शिवसेना खासदार संजय राउत यांनी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवारांची मॅरेथॉन मुलाखत घेतली आणि एक शरद बाकी सगळे गारद असे बिंबवण्याचा प्रयत्न केला. पण यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते म्हणजे शरद पवारांना संजय राउत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्थान देउ पहात आहेत का? त्यांना महत्व देउन आपले नेते उद्धव ठाकरे यांचे महत्व कमी करत आहेत का? तसेच या मुलाखतीत पवारांनी दिलेली उत्तरे मार्मिक असली तरी ती त्यांच्या कृतीशी विसंगत अशीच दिसून येतात.
आजवर अशा मॅरेथॉन मुलाखती संजय राउत हे सामनामधून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची घेत होते. त्यावेळी सामनाचे अंक शिल्लक रहात नसत. पण गेल्या सात आठ वर्षात अशी कोणतीही संधी त्यांना करता आली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्या फार घेतल्या नाहीत. त्यामुळे राज्याला आकर्षण वाटेल शी मुलाखत घेण्यासाठी संजय राउत यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. यावरून शिवसेनाप्रमुखांची जागा मुख्यमंत्री किंवा शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे कधीच घेउ शकत नाहीत असेच त्यांना अधोरेखीत करायचे आहे काय असे वाटते. त्यासाठी महाराष्ट्राचे शिवसेनाप्रमुखांनंतरचे प्रभावी नेते शरद पवारच आहेत हे बिंबवण्याचा प्रयत्न मोठ्या कौशल्याने केला.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजपाला साथ दिली नसती तर भाजपाला राज्यात केवळ 40 ते 50 जागा मिळवता आल्या असत्या असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुलाखतीत व्यक्त केलं आहे. भाजपाला राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या 105 जागांवर विजय मिळवला आहे त्यामध्ये शिवसेनेचं फार मोठं योगदान असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं आहे. या उत्तरातून स्पष्ट होते की शरद पवार हे शिवसेनेला खूपच जपत होते. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांचे सातत्याने कौतुक करत होते. उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत होते. शिवसेनेशी खूपच सलगी करत होते. भाजपला 105 जागा शिवसेनेमुळे मिळाल्या असे वक्तव्य करून त्यांनी टाकलेला गुगली संजय राउत यांना कितपत समजला हे माहिती नाही पण 2014 ला शिवसेना बरोबर नसताना आणि शिवसेना भाजप विरोधात लढलेली असताना भाजपला 123 जागा मिळाल्या होत्या. शिवसेना सोबत आल्यावर भाजपचे संख्याबळ कमीच झाले हे जनतेकडून येणारे उत्तर शरद पवारांनी अचूकपणे काढून घेतले आणि संजय राउत यांना अप्रत्यक्ष दणका दिला आहे. शिवसेना बरोबर होती म्हणून 105 जागा आल्या ती विरोधात लढली असती भाजपच्या जास्त जागा आल्या असत्या हे त्या वाक्याचे उत्तरार्ध होते. म्हणजे शरद पवारांनी पूर्णपणे भाजपला नाकारलेले नाही. पण उत्तरातील विसंगती दाखवून संजय राउत आणि शरद पवार दोघांनाही भाजपवर टीका करणे जमलेले नाही.
लोकशाहीमध्ये 105 जागा असणारा प्रमुख पक्ष राज्यात सरकार स्थापन करु शकला नाही. यासंदर्भात तुमचं काय मत आहे, असा प्रश्न राऊत यांनी शरद पवारांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना माझं स्पष्ट मत आहे, 105 हा जो आकडा आहे त्यामध्ये शिवसेनेचं योगदान फार मोठं होतं. त्यामध्ये शिवसेना सहभागी नसती. किंवा शिवसेनेला त्यामधून वजा केलं तर तो 105 जागांचा आकडा 40-50 च्या आसपास असता. अर्थात शरद पवार हे खूपच हुशार आहेत. महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय पक्षाला आघाडीत असताना साठ ते पासष्टच्या वर आकडा गाठता आलेला नाही. शंभरी ओलांडता आलेली नाही. 50 पेक्षा जास्त वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या शरद पवारांनी काढली त्यांनाही आजपर्यंत 60 च्या आसपासच आमदार निवडून आणता आले आहेत. स्वबळावर शरद पवार जिथे 100 आमदार निवडून आणू शकत नाहीत तिथे भाजपचे 105 आणि 2014 ला 123 आमदार कसे काय निवडून येतात? हा फार मोठा राजकीय धक्काच आहे त्यांच्या दृष्टीने. म्हणजे महाराष्ट्रातला मतदार लोकशाही मानणारा आहे असे या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, ते खरंच आहे. त्यांनी फक्त भाजप या पक्षालाच आत्तापर्यत 100 च्या पुढे जाउ दिले असे दिसते. काँग्रेस एक असताना गोष्ट वेगळी होती. पण गेल्या 30 वर्षात आघाडीचे राजकारण आणिक्षह सत्ताकारण सुरू झाल्यानंतर भाजप सोडून कोणालाही शंभरी पार करणे शक्य झालेले नाही. ही शरद पवारांची चिंता आहे, भिती आहे की आश्चर्य आहे? या आश्चर्यापोटीच कदाचित त्यांनी भाजपला न मागता पाठिंबा 2014 ला दिला होता काय? आपले काका शरद पवार अशीच भूमिका घेतील असे वाटून 23 नोव्हेंबरला त्यांचे पुतणे अजित पवार यांनी चुपचाप रात्रीत भाजप बरोबर जाउन शपथ घेतली होती का? हे सगळे अनाकलनीय आहे. भाजप हा गृहीत धरणारा पक्ष आहे हे एकवेळ मान्य करता येईल. पण शरद पवारांशिवाय राज्यात कोणतेही सरकार स्थापन होउ शकत नाही हे महाराष्ट्राने कायम गृहीत धरलेले आहे. मागच्या पाच वर्षात भाजपचे सरकार आले होते तेही शरद पवारांनी न मागता पाठिंबा दिल्यामुळेच. त्यामुळे आपण सत्तेपासून बाहेर राहु आणि शरद पवार या सरकारचा फायदा उठवतील अशी भिती सेनेला वाटल्यानेच तर विरोधी पक्ष असताना ते सत्तेत आले. हे कसले राजकारण होते?
एकुणच या मुलाखतीचा फायदा शिवसेनेला न होता शरद पवारांचे आणि भाजपचे महत्व वाढवण्यासाठी झाला असेच वाटते.या मुलाखतीत तुम्ही या सरकारचे रिमोट कन्ट्रोल की हेडमास्तर यापैकी कोण आहात असा प्रश्न विचारला गेला. वास्तविक पाहता शरद पवार नसते तर हे सरकार अस्तित्वात आलेच नसते. शिवसेनेचे युतीचे सरकार 1995 ला आले तेंव्हा रिमोट माझ्या हातात आहे असे शिवसेनाप्रमुख सांगत होते. अगदी उघडपणे. त्यामुळे रिमोटशिवाय सेनेचे सरकार चालणार नाही हे नक्कीच होते. आता शिवसेनाप्रमुख नसताना शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा तर त्याचा रिमोट कोणाच्या हातात जाणार? ज्यांच्या हातात रिमोट असला पाहिजे तेच मुख्यमंत्री झाल्यावर सेना काय करणार होती? हा रिमोट आपल्या हातात आहे असे कदाचित संजय राउत यांना भासवायचे असेल. पण जर रिमोट शरद पवारांच्या हातात गेला असेल तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेनेने बाळासाहेबांच्या जागी शरद पवारांना बसवले आहे असे भासवण्याचा हा प्रयत्न होता का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे स्थान कोणीच घेउ शकत नाही. सेनेचा पहिला मुख्यमंत्री झाला तो शरद पवारांची राजवट संपवून झाला होता. त्यांच्याविरोधात सेनेने रान उठवले होते. त्यामुळे त्यांच्या हातात रिमोट गेला तर तो बाळासाहेबांना आवडेल का याचाही विचार करावा लागेल. पण रिमोट हातात नाही तर शरद पवार मातोश्रीवर सारख्या बैठका का घेत आहेत? म्हणजे बर्याचवेळी अजित पवारांचे विसंगत वागणे असह्य झाल्यामुळे ते तसे करत आहेत का? चुपचाप जाउन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे किंवा पारनेरच्या नगरसेवकांना पळवणे आणि पुन्हा सेनेते पाठवणे या कसल्या कुरघोड्या आहेत?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा