बुधवार, १५ जुलै, २०२०

अजून पर्याय खुले आहेत...


   शिवसेना खासदार संजय राउत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुलाखत घेतल्यानंतर भाजप राष्ट्रवादीच्या संबंधांचे अनेक कंगोेरे समोर आले. म्हणजे शिवसेनेचा काँग्रेस राष्ट्रवादीबरोबरचा हनीमून पिरीअड कोरोनात अडकला असताना राष्ट्रवादी आणि भाजपचे अनैतिक संबंध समोर येत आहेत असे दिसते. म्हणजे या संबंधात कोणी कोणाला शुकशुक केले, कोणी कुणाला लाईन दिली नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले असले तरी जुळवायचा प्रयत्न झाला हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे हे पर्याय दोघांकडून इथून पुढेही खुले असतील यात शंका नाही.
 म्हणजे काही दिवसांपूर्वी राजकीय विश्लेषक राजू परूळेकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत स्वाभाविकपणे फडणवीसांना विधानसभा निवडणुकीतील सत्ता स्थापनेच्या डावपेचांसंदर्भात प्रश्न विचारले गेले. पवार असो वा फडणवीस त्यांना प्रत्येक मुलाखतीत राज्यातील सत्ता स्थापना, पहाटे घेतलेली शपथ, विस्कटलेला डाव या प्रश्नांना आता सतत सामोर जावे लागणारच. या प्रत्येकवेळी नवनवे गौप्यस्फोट होत राहणारच. परुळेकरांना दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी काही गौप्यस्फोट केले. योग्य वेळ आल्यावर याचं उत्तर निश्चितपणे देऊ, असं म्हणून पूर्वी टाळलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी या मुलाखतीत दिली. पण याच उत्तरानंतर इतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ वाढवण्यासाठी शरद पवारांनीही काही नरो वा कुंजरोवा बोलून दोन्ही दगडावरचे आपले पाय भक्कम केले. याचा स्पष्ट अर्थ आहे की, भाजप बरोबर आपण जाणार नाही हे शरद पवारांनी कधीही नाकारलेले नाही. या मुलाखतीतील उत्तरानंतर त्यातले नेमके मर्म रामदास आठवले यांनी ओळखले आणि त्यांनी पवारांना एनडीएत येण्याचे आमंत्रण दिले. याचा नेमका अर्थ समजून घेतला पाहिजे. म्हणजे संजय राउत यांना कदाचित वाटले असेल की शरद पवार आपल्याच बरोबर आहेत. पण पवार हे फक्त स्वत:चे असतात. ते शिवसेनेचे कधीच होणार नाहीत.  
    महाराष्ट्रात गेल्या वर्षी 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यांचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. राज्यात भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 तर काँग्रेसला 44 जागांवर विजय मिळवता आला होता. भाजप-सेना युती करून निवडणूक लढलेले असूनही मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांचं बिनसलं. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचा पाठिंबा मिळवून 23 नोव्हेंबर रोजी सरकारही स्थापन केलं. पण हे सरकार अवघ्या 80 तासांचं ठरलं.
राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजप सोबत येण्यासाठी थेट शरद पवारांनीच ऑफर दिली होती, असं फडणवीस यांनी परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटल होतं. तर पवार यांनी मागे एका मुलाखतीत म्हटलं होतं, मोदींनीच त्यांना ऑफर दिली होती, पण आपण ती विनम्रपणे नाकारल्याचं पवारांनी म्हटलं होतं. शरद पवारांनी सत्तास्थापनेची ऑफर दिली, मग निर्णय बदलल्याने अजित पवार नाराज झाले आणि ते आपल्या बरोबर आले असे फडणवीस यांचे म्हणणे होते. त्यामुळे दोन्ही मुलाखतींमध्ये एकाच घटनेबाबत दोन्ही नेत्यांची दोन वेगवेगळ्या टोकांची विसंगत विधानं पाहिल्यास, यात कोण खरं बोलतंय, हे अजून तरी स्पष्ट नसल्याचं दिसून येईल. पण वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले गेले असले तरी हा विवाह ठरवण्याचे प्रयत्न झाले होते हे नक्की. आता तो कशामुळे मोडला, हुंडा, मानपानात मोडला की मुलगी पसंत नव्हती का नवरा बरोबर नव्हता हा भाग वेगळा. पण लग्न ठरवण्याचा प्रयत्न झाला हे दोघांच्याही बोलण्यावरून नक्की होते.
   परुळेकरांच्या मुलाखतीत फडणवीसांनी म्हटलं, ज्यावेळी शिवसेना सोबत येत नाही, हे आमच्या लक्षात आलं, तेव्हा आमच्यासमोर कोणते पर्याय असू शकतील, याचा आम्ही विचार केला. त्यातल्या एका पर्यायात आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. म्हणजे अजित पवार नाही...थेट राष्ट्रवादी. यातील थेट राष्ट्रवादी म्हणजे अर्थातच शरद पवार.
फडणवीस म्हणतात की, यासंदर्भात योग्य त्या चर्चादेखील झाल्या होत्या. एका चर्चेत मी होतो. एकात मी नव्हतो. एकदम टोकाच्या चर्चा ज्या व्हायला पाहिजेत, त्या लेव्हलच्या सगळ्या चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी (शरद पवार) आपली भूमिका बदलली आणि आम्ही कॉर्नर झालो. आम्ही शांत बसलो होतो. पण यातील हे सगळे मुद्दे राउत याना दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी वेगळ्या प्रकारे अप्रत्यक्ष कबूल केले आहेत. ते म्हणजे, चर्चा करण्यासाठी फडणवीस महत्वाचे नव्हते. त्या वरीष्ट पातळीवरून होत होत्या. फडणवीस यांचे एका चर्चेत मी नव्हतो म्हणणे आणि चर्चेत सहभागी करून घेण्यासाठी फडणवीस महत्वाचे नव्हते हे पवारांनी म्हणणे यात चर्चा झाली हे तर नक्की आहेच. अर्थात या चर्चा सत्तास्थापनेच्या होत्या. नाहीतर निवडणुका झाल्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काही बेटीरोटीचे व्यवहार करायला किंवा शिळोप्याच्या गप्पा मारायला जमणार नव्हते. पण तरीही शरद पवारांनी भाजपपेक्षा शिवसेनेला का पसंती दिली हा प्रश्न आहे. त्यामागचे कारण भाजपकडे केंद्रीय सत्ता आहे, भाजपच्या नेत्यांना पाच वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळण्याचा अनुभव आहे. त्या तुलनेत शिवसेना अनुभवी नाही. त्यामुळे शिवसेना कायम आपल्यावर अवलंबून राहिल, सत्तेचा रिमोट आपल्याकडे राहील, त्याचा फायदा पुढच्या पाच वर्षात उठवता येईल हे अगदी स्पष्ट गणित शरद पवारांचे होते. त्यामुळेच सेना भाजप यांचे जुळू न देणे हे शरद पवारांचे ध्येय होते. ते त्यांनी पूर्ण केले.
   फडणवीस यांच्या मते, दोन तीन दिवस असे होते की, आम्ही मनातून हे सरकार आपलं नसेल असं ठरवून टाकलं होतं. त्या तीन-चार दिवसांत कुठलीच कृती आम्ही केली नाही. पण त्या तीन-चार दिवसांनंतर अजित पवारांकडून आम्हाला फिलर आला. आमची त्यांच्याशी चर्चा झाली. ते म्हणाले, मला हे मान्य नाही. जे शरद पवारांनी आधी सांगितलं होतं, त्यानुसार स्थिर सरकार भाजप आणि राष्ट्रवादीच देऊ शकतं, असं माझं आजही स्पष्ट मत आहे. पण जर पवारसाहेब शब्दावरून आता बदलत असतील, तर हे तीन पक्षांचं सरकार चालू शकत नाही, असं मला वाटतं. यातून राज्याचं नुकसान होईल. म्हणून तुमच्यासोबत सरकार बनवायला मी तयार आहे. अर्थात हे अजित पवारांनीही नाकारलेले नव्हते. त्यामुळे जरी हे सरकार गडगडले तरी भाजप राष्ट्रवादी आणखी एक पर्याय राज्यात तयार होउ शकतो हे दोन्ही मुलाखतीतील वास्तव संजय राउत यांच्या लक्षात आले नसेल असे नाही.  म्हणजे, 28 नोव्हेंबर 2019 ला ठाकरे सरकारचा शपथविधी झाला आणि त्यानंतर या सरकारचे शिल्पकार म्हणून शरद पवारांचं कौतुक सगळ्याच वाहिन्यांवर सुरू होतं. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर पहिली मुलाखत शरद पवारांनी दिली. यात अजित पवारांचं बंड, भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थापन यांसारख्या विषयांवर पवारांनी स्पष्टीकरण दिलं होतं. आपल्या मुलाखतीत पवार म्हणतात, नरेंद्र मोदी यांना मी बर्‍याच दिवसांपूर्वी वेळ मागितली होती. त्यांनी वेळ दिली. कदाचित मोदींच्या कार्यालयाची ही इच्छा असावी, यामुळे माझ्याबद्दल गैरसमज वाढायला मदत होईल. मला काही चिंता नव्हती. मी विदर्भात अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान पाहण्यासाठी दौरा करून आलो होतो. अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारने मदत करण्याची आवश्यकता आहे, हे मला त्यांच्या लक्षात आणून द्यायचं होतं. म्हणून मी वेळ मागितली होती. ती मिळाली. त्यांना मी त्यासंदर्भात पत्र दिलं आणि परिस्थिती सांगितली. ती बैठक संपल्यानंतर मी उठायला लागलो तेव्हा पीएम म्हणाले की, आपण एकत्र येऊन काम केलं तर मला आनंद होईल. मी म्हटलं आपले व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत, ते राहतील. पण एकत्र काम करणं राजकीयदृष्ट्या मला शक्य नाही. मी म्हटलं राष्ट्रीय प्रश्न आले तर विरोधासाठी विरोध करणार नाही. त्यासाठी आम्ही नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊ. त्याची चिंता करू नका. पण एकत्रित काम करणं मला शक्य नाही. पण काही असले तरी सत्ता स्थापनेबाबत दोन्ही पक्षात चर्चा झालेल्या होत्या आणि त्या इथून पुढेही चालू राहतील हेही लक्षात घेतले पाहिजे. या मुलाखतीतून मुख्यमंत्र्याची कार्यपद्धती आदेश देण्याची आहे, ती सतत सहन नाही झाली तर हा पर्याय असू शकतो असा इशारा त्यांनी दिला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: