शनिवार, ११ जुलै, २०२०

नृत्याचा ढाचा बदलणार्‍या सरोजखान


सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं. त्यामुळे बॉलीवूडला फार मोठा धक्का बसला आहे. बॉलीवूडबरोबरच सरोजखान यांच्या चाहत्यांनाही तो धक्का बसला आहे. कारण 1980 च्या उत्तरार्धापासून अगदी कालपरवापर्यंत आपल्या आवडत्या हिरॉईनला नाचवणारी नृत्यदिग्दर्शिका म्हणून सरोजखान यांच्याबद्दल प्रेक्षकांना कुतुहल वाटत होते.
 मृत्यूसमयी सरोजखान या 71 वर्षांच्या होत्या. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. पण त्यांचे शरीर स्थूल असले तरी त्या अत्यंत लवचिक होत्या हे प्रेक्षकांनी अनेकदा पाहिले होते. 17 जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु शुक्रवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
याव्यतिरिक्त त्यांना मधुमेह आणि याच्यासंबंधित आजारांशीही झुंज देत होत्या. दरम्यान, त्यांना वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची करोना चाचणीही करण्यात आली होती. परंतु चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
  गेल्या सहा सात वर्षांपासून त्या बॉलिवूडपासून दूर होत्या. परंतु 2019 मध्ये मल्टिस्टारर चित्रपट कलंक आणि कंगना रणोतच्या ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात एक गाणं कोरिओग्राफ केलं होतं. पण नृत्यदिग्दर्शनात गेल्या तीस वर्षात सरोजखान यांनी आपला असा एक ठसा उमटवला होता. सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कोरिओग्राफर होत्या.
1980 च्या दशकाचा उत्तरार्ध सुरू झाला आणि तो धकधकक्वीन माधुरी दीक्षितने गाजवला. पण या माधुरीचे नाव चांगली नृत्यांगना म्हणून गणले जात असले तरी माधुरीच्या नाचाची गोडी ही सरोजखान यांच्या नावाशी जोडलेली होती. हे ना माधुरीने कधी लपवले ना ते लपून राहिले. म्हणजे बॉलीवूडमध्ये पूर्वी एखादा चित्रपट एखाद्या नायकच्या अभिनयाने ओळखला जायचा. एखादा चित्रपट दिग्दर्शकाच्या नावाने ओळखला जायचा. काही नृत्यप्रधान चित्रपट असायचे. म्हणजे सुरवातीच्या काळात नृत्यप्रधान चित्रपट वेगळे असायचे. त्याचे नायक नायिकाही ठरलेले असायचे. अगदीच नृत्यप्रधान चित्रपट असतील तर त्यात संध्या, गोपीकृष्ण अशा किंवा वैजयंतीमाला, आशा पारेख, हेमा मालिनी अशा नृत्य शिकून चित्रपटात आलेल्या नायिकांचे चित्रपट असत. नवरंग, जलबिन मछली सारखे नृत्यप्रधान चित्रपट काढणारे व्ही शांताराम असोत किंवा अन्य निर्माते. पण त्यात एक ठराविक मर्यादा होत्या. चित्रपटावर अभिनेता नाहीतर दिग्दर्शक यांचा अंमल दिसायचा. पण नृत्यप्रधान नसलेल्या चित्रपटातही जागा निर्माण करून लक्षात राहिल असे गाणे नृत्य देण्याचे काम सरोजखान यांच्या दिग्दर्शनातून निर्माण झाले. त्यामुळे प्रत्यक्ष पडद्यावर स्वत: नृत्य न करता त्यांनी अनेकांना नाचवले.
 माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांचा तेजाब हा चित्रपट व्हॉयोलंट लव्ह स्टोरी म्हणून जाहीरात केलेला होता. पण आज तेजाब म्हटले की माधुरी आणि एक दोन तीन या गाण्याने तो ओळखला जातो. यात माधुरीचे नृत्य आणि त्याचे नृत्यदिग्दर्शन करणार्‍या सरोज खान यांचे फार मोठे यश दिसून येते.
1980 आणि 1990 चे दशक अक्षरश: अनेक नवनव्या नायक नायिकांचे पदार्पणाची दशके असली तर त्यात अनेक नायिकांना छानपैकी नाचवण्यात आणि त्या नाचामुळे प्रेक्षकांना ठेका धरायला लावण्यात सरोजखान यांचा वाटा फार मोठा होता. संगित दिग्दर्शकाने गाणे खूप छान तयार केले तरी त्यावर चांगला नाच नसेल तर फियास्को होतो. त्यापेक्षा ते गाणे चित्रपटात का घातले असा प्रश्न निर्माण होतो. पण सरोजखान यांनी चित्रपटात नृत्य दिग्दर्शित करताना आणि ती चित्रित करताना चित्रपट नृत्यप्रधान नसतानाही आपला छाप सोडलेला होता हे फार मोठे योगदान आहे. एन चंद्राचा चित्रपट, आधीच त्यात हिंसाचार भरपूर असणार, त्यात स्थिरावलेला अनिल कपूर, समोर अनेक दिग्गज असताना आजही लोकांना मोहीनी मोहीनी मोहीनी हे शब्द लक्षात राहतात. ही सगळी माया माधुरीच्या सौंदर्याची होती त्याहीपेक्षा त्या सौंदर्याला नाचवणार्‍या सरोजखान यांची मोहीनी त्यात होती. डिंग डॉग डिंग एक दो तीन हे गाणे कुठेही वाजल्यावर गुणगुणला नाही असा माणूसच सापडणे अवघड. अशी कितीतरी नामांकीत आणि हिट गाणी नृत्याच्या अविष्काराने गाजली. त्यात सरोजखान यांचे योगदान फार मोठे आहे.
 माधुरी दीक्षित आणि सरोजखान हे समिकरणच बॉलीवूडला त्यानंतर भुरळ घालणारे ठरले. या दोघींनी अनेक हिट गाणी यानंतर दिली. तेजाब, बेटा, सैलाब, खलनायक ते अगदी देवदासपर्यंत या जोडीने जबरदस्त गाणी दिली.
सरोजखान यांच्या नृत्यदिग्दर्शनाचे वैशिष्ठ्य हे होते की त्या शब्दांना महत्व देत होत्या. त्यामुळे बाकीच्या चित्रपटातील अन्य दिग्दर्शनात जसे गाणे एकीकडे आणि नृत्य एकीकडे असे चित्र असते तसे सरोजखान यांच्याबाबतीत कुठे दिसत नाही. त्यांच्या शब्द, आणि गाण्याच्या ओळीवर सगळ्या स्टेप्स ठरलेल्या असायच्या. त्यामुळे त्यांनी बसवलेला नाच त्याच नायिकेने अन्य कुठेही नंतर केला तरी त्याची स्टेप कधी चुकत नव्हती. पुन:प्रत्ययाचा आनंद मिळायचा. हे माधुरीने अनेकवेळा दाखवून दिले आहे.
कधी कधी गाणी  आणि त्याचे शब्द अश्लिल असतात. पण त्या अश्लिलतेपलिकडे जाउनही चांगला नाच दाखवण्याचे कौशल्य सरोजखान यांच्यात होते. म्हणजे खलनायक हा चित्रपट सुभाष घई यांचा. राजकपूरनंतर सुभाष घईलाच ग्रेट शोमन असे म्हटले जाते. कारण त्याची प्रत्येक चित्रपटात असणारी हीट गाणी. तरीही त्याला लोकगीतावर आधारीत असे गाणे खलनायक यात घ्यावे लागले. हे गाणे म्हणजे त्या काळात प्रचंड चर्चा झालेले,  चोली के पिछे क्या है.. हे गाणे. हे गाणे अन्य कोणीही दिग्दर्शित केले असते तर ते फार अश्लिल किंवा व्हर्ल्गर झाले असते. पण त्या गाण्यातही एकप्रकारची लोकसंस्कृती आहे हे दाखवून हे गाणे सुपरहिट करण्याचे काम सरोजखान यांनी केले. म्हणजे खलनायक विसरले. संजयदत्तचा खलनायकही विसरले, पण सरोजखान यांची चोली मात्र अजूनही लक्षात राहते आणि अधुनमधून कुककुककुककुक कोणी केले तर डोळ्यापुढे ते गाणे येते.
 गाणी हिट असतील तर त्यांना तहहयात सुपरहिट करण्याचे काम सरोजखान यांच्या नृत्यदिग्दर्शनाने केले. त्यामुळेच कोणत्याही कार्यक्रमात चांगल्या घरातील, सुशिक्षीत मुलीही त्या गाण्यांवर नाच करू शकल्या. कोणतेही रिअ‍ॅलीटी शो आपण पाहतो त्यात नृत्याचे कार्यक्रम असतील तर सरोजखान यांच्या दिग्दर्शित नाचाची गाणी जास्त पहायला मिळतात याचे हेच कारण आहे. अगदी याध्ये निंबुडा निंबुडा, डोला रे डोला अशी किती तरी गाणी सांगता येतील।  या गाण्यांचंही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं.
   मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका, या आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. हे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले जातात तेंव्हा सरोजखान यांच्या नृत्यांसाठी तेवढ्याच आवडीने पाहिले जातात.
    सरोज खान यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. 1974 मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाद्वारे त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यांनी आतापर्यंत 2 हजारांपेक्षा अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत. तसंच सरोज खान यांना आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं आहे. काही चित्रपटांमध्ये त्यांनी लेखक म्हणूनही काम केलं होतं.बॉलीवूडमध्ये अत्यंत प्रसन्न चेहर्‍याची आणि भारदस्त व्यक्तिमत्वाची म्हणून सरोजखान ओळखल्या जात होत्या. पण हेच वजनदार भारदस्त शरीर जेंव्हा नृत्यासाठी हालचाली करत होते तेंव्हा त्याची लजाकत, नाजूकपणा षोडष वर्षीय यौवनेला लाजवतील असे होते. ही पावले आज थांबली आहेत. बॉलीवूडचा ताल काही काळासाठी थांबला आहे असेच म्हणावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: