शनिवार, २५ जुलै, २०२०
लीव्ह अँड रिलेशनशीप सध्या राजकारणात होणार्या युती किंवा आघाड्या म्हणजे लीव्ह अँड रिलेशनशीपचा विवाह असतो तसाच प्रकार आहे. किंबहुना अनेक ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार असले तरी तिथे लिव्ह अँड रिलेशनशिपचाच प्रकार असतो. त्यामुळे आता नितीमत्तेचे, निष्ठेचे राजकारण आणि सत्ताकारण बघायला मिळणे अवघड झाले आहे. फक्त सोयीचे राजकारण या प्रकाराने सरकार बनत आहेत. राज्याचा कारभार प्रशासन आपोआप चालवत असते. राज्यकर्त्यांचा संबंध फक्त पदाशी निगडीत असतो. त्यामुळे आजची सरकारे ही लिव्ह अँड रिलेशनशिपची अमेरिकन विचारसरणीची आधुनिक झाली आहेत. म्हणजे लग्नानंतर पतीपत्नीचे जसे शारीरीक संबंध असतात तसे ठेवायचे पण तेही सुरक्षित ठेवायचे. कारण मुलंबाळं झाली तर त्यांची देखभाल, शिशू असली जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे विकासकामांची मुले नाही झाली तरी चालतील फक्त एकत्र येउन मजा घेउ असा कारभार दिसतो.आता महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे नेमका संसार कुणाचा चालला आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. पण ही रिलेशनशीप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचीच आहे. काँग्रेसला फक्त रुसण्यापुरते या संबंधात घेतलेले आहे. त्यांच्याकडून कोणी काही अपेक्षा करत नाही. हे वर्षानुवर्ष चालले आहे. मागच्या पाच वर्षात तेच पहायला मिळाले होते. तत्कालीन राज्यातील युती - आघाडी सरकारला यामुळेच अनेक निर्णय घेता आलेले नव्हते. इथे युती आणि आघाडी असा उल्लेख करण्याचे कारण, सुरुवातीला राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध केलेले आणि सव्वा महिन्याने शिवसेनेशी पुन्हा घरोबा करून आपला मंत्रिमंडळाचा विस्तार करून युती तयार झालेली होती. त्यामुळे ते ना धड आघाडीच्या विचाराचे सरकार होतेे, ना युतीच्या अशी अवस्था होती. अतिशय दिमाखदारपणे वानखेडे स्टेडियमवर फडणवीस आणि त्यांच्या मंडळाने अभूतपूर्व सोहळा साजरा करून शपथ घेतली. ही शपथ घेताना त्यांच्यासोबत शिवसेना नव्हती. केवळ 123 एवढया अल्पमतावर राज्यपालांनी भाजपला सत्तेत येण्याचे आमंत्रण दिले. त्यामुळे सरकार बनले. तेव्हा 22 आमदार त्यांना कमी पडले होते. 123 या संख्येवरच सरकार बनले. पण, या 123 आमदारांमध्ये 27 आमदार हे आयात केलेले होते. भाजपमध्ये असलेल्या या 27 संधीसाधूंमध्ये राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपमध्ये घुसून आमदार झालेले 16 नेते होते. तसेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाऊन आमदारपद मिळवणारे 11 संधीसाधू होते. अर्थात हे सगळे लिव्ह अँड रिलेशनशिपमध्येच होते. कारण त्यापैकी पुन्हा अनेकजण मागे गेले. त्यामुळे फडणवीसांचे नुसते अल्पमताचे सरकार नव्हते, तर ते सोयीचे सरकार होते. कारण शास्त्रोक्त पद्धतीने विवाह सोहळा न करता लिव्ह अँड रिलेशनशिपचा प्रयोग त्यांनी केला होता. लग्नाची बायको कुरकुरते आणि नंतर सामोपचाराने घेतेही. पण फडणवीसांच्या काळातील युती ही लिव्ह अँड रिलेशनशिप असल्यामुळे शिवसेनेचे आमदार म्हणे सतत राजीनामाच खिशात ठेवून होते. ही घटस्फोटासाठी केलेली युती राज्याला काय देउन गेली? अर्थात सोय ही सर्वच पक्ष आणि नेत्यांची सवय असते, सामान्य माणसांची गैरसोयच होत असते. पण एकुणच देशभरात अशा लिव्ह अँड रिलेशनशिपच्या सरकारचा फाँर्म्युला हिट होत आहे ही दुर्दैवाची बाब आहे. म्हणजे जनतेच्या मनात दु:ख याचेच असते. कोणत्याही आईबापाला आपल्या मुलीने नीट रितसर विवाह करून संसार करावा अशी अपेक्षा असते. ती आज याच्याबरोबर उद्या त्याच्याबरोबर राहिली तर त्या आईबापाला किती क्लेश होतील? तेच दु:ख आज या मायबाप जनतेला भोगावे लागते आहे. म्हणजे राज्यात असलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सरकारचा फॉर्म्युला नेमका काय आहे? कोणत्या मुद्द्यांवर हे लोक एकत्र आले? आज शरद पवार शिवसेेनेला दिलेल्या मुलाखतीतून शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री आदेश देतात, ती पद्धती आम्हाला आवडत नाही असे जाहीरपणे सांगतात, काँग्रेसचे नेते शिवसेना आम्हाला विश्वासात घेत नाही म्हणतात, काँग्रेस आमदारांची कामे शिवसेनेचे मंत्री करत नाहीत म्हणून जाहीर बोलतात, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय, अचानक केलेल्या बदल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री रद्द करतात. हे नेमके काय दर्शवते? केवळ आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि आम्ही सत्तेत वाटेकरी असलो पाहिजे म्हणून एकत्र आलेली ही लिव्ह अँड रिलेशनशिप तशी कुचकामीच. कारण वाटेकरी म्हणजे शोषणकते असतात, सत्तेतील वाटेकरी हा शब्दच भयानक आहे. पूर्वी जनसेवक, लोकसेवक, लोकनेते म्हणून लोक सत्तेत सहभागी होत होते. आता वाटेकरी आले आहेत. हा राजकारणात येत असलेला प्रकार अत्यंत हिडीस आहे.अर्थात हे काही फक्त महाराष्ट्रात घडते आहे असे नाही, संपूर्ण देशात घडते आहे.मेहबुबा मुफ्तीबरोबर भाजपने जम्मू कश्मिरमध्ये केलेली युती हा त्यातलाचा प्रकार होता. लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर केलेली नितिशकुमार यांची बिहारमधील आघाडी किती दिवस टिकली? कर्नाटकात काँग्रेस जनता दल कोणत्या हेतुने एकत्र आले? गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. अशी मोडून खाण्यासाठी बनलेली सरकारे राज्याचा किंवा देशाचा विकास कसा काय करतील? काँग्रेसची जिथे सत्ता आहे किंवा होती तिथेही काही फारशी वेगळी परिस्थिती नव्हती. फरक इतकाच की त्यांना कोणाशी लिव्ह अँड रिलेशनशिप ठेवायची वेळ आली नाही कारण त्यांच्या पक्षातच इतके भयानक सोयरे संबंध असतात की नवा जोडीदार शोधायची गरज नाही. याचे कारण काँग्रेस हा एक पक्ष असला तरी तो गटातटांचा पक्ष आहे. दोन गट विशिष्ठ हेतुने एकत्र आले की अंतर्गत युती आघाडी तयार होते. त्या गटांचे नाही पटले की फुटतात ते लगेच. मध्यप्रदेशात कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांनी दणका दिलाच ना? आज राजस्थानातही तेच घडते आहे. सचिन पायलट यांनी गेहलोत यांना दणका दिला. ही सगळी लीव्ह अँड रिलेशनशिप असते. लिव्ह अँड रिलेशनशिपच्या संसारात प्रेम ही भावना नसते. फक्त स्वार्थ महत्वाचा असतो. मला काय मिळणार? माझ्या पदरात काय मिळणार? माझा वाटा किती? माझी टक्केवारी किती? यातून काही उरले तर जनहित. पण असे उरेपर्यंत सगळे संपलेले असते. औटघटकेचे राज्य करायचे आणि नंतर वार्यावर सोडून द्यायचे यालाच तर आजची लोकशाही म्हणतात.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा