चीनचा बुरखा
कारगील विजय दिवसाच्या निमित्ताने देशासाठी प्राणांची आहुती देणाऱया शेकडो हुतात्म्यांची स्मृती रविवारी संपूर्ण देशभरात आपण जागवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या मन की बातमधून याचा उल्लेख केला आणि त्या काळातील देशाचे नेतृत्व करणार्या अटलबिहारी वाजपेयींच्या संयमाचा उल्लेख केला. 1999 साली झालेल्या या युद्धात शांततेच्या अपेक्षेत असलेल्या भारताला उतरणे भाग पडले होते. आज जे चीन करत आहे तेंव्हा ते पाकीस्तान करत होता. त्यामुळे पाकची जशी खोड मोडली तशी चीनची खोड मोडण्यासाठी हा दिवस प्रेरणा घेणारा ठरावा ही अपेक्षा आहे. पाकिस्तानच्या दारात आलेल्या वाजपेयी यांना अभिवादन करण्यास टाळणाऱया मुर्शरफ आणि त्यांच्यासारख्याच माथेफिरू लष्करी अधिकाऱयांनी याच दरम्यान कारगीलमध्ये भारतीय हद्दीत आठ ते नऊ किलोमीटर आत घुसखोरी करून भारताचा सामरिकदृष्टया महत्त्वाचा भाग गिळंकृत करण्याचा डाव रचला होता. सियाचीन टोकाला जाणारा राष्ट्रीय महामार्ग रोखायचा आणि लडाखकडे जाणारी भारतीय रसद, भारतीय सैनिकी ताफ्याची वाहतूक रोखायची त्यामुळे भारताला कायमचा हा भाग सोडून द्यावा लागेल आणि पाकिस्तान, चीन, नेपाळ दरम्यानच्या सगळया सीमेवर हळूहळू भारताला कमकुवत करून येथे कायमची अस्थिरता माजवायची हा त्यांचा डाव होता. आजही चीन आणि पाकीस्तान एक झालेले आहेत. चीनच्या फायद्याचे ते युद्ध 21 वषार्र्पूर्वी पाक हारला होता. भारताने त्यांना धडा शिकवला होता. पण आज हे दोन देश एकत्र झालेले आहेत. ते एकत्रित येउन त्याची पुनरावृत्ती करू शकतात. कोरोनाच्या संकटात भारत सापडलेला असताना त्याचा फायदा उठवत चीन पाकच्या मदतीने काही दुष्कृत्य करू पाहतो आहे. चीन आणि अमेरिका हे दोनही महासत्तांसाठी सरसावलेले देश भारत पाक यांना लढवू पहात आहेत हे यातून दिसणार आहे. त्यामुळे नेमका शत्रू ओळखून आपल्याला धडा देण्याची काही व्यूहरचना आता आखावी लागेल असे दिसते. 21 वर्षांपूर्वी आपल्या शूर सैनिकांनी या कारस्थानालाच मूठमाती देऊन कारगीलच्या डोंगरांमध्ये गाडले. त्याला 21 वर्षे झाली आहेत. पण, म्हणून भारतासमोरचे आव्हान संपले आहे का? जे कारस्थान पाकिस्तानने रचले ते खरोखर केवळ पाकिस्तानचेच होते की त्यामागेही चीन होता, अशी शंका वाटाव्यात अशा घटना नजीकच्या काळातच चीनद्वारे गलवान खोऱयात घडलेल्या आहेत. अधिकृत युद्धाची घोषणा न करता आणि शस्त्रास्त्रांचा वापर न करता पारंपरिक हत्यारांच्या साहाय्याने चीनने डोकलाम भागात जी घुसखोरी केली आणि त्याला अटकाव करणाऱया भारतीय सैनिकांवर हल्ला चढवला त्याची पद्धत शिवाय चीनचे कारस्थान आणि पाकिस्तानचे कारस्थान हे ज्या कारणांसाठी होते ते एकसारखेच असल्याचे दिसून येईल. त्यामुळे तो विजय दिवस आपण साजरा करत असताना, त्यातील हुतात्म्यांना आपण श्रद्धांजली वाहात असताना त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी काही यंत्रणा राबवणे गरजेचे आहे. आज उद्या राफेलची विमाने आणि बरेच काही अमेरिकेतूनही आपल्याकडे येणार आहे. ही युद्ध सज्जता आता आपल्याला कायम राखावी लागणार आहे असे दिसते. 21 वर्षानंतर त्या सर्व घटनांना पुन्हा आठवण्याची गरज निर्माण झाली आहे. 1984 साली भारताने सियाचीन ताब्यात घेतल्याचा राग मनात ठेवून असलेल्या तत्कालीन कमांडो फोर्समधील मेजर परवेझ मुशर्रफ यांना वरिष्ठ हुद्यावर आल्यानंतरसुद्धा हे अपयश सतावत होते. त्यामुळे वाजपेयी आणि नवाझ शरीफ समझोत्याची शिखर परिषद घेत होते तेव्हाच मुशर्रफ कारगीलमध्ये जिथे भारतीय सैन्याने वावर ठेवला नव्हता तिथे आपले सैनिक तैनात करण्यात गुंतले होते. प्रारंभीच्या टप्प्यात मे 1999 मध्ये जेव्हा ही बातमी फुटली तेव्हा तर घुसखोरी ही काश्मिर स्वातंत्र्यासाठी लढणाऱया लोकांनी केली आहे असेच पाकिस्तानी लष्कर म्हणत होते. विशेष म्हणजे भारतीय लष्करालासुद्धा याची कल्पना नव्हती आणि जेव्हा याची माहिती पुढे आली तेव्हाही भारतीय नेतृत्वाला याची कल्पना द्यावी असे तेव्हाच्या लष्करी अधिकाऱयांना वाटले नव्हते. ज्याचे परिणाम पुढे फार मोठया प्रमाणात भारताला भोगावे लागले. प्रयत्नांची शिकस्त करून आणि प्राण हातावर घेऊन सैनिकांनी ही पूर्णतः प्रतिकूल लढाई जिंकली. त्यासाठी 527 भारतीय जवानांनी हौतात्म्य पत्करले तर 1,363 जवान जायबंदी झाले. अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या कणखर आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱया व्यक्तिमत्त्वांनी या घटनेतही जे राजकीय शहाणपण दाखविले, त्याचा भारताला आजपर्यंत फायदा झाला आहे. पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी हे युद्ध फार महत्त्वाचे ठरले. आता गरज आहे ती पाकच्या मागे लपलेल्या चीनचा बुरखा फाडण्याची. कारगील युद्धात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने जो विजय मिळविला त्यामुळेच अमेरिकाही भारताच्या बाजूची झाली. आजही चीनच्या विरोधात ही शक्ती आपल्या उपयोगास आली आहे. तिची मुळे 1999 सालातच आहेत. पण, आजची आव्हानेही मोठी आहेत. कारगीलचे युद्ध भारताने जिंकले म्हणून पाकिस्तान कुरापती करायचा थांबला नाही. पुढे मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. पठाणकोटच्या लष्करी तळावरच हल्ला करण्यात आला. उरी झाले, पुलवामामध्ये भारतीय सैन्याच्या ताफ्यावर आरडीएक्सनी भरलेल्या गाडीद्वारे हल्ला केला गेला. हजारो सैनिकांना मारण्याचा हा कट होता. मात्र गाडी चुकीच्या ठिकाणी धडकली आणि 40 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या सर्वाला त्या त्या वेळी भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. तेव्हा पाकिस्तान पाठोपाठ चीनने आगळीक करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी चीनने डोकलाममध्ये घुसखोरी केली. तब्बल 73 दिवस विविध पातळयांवरील घडामोडी घडल्या आणि नंतर चीनने माघार घेतली. भारतीय सीमेवर हक्क सांगण्याचा होणारा हा प्रयत्न पाठोपाठ नेपाळसारख्या देशाने स्वतःच भारताच्या हद्दीला आपल्या नकाशात दाखविणे या सर्वामागे चीन आहेच. भूतानशी भारताचे चांगले संबंध असल्याने तिथेही त्यांच्या हद्दीवर हक्क सांगून भारतीय सीमा असुरक्षित करण्याचा होणारा प्रयत्न या सर्व घटनांना एकत्रित लक्षात घेतले तर भारतासमोरील आव्हान किती गंभीर आहे याची जाणीव व्हावी. त्यामुळे चीन, पाक, नेपाळ, बांग्लादेश यांच्या एकत्रित शक्तीला नेस्तनाबूत करण्याची यंत्रणा आपल्याला उभी करावी लागणार आहे. यावेळी देशातील एकजूट फार महत्वाची आहे. देशातील राजकारण्यांनी, मोदी विरोधकांनी चीन आणि पाकला प्रोत्साहन मिळेल अशी वक्तव्ये करू नयेत ही जबाबदारी आता लक्षात घेतली पाहिजे. तरच पाकच्या मागचा चीनचा बुरखा फाडता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा