शनिवार, ११ जुलै, २०२०

भयावह परिस्थिती


कोरोनावर औषध लवकर मिळाले नाही तर 2021 मध्ये भारतात दररोज अडीच लाख लोकांना कोरोना होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. अर्थात सध्या वीस ते बावीस हजारांच्या संख्येने होणारी ही वाढ येत्या चार पाच महिन्यात दहापट वाढणार हे नक्की झालेले आहे.
   आता कोरोनाचा धोका जगाला कळला त्याला आता सहा महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे कोरोनबाबत आता रोज नवनवी माहिती पुढे येताना दिसत आहे. त्यामुळेच आता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या संक्रमणाबाबत आजवर जे सांगितले आहे, त्याहून हे संक्रमण अधिक जटिल असल्याचे जगाला एव्हाना जाणवू लागले आहे. नुकतेच 32 देशांतील 239 वैज्ञानिकांनी जागतिक आरोग्य संघटनेला खुले पत्र लिहून कोरोना हा हवेतल्या हवेत देखील संक्रमित होऊ शकतो असा दावा केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे विषाणू हे बाधित व्यक्तीचे खोकणे, शिंकणे, बोलणे यावेळी एक - दीड मीटर अंतरापर्यंतच्या पृष्ठभागावर उसळणार्या तुषारांतून पसरतात असे आजवर सांगितले होते. ‘दो गज दूरी’चा आग्रह त्यासाठीच धरला गेला. हे सामाजिक अंतर पाळणार्यांच्या, वारंवार हात धुणार्यांच्या आणि मास्क वापरणार्यांच्या वाटेला कोरोना जाणार नाही असे जागतिक आरोग्य संघटना सांगत आली. मात्र, कोरोनाचे विषाणू हे हवेतल्या हवेत तरंगत राहू शकतात आणि खोलीभर पसरलेले असू शकतात आणि श्वसनावाटेही ते इतरांच्या शरीरात प्रवेश करू शकतात असे वरील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा दररोज अडीच लाख रूग्णांचा दिलेला संभाव्य अंदाज हा खरा असू शकतो. अर्थात, जागतिक आरोग्य संघटनेला अद्याप हे मान्य नाही, परंतु कोरोनाचा ज्या प्रचंड प्रमाणात फैलाव जगभरात झाला आहे, तो पाहता ही शक्यताही अगदीच झटकून टाकता येत नाही. खरोखरच हवेतल्या हवेत संक्रमण जर होत असेल तर ते अधिक चिंताजनक ठरेल व त्यापासून बचावही तितकाच दुरापास्त ठरेल हेही तितकेच खरे आहे.
 गुरूवारी हा भारतात दररोज अडीच लाख रूग्णांची भर 2021 मध्ये पडेल हा दिलेला अंदाज तर भयानक आहेच. पण भारताला संपवण्याचे हे धोरण असू शकते. कारण कोरोनाचा निर्माता चीन आहे. बुधवारीच चीनने कोरोनाचा भयानक टप्पा अजून जगाला पहायचा आहे असे म्हटले होते. त्यामुळे हे अत्यंत धोकादायक चित्र आता तयार होत आहे.
कोरोनासंदर्भात आणखी एक गोष्ट लक्षात आली आहे ती म्हणजे जे लोक यातून बरे होतात, त्यापैकी अनेकांची गंधसंवेदनाच कायमची नाहीशी झालेली दिसून आली आहे. त्यांना कसला वासच येत नाही. याला इंग्रजीत ‘ऍनॉस्मिया’ असे म्हणतात. कोरोनाबाबत असे अधिकाधिक आकलन दिवसेंदिवस जगाला होऊ लागले आहे. त्याचा नायनाट करणे मात्र अद्यापही शक्य झालेले नाही. त्यामुळे दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेने जपानच्या हिरोशिमावर टाकलेल्या अणूबाँम्बपेक्षा हा कोरोना बाँम्ब अत्यंत धोकादायक आणि भयानक आहे असे दिसते. अण्वस्त्र शांत करणे शक्य होते पण हे जैविक, विषाणूचे अस्त्र थांबवणे आता चीनलाही अशक्य झालेले दिसते.
नुकत्याच भारतामध्ये त्यावरील लस विकसित होत असल्याच्या व आयसीएमआरने त्यासाठी 15 ऑगस्टची मुदत दिलेली असल्याच्या बातम्या आल्या. केंद्र सरकारच्याच विज्ञान मंत्रालयाने मात्र ही लस 2021 पर्यंत येणे शक्य नसल्याचे म्हटले. त्यावरून वाद उसळला. एखादी लस प्रत्यक्षात वापरात आणण्यापूर्वी ज्या विविध प्रक्रिया असतात, त्या पूर्ण न करताच ती आणण्याची घाई करणे घातक ठरू शकते. लाल फितीची प्रक्रिया टाळणे इथपर्यंत ठीक, परंतु पंधरा ऑगस्टचा आयसीएमआरचा आग्रह निव्वळ राजकीय कारणांखातर असेल तर ते गैर आहे. त्यामुळे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतात नेमके काय असणार आहे याबाबत प्रश्नचिन्ह आहे. भारतामध्ये सध्या सात लाखांपेक्षा जास्त  कोरोनाबाधित आहेत. दिवसाला त्यात नव्या पंचवीस हजारांची भर पडणे हे काही चांगले चिन्ह नव्हे. वीस हजार लोकांचा आजवर बळी गेला आहे. कोरोनाचा फैलाव वाढत राहील. मग तो शिखर गाठेल आणि नंतर हळूहळू त्याचे प्रमाण खाली खाली येत जाईल असे अंदाज संख्याशास्त्रज्ञांनी वर्तवलेले होते. परंतु तसे काही घडताना दिसून येत नाही. कोरोनाचा चढता आलेख चढताच राहिला आहे. संख्याशास्त्रीय अनुमाने वैद्यकीय गोष्टींमध्ये बरोबर ठरतातच असे नाही.
आज देशात सर्वात जास्त कोरोनाचा प्रसार महाराष्ट्रात झालेला आहे. महाराष्ट्र आणि मुंबई ही देशाची फार मोठी शक्ती आहे. मुंबई ही तर देशाची आर्थिक राजधानीच आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात झालेली रूग्णांची वाढ ही सहजासहजी किंवा योगायोग नाही. भारताला संपवण्यासाठी अगोदर महाराष्ट्र आणि मुंबई संपवावी लागेल हे चीनने ओळखले होते. त्यामुळे बरोबर त्याचा सर्वाधिक प्रसार हा मुंबई आणि त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत झालेला आहे. हा काही योगायोग नाही. हे हेतुपुरस्सर केलेले कारस्थान असू शकते. आता नव्या अंदाजाप्रमाणे जर 2021 मध्ये रोज अडीच लाखाने वाढ होत गेली तर भारताला विकासकामांऐवजी फक्त लॉकडाउन आणि आरोग्यसेवांकडेच लक्ष देण्याची वेळ येईल. एखाद्या घरात जर आजारपण लागलं तर ते त्या घराला उद्धवस्त करते. कर्जबाजार करते. तशी अवस्था देशाची होण्याची भिती आहे. देशापुढचे हे फार मोठे आव्हान असेल. अशा परिस्थिीतीत आपण घाबरून घरात बसायचे, कोरोनाशी लढायचे, लॉकडाउन व्हायचे की नेमके काय करायचे? म्हणजे देशातील निम्मी माणसे कोरोनामुळे आणि निम्मी माणसे उपासमार, रोजगार गेल्याने मरतील हे चित्र समोर दिसते आहे. अमेरिकेला हे अगोदरच माहिती असावे म्हणूनच तर कदाचित ती जागतीक आरोग्य संघटनेतून बाहेर पडून स्वत:चे अंग काढून घेत आहे. चीनचा विरोध वगैरे अमेरिकेचे थोंतांड असू शकते. भारतात ज्याप्रकारे या रोगाची वाढ होते आहे त्यावरून हा देश भविष्यात खूप अडचणीत येणार हे त्यांनी ओळखले असावे. म्हणूनच आता मरायचेच असेल तर लढून मरू, बाहेर पडून मरू असा निर्धार करण्याची गरज आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: