गणेशोत्सव सार्वजनिक कशासाठी केला गेला तर जनजागृतीसाठी केला. त्यामुळे या उद्देशाचे खर्या अर्थाने पालन लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने केलेले दिसते. त्यामुळे त्याला लालबागचा नाही तर खरा राजा म्हणावे लागेल. खरं म्हणजे गणेशोत्सव हे समाज जागृतीचे माध्यम आहे ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची शिकवण आहे. त्या अगोदर गणेशोत्सव हा फक्त घरगुती सण होता. पण माणसांना एकत्रित करून जनजागृती करण्यासाठी हा सण धार्मिक आहे, सार्वजनिक आहे हे भासवून इंग्रजांना चकवा देण्याचा तो प्रयत्न होता. पण आज माणसंच संघटीत करायची नाहीत, सोशल डिस्टन्स राखायचे आहे तर गणेशोत्सवाचे कारणच काय? त्यामुळे हा उत्सव वेगळ्या प्रकारे राबवण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच चांगला आहे. कोरोनाचे संकट आणि भक्तांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी मूर्तीच न बसविण्याचा आणि उत्सव साजरा न करण्याचा निर्णय तसा धाडसी होता. पण, तो घेतानाच यावर्षी रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेशन कॅम्प घेऊन गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा आरोग्यदायी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या आरोग्यगणेशाचा संकल्प फार महत्वाचा आहे. कारण कोरोना युद्धातील हुतात्मा पोलीस, डॉक्टर आरोग्य कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांचा योग्य मान-सन्मान आणि हातभार लावण्यास मंडळ प्रथम प्राधान्य देणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री निधीलाही मंडळ 25 लाख रु. देऊ करणार आहे. हा निर्णय घेणारे लालबाग परळ परिसरातील कोळी बांधव हे या मंडळाचे कार्यकर्ते आहेत. त्याअर्थाने मुंबईच्या मूळ रहिवाशांचा हा स्तुत्य निर्णय आहे. इथले मूळवासी असलेले कोळी आगरी बांधव हे अत्यंत पुरोगामी विचारसरणीचे आहेत आणि त्यांनी एक चांगला आदर्श समाजापुढेच नाही तर देशापुढे घातला आहे. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे आधी केले मग सांगितले हे फार महत्वाचे असते. इतर धर्मिय किंवा भाषिकांच्या सणांना होणारी गर्दी रोखा अशी मागणी करण्यापूर्वी आपली गर्दी कमी करणे आणि तसे करून दाखवणे फार महत्वाचे असते. पण लालबागच्या राजाने ते करून दाखवले.
त्यामुळे यावर्षी गणरायाची आकर्षक भव्य मूर्ती आणि त्याच्या दर्शनाला येऊन नवस बोलणारे सेलिब्रिटी आणि पर्यायाने होणारी गर्दी याला चाप बसणार आहे. काही वर्षांपूर्वी या मंडळावर काही माध्यमांनी खूप टीका केली होती. या मंडळाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे कारण नसताना वाभाडे काढण्याचे प्रयत्न केले होते. अगदी न्यायालयापर्यंत या बाबी गेल्या होत्या. पण हे मंडळ काय करू शकते, लालबागचा राजा जनहितासाठी काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. लालबागच्या राजाचे दर्शन मिळावे म्हणून आत्तापर्यंत अनेकांनी गैरप्रकार केले होते. त्याच्या बातम्या वाहिन्यांवर दाखवून अनेकांनी आपला टीआरपी वाढवून घेतला होता. पण आता त्याच वाहिन्या या रक्तदान, प्लाझ्मादानाच्या बातम्या किती आपुलकीने दाखवतात हे पहावे लागेल.
उत्सव काळात लालबागच्या राजाच्या गणेशाचे दर्शन होण्यासाठी रांगेतून 24 ते 40 तासही दर्शनाला लागू शकतात. त्यातून प्रचंड गर्दीत कधी माध्यम प्रतिनिधी तर कधी पोलिसांशी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मतभेद होतात. लालबागचा राजा अशा प्रकारे कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहतो. या गणरायाचा हात सदैव आशीर्वादासाठी उंचावलेला आहे. दूरदूरहूनही त्याचे दर्शन होते. अरुंद अशा एका गल्लीत असलेल्या या जगप्रसिद्ध गणरायाला अगदी जवळून पाहण्यासाठी आणि त्याच्या अवाढव्य पायाजवळ माथा टेकण्यासाठी भल्याभल्यांची चढाओढ लागलेली असते. या गर्दीला आवरणे तसे अवघड काम असते. पण मंडळाचे कार्यकर्ते ते काम एखादे शिवधनुष्य पेलावे तसे उचलतात आणि कोणताही गैरप्रकार न होता करतात. काही हौशे, गवशे नवशे याचा गैरफायदाही उठवायचा प्रयत्न करतात. पण, याच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे कौतुकास्पद कार्य केले आहे. दारात केवळ दर्शनासाठी लाखोंची रीघ असते त्या मंडळाने मूर्तीच न बसविण्याचा निर्णय घेतला हे फार धाडसाचे आणि पुरोगामीपणाचे लक्षण आहे. अगदी आषाढी एकादशीच्या दिवशी हा निर्णय घेतला त्याला खूपच महत्त्व आहे. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची संस्कृती. लाखोंच्या संख्येने येणारे हे सांस्कृतिक वैभव यावर्षी दिसले नाही. वारकर्यांनी वारी न करण्याचा निर्णय घेतला. वारीच्या या परंपरेला वारकरी सांप्रदायाने कोरोनामुळे मुरड घातली. विविध फडांच्या प्रमुखांनीही या संकटाचे गांभीर्य जाणून पालखी न काढण्याचा आणि पायी वारी न करण्याचा निर्णय घेतला आणि तो तंतोतंत अमलात आणला. ही अनुकरणाची वारी लालबागच्या राजाने केली. यावर्षी सर्वधर्मियांनी आपल्या उत्सवाला, समारंभाला मुरड घातली असताना गर्दी होणार्या लालबागच्या राजाला असा निर्णय घेण्याची ईच्छा झाली हे फार महत्वाचे क्रांतीकारक पाउल आहे. मार्चपासून आपल्याकडे लॉकडाउन आहे. दरवर्षी 14 एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही चैत्यभूमीवर लाखोंचा भीमसागर लोटतो. यावर्षी आंबेडकरी समुदायाने जे सामंजस्य दाखवले त्याचेही विशेष कौतुक आहे. त्यामुळे सर्वांनी एकप्रकारे आपल्या मुंबईचे, महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. धर्मो रक्षती रक्षित: असे तत्व यातून दिसत आहे. तसे पाहता गणेशोत्सव साजरा करायचा नाही असे आवाहन करणे सोपे नव्हते. प्रथम मूर्तीचा आकार कमी करण्याचे सुचवले गेले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यात निर्णय होत गेले. वास्तविक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी गणेशोत्सव मर्यादीत प्रमाणात साजरा करा असे सांगणे अवघड होते. त्यांनी यापूर्वीच एक भावनिक आवाहन करताना गणेशोत्सवात चार फुटांपेक्षा अधिक उंचीची मूर्ती बसवू नये. दोनपेक्षा जास्त कार्यकर्ते मूर्ती उचलण्यासाठी लागू नयेत असा निर्णय घेऊन भाविकांबरोबरच कार्यकर्त्यांच्या जीविताचीही काळजी घेण्याचे आवाहन केले होते. गणेशोत्सव ही मराठी अस्मिता. सरकार शिवसेनेचे असताना मराठी सण करायचा नाही हे सांगणे तसे क्लेशदायक होते. पण त्यांनी मनावर दगड ठेवत असे आवाहन केले आणि त्याला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लालबागच्या राजाने जो निर्णय घेतला त्यामुळे मुंबई प्रमाणेच पुणे येथेही त्याचा प्रभाव जाणवणार आहे. गणेशोत्सवाच्या या विधायकतेला प्रोत्साहन दिले तर अनेक बाबतीत बदल घडेल इतकी लोकशक्ती या उत्सवात आजही आहे. ज्यांच्यावर टीका होते त्या कार्यकर्त्यांचीही एक वैचारिकता आहे आणि त्या वैचारिकतेचा सन्मान हा झालाच पाहिजे. लालबागच्या राजाने आज जाणत्या राजाची भूमिका वठवली आहे. आमचा जाणता राजा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय. त्यांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात झालेला हा निर्णय छत्रपतींची प्रतिष्ठा वाढवणारा आहे. त्यामुळे राजाने राजाचा सन्मान केला असेच म्हणावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा