने स्वत:ची नाचक्की करून घेउ नये. आपण राजकीय आणि विरोधी पक्ष आहोत. याचा अर्थ प्रत्येक गोष्टीला विरोध करणे आवश्यक नाही. हा राजकीय दुरूपयोग आहे हे काँ्रग्रेसने लक्षात घेतले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा